सकाळी उठल्यापासून कानावर पडणारे शब्द.. संस्कार, संस्कृती, भारतीय विचार. सभोवतालचं सर्वच वातावरण पाश्चात्त्य संस्कृतीच्या चुकीच्या प्रभावाने झपाटलेलं आढळतं. राहणीमान, जीवनपद्धती व संस्कार सर्व बाबतीत या पाश्चात्त्य संस्कृतीचा प्रभाव जाणवतोय व मग माझ्यासारख्या नव्वदीला पोहोचलेल्या स्त्रीला चुकल्यासारखं वाटतं.. वाटतं, कशाला म्हणायचं भारतीय?
१९२२ सालात जन्मलेल्या माझ्या पिढीतल्या स्त्रीला आधुनिक काळातले बदल तीव्रतेने जाणवतात. आमच्या वेळचं जीवनमान सरळ साधं. जवळजवळ ६० सालापर्यंतच्या पिढय़ांनी एक सांस्कृतिक व कौटुंबिक समृद्धी अनुभवली असं फार आनंदानं व मनापासून नमूद करावंसं वाटतं. १०-१५ सदस्यांचं एकत्र कुटुंब, त्यात सर्वच मिळून मिसळून आनंदाने साजरं करण्याची वृत्ती. यात काटकसर, दानधर्म, शेजारधर्म घरातील वडीलधा-यांनी सांगितल्याप्रमाणे कुलाचारांचं पालन, सर्वच सहज पाळलं जायचं. मुळातच माणुसकी, सर्व नात्यांबद्दल आपुलकी, आदर व कृतज्ञता मनी आपसूक रुजली जायची. व्यवहारी वृत्ती, समंजसपणा, यासह वडीलधा-यांच्या आज्ञेत वागण्यात धन्यता व कृतज्ञता वाटावयाची असा काळ. घरातील सदस्यांबरोबरच घरातील पाळीव प्राणी- गोठय़ातील गाय, म्हैस, वासरू, शेतावरील बैलांची जोडी, राखणदार कुत्रा सर्वानी व्यापलेलं, चैतन्याने भरलेलं त्या काळचं घर म्हणजे सर्वार्थाने ‘वृंदावन’ वाटायचं.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर खूप आमूलाग्र बदल होत गेले. सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्वच बाबतीत क्रांतिकारी वाटावे असे बदल. कारण प्रत्येक कुटुंबात ते बदल व त्यांचे परिणाम दिसून येऊ लागले. रोजगाराच्या संधी वाढल्या, पगार वाढले, एक आणे, दोन आण्यांचे व्यवहार रुपयांत होऊ लागले. (महागाई आली.) स्त्रियांसाठी शिक्षणाची द्वारं सर्वार्थाने खुली झाली. घराचा उंबरठा ओलांडून स्त्रिया बाहेर पडू लागल्या.
पुढच्या काळात आणखीन वेगळं चित्र उभं राहिलं ते विभक्त कुटुंब पद्धतीने. सोप्या भाषेत सांगायचं तर तडजोड करावी लागू नये म्हणून वेगळं बि-हाड मांडलं जाण्याकडे कल वाढला. त्याचबरोबर बरीचशी कामं जी घरातील कर्ती स्त्री स्वत: करायची ती सोपी करायला वेळ व श्रम वाचवायला यंत्रं आली. स्वयंपाकघरातील पाटा, वरवंटा व जात्याची जागा मिक्सर, घरघंटी इ. सारख्या इलेक्ट्रिक मशिननी घेतली. चुलीऐवजी गॅस सिलिंडर आलं. विहिरीचं पाणी ओढणं बंद होऊन घरोघरी नळ आले. श्रम वाचले.
