कनिष्ठ-मध्यमवर्गीय कुटुंबातले, बँकेत नोकरी करणारे सतीश आंबेरकर आपल्या तीन साथीदारांसह सायकलीवरून जगभ्रमण मोहिमेत सहभागी झाले. या मोहिमेत विविध देशांत त्यांना येत गेलेले चित्रविचित्र अनुभव म्हणजे हे पुस्तक. हे अनुभव वाचताना वाचक अक्षरश: गुंतून पडतो नि पुस्तकाशी जणू एकरूप होऊन जातो.
कादंब-या, कथासंग्रह, ललितलेखन आदी उदंड लेखन करत सुमेध वडावाला (रिसबूड) हे नाव आत्मकता/ चरित्र या साहित्य प्रकारात स्थिरावले आणि अधिकच प्रसिद्ध झाले. माझ्या-तुमच्यासारखी सामान्य माणसं वडावालांच्या पत्रिकेत येणं ही जितकं त्यांचं भाग्य तितकंच वाचकांचंही. कारण अशा सामान्य माणसांच्या काहीशा असामान्य जीवनप्रवासास जेव्हा वडावालांची चित्रदर्शी शैली लाभते तेव्हा ते पुस्तक वाचकवर्गात हमखास उचलून धरलं जातं, हा आजवरचा अनुभव आहे. याच शृंखलेत आलेलं नवं पुस्तक ‘दोन चाकं झपाटलेली’ हे सतीश आंबेरकरांच्या जगातल्या २४ देशांत, ३२० दिवसांत केलेल्या सायकलप्रवासावर बेतलेलं आहे.
अति-कनिष्ठ-मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आंबेरकर, त्यांची बँकेतील सामान्य पगाराची नोकरी आणि अशा पार्श्वभूमीवर त्यांना त्यांचा मित्र महेंद्रकुमार व त्याचे तीन साथीदार यांच्याकरता सायकलीवरून जगभ्रमण मोहीम आखण्याची संधी चालून येते. आंबेरकर या आवडीच्या कामासाठी तहान-भूक विसरून तब्बल अडीच वर्षातले सगळे रविवार संशोधन व आखणी करण्यात आनंदाने आणि निरपेक्षपणे घालवतात. इंटरनेट, गुगल, मोबाइल यांचे प्रस्थ न माजलेला नव्वदाव्या दशकातला तो काळ. नियोजित प्रवासातील नाना देश, त्यांमधील सायकलीने कापण्यायोग्य अंतर, प्रत्येक देशाचे व्हिसाचे नियम यांचा काटेकोर अभ्यास करून त्यांनी पृथ्वी व्यापणा-या रंगमंचावर प्लॅनिंगचं भव्यदिव्य नेपथ्य उभारून दिलं, पण आंबेरकरकरांचं भाग्य तिथवरच थांबवलं नाही तर पुढे या मोहिमेतील एक साथीदार गळल्यावर त्याच्याऐवजी मोहिमेत सहभागी होण्याची सोनसंधी आंबेरकरांच्याच गळयात पडली. त्यात त्यांच्या घरच्यांचा, विशेषत: आईचा, बँकेचा पाठिंबा मिळाला आणि ते त्यांच्या साथीदारांसह वर्षभराच्या सायकलसफरीवर निघाले.
