कोकण हे जसे विविध वैशिष्टय़ांनी भारलेले आहे तसे येथील सण-उत्सवाने, आदरातिथ्याने भरलेले आहे. गूढ गोष्टींचे येथे भांडारच म्हणायला हवे. वेळोवेळी आपण विविध अतर्क्य याचा प्रत्यय घेत आलो आहोत. हा प्रदेश भुताखेतांचा म्हणूनही प्रसिद्ध आहे. भूतखेत ही वस्तुस्थिती आहे की कल्पना आहे या वादात आम्हाला पडायचे नाही. मात्र येथील लोकसंस्कृतीवर त्याचा किती पगडा आहे हे समजून घेणे रंजक वाटते. त्यांच्या अस्तित्वासंबंधी एक प्रकारे खात्रीची भावना पिढय़ान् पिढय़ा मानवाने हजारो वर्षापासून बाळगली आहे. यांचा उद्भव, संचार व इच्छेनुरूप रूपे धारण करण्याची शक्ती, पीडा देण्याचे आणि प्रसंगी भले करण्याचे सामर्थ्य, त्यांचा स्वभाव, त्यांची निवासस्थाने, शक्तीच्या मर्यादा, त्यांना प्रसन्न करून घेण्याचे वा हुकमतीत ठेवण्याचे उपाय, तसेच त्याचा प्रतिबंध करण्याचे उपाय, त्यांच्यावरील नियंत्रणाच्या शक्ती आणि तेवढेच समज, रूढी व परंपरा यांचे विश्व फार मोठे आहे.
धर्मकल्पनेच्या उदयाबरोबर पिशाच कल्पनेचा उदय झाला असावा, असे एक मत आहे. वैदिक काळापासून याची कल्पना आढळते. ऋग्वेदात याचा उल्लेख आहे. रामायण, महाभारतात याचे अनेक दाखले आढळतात. कोकणातील भुतांबाबत तर अनेक अतक्र्य कथा, घटना अगदी काल-परवापर्यंतचे प्रसंग कानावर येतात. येथील भुते सामान्यत: चांगल्या व वाईट प्रवृत्तीची आहेत असे काही ज्येष्ठ मंडळी सांगतात. प्रत्येक राज्यात, इलाक्यात भुतांची नावे वेगळी आहेत एवढेच.
येथील लोकांचा देवावर जेवढा विश्वास, तेवढाच भूतबाधेवरही विश्वास आहे. याचमुळे गाव तिथे डॉक्टर एखादे वेळी कमी असेल. पण गाव तिथे बुवा अथवा मांत्रिक, भगत तत्सम अंगारे-धुपारे देणारी अमुक एक व्यक्ती यात मग स्री-पुरुष या दोघांचाही समावेश असतोच. याचा प्रत्यय येईल. कोकणात भुतांचे बंड फार. जमिनीच्या तुकडय़ावरून जसा संघर्ष तसा कोकणी माणसाच्या वृत्तीबाबतही चर्चा. खेकडय़ाच्या वृत्तीची त्याला दिलेली उपमा, सारेच मार्मिक अन् विचार करायला लावणारे. ज्याच्याशी वाकडीक असेल त्यांच्यावर भूत घालून परिपत्य करण्याचा पूर्वी येथील लोकांचा सर्वसाधारण इलाज होता.
आजही अनेक ग्रामीण भागात याचा पगडा मोठा आहे. त्याची सर्वत्र पडछाया दिसतेच. आजची पिढी भूतबाधेपासून फार लांब आली आहे. परंतु, भूतबाधा आणि घाबरण्याचे प्रकार भीत्यापाठी लागणारा ब्रह्मराक्षस हे नामाभिधान येथेच अनुभवता येते. पेशवाईत या भुतांच्या दहशतीने अनेक कुटुंबेच नाहीत तर तळकोकणातील गावेच्या गावे स्थलांतरित झाल्याच्या घटना आहेत. भुते अन्यायाने कोणावर घातली असल्यास त्यापासून रयतेचे रक्षण करणे हा तत्कालीन सरकारचा एक उद्योगच झाला होता.