आम्ही विचार करतो की, श्रम तर वाचले, पण चुलीवर शिजवलेल्या स्वयंपाकाची चव व एकत्र कुटुंबाचं समाधान कुठेतरी हरवलं. बायकांना घरातील सर्व कामं, झाडलोट, पाणी भरणं यातून सतत आपोआप व्यायाम होत होता. तो थांबत जाऊन आज सर्वच अॅटोमॅटिक झालंय. जागेवरून उठायचेही कष्ट घ्यावे लागत नाहीत. सर्वच काही कंट्रोल बाय रिमोट. परिणाम काय, तर अनेक शारीरिक व्याधी जडून डॉक्टरचा खर्च वाढलाय. कारण नैसर्गिक जीवनशैलीपासून आपण अधिकाधिक तोडले जातोय. वरवर पाहता ‘ऐहिक’ सुख खूप मिळत असलं तरी हे सुखच मारक ठरतंय की काय, अशी शंका वाटू लागते. मग आम्हा ज्येष्ठ स्त्रियांचं मन आपसूक जुन्या काळात रमतं. तुलनात्मक विचारातून आम्ही काल व आज अनुभवतोय. आम्ही हट्टीपणा करून सर्वच बाबतीत जुन्या जीवनशैलींचा आग्रह तर धरू शकत नाही. काही बाबतीत हा हट्ट प्रत्यक्षात येणं शक्यही नाही हेही खरं, पण काही बाबतीत मात्र हे बरोबर की चूक, असा प्रश्न पडतो.
आम्ही पाहतो की, आजच्या पिढीच्या राहणीमानात खूप फरक पडलाय. नव्या जमान्याबरोबरीने राहायला हवं हे मनालाही पटतं. शिवाय आपल्या वेळी मोठय़ांच्या धाकात आपली हौस-मौज करायची राहिली. काही बाबतीत ती या पिढीला जगता येतेय तर त्यांना त्याचं स्वातंत्र्य अनुभवू दे, असंही कुठेतरी वाटतं.
सवयीही सहज बदलल्या आहेत. आज घरोघरी टीव्हीसमोर जेवणं होतात. घरपण, घराची शिस्त, अन्नाचं पावित्र्य हे विचार मागे पडलेत. घरातली लहान मुलं-मुलीसुद्धा शाळा, परीक्षा, शिकवणी यामुळे सतत घराबाहेर. त्यांची मित्रमंडळी, पाटर्य़ा, ट्रीप हेच जग. घराबरोबर सण-समारंभ, कार्यातही एकत्र वेळ द्यायला ती मुलं फ्री नसतात. सणांना घरची मुलबाळंच घरी नाहीत, उशिरा येतील तोवर दिवस संपूनही जाईल. मग आम्हा आजी-आजोबांचं मन थोडंसं का होईना खट्टू होतं. घरची लहान मंडळी घरी नाहीत म्हणजे घरातलं चैतन्यच नाही, असं वाटतं.
आजची तीव्र व भरीची (वाढत जाणारी) सामाजिक तसंच कौटुंबिक बाब म्हणजे स्पर्धा. लहान पिढीबाबत तर केजीपासून म्हणजे आजकाल तर अवघ्या अडीच वर्षाच्या चिमुरडय़ांनाही शाळेत अॅडमिशनसाठी ‘वेगळेपण’ दाखवावं लागतं. पालकही इतरांसारखे आपल्या मुलांचं सर्व व्हावं यासाठी महागडी बेसुमार फी भरून इंग्रजी माध्यमाची शाळा मुलांसाठी निवडतात. पालकच आपसूक मुलांना आपली मातृभाषा वापरण्यात कमीपणा, आणखी हाव/ चंगळवादी सवयी लावताहेत असं वाटतं. मुलांना हवे ते मोबाइल, लॅपटॉप, इंटरनेट, आयपॅड, कॅमेरे तासन् तास फेसबुक सर्व उपलब्ध करून देतात. पूर्वीच्या काळासारख्या कमी गरजा, साधी राहणी हे सर्व नामशेष झालंय. आजकाल कोणाची हौस भागतच नाहीये. महागाई वाढतेय, सर्व वस्तूंचे दर गगनापार झालेत तरीही उपभोग्य वस्तूंवरील खर्चाचा काहीही हिशेब राहिलेला नाही.
