ठाणे जिल्ह्यात आजही मोठया प्रमाणावर कृषी संस्कृती तग धरून आहे. मात्र पारंपरिक पद्धतीच्या जोखडात अडकलेल्या या शेतीतून येथील शेतक-यांच्या हाती फारसे काहीच लागत नसल्याचे एकूणच चित्र दिसते. योग्य व्यवस्थापन आणि आधुनिक तंत्रज्ञानाने येथील शेतीला योग्य दिशा दिल्यास या परिसराचा कायापालट झालेला दिसेल. वाडा तालुक्यातील मौजे सांगे येथील प्रयोगशील शेतकरी म्हणून परिचित असलेल्या अनिल पाटील यासाठी शेतक-यांना मार्गदर्शन करत आहे. त्यांनी स्वत: शेतीतून आपल्या उदरनिर्वाहाचे साधन शोधले आहे. आंबा, चिकू यांसारख्या विविध फळांचे उत्पादन घेणा-या पाटील यांनी आता साडेतीन एकरावर पपईची लागवड करून एकरी ४० टनांपर्यंत विक्रमी उत्पादन ते घेत आहेत. यातून दोन ते अडीच लाख रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळत आहे.
एकेकाळी उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी असे बोलले जाई. खते, अवजारे व मजुरी यांचे दर वाढल्याने शेती परवडेनाशी झाली. नोकरदारांची कुटुंबे सुखी-समाधानाने जीवन जगू लागली. यामुळे गेल्या काही वर्षापासून उत्तम नोकरी, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ शेती अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र वाडा तालुक्यातील मौजे सांगे येथील अनिल नारायण पाटील या शेतीनिष्ठ शेतक-याने कनिष्ठ ठरवण्यात आलेली शेती ही आजही उत्तम व्यवसाय ठरू शकते हे आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.
आपल्या सात ते आठ एकर शेतीतून प्रतिवर्षी विविध पिकांमधून २० ते २५ लाख रुपयांचे उत्पन्न घेणा-या अनिल पाटील यांनी आता अवघ्या साडेतीन एकरांमध्ये पपईची लागवड करून एकरी ४० टनांचे उत्पन्न घेण्याचा विक्रम केला आहे. योग्य व्यवस्थापन, अनुभव आणि यांत्रिकी पद्धतीने केलेल्या या पपई शेतीने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे जीवनमान उंचावले आहे.
‘या शेताने लळा लाविला असा की, सुख-दु:खाशी परस्पराने हसलो, रडलो’ हे ब्रीदवाक्य घेऊन शेतीमध्ये रमलेल्या अनिल पाटील या प्रयोगशील शेतक-याला गेल्या वीस वर्षामध्ये अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. १९९२मध्ये तालुकास्तरीय आदर्श शेतकरी पुरस्कार, १९९४मध्ये ठाणे जिल्हा परिषदेकडून प्रयोगशील शेतकरी पुरस्कार, १९९७मध्ये ठाणे जिल्हा परिषदेकडून शेतीनिष्ठ पुरस्कार, २००९मध्ये वसंतराव नाईक कृषी प्रतिष्ठान पुरस्कार (महाराष्ट्र राज्य), २०११मध्ये जायंट्स ग्रुपकडून कृषिभूषण पुरस्कार, २०१३मध्ये दै. ‘प्रहार’कडून राज्यस्तरीय प्रहार भूषण पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी पाटील यांना गौरवण्यात आले आहे. शेतीमधील विविध प्रयोगांमुळे अनिल पाटील यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यांनी राज्यभर तसेच देशभर अनेक अभ्यास दौरे केलेले आहेत.
चीन, सिंगापूर येथील शेतीविषयक अभ्यास दौ-यांत सहभागी होण्यासाठीही त्यांना सरकारच्या वतीने संधी मिळाल्या आहेत. आपल्या शेतीविषयक ज्ञानाच्या वापराआड त्यांनी कधीच संकुचित वृत्ती येणार नाही याची काळजी घेतली. आपल्या ज्ञानाचा इतर शेतक-यांना कसा फायदा होऊ शकेल, याचा त्यांनी सातत्याने विचार केला. ठाणे जिल्ह्यातील शेकडो शेतक-यांना मेळाव्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
आंबा, चिकू, केळी या फळशेतीबरोबरच पाटील यांनी आता पपईची लागवड केली आहे. पपईच्या शेतीवर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले आहे. कोकणामध्ये पपईच्या शेतीचे प्रमाण फारच कमी आहे, जी व्यावसायिकदृष्टय़ा अधिक फायदेशीर ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे. उत्पन्नाचा स्तर उंचावण्यासाठी या शेतीकडे शेतक-यांनी आपले लक्ष वळवले पाहिजे, असे ते सातत्याने सांगतात. कोकणात पावसाचे अतिप्रमाण आणि वेगाने वाहणारे वारे यामुळे पपईची शेती करण्यास शेतकरी फारशी उत्सुकता दाखवताना दिसत नाहीत.
