लहानपणीच्या गावशिवेवर आठवणींचा पाऊस भुरभुरतो आणि कडू गोड क्षणांचा डोळय़ांत पूर येतो. मग दिसते गाभुळल्या लाल चिंचेचं झाड आणि ज्या ठिकाणी ओढय़ात सूर मारला तो हत्ती डोह. गावच्या पाठीचा डोंगर वृद्ध वाटतो. त्याच्यावर आता टीव्हीचा मनोरा उभा राहिलाय. तरी डोंगराची माया अपार आहे. गावातली नवीन उंच घरे मात्र उपरी वाटतात. मात्र शाळा उंच झाल्याची पाहून आक्रित वाटते. परंतु सारं बकाल वाटतं.
कविता ही कवीच्या काळजातला उद्गार असतो. कवितेचा गाव हा कवीच्या काळजात असतो. कविता शोधण्यासाठी कवितेच्या गावा जावे असं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा आपल्याच काळजात डोकवा, गाव तुमच्या हृदयाजवळच आहे. असं सांगण्याचा हेतू असतो. या कवितेच्या गावी आपण डोकावलं तर आपलंच ओळखीचं गाव आपल्याला कवितेत दिसतं. ज्या गावी आपला जन्म झालेला असतो. ज्या मातीत आपण रांगलेले असतो. ज्या मातीत आपण खेळलेलो असतो.
त्या मातीचे रंग, गंध, स्पर्श, एवढेच नव्हे तर पंचभुतांचे संस्कार आपल्या गावीच आपल्यावर झालेले असतात. ते संस्कार घेऊन एखादा कवी जेव्हा आपल्या अनोळखी कवितेच्या शोधात जातो तेव्हा त्याची कविता त्यांचेच संस्कार घेऊन त्यांच्याच शब्दांत साकार होते. हे त्याचे शब्द जेव्हा त्याच्या काळजातून येतात तेव्हा ते कवीला अनुभवांचे एक विलक्षण कर्ज देतात. ते कर्ज घेऊन कवी आपल्या प्रतिभेच्या जोरावर ज्या शब्दांना जन्म देतो ते शब्दच त्याच्या कवितेच्या गावी घेऊन जातात. हे शब्दांचे ऋण फेडत असतो. कारण त्याच्या कवितेतून त्याचं गाव त्याला शब्दाशब्दांतून भेटते. तेही त्याला नकळत मला इतरांचं माहिती नाही पण माझ्या कवितेत मला माझा गाव दिसतो.
जेव्हा काळीज हलते तेव्हा, आपल्या शब्दांना किंमत येते व कविता आपल्या काळजाला भिडते. मग शब्द नकळत मनात येतात.
जेव्हा पडतो पीळ मनाला
तेव्हा ये शब्दांना किंमत
तेव्हा काही म्हणावयाला
आकाशाची होते हिंमत (स्वप्नवास्तव)
आता हे आकाश आहे ते माझ्या गावचं आहे. तसा माझा गाव माळावर वसला आहे. उंचावर असल्याने लांबूनच पाच मैलावरून आपल्याला देवळांची शिखरं दिसतात. त्यामुळे आपला गाव आला या भावनेनेच मी हरकून जातो आणि आपण गहिवरून जातो. सगळय़ा आठवणी गर्दी करतात मधमाशांसारख्या! पण आपण अबोलच राहतो कारण –
रक्त प्रामाणिक मात्र
फक्त मातीलाच राही
धुमसतो नुसताच
शब्द पेटतच नाही (स्वप्नवास्तव)
आणि मुके शब्द जेव्हा बोलके होतात तेव्हा गावातील सा-या आठवणी, त्या शब्दांतून ओसंडून वाहतात. मग कितीतरी गावरान गोष्टी कवितांच्या रूपाने भेटतात मग,
गावरान तू गावामधली
गावामध्ये तुझीच चर्चा
तुला पाहता भल्याभल्यांच्या
मनात पिकती आंबट चिंचा (स्वप्नवास्तव)
मग गावची पहाट डोळय़ांत साचते. तेव्हा,
झाडे देतात आळस
शुभ्र धुक्याची जांभई
डोह-डोळय़ांत अजून
