प्रत्येक एकांकिका स्वत:चं नशीब घेऊन जन्माला येते. त्याच नशिबाच्या जोरावर यशापयशाचं समीकरण ती मांडते. वैयक्तिक आणि सांघिक कीर्तीचे परिमाण ठरवते. गाजली, नावाजली, बक्षीसपात्र ठरली तर लेखकापासून ते तंत्रज्ञानापर्यंत सर्वाचंच बरं करून जाते. दोन-चार वर्ष प्रेक्षक विद्यार्थ्यांकरवी चघळली जाते. नंतर रिवाजाप्रमाणे लुप्त होते; पण काही एकांकिका जात्याच आपलं दुर्भाग्य आपल्या ललाटी घेऊन येतात. प्रत्येक प्रयोगाकरवी त्या वाखाणल्या जातात, मात्र मुख्य बक्षीसपात्र कधीच ठरत नाहीत. नावाजतात; पण वाजत नाहीत, गाजत तर कधीच नाहीत. अशा वेळी काय होत असेल त्यामध्ये काम करणा-या नटांचं, पडद्यामागे खपणा-या हरहुन्नरी सहका-यांचं? कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना कुणासमोरही हात पसरून आणलेल्या स्वाभिमानी बाण्याचं? उदाहरणं अनेक आहेत..
गेल्या २५-३० वर्षात, वर्षाला दोन-तीन तरी एकांकिका अशा आहेत की, त्यातल्या लेखकापासून ते बॅकस्टेज कलाकारापर्यंत, सर्वाचंच पार मानसिक खच्चीकरण करूनच बंद पडल्या. आता बक्षीस मिळेल, पुढे मिळेल, या स्पर्धेत तर नक्कीच मिळेल.. या आशावादावर सादरकर्ते संघ जीवतोड, अपार मेहनत घेतात; पण पदरी पडलेल्या निराशेला औषध नसतं. परीक्षकांपासून ते समीक्षकांपर्यंत त्या एकांकिकेच्या अपयशाबद्दल तर्कसंगत कारणसुद्धा नसतं. संदर्भहीन संभ्रमाच्या गर्तेत ती एकांकिका गरागरा फिरत राहाते आणि स्पर्धाचं वादळ शमलं की, आपटून धोपटून पार चिंधडया, लक्तरं होऊन पडते.
परवाचीच गोष्ट, फेसबुक्सवर ऑनलाइन होतो. एक फ्रेंड रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. तोच ती व्यक्ती चॅट करायला आली. आभास आनंद नावाचा कुणी लेखक होता. प्रोफाइल चेक केलं तर, तो लेखक असेल याचा अंदाजही येत नव्हता. मुख्य म्हणजे मीदेखील या क्षेत्राशी निगडित असेन याची सुतराम कल्पना त्याला अद्यापही नाहीये. चॅट करताना मी ती दक्षता घेतलीय अथवा घेतली होती म्हणू क्षणभर. मग त्याने स्वत: लिहिलेल्या नाटकांची यादी वाचायला सुरुवात केली. पहिलंच नाटक ‘कल्लोळ’..! माझं नुकतंच कॉलेज पूर्ण झालेलं.
विश्वजीत जाधवला आम्ही सांगायचो, ‘नाटकात निर्माता म्हणून करिअर करायचंच असेल तर ‘फॉर्म्युला’ नाटक घेऊन सुरुवात कर; पण तो काही ऐकला नाही. ‘कल्लोळ’वर लावलेला पैसा, अरुण नलावडे, अजय फणसेकर, सुकन्या कलकर्णी, विवेक लागू, अनंत अमेंबलसारखी नामावली असतानाही विश्वजीतच्या चार गाडय़ा देशोधडीला लावून बंद झालं. मग त्या आभास आनंदशी चॅट करताना अनेक असफल एकांकिकांची नावं वाचली आणि मला आजच्या कॉलमसाठी विषय मिळाला.
१९८१-८२ ची गोष्ट. साहित्य संघ मंदिर, उन्मेष फायनलसाठी तुडुंब भरलेलं. सतीश पुळेकर आणि सिद्धार्थ कॉलेज भलतेच फॉर्ममध्ये होते. त्याच वर्षी सिद्धार्थ महाविद्यालयाची ‘धींड’ प्रचंड गाजत होती.
