दुबईस्थित फिरोज जी. मर्चंट या अनिवासी भारतीय उद्योगपतीने तुरुंगांत खितपत पडलेल्या ३७०० कैद्यांना मदतीचा हात दिला.
दुबई- शाळा, रुग्णालयांची उभारणी आणि अन्य सामाजिक उपक्रमांसाठी जगातील दानशूर उद्योगपती लाखो डॉलरची मदत देत असतात. मूळचे मुंबईकर असलेल्या दुबईस्थित फिरोज जी. मर्चंट या अनिवासी भारतीय उद्योगपतीने मात्र येथील तुरुंगांत खितपत पडलेल्या ३७०० कैद्यांना त्यांच्या घरी परतण्यासाठी दिलेला मदतीचा हात हा समाजात अद्याप माणुसकी जिवंत असल्याची पावती ठरली आहे. शिक्षेचा कालावधी संपल्यावरही केवळ घरी जायला विमानाच्या तिकिटाचे पैसे नाहीत म्हणून यातील अनेक कैदी तुरुंगात खितपत होते. या सगळ्यांना तिकिटाचे पैसे मर्चंट यांनी दिलेच शिवाय, त्यांची सर्व देणीही फेडून टाकल्याने ते या कैद्यांसाठी जणू देवदूत बनले आहेत.
फिरोज मर्चंट हे संयुक्त अरब अमिरातीतील मोठे उद्योगपती असून त्यांची तयार दागिन्यांची कंपनी आहे. तुरुंगवास पूर्ण झालेल्या कैद्यांना घरी जायला विमानाचे तिकीट आणि कैद्यांच्या नावावर असलेले गृह, कार, क्रेडिट कार्ड, शैक्षणिक कर्जाची फेड असा त्यांचा उपक्रम गेली काही वर्षे सुरू आहे. त्यासाठी त्यांनी ६ कोटी रुपये खर्च केले आहेत.
तुरुंगातील शिक्षा संपल्यावरही अनेक कैदी केवळ पैशाअभावी तेथेच खितपत पडतात. शिक्षा संपल्यावर त्यांना घरी जाऊन कुटुंबीयांना भेटण्याची ओढ असते. त्यामुळे आपण त्यांना मदत करतो, असे मर्चंट यांनी सांगितले.
आर्थिक मंदीमुळे शेकडो कामगारांचा रोजगार गेला. त्यांना कर्ज फेडणे अशक्य झाले. हे कैदी मोठे गुन्हेगार नाहीत. अपरिहार्य परिस्थितीमुळे त्यांना तुरुंगात जावे लागले. त्यांच्या मदतीसाठी हे समाजकार्य सुरू केले. मला जितके शक्य होते तेवढी मदत करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.
भारतासहित बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया, फिलीपिन्स, इंडोनेशिया, इथिओपिया आणि मोरोक्को आदी देशांच्या कैद्यांना त्यांनी ही मदत केली आहे. बलात्कार, अंमली पदार्थ आणि खून प्रकरणातील कैद्यांना ते अशी मदत करीत नाहीत. यंदा किमान १ हजार कैद्यांची या उपक्रमाद्वारे त्यांच्या कुटुंबीयांशी पुनर्भेट करवून देण्याचा त्यांचा मानस आहे.
श्री फिरोज मर्चन्ट साहेबांनी जो उपक्रम हाती घेतला आहें तो फार मोठा आणी अतुलनीय आहें. विविध कारणे अनेक भारतीय नागरिक दुबई व इतर आखाती भागात तुरुंगात जातात व शिक्षा संपल्या नंतर ही त्यांना पैशा अभावी मायदेशी परत जाता येत नाही.भारतीय दूतावास व इतर अनेक सामाजिक संस्था त्यांना जमेल तेवढी मदत देतच. असतात. परंतू स्वखर्चाने ३००० लोकांना विमानाचे तिकीट व त्या सर्वांच कर्ज फेडणे हे फार खर्चिक आहें. आणी त्या साठी फार विशाल आणी दानशूर मनाचाच माणूस हे करूशकतो .अल्ला त्याचं नेहमी रक्षण करो त्यांना उदंड आयुष्य लाभो व त्यांच्या उद्योगांत त्यांना यश मिळो.