इथून पुढे सुरू होतो एक अखंड, चित्तथरारक प्रवास. विविध देशांत सायकलवीरांना येत गेलेले चित्रविचित्र अनुभव वाचताना वाचक अक्षरश: गुंतुन पडतो नि पुस्तकाशी जणू एकरूप होऊन जातो. केवळ अतिथंड (अमेरिका), अतिउष्ण (ऑस्ट्रेलिया) व अतिपाऊस (कॅनडा) अशा टोकाच्या हवामानात सायकली चालवण्याइतकंच हे साहस मर्यादित स्वरूपाचं नाही, तर आयोजकांच्या उदारतेवर अवलंबून असलेल्या या मोहिमेत सतत काटकसर करण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत आहे, भिन्नभाषिक माणसांपर्यंत अन्न-पाण्यासारख्या मूलभूत गरजांसाठी पोचण्याकरता केलेली धडपड आहे तर कधी सायकलचोरी तर कुठे पाकीटमार आणि कधी शहरात कुठेच राहण्याची सोय न झाल्यामुळे विस्थापितांसाठी रस्त्यावर काढलेली रात्र आहे. त्याचबरोबर या जगप्रवासापुरतं एक कुटुंबच झालेल्या सायकस्वारांची, आपसातल्या ‘अहं’ची धुसफूस आणि प्रवासातील सहचारिणी झालेल्या त्यांच्या सायकलींचे रुसवेफुगवे यांचा सामनाही या वीरांना वारंवार करावा लागतो आणि म्हणूनच की काय, पण हे अनुभवकथन केवळ ठोकळेबाज प्रवासवर्णनापुरतं मर्यादित न राहता नाना देशांतील मानवी स्वभावांचे, नात्यांचे सूक्ष्म कंगोरे पारदर्शकपणे दाखवत राहतं. अर्थात अशा प्रकारचे हटके अनुभव, सुक्ष्म कंगोरे पारदर्शकपणे, दाखवत राहतं. अर्थात अशा प्रकारचे हटके अनुभव नि भटक्या जिप्सीचं जीवन प्रवासी कंपनीतर्फे परदेशसफर करणाऱ्यांच्या, एवढंच काय पण त्या त्या देशांत वर्षानुवर्ष राहिलेल्यांच्या भाळीही निश्चितच लिहिलं जाणार नाही. म्हणूनच हे पुस्तक उजवं ठरतं.
अर्थात यामध्ये आंबेरकरकरांच्या भन्नाट अनुभवांचं तितकं योगदान आहे, तितकंच श्रेय वडावालांच्या लेखनकौशल्याला द्यायला हवं. नाहीतर आंबेरकर यांचं खासगी डायरीतलं हे अनुभवविश्व अशी नीटस झळाळी घेऊन कदाचित आलं नसतं. वडावालांच्या मुशीतले हे शब्दसाज त्यांच्या नियमित वाचकाच्या लक्षात आल्यावाचून राहत नाहीत आणि या जोडगोळीच्या सर्व प्रयत्नांना सुयोग्य जोड मिळाली आहे ती संदर्भक्रमांकासहित येणा-या रंगीत छायाचित्रांची. या सगळ्याकडे पुस्तकातील काही छपाईचे वा इतर नगण्य दोष दुर्लक्ष करण्यासारखेच आहेत.
आणि म्हणूनच या सायकलस्वारांचा प्रवास अंतिम टप्पात येतो, तेव्हा त्यांच्याबरोबर पुस्तकाच्या माध्यमातून प्रवास करणा-या वाचकांनाही तो प्रवास व पुस्तक संपत आल्याची हुरहूर लागून राहते. पुस्तक वाचून बाजूला ठेवलं तरी त्यात भेटणारी नाना स्वभावछटांची माणसं उदाहरणार्थ मलेशियाचा गवळी, लंडनचे निरंकारी, वल्गंरीमातील उपाशी भिकारी बराच काळ वाचकाच्या मनात ठाण मांडून बसतात.
झपाटलेल्या दोन चाकांवरून जग फिरून, यशस्वी होऊन आंबेरकर पुन्हा बँकेच्या नोकरीत रुजू होतात. पण त्या हिशोबी, रूक्ष आयुष्यालाही या पुढली मोहीम कुठली करावी, जगावेगळं कुठलं साहस असावं अशा व्यवहारमुक्त, निर्मळ विचारांची कमळं त्यांच्या मनाच्या भरल्या डोहात तरंगू लागतात आणि उत्कर्षबिंदूवर पुस्तक वाचकांचा निरोप घेतं. मुळातच सूरनभी झालेल्या मैफलीला याहून अधिक मधूर भैरवी ती काय लाभावी?
दोन चाकं झपाटलेली : सुमेध वडावाला (रिसबूड)
नवता प्रकाशन
पानं : ३००+३२
किंमत : ३६० रुपये
अमोल्काका खूप छान लिहिलंय..आता he पुस्तक वाचलाच पाहिजे असं वाटत..