देवेंद्र गंगाधर फडणवीस यांनी महाराष्ट्रातील सगळी वृत्तपत्रे शांतपणे आपल्या डोळय़ांसमोर ठेवली तर गेल्या काही दिवसांत वृत्तपत्राच्या कोणत्याही पानावर महाराष्ट्रात झालेले अन्याय, अत्याचार, बलात्कार, खून, भोसकाभोसकी, विनयभंग अशा सगळय़ा बातम्यांनी वृत्तपत्रे भरून गेलेली आहेत.
वृत्तपत्राच्या पहिल्या पानापासून आतल्या सर्व पानांत तुमच्या सरकारने आणि तुम्ही, जे फक्त एकटेच मुख्यमंत्री म्हणून वावरता त्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या २० महिन्यांच्या कारभारात मनाला समाधान वाटणारी कोणती बातमी वाचायला दिली आहे का? याची कल्पना महाराष्ट्राला द्या. ‘जलयुक्त शिवार, जलयुक्त’ शिवाय ही काँग्रेसची ‘शेततळी’ निर्माण करण्याची मूळची योजना तुम्ही तुमच्या नावावर खपवून तुम्ही चांगले पावसाने भरलेल्या तळय़ासोबत फोटो काढून पाठ थोपटून घेतलीत. पण समाजजीवनातील रोजचे जीवन किती असुरक्षित आणि भयावह वातावरणाचे झाले आहे, याची दखल तुम्ही घेत नाही.
ज्या थाटात तुम्ही बुधवारी कोपर्डी भीषण अत्याचार आणि नंतर त्याच मुलीचा झालेला खून त्याबद्दल जे भाषण केलेत त्या भाषणात महाराष्ट्रात असा प्रकार पुन्हा घडू देणार नाही, याची हमी विरोधी पक्ष मागत होता, तशी हमी तुम्ही दिली नाहीत. कारण तुमचा आणि तुमच्या गृहखात्याचा धाक पोलिसांना राहिलेला नाही. त्यामुळेच वृत्तपत्रांतील रोजच्या बातम्या पाहून तुमचे राज्य खरंच कसे चालले आहे, हे तुमचे तुम्हीच ठरवा. बुधवारी तुम्ही उत्तर देत असताना नवी मुंबईत स्वप्नील सोनावणे या कोवळय़ा तरुणाची हत्या नेरूळ येथे करण्यात आली. कारण काय? तर आंतरजातीय प्रेमसंबंधांतून त्याला लाथा-बुक्क्यांनी तुडवून मुलीच्या वडिलांनी मारले आणि रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
तिकडे विधान परिषदेतील भाषणात कोपर्डी घटनेची महाराष्ट्राला शरम वाटते, असे सांगत होतात. नेरूळच्या घटनेचे तुम्हाला काय वाटले? ती घटना तुम्हाला माहिती होती की नाही? नवी मुंबईच्या पोलिसांनी गुन्हा नोंदवायला गेलेल्या सोनावणे कुटुंबीयांना हाकलून दिले. त्यांची तक्रार दाखल करून घेतली नाही आणि सोनावणे कुटुंबीय जेव्हा मुलीच्या वडिलांची माफी मागायला गेले तेव्हा त्या मुलाला लाथा-बुक्क्यांनी तुडवले. मंगळवारी झालेला हा प्रकार. बुधवारी सकाळी त्याचा मृत्यू. बुधवारी संध्याकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार. विधानसभेतील तुमचे भाषण बुधवारचेच. त्या भाषणातील शब्द विरतात न विरतात तोच स्वप्नील सोनावणेच्या आयुष्याचे स्वप्न भंगले. शाळेचा पहिला दिवस गुरुवारी होता. पहिल्या दिवशी तो शाळेत जाऊ शकला नाही. लहान वयात तरुण मुलांनी या प्रेमचाळय़ांत पडावे का? हा वेगळय़ा चर्चेचा विषय होऊ शकेल. पण मुख्य आक्षेप पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही, हा आहे. जसा कोपर्डीला दखल न घेतल्याचा आक्षेप आहे, तीच गोष्ट नवी मुंबईत घडली.
किंजल नावाच्या मुलीची तिचा प्रियकर देवेंद्र भोसले याने हत्या केल्याची कबुली दिली आहे. त्या बातमीचे स्वरूप काहीसे वेगळे आहे. अॅसिड फेकण्याची धमकी देत एका अभिनेत्रीवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली आहे. हे सगळे गेल्या ४८ तासांतील गुन्हेगारी जगतातील भीषण गुन्हे आहेत. हा तपशील सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की, देवेंद्र फडणवीस साहेब, बुधवारी विधानसभेत तुम्ही ज्या हुशारकीने सांगत होतात की, मी एकटाच मुख्यमंत्री आहे आणि एकटाच मुख्यमंत्री सक्षम आहे! तर तुम्ही खरोखर सक्षम आहात का? राज्यात काय सुरू आहे याची तुम्हाला माहिती आहे का? दिसायला तरी असे दिसते आहे की, तुम्ही आणि तुमचे सरकार अशा विषयांत अजिबात गंभीर नाही. बुधवारी बोलताना सांगितले की, गोवारी हत्याकांडातही त्यावेळचे मुख्यमंत्री (शरद पवार) मृत्यू झालेल्यांच्या घरी गेले नाहीत. हा संदर्भ देताना तुम्ही कोपर्डीला न जाण्याच्या समर्थनासाठी गोवारी हत्याकांडाचा संदर्भ वापरलात. हा संदर्भ तद्दन चुकीचा आहे. गोवारी हत्याकांड चेंगराचेंगरीतून झाले. एकमेकांनी एकमेकांना तुडवले गेल्यामुळे काही जणांचा मृत्यू झाला.
