रेल्वेने पहिल्या व दुस-या वर्गाचे मासिक पासाचे दर दुप्पट केल्याने मुंबईकरांच्या संतापाचा कडेलोट झाला असून ही बेसुमार भाडेवाढ २५ जूनपासून होणार आहे.
मुंबई- महागाईच्या आगीत होरपळत असतानाच रेल्वे खात्याने पहिल्या व दुस-या वर्गाचे मासिक पासाचे दर दुप्पट केल्याने मुंबईकरांच्या संतापाचा कडेलोट झाला. ही बेसुमार भाडेवाढ २५ जूनपासून होणार आहे. त्याआधीच दीर्घ मुदतीचा पास काढून या भाडेवाढीचे चटके काही प्रमाणात कमी करण्यासाठी रेल्वे तिकिटांच्या खिडक्यांवर प्रवाशांची झुंबड उडाली आहे.
एकीकडे पैसे वाचवण्याचे प्रयत्न तर दुसरीकडे हा आटापिटा नशिबी आणणा-या ‘अच्छे दिन’च्या भूलथापा देणा-या मोदी सरकारच्या नावाने शिव्यांची लाखोली, असे चित्र रविवारी पाहायला मिळाले. ‘प्रवाशांना आधी सुविधा द्या, त्यानंतरच दरवाढ करा’, ‘आता वाईट दिवस आले’ असा संताप ठिकठिकाणी व्यक्त होत होता. त्याच वेळी सोशल मीडियावर मात्र या दरवाढीचे समर्थक व विरोधक यांच्यात जंगी सामना रंगला होता.
रेल्वे खात्याने पासच्या दरात ‘रेकॉर्डब्रेक’ वाढ केल्याने सर्वसामान्य रेल्वे प्रवाशांचे आर्थिक नियोजन पार विस्कटून गेले आहे. सीएसटी-ठाणे १९० ऐवजी ४८० रुपये, सीएसटी-कल्याण २८० ऐवजी ६४५ रुपये, चर्चगेट-विरार पाससाठी २८० ऐवजी ६४५ रुपये तर चर्चगेट-डहाणू पाससाठी ४४५ ऐवजी १११० रुपये मोजावे लागणार आहेत. या प्रचंड भाडेवाढीने मुंबईकर संतापले आहेत. तर प्रथम वर्गाच्या प्रवासात दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे प्रथम वर्गातून प्रवास करणा-या प्रवाशांनी आता दुस-या वर्गातून प्रवास करण्याचे ठरवले आहे. येत्या बुधवारपासून दरवाढ लागू होणार असल्याने पैसे वाचवण्यासाठी प्रवाशांनी रविवारी सुट्टीचा दिवस असतानाही पास घेण्यासाठी विविध रेल्वे स्थानकांवर रांगा लावल्या. मात्र काही ठिकाणी त्यांच्याकडून नवीन दरानेच पैसे आकारले गेल्याचा आरोप काही प्रवाशांनी केला. मात्र मंगळवारी रात्री १२ वाजेपर्यंत पास काढल्यास जुनेच दर आकारण्यात येतील, असे मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासनाने सांगितले.
या भाडेवाढीचे पडसाद सोशल मीडियावरही जोरदार उमटले. ज्या सोशल मीडियाचा वापर करून मोदी सरकार सत्तेवर आले त्याच सोशल मीडियावर मोदी सरकारच्या विरोधात नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया देत प्रचंड संताप व्यक्त केल्यावर मोदी समर्थक खडबडून जागे झाले. त्यांनी मोदी सरकारच्या दरवाढीचे समर्थन करणा-या प्रतिक्रिया पोस्ट करण्यास सुरुवात केली.
मेगाब्लॉकमुळे रविवारी डब्यात तुफान गर्दी झाली होती. काही डब्यांतील पंखे नेहमीप्रमाणे चालत नव्हते तर मध्य रेल्वेवर अतिशय मंद गतीने धावणा-या जुन्या गाडय़ांच्या डब्यांमधील केवळ फिरण्याचा आभास निर्माण करणा-या पंख्यातून कोणतीही हवा फेकली जात नसल्याने प्रवासी उकाडय़ाने हैराण झाले होते. या प्रवाशांनी सरकारच्या विरोधात मतप्रदर्शन केले. ‘डब्यातील पंखे चालवा, सोयीसुविधा द्या नंतरच दरवाढ करा’ अशा भावना ते व्यक्त करत होते. ‘मोदी सरकार आले आणि पूर्वीपेक्षा वाईट दिवस आले,’ अशा तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांमधून उमटत आहेत.
भाडेवाढ रद्द करा, ऑल इंडिया पॅसेंजर असोसिएशनची मागणी रेल्वेने केलेली दरवाढ प्रवाशांचे कंबरडे मोडणारी आहे. रेल्वेची केलेली भाडेवाढ त्वरित मागे घेण्यात यावी, अशी मागणी ऑल इंडिया पॅसेंजर्स असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केली.
पैसे वाचणार की नाही?
दरवाढ झाल्याने दोन दिवसांत पास काढून पैसे वाचवण्याचा प्रयत्न करणा-या प्रवाशांच्या पदरी निराशा येण्याची शक्यता आहे. रेल्वे भाडेवाढ २५ जूनपासून होणार असली तरी पैसे वाचवण्यासाठी आधीपासून पास काढणा-या प्रवाशांना २५ जूननंतर उर्वरित रक्कम भरावी लागणार असल्याचेही रेल्वेकडून सांगितले जात आहे. तर रेल्वेच्या काही प्रवक्त्यांनी मात्र असे होणार नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आधीपासून पास काढून पैसे वाचवण्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांच्या फलनिष्पत्तीबाबतही प्रवाशांच्या मनात शंका निर्माण झाली आहे.
ग्राहक पंचायत न्यायालयात जाणार
मुंबईतील रेल्वे दरवाढ तब्बल १८६ टक्के असून त्याचे स्पष्टीकरण रेल्वे खात्याने दिलेले नाही. या निर्णयाविरोधात मुंबई ग्राहक पंचायत मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे मुंबई ग्राहक पंचायतच्या प्रमुख वर्षा राऊत यांनी सांगितले. चर्चगेट ते वांद्रे दुस-या वर्गाचा पास सध्या ११५ रुपये असून नवीन दरवाढीनुसार त्यासाठी ३३० रुपये आकारले जातील. हे वाढीचे प्रमाण १८६ टक्के आहे. तर चर्चगेट-डहाणू पाससाठी ४४५ रुपये आकारले जातात. मात्र, नव्या दरानुसार १११० रुपये आकारले जातील. ही दरवाढ १५० टक्के आहे. या भरमसाठ भाडेवाढीपूर्वी प्रवाशांना सुविधा काय देणार याबाबत उल्लेख नाही, असे राऊत यांनी सांगितले.
ह्याला बोलतात थोंड दाबून बुक्यांचा मार…