आताचे रंगभूमी आणि चित्रटसृष्टीत गाजत असलेले जवळपास सर्व विनोदी कलाकार त्यात होते. प्रदीप पटवर्धन, प्रशांत दामले, विजय पाटकर, जयवंत वाडकर, हर्षराज शिवशरण, कामिनी केणी (आता कुठे आहे, माहीत नाही) अशी टीम बघायला थिएटर खचाखच भरलेलं असायचं. त्याआधी एन. एस. कॉमर्सची सव्यासाची देब बर्मन दिग्दर्शित ‘असतो मा.. सद्गमय’ सुरू झाली आणि अतिप्रयोगिकतेच्या आहारी गेलेल्या सादरीकरणामुळे प्रेक्षकांच्या सहनशीलतेचा बांध तुटला. पहिल्यांदा प्रेक्षकांतून शेरेबाजी सुरू झाली, नंतर हुयरे करणा-या कमेंट्स, नंतर-नंतर गोंधळ सुरू झाला.
प्रेक्षक नाटक ऐकूनच घेईनात. प्रेक्षागृहातील लाइट्स लावले गेले. थोडीफार शांतता पसरली; पण बाल्कनीतल्याचं काय? परीक्षक उभे राहून एकांकिका पाहण्याची विनंती करतायत; पण हुल्लडबाजीला आलेला ऊत काही कमी होईना.. यात महत्त्वाची आणि रंगभूमीवर काम करणा-या प्रत्येक नटाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट एकच होती की, प्रेक्षागृहात एवढा गोंधळ सुरू असूनही एकांकिका कुठेही थांबली नव्हती. एन. एम. कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी आपला परफॉर्मन्स देतच राहिले.
पुढे स्पर्धेचा निकाल काय लागला वगैरे बाबींवर चर्चा करत बसण्यापेक्षा, त्या कलाकारांना बसलेली धडकी पुढे कधीच भरून येऊ शकली नाही. कलाकारांनी जणू त्या प्रसंगाने आत्मविश्वासच गमावला होता. ती एकांकिका त्या प्रयोगानंतर कधीच यश मिळवू शकली नाही. अशीच पण थोडय़ाफार फरकाने साम्य असलेली कारणं दरवर्षी तरी महाविद्यालयाच्या, संस्थेच्या अथवा कलाकारांच्या नशिबी येतातच. काही एकांकिका तर अंतिम टप्पा गाठतात; पण पहिल्या तिनात येण्याचं भाग्य त्यांना कधीच प्राप्त होत नाही. सहा वर्षापूर्वी माझ्याच एका एकांकिकेच्या वाटयाला हे नशीब आलं होतं. पाल्र्याचं साठे महाविद्यालय ‘अळीचा अजगर झाला, त्याचा पंचनामा’ नावाची एकांकिका सादर करीत असे.
बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या दुर्दैवी जीवांना ‘जीवन वीमा’ मिळत नाही, असा साधा विषय त्यात मांडला होता. एक एमबीए झालेलं प्रेमीयुगुल एका कॉर्पोरेट इन्शुरन्स कंपनीत कामाला आहे. दररोज संध्याकाळी एकत्र मिळून घर गाठणं आणि जाता जाता भावी आयुष्याची स्वप्नं रंगवणं हा जणू एक प्रवासक्रम. त्या स्वप्नातच मुलगी, त्याच्या आई-वडिलांना आणि तो मुलीच्या आई-वडिलांना भेटून येतात. लग्नाचं नक्की होतं आणि त्याच रेल्वे डब्यात बॉम्बस्फोट होतो. एकांकिकेच्या लिखाणाची बांधणीच अशी केली होती की, शेवटपर्यंत ती दोघे जिवंतच भासतात. ना बॉम्बस्फोटाचं दुष्य, ना विषयाच्या गदारोळाचं अवडंबर.. साध्या सरळ अभिनयाच्या दृष्यात्मकतेवर एकांकिका संपत असे.