झोप रेंगाळत राही (स्वप्नवास्तव)
मग सकाळी सकाळी शेतावर जाणारी एखादी गावरान पोर आठवते तीही पाठमोरी –
पन्हळ पाठीची चोळी गाठीची
ठसठसेल गं मनी
तरणीताठी होईल साठी
ठसका मारील कुणी (स्वप्नवास्तव)
आणि शहरात आल्यावर गावचे अनुभव अंगावर येतात आणि आठवते,
या शहराच्या उबदार ‘फार’ थंडीत
मज आठवली ती खेडय़ामधली रात
तू आली होतीस रात्रीची रानात
अन् ओठी भाजला हुरडय़ापरी एकांत
मग गावात भेटलेलं पहिलं प्रेम असं आठवतं
एका हातात दळणाचा डबा
एका हातात मेथीची जुडी
ओळखीच्या वळणावर
तुझी माझी झालेली
सरळ भेट! (स्वप्नवास्तव)
मग गावाबाहेर फिरताना
वडाखालती थकला मांठा
वळीत असतो सोंदूर नाडा
म्हातारीही जुळवत असते
झाडूमधला फडा न् फडा..
(स्वप्नवास्तव)
इकडे गावची सकाळ गोरी जेव्हा दवांत न्हाते तेव्हा तिची धुक्याची चोळी चिंब भिजलेली असते. तिच्या पहाट गालावरती वा-याच्या बटा झुळझुळतात आणि पहाटे पहाटे एखादी चांदणी खाली निथळते. मग सकाळ सोन उन्हाचा ओला पदर अंगावर घेते. तिची गवताची वाट पाऊल मेंदीनं रंगते. मग ही गावची सकाळ दवांत न्हाते आणि तशीच ओलेत्याने आपल्या मनात येते. तसा गावी पाऊस बेताचाच पण भुरभूर पावसातही एखादी सासुरवाशीण पहिल्याच पावसात म्हणते,
गेला भिजुनिया चिंब
दारी एकटाच निंब
धनी घराचा गं बाई
गेला लढाईला लांब!
पाऊस संपल्यावर उन्हं लख्ख पडतात तर रात्री सारं गाव अंधाराची घोंगडी पांघरते तर कधी शुभ्र पांढरी चांदण्यांची गोधडी पांघरते. तेव्हा निद्रिस्त डोंगरही धुक्याची चादर अंगावर घेतो. तर माळावरले एकाकी झाड पानांच्या पापण्या मिटून घेते. चिमण्या घरटय़ातले पक्षी फांद्यावर डुलक्या घेतात. एखादा वाट चुकला ढग त्याला साक्षी असतो. त्याला पाडून घाटातील नागमोडी वाट हळूच तो घाट उतरत असते. याच वेळी माझा छोटासा गाव नभातील नक्षत्रांचे शांतीमंत्र म्हणत झोपी जातो. नदीच्या घाटावर वारा उसासा टाकतो तर थकलेला मंद दिवा विसावा घेतो.
तसं माझं गाव माळावरचं. गाव छोटंसं मात्र बाजारपेठ मोठी. साठ साली पाच हजार वस्तीचं गाव नाक्यावर होतं. कारण पूर्वेला फलटण, उत्तरेला पुणे, पश्चिमेला महाड तर दक्षिणेला सातारा. तसा लोणंदचा कांदाही प्रसिद्ध आहे. त्यावेळी माझं गाव एका कुटुंबासारखं नांदत होतं. माळावर भन्नाट वारा.
पाऊस बेताचा. पडला तर वळवाचा. गावाच्या पूर्व पश्चिम दोन मोठे ओढे त्यामुळे ओढय़ाची काठी निंब वड, पिंपळ, जांभूळ, करंजाची खूप झाडी. त्याचा परिणाम म्हणून की काय मी ‘माझे घरटे झाडीत’ ही माझी कविता शाळेत असतानाच लिहिली आणि ती स्वराज्यमध्ये प्रसिद्ध झाली. माझ्या घराच्या अंगणात हिरव्या पिवळय़ा निंबोळीचा खच पडायचा. उन्हं ओटीवर रांगत यायची. कधी अंगणात ऊन पावसाचा खेळ तर कधी चांदण्याचे झुबके रात्री दारात पडायचे. तर सकाळी सकाळी पडवीत उन्हाबरोबर चिमण्यांचा थवा उतरायचा!
