विधान परिषदेच्या निवडणुकीतच शिवसेनेचा स्वबळाचा फुगा फुटला असून त्यांनी भाजपासोबत पडद्यामागे युती केली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करण्याची सर्वात अगोदर घोषणा केली, मात्र त्यांचे लातूरच्या जागेवरून सध्या बिनसले आहे.
मुंबई- या पुढे कोणतीही निवडणूक भाजपासोबत लढणार नाही. शिवसेना प्रत्येक निवडणूक स्वबळावर लढवील, अशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठोकलेली आरोळी नेहमीप्रमाणेच पोकळ ठरली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीतच शिवसेनेचा स्वबळाचा फुगा फुटला असून त्यांनी भाजपासोबत पडद्यामागे युती केली आहे. सहा जागांपैकी भाजपा तीन आणि शिवसेना तीन जागा लढविणार आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीने आघाडी करण्याची सर्वात अगोदर घोषणा केली, मात्र त्यांचे लातूरच्या जागेवरून सध्या बिनसले आहे. आघाडीचा निर्णय अद्याप झालेला नाही, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सांगितले.
स्वबळाच्या पोकळ गर्जना करणा-या शिवसेनेचे पितळ विधान परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने उघडे पडले आहे. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेच्या सहा जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे. सेना-भाजपमध्ये ५०-५० टक्के फॉर्म्युला निश्चित झालाय. त्यांचे हे ‘तुझं माझं जमेना, तुझ्यावाचून करमेना’ स्वरूपाचे नाते पाहून, २०१९ मध्येही त्यांची युती होणार का, याविषयी राजकीय वतुर्ळात चर्चा सुरू झाली आहे.
या निवडणुकीत शिवसेना-भाजपाने पडद्यामागे सोयरीक केली असून प्रत्येकी तीन-तीन जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. रायगड – रत्नागिरी- सिंधुदुर्ग, नाशिक आणि परभणी-हिंगोली या तीन जागा शिवसेना लढविणार आहे. तिन्ही जागेवर शिवसेनेने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
रायगड- रत्नागिरी- सिंधुदुर्गातून राजीव साबळे, नाशिकमधून नरेंद्र दराडे, तर परभणीमधून विपुल बजोरिया यांना शिवसेनेने उमेदवारी घोषित केली. भाजपा अमरावती, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली आणि लातूर-बीड- उस्मानाबाद या तीन जागा लढविणार आहे. अमरावतीमध्ये राज्य मंत्री प्रवीण पोटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर लातूर-बीड-उस्मानाबाद मधून राष्ट्रवादीमधून हकालपट्टी केलेले सुरेश धस यांना तर वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीमधून भाजपचे प्रदेश संघटन सचिव रामदास आंबटकर यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असल्याचे समजते. ते दोघेही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करतील.
जातीयवादी शक्तींना रोखण्यासाठी समविचारी पक्ष एकत्र येतील. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, असे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांचे नेते सांगत होते. मात्र विधान परिषदेचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शेवटचा एक दिवस उरलेला असतानाही आघाडीबाबतचा निर्णय झाला नाही. लातूर येथून काँग्रेसचा उमेदवार गेल्या तीन टर्म निवडून येत होता. मात्र यावेळी ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसने मागितली. आमच्या मतदारांची संख्या जास्त असल्याने लातूरची जागा आम्हाला मिळाली पाहिजे, असा राष्ट्रवादीचा आग्रह होता. अद्याप निर्णय झालेला नसला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपमधून आलेल्या रमेश कराड यांना उमेदवारी दिली असून त्यांनी आपला उमेदवारी अर्जही दाखल केला आहे. तर काँग्रेसने बीड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, आंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर ऊर्फ पापा मोदी यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या तारखेपर्यंत आणखी काही बदल होऊ शकतो. या ठिकाणी भाजपकडून सुरेश धस उमेदवारी दाखल करणार आहेत.
अब्रू वाचविण्यासाठी लपतछपत युती..
यापुढे कोणतीही निवडणूक भाजपासोबत लढणार नाही, असे जाहीर केले असले तरी युतीशिवाय पर्याय नाही, हे शिवसेना ओळखून होती. परंतु आता जर जाहीरपणे युती केली, तर उरलीसुरली सर्व अब्रू जाईल म्हणून लपतछपत युतीचा घाट घातला. भाजपा नेत्यांशी दाराआड चर्चा करून तीन-तीन जागांचा फॉर्म्युला तयार करण्यात आला. युतीबाबत कुठेही जाहीर भूमिका न मांडता दोन्ही पक्षांनी अंधारात गळ्यात गळे घातले. आज शिवसेना कितीही भाजपा सोबत युती करणार नाही, अशा डरकाळ्या फोडत असली तरी भविष्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही युती होणारच नाही, असे कुणीही सांगू शकणार नाही.
राष्ट्रवादीकडून आयात उमेदवारांना संधी!
स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून विधान परिषदेवर निवडणून द्यावयाच्या सहा जागांसाठी मोठय़ा प्रमाणांत पैशांचा खेळ होत असल्याने जवळपास सर्वच पक्षांनी आर्थिक मजबूती असणा-या आयात उमेदवारांना संधी दिली आहे. शिवसेनेने तीन पैकी दोन ठिकाणी आयात उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस सध्या चार जागा लढविण्याच्या तयारीत आहे. त्यांनी दोन ठिकाणी आयात उमेदवारांवर कृपा केली आहे. तर भाजपाने तीन पैकी एका जागेवर आयात उमेदवाराच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडून द्यावयाच्या सहा जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याचा गुरुवार शेवटचा दिवस आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्व संध्येला जोरदार फोडाफोडी झाल्याचे पहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेसने एका शिवसेनेच्या आणि एका भाजपाच्या आयात उमेदवारला निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेतून आयात केलेले शिवाजी सहाने यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली असून त्यांचा उमेदवारी अर्जही दाखल करण्यात आला आहे. शिवाजी सहाने यांनी मागील विधान परिषदेची निवडणूक शिवसेनेच्या वतीने राष्ट्रवादीचे उमेदवार जयंत जाधव यांच्या विरोधात लढली होती. तेव्हा त्यांचा निसटता पराभव झाला होता. अलिकडेच संजय राऊत यांच्या विरोधात काही विधाने केल्यामुळे त्यांना शिवसेनेतून काढून टाकले होते. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून उमेदवारी मिळविली आहे. तर तिकडे लातूरमध्ये पंकजा मुंडे यांचे अत्यंत निकटचे समर्थकच नव्हे तर मानलेले भाऊ म्हणून ओळखले जाणारे रमेश कराड यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला आहे. त्यांचाही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून राष्ट्रवादीने सुनील तटकरे यांचे चिरंजीव अनिकेत यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर भाजपाकडून लातूरमध्ये राष्ट्रवादीकडून आयात केलेल्या सुरेश धस यांना मैदानात उतरविले जाणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्व संध्येला या फोडीफोडीच्या राजकारणाला चांगलाच रंग चढला होता.
शिवसेना वाघांचा फोटो दाखवते फक्त पण वागणूक लबाड मांजरा सारखी आहे.मालकाला (जनतेला)फसवून मल्ई फस्त करून मिश्या पुसत आंदोलनातून बाहेर?