विषयाचं नावीन्य म्हणून एकांकिका पाहिल्यावर भले-भले माझ्याशी विषयानुरूप चर्चा करत. एकांकिका आवडल्याचं सांगत; पण परीक्षकांच्या दृष्टीने त्यात काहीतरी ‘मिसिंग’ होतं. दिग्दर्शक प्रमोद शेलारने नाटय़बांधणीवर खूप मेहनत घेतली होती; पण कुठल्याही स्पर्धेत त्या एकांकिकेने पहिल्या तिनापैकी एकही नंबर कधी पाहिलाच नाही. त्या वर्षी आयएनटी फायनलचा रिझल्ट लागला; पण कलाकारांना वैयक्तिक प्रशस्तिपत्रकं देणाराच..! त्यात नेमकं काय ‘मिसिंग’ होतं कुणास ठाऊक? आजपर्यंत कुणीही परीक्षक नेमकं कारण सांगू शकलेला नाही. पुढे ती एकांकिका हेमंत भालेकर आणि रघुनाथ कदम यांसारख्या दिग्गज दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या पद्धतीनेही केली; परंतु त्याच्याही वाटयाला आलेलं अपयश आजही अनाकलनीय आहे.’
स्पर्धेची समीक्षा लिहिताना रवींद्र पाथरे आणि संजय कुलकर्णी या दोघांनी तर एकांकिकेला डोक्यावर घेतलं होतं.. ‘ही खरी एकांकिका..’ असे समीक्षेत म्हणणा-या संजय कुलकर्णीलादेखील अपयशाची कारणं देता आली नव्हती. पारितोषिकांच्या बाबतीत एक दुर्दैवी एकांकिका असेल, असं तिचं वर्णन करावं लागेल. मला दुर्दैवी वाटलेल्या आणि अपयश वाटय़ाला आलेल्या अशा एकांकिकांची मोठी यादीच मी या ठिकाणी देऊ शकतो. त्यात प्रामुख्याने सतीश पुळेकरांची ‘नदीकाठचा परकार’, जोशी बेडेकर ठाणे महाविद्यालयाची ‘आमच्या येथे श्री कृपेकरून’, जे.जे.ची ‘कुका’, रुईयाची, राकेश सारंग अभिनित आणि प्रमोद पवार दिग्दर्शित पु. लं. च्या व्यक्तिरेखेवरील ‘नंदा प्रधान भाग दोन’, रवी कुरसुंगेची ‘माणसं बहुतेक’, किशोर कदम, गणेश यादव यांची चेतना महाविद्यालयाची ‘अडलंय माझं थेटर’, गजेंद्र अहिरेची ‘ओल्या रात्रीची कथा’, विनय आपटे, विक्रम भागवतची ‘अनुभव’, विश्वास सोहोनीची ‘बसंती वेड्स गब्बर’, अनिल बांदिवडेकरांची ‘अव्यक्त’, रमेश कुबलांची ‘गर्दभाचे मनी’, अंबर हडपची ‘समुद्र’ अशी जवळपास शे-सव्वाशे एकांकिकांची यादी गेल्या २५ वर्षात सहज देता येईल.
यंदाच्या २०१३च्या मौसमातसुद्धा अशीच एक एकांकिका पदोपदी कमनशिबी ठरत होती. साठे महाविद्यालयाची ‘लवकरच रंगभूमीवर’ नावाची एकांकिका सर्वागाने परफेक्ट होती. मी परीक्षक असलेल्या दोन्ही स्पर्धामध्ये ती अंतिमला होती; परंतु नशिबाचं गणित शेवटच्या क्षणी चुकायचं आणि एकांकिका निकालातून बाहेर फेकली जायची. अभिनय शास्त्रात मैलाचा दगड समजली गेलेली ‘स्तानोस्लावोस्की मेथड’ अंगीकारून नाटक दिग्दर्शित करणारा लेखक, निर्मात्याने क्षुल्लक समजून केलेल्या हेटाळणीला न जुमानता पुनरुज्जीवनाचं नाटय अधोरेखित करणारी ही एकांकिका होती.
मुंबईच्या शिवाजी मंदिर आणि लंडनच्या ब्रॉडवे थिएटरचं अप्रतिम मिश्रण, मरलिन मॉन्रो या जगविख्यात नटीच्या शोकांतिकेचं उपकथानक सादर होताना, काही सुखावह पाहतोय, याची जाणीव पदोपदी करून देत असे. साठे कॉलेजची टीम जीव तोडून सादरीकरण करतेय, याची जाणीव निर्माण होत असे. एक रिस्की एकांकिका असं मी ‘लवकरच रंगभूमीवर’चे वर्णन करेन. सादरीकरणात दिग्दर्शकाने प्रचंड रिस्क निर्माण करून ठेवली होती. नाटकाची सुरुवात प्रेक्षकांतून होते. त्यानंतर प्रेक्षागृहाचा वापर ३ ते ४ वेळा केला जातो. एकांकिकेत ४ व्यक्तिरेखा ‘फॉरेनर’ होत्या. त्यांचे संवाद इंग्रजी भाषेतच होते.. उगाच ठिगळं लावलेलं मराठी, पात्रांकरवी बोलायला लावण्याचा अट्टहास लेखकाने मांडला नव्हता.