कधी सकाळी सकाळी कौलावरती साळुंक्याची गाणी तर दुपारी एकांतात कधी पारवा घुमायचा. परंतु कधी कधी माळावरून वादळवारा यायचा आणि माझं घर वादळात सापडायचं. तसा गावाला पाऊस कमी आला तर वळवाचा पाऊस पडून जायचा. त्यावरच पोटपाणी पिकायचं. गाव तसा सुखी होता. पण चाळीस पन्नास वर्षापूर्वीचा. पन्नास वर्षानी एकदा मी गावी चाललो होतो. तेव्हा –
येताच गाव जवळी मन दूर दूर जाते
वाटेत शैशवाला भेटून मोर होते
लहानपणीच्या गावशिवेवर आठवणींचा पाऊस भुरभुरतो आणि कडू गोड क्षणांचा डोळय़ात पूर येतो. मग दिसते गाभुळल्या लाल चिंचेचं झाड आणि ज्या ठिकाणी ओढय़ात सूर मारला तो हत्ती डोह. गावच्या पाठीचा डोंगर वृद्ध वाटतो. त्याच्यावर आता टीव्हीचा मनोरा उभा राहिलाय. तरी डोंगराची माया अपार आहे. गावातली नवीन उंच घरे मात्र उपरी वाटतात. मात्र शाळा उंच झाल्याची पाहून आक्रित वाटते. परंतु सारं बकाल वाटतं. स्वत:चं घरच परके परके वाटू लागते. त्याहून दु:ख मोठे म्हणजे गावी गेल्यावर पावसाची भेट होत नाही. मग वाटतं आपण हे सारं कसं विसरलो. हिरवा पिवळा माळ लाल तांबडय़ा पाऊलवाटा, बावरलेल्या बाभळबोरी आणि लेकुरवाळय़ा शेळय़ांमागील गावरान अल्लड पोरी, बांधावरली रंगीत रानफुले असे हे झाडीमधले माझे घरटे मी कसे विसरलो. जे वास्तव होते आणि स्वप्नही होते. (कावराबावरा)
पण हे सारं विसरूनही विसरता येत नाही. सारे पुन्हा पुन्हा डोळय़ांपुढे येते. जसजसं वय होतंय तसतसं सारं गाव पुन्हा जवळ जवळ येतंय. कारण
माणसांची नाळ माझ्या अंतरी
तारकांचे गुढ माझ्या अंतरी
हे कसे विसरून जाऊ सांगा तरी।।
कारण आता पन्नास वर्षात गाव बदललाय. तो पूर्वीचा राहिला नाही. म्हणून मी लिहून जातो,
झाडावर कावळे करीत नाहीत
मनासारखी काव काव
गाव राहिला नाही गाव।।
कारण त्यावेळी घरे जरी काडाची होती तरी माणसं हाडाची होती. तेव्हा घराला घरपण होते. आभाळ दिठशी आणि डोंगर पाठीशी होते. झाडांना सावली होती. पाऊस नेमाचा होता, वर्षाव प्रेमाचा होता. हवेहवेसे ऊन होते. उन्हासारखे मन होते. मातीला वास होता, पाण्याला जोश होता. झुळझुळणारे क्षण होते, वारे प्रसन्न होते. घराला घर लागून होते. रस्त्याला रस्ते जागून होते. देवळात देव होता, मनात भाव होता.