१९७४-७५ साली अंजनवेल, सुवर्णदुर्ग, रत्नागिरी, विजयदुर्ग, देवगड पंचक्रोशी ते उर्वरित भागात भुते घालणा-या गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याकरिता पेशवे सरकारने खास दोन अधिकारी नेमले. त्यांच्या मदतीला दोन कारकून, ६ शिपाई दिले होते. ही भुतांविरुद्धची मोहीम अगदी १९ व्या शतकापर्यंत सुरू होती. ब्रिटिश राजवटीत यावर टाच आणण्यात आली. भुते घालणा-यांची आणि ती निवारण करणा-यांची गावातील वैद्यांच्या यादीप्रमाणे गावच्या पोलीस पाटलाला माहिती असायलाच हवी. ती यादी दर महिन्याला अद्ययावत असायला हवी, असा तत्कालीन मामलेदाराचा दंडक असायचा. भुते उजेडात राहत नाहीत. जमिनीवर बसत नाहीत, भुतांना गूढ जागा लागते, स्वच्छतेपासून ती दूर पळतात, असा समज आहे.
कोकणच्या खेडोपाडी वीज पोहोचली. सर्वत्र लखलखाट झाला. लोकवस्ती वाढली, भुतांची वस्ती कमी झाली आणि भीतीचे ढगही कमी होऊ लागेल. पण आजही जिल्हय़ातले असे एकही गाव सापडणार नाही तिथे भूत-पिशाच अथवा तत्सम घटकांची शापित भूमी, त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाची माहिती नाही असे नाही.
अनेक भूत बंगले, ठिकाणे, हमरस्त्यावरील घटना या तिस-या जगातील अनेक कथांचा आसरा घेऊन उभे आहेत. शू ऽऽऽऽ कुणी तरी आहे असेच फक्त सांगितले जाते. याच भागात भुतांची जत्रा भरते आणि अनेक प्रेतात्म्यांना बोलविणा-या शक्तीही येथे आहेत. प्रेतात्म्यांना बोलवून त्यांच्याकडून मनाजोगे कार्य करून घेण्यासाठी काही जण कार्यरत असतात, असाही समज आहे. भूतबाधेच्या या प्रकारांनी अनेक कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. चालगती आणणे तत्सम मंत्रतंत्र करणारी मंडळीही कमी नाहीत. कुणाचे वाकडे करायचे असल्यास त्यांच्यावर भुते उठवून घातली जातात. म्हणजे संबंधित परिवाराला विविध समस्यांना सामोरे जावे लागते. अंगारे-धुपारे केले जातात. कोंबडी, बकरे कापले जातात. देवदेवस्की केली जाते. अनेक परिवार या प्रकारातून उद्ध्वस्त झाल्याच्या घटना गावोगावी सांगितल्या जातात. या तिस-या जगाचा वेध घेताना गावोगावची गूढ संस्कृती हादरवून सोडते.
भुतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे!
भूत पिशाच या शब्दातील पिशाच याची व्याख्या पं. श्री. दा. सातवळेकर ‘महाभारत’ की समालोचना ग्रंथात पिशितं मासं अश्नति इति पिशाच: अशी केली आहे. म्हणजे ज्यांनी मांस सोडलं आहे ते मांस खाणा-यांना पिशाच हा शब्द वापरतो. यावरून यास किमान पाच हजार वर्षाचा इतिहास आहे. अथर्व वेदात मानव शत्रू, प्रेत या अर्थी हा शब्द वापरला आहे. अमर कोशात विद्याधर, अप्सरा, राक्षस, गंधर्व, किन्नर, गुहय़क, सिद्ध व भूत यांच्याबरोबर पिशाच्याचा उल्लेख असून त्या देवयोनीतील आहे, असे म्हटले आहे. पुराणांच्या मते पिशाच कश्यपाला क्रोधवशा या भार्येपासून झालेले पुत्र होत. तसेच ब्रह्मदेवाने पिशाचांची निर्मिती केली. ते पुलह नावाच्या ऋषीपासून जन्मले. क्रोधा वा दशकन्या त्यांची आई म्हटली आहे. भूत व पिशाच या दोन भिन्न योनी असल्याची वर्णने आढळतात. तरी स्थुलमानाने भुतांनाच पिशाच म्हटले जाते. अशा या पिशाचांचा रामायण, महाभारत, मनुस्मृती भागवत् पुराणात जागोजागी संदर्भ आढळतात. रामायणात खालील उल्लेख आढळतो.