एक नाटक ब्रॉडवेला चालतं आणि एक मुंबईच्या शिवाजी मंदिरमध्ये. या दोहोंमधलं अंतर दाखवणारं नेपथ्य तर लाजबाब होतं. काही सेकंदात होणारा ‘चेंजओव्हर’ थक्क करून टाकत असे. शिवाय प्रसंग बदलांसाठी नाटकांच्या जाहिरातीच्या बोर्डाची कल्पक ‘मूव्हमेंट’ टाळ्या मिळवत असे. सर्व पात्रं मन लावून कामं करत. कशा कशात कमी नसलेली एकांकिका नंबरात मात्र कधीच नव्हती. माझ्या माहितीनुसार या एकांकिकेने निदान ८ ते १० स्पर्धा तरी नक्कीच केल्या होत्या; परंतु अपयशाचं बाशिंग किती ठिकाणी बांधून घ्यायचं? शेवटी व्हायचं तेच झालं. एकांकिका ‘बंद’ झाली. प्राथमिक फेरीनंतर संबंधित मंडळी एकांकिकेबद्दल चर्चा करत. सादरीकरणात काय हवं, काय नको, या विषयी चर्चा होई.. पण डाव्या अंगांचा प्रश्नच नव्हता.
दिग्दर्शक स्वप्नील कोकाटे लीन होऊन आम्हा परीक्षकांची मतं जाणून घ्यायचा. आवश्यकतेनुसार थोडेफार बदलही करायचा; पण ते जाणिवेच्या पातळीवर परीक्षक मंडळींना दखलपात्र कधीच वाटत नसतं. महत्त्वाची गोष्ट एकच होती ती म्हणजे, प्रतिस्पर्धी असलेल्या एकांकिकांचे विषय..! इतर एकांकिका विषयाच्या अंगाने तगडया असल्याकारणाने ‘लवकरच रंगभूमीवर’ कानाला धरून बाहेर काढल्या जायच्या. शेवटी-शेवटी तर बाहेर काढण्यासाठी ही एकांकिका आत घेतलीय का? अशी विचारणा झाल्याचंही कानावर आलं होतं. फेसबुकवरून दररोज केलेली जाहिरात, त्या जाहिरातीसाठी वापरलेली कल्पक स्लोगन्स तरुण प्रेक्षकवर्गाला नक्कीच आकर्षित करणारी होती. जुई चाळके, आचल चंडेल, कल्पेश चव्हाण, सोहम काळोखे, रोहन जाधव हे महाविद्यालयीन विद्यार्थी कायम उत्तेजनार्थकच राहिले. लेखक हेमंत-संध्याचं लिखाण नक्कीच विचारात घेण्याजोगं होतं. साठे महाविद्यालयाचे प्राध्यापक माधव राजवाडे शेवटपर्यंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत राहिले; परंतु पदरी पडणा-या निराशाने साथ काही सोडली नाही.
हे सर्व लिहिण्यामागचं कारण एकच आहे की, आपण नेहमी ‘जय’ नावाचा इतिहास वाचत असतो, पाहत असतो. तशी परंपराच रूढार्थाने रुजलीय. महाभारतातील पहिलं वाक्यच ‘‘ऐक, जनमेन्जया, हा जय नावाचा इतिहास आहे..’’ असं आहे. धर्मवीर भारतींचं ‘अंधायुग’ आलं आणि नाटय़ अभ्यासकांचे डोळे उघडले. पहिल्यांदा कळून चुकलं की, ‘पराजय’ नावाचाही इतिहास असू शकतो. जो लिहून ठेवला गेला पाहिजे. पराजयाची कारणमीमांसा अभ्यासली गेली पाहिजे. त्याची नोंद पुढील पिढीसाठी अभ्यास ठरू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती कारणमीमांसा सादरकर्त्यां नाटय़कर्मीना पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरू शकते..! कारण कुठलाच ‘पराजय’ हा क्लेशदायी कधीच नसतो.. तो ‘जय’ नावाच्या इतिहासाची नांदी ठरतो..!
Very True