मात्र पपईची योग्य मोसमानुसार लागवड केल्यास ती अधिक किफायतशीर ठरत असल्याचा अनुभव पाटील यांनी सांगितला. पपईची लागवड करण्यास एप्रिल, मे, जून आणि जुलै हा कालावधी अधिक योग्य असल्याचे पाटील म्हणाले. काळी, लाल, मध्यम, हलकी आणि निसरा होणारी जमीन पपईसाठी पोषक समजली जाते. अशा जमिनीत ७ बाय ७ फुटांचे अंतर ठेवून च-या पाडून पपईची लागवड करावी. खत, पाणी व्यवस्थापन आणि रोग नियंत्रणाची बाजू काटेकोरपणे सांभाळल्यास पपई शेती खूपच फायदेशीर ठरते, असे मार्गदर्शन पाटील यांनी शेतक-यांना केले आहे.
आपल्या शेतीमध्ये संपूर्णपणे यांत्रिकीकरणावर पाटील यांनी भर दिला आहे. खत, पाणी देण्यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामुळे त्यांच्या मजुरीवरील खर्चाची बचत होत आहे. रेडलेडी तैवान (७८६) या पपईच्या वाणाची लागवड त्यांनी केली आहे. गेल्या पाच वर्षापासून ते पपईची शेती करत आहेत. या शेतीतून त्यांना मोठय़ा प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळत आहे. मुंबई आणि या शहरालगत पपईसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध असल्याने या फळाला चांगला दर मिळत आहे. पपई हे अति उष्ण फळ समजले जाते. यामुळे उन्हाळय़ात मागणी घटत असल्याने या फळाला प्रति किलो ६ ते ७ रुपये एवढाच दर मिळतो. मात्र हिवाळय़ामध्ये हा दर १० ते १२ रुपयांवर जातो. मुस्लिमांचा पवित्र महिना असलेल्या रमजानमध्ये या फळाला सर्वाधिक मागणी असते. या काळात प्रति किलो भाव १५ ते २० रुपयांच्या वर जात असल्याचे अनिल पाटील यांनी सांगितले.
पपई शेतीसाठी साधारण एकरी ६० ते ७० हजार रुपयांचा खर्च येतो. या शेतीतून एकरी किमान ३५ ते ४० टनांपर्यंत उत्पादन मिळते. याची आर्थिक उत्पन्नाची सरासरी दोन ते अडीच लाखांपर्यंत जात असल्याचे पाटील म्हणाले. पपईच्या पिकामध्ये अंतरपीक घेऊ नये, दीड महिन्यांच्या रोपांची योग्य महिन्यात लागवड करावी, तण काढून टाकावेत, मात्र तणनाशक औषध फवारणी टाळण्याचा सल्लाही पाटील यांनी शेतक-यांना दिला आहे. शेती हा व्यवसाय आहे.
कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी योग्य व्यवस्थापन ही त्याची प्राथमिक गरज असते. योग्य व्यवस्थापन, अनुभव आणि यांत्रिकीकरण यांच्या जोरावरच पपई, केळी, चिकू, केशर आंबे या फळपिकांची शेती आम्ही यशस्वी करू शकलो आणि अधिकाधिक उत्पन्न मिळवू शकलो, असे ते म्हणाले. माझी पत्नी अश्विनी आणि उच्चशिक्षित मुलगा गौतम यांची मदत मिळाल्यामुळेच मी यात यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले.
अनिल पाटील यांनी केलेल्या शेतीला आजवर अनेक तज्ज्ञांनी भेट देऊन त्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक केले. तत्कालीन जिल्हाधिकारी आबासाहेब ज-हाड, मॅगसेसे पुरस्कार विजेते राजेंद्र सिंग, कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय मेहता, मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अरुण सावंत यांनी पाटील यांच्या शेतीला प्रत्यक्ष भेट दिली आहे.
grate papai