‘‘जानकी तू महाराज नि:श्वसन्ती तपस्विनी
भूतोपहत चित्ते व विष्ठीता विस्मृता स्थिता।।’’
अर्थ- महाराज, गरीब बिचारी जनक कन्या तर भुताने झपाटल्याप्रमाणे निरोप वगैरे सांगण्याचे सर्व काही विसरून जाऊन दु:खाने सुस्कारे टाकीत उभी राहिली आहे. हा निश्चित पुरावा रामायणात आढळतो.
भुतांबाबत त्यांच्या बाहय़ आकार, व्यक्तीची इच्छा, आशा, सूडबुद्धी त्याप्रमाणे आकार बनतात. निरनिराळय़ा प्रातांतील रंग व आकारात विविधता आढळते. उदा. पंजाब-काश्मिरातील भुते गोरी असतात. तामिळनाडू, कर्नाटक, केरळमधील भुते सावळी असतात. प्रदेशाप्रमाणे त्यांचे रंग मानतात. शरीर विकृत, कुरूप भयंकर असतात. तोंडात हिंस्र् प्राण्याप्रमाणे दात असतात. हातपाय उलटे असतात. त्यांना देहकार असूनही त्या वायुरूप असतात. त्यामुळे त्यांची छाया पडत नाही. विविध रूपे धारण करण्याची त्यांच्या अंगात जबरदस्त ताकद असते. मेलेल्या माणसांची भुते होतात म्हणून त्यांचे क्रीडास्थान स्मशान ठरविले आहे. या शिवाय पिंपळ, चिंच हे वृक्ष तिवाटा, ओसाड घरे,पडक्या विहिरी ही त्यांची वास्तव स्थाने ठरविली आहेत. स्मशानवाशी, स्मशानातील चिताभस्म धारण करणारा महादेव शिव हा त्यांचा नियंत्रक असतो. त्यामुळे शिवमंदिर बहुतेक करून स्मशानानजीक असते. भुते ही शंकराचे सैनिक या श्रद्धेने शंकराला, भुतेश, भूतपती, भूतनाथ, भुतेश्वर म्हणून ओळखतात. दुर्गेला भूत नायिका, भूतमाता म्हणतात.
कोल्हासुर राक्षसाच्या वधाच्या वेळी महालक्ष्मी अंबा व रवळनाथासोबत भूत व भुतीनीचे सैन्य व तिच्याबरोबर होते. औषध विद्येच्या अष्टशाखापैकी भूतविद्या ही एक शाखा सुद्धा आहे. पं. सातावळेकरांच्या मते आजचा भूतान प्रदेश म्हणजेच प्राचीन भूतस्थान होय. इतिहासाचार्य राजवाडे यांनी पेशावर हा शब्द पिसावर-पिसाऊर-पिशाचपूर अशा परंपरेने साधला असून अफगाणिस्तानातील पेशावर प्रांत म्हणजे पिशाच्च प्रांत म्हटले आहे. नागगणांचे भूतगणांशी अगदी जवळचे संबंध आहेत. सिंधू संस्कृतीतील लोक म्हणजे पिशाच्च असे संशोधन आहे. त्यामुळे पिशाच्च व नागसंस्कृती हा अभ्यासाचा वेगळा विषय आहे. भाषेसंबंधी बोलायचे तर मराठी भाषेच्या निर्मितीत पैशाच्या भाषेचा मोठा वाटा आहे. तिला पिशाच्च भाषा असेही म्हणत. कथा सरित्सागर हा गुणाठय़ाचा ग्रंथ याच भाषेत होता.
भुतांचे वर्गीकरण सुष्ट व दुष्ट असे स्थूलमानाने केलेले आहे. स्री व पुरुष भुते, तसेच विवाहपूर्व व विवाहोत्तर मरणाने बनलेली भुते, ब्राह्मण व ब्राह्मणेत्तर असेही त्यांचे वर्गीकरण आहे. तसेच ती कुठे राहतात यावरून वर्गीकरण केले आहे. तसेच लोकांना मदत करणा-या सत्प्रवृत्त भुतांचीही कल्पना करण्यात आली आहे. तरी सामान्यत: भुते ही भयंकर अपायकारक असतात. वेताळ व म्हसोबा यांना भुतांचा राजा म्हणतात. खून झालेल्या माणसांचे भूत रागीट व सूड घेणारे असते असे म्हणतात. खून झालेल्या ब्राह्मणाच्या भुतास ब्रह्मराक्षस ब्रह्मासुर किंवा ब्रह्मदैत्य म्हणतात.
