राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबतच्या भाजपा नेत्यांच्या वाचाळ भूमिकेवर नागपूर येथे टीकास्त्र सोडले.
नागपूर- ‘जणू काही यांनीच प्रथम सर्जिकल हल्ले केले आहेत, अशा थाटात भाजपा सर्जिकल हल्ल्यांचे राजकारण करत आहे. यूपीए सरकारच्या काळातही चार वेळा सर्जिकल स्ट्राईक केले होते. पण, त्याचा गवगवा आम्ही केला नाही’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि माजी संरक्षणमंत्री शरद पवार यांनी सर्जिकल स्ट्राईकबाबतच्या भाजपा नेत्यांच्या वाचाळ भूमिकेवर नागपूर येथे टीकास्त्र सोडले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात ते बोलत होते.
मनमोहन सिंग पंतप्रधान असताना चार वेळा सर्जिकल स्ट्राईक झाले. देशाच्या सीमा ओलांडून दहशतवाद्यांना धडा शिकवला. मात्र त्यावेळी जाहीर वाच्यता कुणी केली नाही. सध्याच्या नेत्यांमध्ये समज नाही. भाजपा नेते तर स्वत: पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केल्याचा आव आणत आहेत, असा सणसणीत टोलाही पवार यांनी भाजपा नेत्यांना लगावला. आताच्या कारवाईनंतर यात राजकारण न आणता आम्ही भाजपा सरकारला पाठिंबा दिला आहे. परंतु एकच गोष्ट माझ्यासारख्याला खटकते. या घटनेचा गवगवा व्हायला नको होता.
मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, असे सांगून ते म्हणाले, ओबीसींना हात न लावता हे आरक्षण कसे देता येईल याबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शेतकरी आज विस्थापित आहे. तर राजकारणी हाही विस्थापित असतो. सरकार प्रस्थापित असते. अशी व्याख्या त्यांनी केली. मुख्यमंत्री ज्यांना विस्थापित म्हणतात ते आज कुठेच पदावर नाहीत. मात्र पाच वर्षानी हेच विस्थापित पदावर येऊ शकतात, हे मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यावे, अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला. ज्या शेतक-यांचे सोन्यासारखे पीक पावसाने नष्ट होते, असा शेतकरी विस्थापित होतो आणि हे मोर्चे त्यांचेच आहेत याकडेही पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. या सरकारने कुठलीही आश्वासने पाळलेली नाहीत, धनगर समाजाला आरक्षण देतो, असे सांगतले पण तेही आश्वासन पाळलेले नाही.
अॅट्रॉसिटी कायदा रद्द करणे योग्य नव्हे, हा कायदा हवाच, मात्र त्याचा गैरवापर रोखणे आवश्यक आहे, असे मत त्यांनी मांडले. सत्तेबद्दल लोकांना विश्वास असेल, तर लोक रस्त्यावर उतरत नाहीत. मात्र, जिथे विश्वासच शिल्लक नसतो तिथे लोक रस्त्यावर उतरतात. या सरकारबद्दल नागरिकांना केवळ दोनच वर्षात कळून चुकले आहे, की हे सरकार आपले प्रश्न सोडवू शकत नाहीत. त्यामुळेच ते रस्त्यावर उतरले आहेत, अशी टीकाही पवार यांनी केली.
आरक्षणाविषयी त्यांनी तमिळनाडूत ५० टक्क्य़ांपेक्षा अधिक आरक्षण दिले असल्याकडे लक्ष वेधले. याबाबत केंद्र सरकारसोबत चर्चा करायला हवी असेही पवार म्हणाले.
कोपर्डी बलात्कारप्रकरणाचं आरोपपत्र एक महिन्यात दाखल करण्यात येईल, या मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचे काय झाले? या घटनेला तीन महिने होत आले असतानाही अद्याप हे आरोपपत्र का दाखल झाले नाही? असा सवाल त्यांनी विचारला.
नागपूर-मुंबई सुपर एक्स्प्रेस वे प्रकल्पाला विरोध
शेतक-यांना उद्ध्वस्त करून विकास करत असाल तर आम्ही तो होऊ देणार नाही, आम्हाला तो मंजूर नाही, असे सांगत त्यांनी ४६ हजार कोटी रुपये खर्चाच्या नागपूर मुंबई कम्युनिकेशन सुपर एक्क्सप्रेस वे या मुख्यमंत्र्यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या प्रकल्पाला कडाडून विरोध केला. सरकार ज्या पद्धथीने या प्रकल्पासाठी जमीन घेत आहे ते शेतक-यांच्या् हिताचे नाही. लबाडाचे आवताण. हे जेवल्याशिवाय खरे नाही अशी टीका करत त्यांनी येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी रणशिंग फुंकले.
विदर्भ राज्याच्या मागणीबाबत ते म्हणाले की, लोकांच्या भावनेचा आमचा पक्ष आदर करेल. आम्ही लोकांसोबत राहू. लोकभावनेचा सन्मान करू. भाजपावाल्यंनी मात्र आश्वासने देऊनही पाळलेली नाहीत.
निवडणूक आघाडीबद्दल लवकरच बैठक
दुपारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले की, येत्या निवडणुका दोन काँग्रेसने एकत्र लढवण्यासंबंधात चर्चा सुरू आहे. येत्या १५ दिवसांत त्या संबंधात बैठक होईल, असे त्यांनी जाहीर केले.
भाजप Pexa anya virodhi partincya chachyani sergicle strike cha gadarol majvilai,