पूर्वी गावाकडे मोठे वाडे, तर मुंबईसारख्या भागात चाळी असायच्या. आसपासचे सर्व शेजारीही एक कुटुंब असल्याप्रमाणे राहायचे. आज शेजारचं दारही उघडलेलं दिसत नाही (फ्लॅट सिस्टीममुळे), तर माणसं कशी दिसणार. शेजारधर्म रुजायला परस्परसंवाद होतच नाहीत. फक्त सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विसंवाद होतात. हौस इतकी, पण कशात समाधानी वृत्ती नाही. निखळ आनंद नाही. कशावरही अंकुश नाही. संस्कार, आदर, रीतीरिवाज, बंधनं नकोशी वाटतात.
एक किनारा सोडला, पण दुसरे रीतीरिवाज एकदम मानवत नाहीत, जमत नाहीत. दुसरा किनारा गाठेपर्यंत नावेची होणारी ही डगमग सांभाळावीच लागणार. मधल्या पिढीतल्या पुरुषांना वाटतं की, ते मोठय़ा कुटुंबात राहिले, मग घरातील लहान भावाबहिणींचं शिक्षण, लग्न इ. जबाबदारीमुळे लवकर नोकरी धरली. उच्च शिक्षणाची इच्छा असूनही जबाबदारीपुढे इच्छा मनातच राहिली. तर मधल्या पिढीतल्या स्त्रियांना वाटतं, लवकर लग्न करून रांधा, वाढा, मुलांच्या गोंधळात मला कितीतरी गोष्टी करता आल्या नाहीत. या आपल्या अपुऱ्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य मधल्या पिढीने आजच्या पिढीला देऊ केलं आहे. त्यांना हवं ते मिळावं यासाठी पाठिंबा, आर्थिक मदत व मनापासून कौतुक या पिढीला मिळतंय, पण कितीतरी घरी लहान मुलं सहज म्हणून जातात की, ‘आमचे आई-बाबा आम्हाला समजूनच घेत नाहीत.’ याउलट ‘ते जे करतात ते त्यांचं कर्तव्यच आहे,’ असे खडे बोलही सुनावतात.
आजही घरं ही सर्व आधुनिक सुखसोयींनी भरलेली. उच्चशिक्षित पालक, भरपूर पैसा, घरात लाडाकोडांचा एकच मुलगा किंवा मुलगी. मग त्यांना हवं ते देण्याची पालकांची तयारी. पैशांचा, किमतीचा विचार नाही, यामुळे या पिढीला ‘नाही’ ऐकण्याची सवयच नाही. मनावर ताबा नाही. राहणं, वागणं वाटेल तसं, कुणाच्याही भावनांचा विचार नाही. काही म्हटलं तर हीच आजकालची फॅशन आहे, असं उत्तर तयार.
शिक्षण, विचारस्वातंत्र्य, पैसा इ.चा उपयोग करून उच्चविद्याविभूषित व्यक्तीने कुळाचा/ घराचा उद्धार केला, तर गौरव होतोच व आशीर्वादही मिळतातच. आजच्या पिढीतले १००पैकी ३० जण संस्कारांना धरून आहेतच. पण उरलेल्या सत्तर जणांची जी तरुणाई आहे त्यातले बरेचसे जण बेलगाम, दिशाहीन, भरकटलेल्या बोटीप्रमाणे, आयुष्याचं वाटोळं झालेलेही आहेत. हे चित्र पाहिलं की खेद वाटतो.
वृत्तपत्रांत पानन् पान भरून गुन्ह्यांच्या, खून, बलात्कार, क्रूर हत्यांच्या, फसवणुकीच्या बातम्या, गुन्हेगारी सर्व सामाजिक थरांत सर्व नात्यांच्या मर्यादा ओलांडून पोहोचली असल्याने धक्कादायक वर्णन वाचलं की, अंगावर काटा उभा राहतो.