विशिष्ट भुतांना काही नावे दिलेली आहेत ती अशी-
वेताळ – यास भूतखेत पिशाचांचा राजा, अधिपती समजतात. हा भूत नसून देवता आहे, अशी समजूत आहे. युद्ध सज्ज शस्र्धारी असलेल्या वेतोबाची गोवा, कोकणात ब-याच ठिकाणी मंदिरे आहेत. गोवा (आजगाव), आरवली (वेंगुर्ला) वेतोबा, पेंडूर (मालवण) येथील वेताळ फार प्रसिद्ध आहेत. तो रात्रभर चालत असल्याने वेताळभक्त दरमहा नव्या वहाणा अर्पण करतात.
ब्रह्मदेव – वेदपारंगत पण गर्विष्ठ ब्राह्मणाचे भूत.
समंध – ज्याला वारस नसतो व ज्याचे अंत्यसंस्कार विधियुक्त होत नाहीत तो, अथवा लोभी माणूस समंध होतो व तो आपल्या संपत्तीचा कोणाला उपभोग घेऊ देत नाही.
ब्रह्मसमंध – ब्राह्मण पण धनलोभी माणसाचे भूत मृत्यूनंतर तो आपल्या धनाचे रक्षण करतो. तो कोणाला पीडा देत नाही.
देवचार – लग्न झाल्यानंतर मेलेल्या शुद्राचे भूत गावातील भुते याच्या ताब्यात असतात.
मुंजा- सोड मुंज होण्यापूर्वी, मरण पावलेला ब्रह्मचारी ब्राह्मणाचे भूत, मुंजा पिंपळाच्या झाडावर राहतो व लोकांना पछाडतो.
गि-हा – पाण्यात बुडून मारणा-याचे अथवा ज्यांचा खून होतो याचे भूत. हा सामर्थ्यवान नसतो तो पाण्याच्या काठावर राहतो.
चेटक- शुद्र मनुष्याचे भूत असते.
झोटिंग- खारवी अगर कोळी अथवा मुसलमानाच्या भुतालाही झोटिंग म्हणतात. याला डोके नसते असा समज आहे.
वीर -अविवाहित क्षत्रीय पुरुषाचे भूत त्याला परदेशचे भूत म्हणतात.
म्हसोबा – हा भुतांचा राजा असून वेताळा इतकेच त्याचे सामर्थ्य असते. अनेक ठिकाणी याची देवळे असतात.
जाखीण- अळवत-बाळंतपणात अथवा सुवासिनीचे भूत. ही स्मशानात राहते. हिला अवगत असेही म्हणतात.
लावसट – विधवेचे भूत. स्मशान हे त्याच्या राहण्याचे ठिकाण.
हडळ – बाळंतीण झाल्यापासून दहा दिवसांच्या आत जी मृत्यू पावते, ती हडळ होते.
जिंद – कृपण पुरुषाचे भूत-मनुष्य किंवा सापाचे रूप धारण करते. आपल्या द्रव्याला हात लावू देत नाही.
पिलर- ठेंगणी व टोळय़ा करून हिंडणारी भुते. ती अपाय करणारी व उपकारकही असतात.
यदम कडताई- खूप मुलांच्या गरीब आईचे भूत.
कबंध – अनिच्छेने लढाईत जाऊन मेलेल्याचे भूत.
म्हैसासुर – रेडय़ाच्या आकाराचे भूत. हा भयंकर असतो.
कर्णपिशाच्च : विद्वान ज्योतिषी ब्राह्मणाचे भूत.
राणोबा – रानात राहतो, गाड्यांचे बैल सोडतो.
याशिवाय सटवाई, शाकिणी, तळखांबा, बापा, पाणीपात्र, सैतान, हिरवा, डाकण, कुष्मांड, खेचर, जाखरो, मारीच अशी ७० ते ८० विविध नावे असलेली भुते आहेत.
