मुंबईकरांना २४ तास पाण्याचा पुरवठा केला जाईल, अशी घोषणा करून शिवसेना सत्तेवर आली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने २४ तास पाणीपुरवठय़ाची योजना तयार केली
मुंबई – मुंबईकरांना २४ तास पाण्याचा पुरवठा केला जाईल, अशी घोषणा करून शिवसेना सत्तेवर आली. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने २४ तास पाणीपुरवठय़ाची योजना तयार केली. परंतु गेल्या तीन वर्षात भांडुप, मुलुंड, घाटकोपर, चेंबूर आणि कुर्ला येथील निवडक भाग वगळता पालिकेला २४ तास पाण्याचे स्वप्न साकारता आलेले नाही. मुंबईला सध्या ३७६ कोटी लिटर पाण्याचा पुरवठा केला जात असून प्रत्यक्षात मुंबईकरांची तहान ४६० कोटी लिटरची आहे. त्यामुळे अद्यापही ८४ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा असून गारगाई आणि पिंजाळ प्रकल्प पूर्ण होण्यास किमान सात ते आठ वष्रे लागणार असल्यामुळे मुंबईकरांचे २४ तास पाणीपुरवठय़ाचे हे स्वप्नच राहणार आहे.
[poll id=”915″]
शहराची लोकसंख्या १ कोटी २६ लाखांच्या असून त्यासाठी ४६० कोटी लिटर्स पाण्याची गरज आहे. परंतु मध्य वैतरणा पाणी प्रकल्प सुरू झाल्यानंतर पाणीपुरवठय़ात वाढ होऊन ४०७ कोटी लिटर पाणी पालिकेला प्राप्त होते. पण मुंबईकरांना ३७६ कोटी लिटर पाणी मिळते. उर्वरित १५ कोटी लिटर पाणी ठाणे यासह भिवंडी व मिरा रोड महापालिकेला पुरवले जाते. मात्र, मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी आखलेले गारगाई (प्रतिदिन ४४ कोटी लिटर) व पिंजाळ (प्रतिदिन ८६ कोटी लिटर) प्रकल्प कागदावरच आहे. यातील गारगाई प्रकल्प तानसा अभयारण्याच्या कक्षेत असल्यामुळे पालिकेने पिंजाळला प्राधान्य दिले. परंतु या दोन्ही प्रकल्पांना पर्यावरण विभागाची परवानगी मिळून आजही जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षेतच जमिन ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेशिवाय काहीच घडले नाही. त्यामुळे पुढील पाच ते सात वर्षामध्ये या प्रकल्पांचा लाभ मिळणे अशक्यच असल्याचे मत पालिकेतील वरिष्ठांकडून व्यक्त केले जात आहे.
पिंजाळ-दमणगंगा प्रकल्प केंद्र सरकारच्या राष्ट्रीय जलविकास संस्थेमार्फत विकसित केला जात असला तरी प्रत्यक्षात या प्रकल्पाचा लाभ सात ते आठ वर्षाशिवाय मिळणार नाही, असेही जाणकारांचे म्हणणे आहे.
२४ तास पाणी देण्याची घोषणा केल्यानंतर दरवर्षी पाणी दरात आठ टक्के वाढ केली जात आहे. परंतु गळती व चोरी रोखण्यात पालिका अपयशी ठरत आहे. सध्या गळती व चोरीचे प्रमाण ३० टक्क्यांवर २५ टक्क्यांवर आणण्याचा दावा प्रशासनाने केला तरी जलवितरण व्यवस्थेत सुधारणा होत नाही. मरोशी ते रुपारेल हा जलबोगदा प्रकल्प डिसेंबर २०१३पर्यंत कार्यान्वित होणे अपेक्षित होता. परंतु हा प्रकल्प जानेवारी २०१५ रोजी पूर्ण होत असून सध्या या जलबोगद्याची जोडणी मुख्य जलवाहिनीला जोडली जात आहे.
याशिवाय गुंदवली ते भांडुप जलबोगदा प्रकल्प फेब्रुवारी २०१६ पूर्ण होईल असा दावा केला जात असला तरी गेल्या दोन वर्षापासून घोषणा करण्यात आलेले चेंबूर-तुभ्रे जलाशय (५.१ कि.मी),चेंबूर-वडाळा-परळ (९ कि.मी) जलबोगदा प्रकल्प व किंग्ज सर्कल ते काळाचौकी (१२कि.मी) तानसा जलवाहिनी बदलण्याच्या कामाला सुरुवात झालेली नाही. मुंबईकरांना देण्यात आलेल्या जलजोडण्यांवरील ३ लाख १२ हजार ११६ मापके बदलण्यासाठी पालिकेने पहिल्या टप्प्यात १ लाख २९ हजार ७७५ मापकांची खरेदी केली. यापैकी ८७ हजार जलमापके बसवली आहेत. या मापकांची चोरी झोपडपट्टय़ांमधून होत असल्यामुळे आता नव्याने मापके खरेदी करण्यात येत आहे.
शहरातील झोपडपट्टय़ांमध्ये जलवितरण व्यवस्थेचे जाळे पसरवण्यासाठी जलवितरण सुधारणा कार्यक्रम हाती घेतला आहे. येत्या ५ वर्षात ३० ठिकाणच्या झोपडपट्टय़ांच्या भागांमध्ये याची सुधारणा करण्यात येणार होती. परंतु एकाही झोपडपट्टीत ही योजना आखली गेली नसल्याचे दिसून येत आहे.
हे प्रकल्प गेले कुठे?
वरळी व भांडुप टेकडी
अजूनही ८७ हजार जलजोडण्यांवर एएमआर मीटर
गुंदवली-भांडुप जलबोगदा प्रकल्प
चेंबूर-ट्रॉम्बे जलबोगदा जलबोगदा प्रकल्प
चेंबूर-वडाळा-परळ
जलबोगदा प्रकल्प
किंग्ज सर्कल ते हिंदमाता जलवाहिनी
३० ठिकाणच्या झोपडपट्टय़ांचा विकास
पाणी वाचवा पृथ्वी वाचवा म्हणून मुंबईला २४ तास पाणीपुरवठा करणे चुकीचे आहे, कारण कित्येक अशा विभागातील व्यक्ती पाण्याचा विध्वंस करतात, विशेषता झोपडपट्टी विभाग. कित्येक व्यक्ती पाणी हे जीवन आहे, हि संज्ञाच विसरून गेले आहेत. नळाला मुबलक पाणी पुरवठा होतो, त्यामुळे कित्येक लोक नळ चालू करून पाणी गटारातून, नाल्यातून वाहून घालवतात. पाण्याचे बिल हे साधारण ८ ते १० खोल्या मिळून येणार आणि आपण का म्हणून फक्त १५ ते २० मिनिटात पाणी भरायचे? एकमेकांशी वैर असल्या कारणाने जो तो इतरांचा विचार न करता हवातसा पाण्याचा अपव्यय करतात.