परंतु आता गावी गेलो तर गेले देव गेला भाव. मनामनात चोरांचाच शिरकाव. आता घराघरात भिंती आल्या. छप्पर-छप्पर वेगळे झाले. रस्ते वाट चुकले. आता बघून बघत नाही, हसून स्वागत नाही. साव राहिला नाही साव! आता झाड मुके झाले. फूल नकळत फुलत नाही. फांद्यातून मन उमलत नाही. पारावरले वडाचे झाड थकले फार. सावली पडत नाही. निसर्गच जणू आता आपला स्वभाव बदलतोय कारण गाव पुढे गेले आहे. आता गावात मते आली अन् गावाची नीज गेली. फोन आले, विमान आले आणि इमान गेले. यंत्र आले, माणूस गेला. तंत्र आले मंत्र मेला, जणू काय आपल्यावरच कुणी तरी घाव घातला आहे.
कुठून आला गढूळ पूर
फाटला ऊर
होतो आहे रक्तस्रव
गाव राहिला नाही गाव (स्वप्नवास्तव)
पण अजूनही गावाची ओढ कायम आहे. कारण माझ्या आईच्या आठवणी अजूनही माझ्या गावात जिवंत आहेत कारण,
आईच्या तळहाताचा
अंतरात ठसा आहे
आईच्या कारुण्याचा
काळजात ससा आहे (कावराबावरा)
कशी होती माझी आई?
रानात फुले फुलताना
जी कधीच फुलली नाही
ती होती माझी आई।।
या आठवणीबरोबरच गावच्या ओढय़ाची अजून ओढ आहे. त्याच्या डोहात पोहण्याची.
तहानलेल्या शेळय़ामेंढय़ांसह ओढय़ाच्या डोहावर येणारांची. अलगुजातून वा-याची शीळ घालणा-या धनगरांच्या पोरांची, स्वच्छ झ-यावरती पाणी भरणा-या न्हात्याधुत्या पोरींची आणि भर उन्हात धुणी घेऊन येणा-या लेकुरवाळय़ा नारींची. पुराच्या पाण्यात पुलावरून सूर मारणा-या पोरांची.
गावाला वळसा घालून जाणा-या ओढय़ाची आणि ओढय़ाला आलेल्या महापुराची।
पण आज हे सारं गेलं आहे वाहून
‘आज गावचा ओढा आटून गेला तरी
ओढ काही आटत नाही।
मात्र लहानपणीचा ओढा कधी भेटेल
असं आज वाटत नाही।।’
पण हा सारा गाव, त्याचा परिसर, त्याचा निसर्ग माझ्या कवितेतून नकळत आला. त्या आठवणी अजूनही जिवंत आहेत. कारण माझ्या शब्दांना माळावरील गवताचा रंग आहे. जाडय़ा भरडय़ा काळय़ा मातीच्या अबीर बुक्क्याचा वास आहे, ओढय़ातल्या झ-याची खळखळ आहे. पावसाच्या सरींचा ओलेपणा आहे. झाडांच्या पानांची सळसळ आहे. शाळेतल्या गुरुजींचा आशीर्वाद आहे. आता सवंगडी देशोधडी गेले, काही सोडून गेले तरीही मला गाव आहे तसाच वाटतो. अजूनही गावी तशीच ज्ञानेशाची पालखी येते आणि मला अमृताचे अभंग ओवी देऊन जाते.
मग मी ग्यानबा तुक्याला म्हणतो,
तुझाच अभंग
झाला माझा सखा
आता सुख-दु:खा
पार नाही।।
उघडा मनाची
आता माझ्या ताटी
प्राणांचीया काठी
देहगाव।।
आज माझ्या कवितेचे आणि कवितेतील शब्दांचे ऋण फेडल्याचे मला समाधान आहे.
आज कविता अनेक अंगाने फुलते आहे. प्रत्येकाच्या काळजाच्या काठी त्याच्या कवितेचं गाव असेल. माझंही गाव माझ्या काळजाच्या काठी आहे.
मात्र आज कागदास आला भाव
काळजात लिहिले गाणे
शब्द आता लागत नाही
शाईचे काही देणे। (कावराबावरा)
तरी पण आर्त संतकवी चोखोबाच्या शब्दांत म्हणावेसे वाटते,
ऊस डोंगापरी रस नोहे डोंगा
काय भुललासी वरलीया रंगा।।
अप्रतिम कविता लहान पण देगा देवा