(संदर्भ – भारतीय संस्कृती कोश)
ब-याच बुद्धिवंतांच्या मते, भूत पिशाच एक ऐतिहासिक वास्तव आहे. याचे संशोधन व्हायला पाहिजे व त्यामुळे अंधश्रद्धेस आळा बसून मोठय़ा सामाजिक समस्येवर उपाय करता येईल. तसेच स्त्रियांवर होणारे अत्याचार, अन्याय यावर अंकुश येईल. मांत्रिक, ढोंगी बाबा यांना यातून दहशत बसेल. आजच्या आपल्या भेटीत या भूमितील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक प्रवासातील साक्षीदारांची ओळख होण्याचाच केवळ उद्देश आहे. अंधश्रद्धेसाठी नाहीच नाही. ही कोकणातील भुते खरंच त्रास देणारी नाही आहेत. त्यांचे अस्तित्वही आहे की नाही याबद्दल खात्री नाही. खरी भुते आहेत ती जित्या जागत्या समाजात जी भ्रूणहत्या करून कुत्र्यांना खायला घालतात, जी स्वत:च्या मुलीवर बलात्कार करतात, जी करोडो रुपयांचे धान्य कुजवून लाखो उपाशी लोकांना मृत्यूच्या खाईत लोटतात. यांना झोडपलं, गाडलं गेले पाहिजे. जसे ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानात म्हटले आहे..
‘ भुतां परस्परे जडो, मैत्र जीवांचे!’
मु.पो. स्मशानभूमी
अंधश्रद्धा निर्मुलनासाठी अथवा काही वेगळे धाडस दाखविण्यासाठी स्मशानभूमीत एक रात्र काढण्याची पैज लावली जाते. स्मशानभूमी म्हणजे भुता-प्रेतांचे ठिकाण असा गैरसमज दृढ झाला आहे. पण घावनळे येथील स्मशानभूमीला घर मानून चक्क पंधरा वर्षे तेथे राहिलेल्या चंद्रकांत नारायण लाड (वय ७५) या अवलियाने मात्र अंधश्रद्धेची पिढय़ान् पिढय़ा तयार झालेली भुताखेतांच्या अस्तित्वाची भिंत तोडून टाकली आहे. भूतबीत काहीच नसते..असे तो ठामपणे सांगतो.
स्मशानभूमीत मुक्काम
फातिमा आणि चंद्रकांत यांचा संसार फार काळ टिकला नाही. या दोघांच्या संसारावर काळाची वक्रदृष्टी फिरली. साथीच्या आजाराने फातिमा यांना ग्रासले. यातच त्यांचा मृत्यू झाला. यामुळे चंद्रकांत पूर्णत: हादरून गेले. त्यांचे मन कशातच रमेना. आंतरजातीय विवाहामुळे घरचे आधीच दुरावले होते. या सगळय़ात चंद्रकांत यांना आजार जडला. समाजही त्यांना झिडकारू लागला. या सगळय़ा धक्क्यातून सावरणे फार कठीण होते. समाजाची झिडकारणी आणि फातिमा यांचा विरह यामुळे ते समाजापासून अलिप्त राहू लागले. मग जिथून फातिमा गेली तिथेच त्याने राहायचे ठरवले.
रांगणा तुळसुलीजवळच असलेल्या घावनळे-खुटवळवाडी येथील स्मशानभूमीत त्यांनी आपला ठिकाणा हलवला. दु:खाचा डोंगर कासळलेल्या चंद्रकांत यांच्या मनातून भिती, भुता-खेतांची दहशत या सगळय़ा गोष्टी कधीच नष्ट झाल्या होत्या. गेली पंधरा वर्षे ते या शेडमध्ये राहत आहेत. अनेक मृतदेह त्यांनी जळताना रात्र-रात्र जागून पाहिले. पुढे त्यांच्या शरीरावरील जखमा ब-या झाल्या. कमी-जास्त प्रमाणात ते समाजातही मिसळू लागले. पण स्मशानातील निरव शांततेची त्यांना इतकी सवय झाली की इतर ठिकाणी झोपच येईना. त्यामुळे त्यांनी आपला कायमस्वरूपी मुक्कामाचा पत्ता या स्मशानात हलविला. आपले घर समजून ते येथे राहतात.
चंद्रकांत हे कोकणातल्या सर्वसामान्य कुटुंबातीलच. स्वातंत्र्यापूर्वी १ जानेवारी १९३९ला जन्मलेल्या चंद्रकांत यांचे तळेबाजार (ता.देवगड) हे मूळ गाव. पूर्वी थोडीफार समज आली की काम-धंद्यासाठी मुंबई गाठायची असा प्रवास प्रत्येक घरातील मुलांचा ठरलेला असायचा. चंद्रकांतनेही लहान वयातच मुंबई गाठली. तेथे ते आपल्या काकाकडे राहू लागले. दिवसा फुलांचा व्यवसाय करून दादरच्या पायोनियर नाईट स्कू लमध्ये शिक्षण घेतले.