१०० जणांच्या घरी जाणे त्यावेळी कोणालाही शक्य नाही. शिवाय गोवारी हत्याकांडात त्यावेळचे आदिवासी मंत्री मधुकर पिचड यांचा राजीनामा घेतला. एवढा संदर्भ तरी तुम्ही सांगायला हवा होतात. तुम्ही कोपर्डीला गेला नाहीत; पण केसरकरांचा राजीनामा घेतलात का? तुम्ही राजीनामा दिलात का? शिवाय गोवारी हत्याकांड आणि कोपर्डीची घटना यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. इथे एका मुलीला एकाकी पकडून तिच्यावर बलात्कार होतो, तिचे हातपाय तोडतात, मान चिरतात हा गुन्हा तुम्हाला साध्या गुन्ह्यासारखा वाटतो का? तेव्हा गोवारी हत्याकांडाचे जे उदाहरण तुम्ही दिलेत ते कोपर्डीच्या घटनेशी कुठेही मिळतेजुळते नाही. गोवारी हत्याकांडानंतर इथे त्याच मुख्यमंत्र्यांनी गोवारींचे स्मारक उभारले. तुम्ही पैशांचा हिशेब मांडून दहा लाख रुपये पाठवल्याचे सांगितले. मुलीचा जीव गेला त्याची किंमत तुम्ही अशी पैशांत कशी काय करता? तुमच्या त्या सभ्य भारतीय संस्कृतीत आणि तुमच्या भाजपाच्या चारित्र्याच्या गप्पांमध्ये माणसाच्या जीवाचे मोल असे पैशात होऊ शकते का? पैसा पाठवलात यात फार मोठी हुशारी केलीत, असे समजू नका. या घटनेनंतरच नेरूळची घटना घडली. अॅसिड फेकून एका अभिनेत्रीची हत्या करण्याची घटना घडली आहे. हे प्रकार थांबलेले नाहीत.
गुन्ह्याचे स्वरूप वेगळे असेल, गुन्हा करणा-यांची वृत्ती वेगळी असेल, गुन्ह्यांची कलमे वेगळी असतील, पण कायदा-सुव्यवस्थेच्या ठिक-या उडालेल्या आहेत, एवढे तरी तुम्हाला मान्य करावेच लागेल. नाही तर तुमचीच फजिती होईल. बुधवारी तुमचीच फजिती झाली. तुम्ही जोरात भाषण केलेत. गुरुवारच्या वृत्तपत्रांनी तुमच्या भाषणाला प्रसिद्धी दिली आणि बाजूलाच स्वप्नील सोनावणे याच्या हत्येची बातमी छापली. तेव्हा तुमचे भाषण क्षणात वाया गेले. बोलबच्चनच्या भाषणाने काही होत नसते. चिमटे काढणे फार सोपे आहे हो. शेवटचे भाषण करणा-याला ती संधी नेहमीच असते. याच अधिवेशनात शेवटचे भाषण करताना तुमच्यावरही तशी वेळ येईल. म्हणून फार जोरात बोललो, असे सांगू नका.
महाराष्ट्र अस्वस्थ आहे. अस्वस्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आपण स्वत:च कार्यक्षम आहोत, अशी जाहिरात करत बसले. अहो फडणवीस, तुम्ही कार्यक्षम आहात हे तुम्ही कसे सांगता? हे लोकांना सांगू द्या ना.. लोकांनी जर म्हटले की फडणवीस कार्यक्षम आहेत तर गोष्ट वेगळी आहे. लोकांच्या पाठिंब्यावर निवडून आलो, अशी हुशारकी तुम्हाला मारता येते. पण ते लोक जेव्हा मागे लागतील त्या दिवशीचे फडणवीस सिव्हिल लाईन नागपूर येथेच असतील. बोलाची कढी बोलाचाच भात फार काळ राहात नाही. अकारण मोठा आव आणू नका. तुमचे राज्य चांगले चाललेले नाही. खून, दरोडे बलात्कार आणि अत्याचाराचे हे राज्य आहे, हे रोजची वृत्तपत्रे तेच सांगत आहेत.
वरील लेख हा आदिवासी गोवारी जमातीवर अन्याय करणारा आहे. मुख्यमंत्री साहेबांनी दोन्ही गोष्टी एकत्र करायला नको होत्या परंतु निष्पाप गोवारी संदर्भात आपले लिखाण मानवतेला काळीमा फासणारे आहे आणि जाती पातीची जी किड तुमच्या डोक्यात आहे त्याची जाणिव करुन देणारी आहे.