प्रेमभंग, लग्नाआधी गर्भधारणा, गर्भपात (अॅबॉर्शन) हे प्रकार तर चालूच आहेत. पण यांचा परिणाम असा की, त्या मुली नंतरही संसारात समाधानी राहात नाहीत. लहान वयातली प्रेमप्रकरणं व पुढे लगेच लग्नबंधनात पडलेली कित्येक तरुण जोडपी लग्नानंतरच्या जबाबदा-या पेलू शकत नाहीत. घर म्हणायला दोघांचाच संसार, वाढत्या गरजा, लाखांचा पगारही अपुरा, त्यात एकमेकांचे इगोज, करिअर्स यामुळे अशांती, तणाव सततचा, याचाच परिणाम हल्ली डिप्रेशनच्या केसेस, वाढते घटस्फोट,आत्महत्या इ.सारख्या समस्यांत होतोय. या समस्यांवरचं खरं समाधान पूर्वीच्या ‘भारतीय जीवनपद्धती व संस्कारात’च दडलं आहे. आज बाबा-बुवा, महाराज, माताजी पूर्वीच्याच अमूल्य भारतीय संस्कारांचं मार्केटिंग करून आजच्या पिढीला देताहेत आणि आजच्या काळात पुन्हा जुन्या काही संस्कार, प्रथा पण एका नवीन स्वरूपात, नवीन तत्त्वज्ञानातून ऐकायला व पाहायला मिळतात. सभोवतालचं जग पाहिलं की, आम्हाला वाटतं, गेल्या ७० वर्षात जी काही प्रगती झाली, त्यामुळे आपण सुधारून वरवर चढतोय की, गडगडत खाली येत आहोत?
तीन पिढय़ा पाहिलेल्या आम्हाला वाटतं की, कुटुंबातलं वातावरण जसं असेल तशी पिढी घडत असते. लहान वयातच मुलांवर योग्य संस्कार, शिस्त बाणवणं आवश्यक आहे. आजची कर्ती पिढी तशी निर्भय व धाडसी आहे. आत्मविश्वासाने करिअर निवडते, उच्च शिक्षणात अग्रेसर राहते. भारतात, परदेशात कोठेही नोकरी करते, नवीन जागा, तेथील सामाजिक, भौगोलिक वातावरणाशी जुळवून घेते. घरी कर्तव्य म्हणून नियमित पैसेही पाठवतात. आपल्या आईवडिलांना फॉरेन ट्रीप घडवून देण्याची हौसही भागवतात. परदेशस्थ नातवंडांकडून कळतं की, त्या त्या देशातल्या ‘महाराष्ट्र मंडळात’ ते आपले सर्व भारतीय सण साजरे करतात. आमच्या पतवंडांना कौतुकाने नटवतात व इंग्रजीतून सर्व सणांची माहिती देतात. त्यांच्या कर्तृत्वाने पिढी देश, धर्म, नातेवाइक कशातही अडकून पडलेली नाही. खूप प्रॅक्टिकल आहे.
आमच्या पिढीला पोथ्या, पुराणं वाचूनही जो ‘गीतायोग’, जी अलिप्तता जमली नाही, इतरांकडून अपेक्षा ठेवायची नाही ही समजून निरपेक्ष जाणीव या पिढीला मुळातच मिळाली आहे. धकाधकीचं जीवन, पैसा सर्व गोष्टी पैशावाचून अडताहेत. या सर्वाचा ताण येतो आहे. खरंच आजच्या आमच्या सर्व पतवंडांना व नातवंडांना फार मोठय़ा अग्निपरीक्षेलाच सामोरं जावं लागतंय. आजी, आजोबा म्हणून आम्हाला त्यांची सतत काळजी लागून राहते. म्हणून वाटतं परमेश्वराने आम्हाला दिलं तसं ताणरहित, सहजसोपं जीवन या मुलांच्याही वाटय़ाला येऊ दे, त्यांनाही जीवनाचा निखळ आनंद भरभरून अनुभवता येऊ दे.
Atishay wastawadi chitran lihil ahe tumhi. Mi ani mazyasarkhya anekjan ase anubhav satat mulansamor sangat asato. Asha margadardanachi garaj matra sarvanach ahe. Kalat; pan paristiti ekdam nahi badalnar Madhalya pidhine kelyalya chuka jastch gadad ahet tyala durust karayala vel lagel. Ek changla vichar mandala ahe tumhi, lekh wachun nishchitch jababdarichi janiv hote.