शिक्षणापेक्षाही पोटापाण्याची चिंता त्यांना जास्त होती. फुलांच्या व्यवसायाबरोबरच ते पेंटिंगची कामेही घेऊ लागले. त्या काळात चित्रपटाची पोस्टर्स रंगविण्याचा व्यवसाय मोठय़ा प्रमाणात चालायचा. हे काम ते लीलया करू लागले. चित्रकलेत त्यांनी प्रयत्नपूर्वक कौशल्य मिळविले. पण मुंबईचे जीवन त्यांच्यासाठी फार काळ सोयीचे ठरले नाही. काबाडकष्ट करूनही आर्थिक मेळ जमेना. अखेर गडय़ा आपुला गाव बरा म्हणत ते गावी पोहोचले.चंद्रकांत यांनी कुडाळमध्ये येऊन कामधंद्यासाठी प्रयत्न सुरू केले. मिळेल ते काम पत्करून पोट भरायचे, असा त्यांचा क्रम सुरू झाला. सुरुवातीला ते छोटय़ा-मोठय़ा कामांबरोबरच गणपतीच्या भिंतीवर चित्र काढण्याचे कामही करू लागले. पण त्यातून पुरेसे आर्थिक बळ उभे राहिना. शेवटी त्यांनी मोलमजुरीचे कामही सुरू केले.
ते गावोगाव मोलमजुरीच्या कामासाठी जाऊ लागले. रांगणा-तुळसुली या सह्याद्रीच्या रांगांमध्ये असलेल्या गावातही ते कामानिमित्त जायचे. फातिमा नावाच्या मुलीशी तेथे त्यांची ओळख झाली. याचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्नाचा निश्चय केला. मात्र आंतरजातीय विवाह असल्याने दोन्हीकडून विरोध होता. ते झुगारून त्यांनी विवाह बंधनात अडकत आपले सहजीवन सुरू केले.
मात्र नियतीचा अजब खेळ..कसल्याशा आजाराचे निमित्त होऊन फातिमा अर्ध्या संसारातून निघून गेली आणि चंद्रकांत कोलमडून गेले. जीवनातील रसच संपला.
मग जगणे म्हणजे मरण येत नाही म्हणून असेच त्याच्या आयुष्यात झाले होते. पैसे ही त्यांची फार मोठी गरज उरलेली नाही. तरीही आठवडा-पंधरा दिवसातून ते तालुक्याच्या ठिकाण असलेल्या कुडाळमध्ये जातात. ठरलेल्या लोकांकडे जाऊन भेटून येतात. पुन्हा घावनळेत परततात. तेथील नदीवर थंड पाण्याची आंघोळ करायची. कधीतरी गळ टाकून मासे टाकायचे, स्मशानातच लावलेल्या मिरची, वाली अशा भाज्यांचा वापर करून शेडमध्ये चुलीवर जेवण बनवायचे आणि आयुष्यातील दु:ख आठवून आठवून जगायचे असा त्यांचा दिनक्रम गेली पंधरा वर्षे सुरू आहे. फातिमा यांची आठवण आजही त्यांच्या मनात घट्ट आहे. स्मशानभूमीत असलेल्या शेडमध्ये त्यांनी फातिमा यांचे मंगळसूत्र आजही जपून ठेवले आहे.
भूत-पिशाच हे काहीही नसते. माणसाच्या मनातच भीती असते. आपले मन साफ असेल तर आपल्याला भिण्याचे कारण काहीच नाही. – चंद्रकांत लाड
अंधश्रद्धेला छेद..
चंद्रकांत यांचा प्रवास खूप संघर्षमय आहे. आयुष्यात त्यांनी खूप चढ-उतार बघितले. आयुष्यात पूर्णत: पराभूत झालेल्या अवस्थेत त्यांनी स्मशानभूमीचा आश्रय घेतला. निसर्गाशी एकरूप होऊन स्मशानाला आपले घर मानून गेल्या पंधरा वर्षाचे जगणे अंधश्रद्धेला छेद देणारे आहे. यात कुठलाही बेगडीपणा, नाटकीपणा नाही. मात्र परिस्थितीशी झुंजताना त्यांनी नकळत दिलेला अंधश्रद्धा निर्मूलनाचा हा धडा खूप मोलाचा म्हणावा लागेल.
कोकणातील प्रत्येक गावाच्या सीमा विशेष मंत्र शक्तीने संरषित केलेल्या आहेत.