स्वामी भक्त हो, आपण गुरुलीलामृत ग्रंथाचा आजच्या जीवनात आम्हाला काय उपयोग आहे? हे जरी पाहत असलो तरीही स्वामी महाराजांच्या अवतार कार्यात ज्या ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने बे. शा. सं. श्री. वामनबुवा वैद्य यांच्या बरोबरच्या स्वामी चरित्रकारांनी कोणत्या वेगळ्या गोष्टींची नोंद त्यांच्या लिखाणात घेतली आहे याचाही मागोवा आपण घेत आहेत.
स्वामी भक्त हो, आपण गुरुलीलामृत ग्रंथाचा आजच्या जीवनात आम्हाला काय उपयोग आहे? हे जरी पाहत असलो तरीही स्वामी महाराजांच्या अवतार कार्यात ज्या ज्या व्यक्तिरेखा आलेल्या आहेत, त्या अनुषंगाने बे. शा. सं. श्री. वामनबुवा वैद्य यांच्या बरोबरच्या स्वामी चरित्रकारांनी कोणत्या वेगळ्या गोष्टींची नोंद त्यांच्या लिखाणात घेतली आहे याचाही मागोवा आपण घेत आहेत.
त्यानुसार वे.शा.सं.श्री. माधवाचार्य मैसलगीकर यांनी त्यांच्या ‘नित्याचे सांगाती’ या फक्त चार अध्यायाच्या स्वामी समर्थ चरित्रात स्वामी समर्थ महाराजांना अक्कलकोटी राहावेसे का वाटले? याचे एक वेगळे कारण दिलेले आहे. या गोष्टीचा आपणही विचार करू या.
ग्रंथकार या चरित्राच्या पहिल्याच अध्यायात लिहितात. महाराज अक्कलकोटी का आले?
बद्रिकानाम एक सरिता।
तुरजामहात्मी जी सुनिश्चिता।।
भूरिभद्रा नाम तत्त्वता। देती समस्त जन।। २।।
ती पुण्यसरिता एके दिनी। प्रार्थी हरिपाद जे ते मनी।।
वर देई ऐसा मज लागूनी। मन्मानस जेणे संतुष्टले।।
तपोधन मुनी मन भीतरी। धरोनियां सद्भाव अंतरी।।
स्नान करिती त्या अवसरी। मुक्ती पावोत।।
प्रार्थना ऐंशी बद्रिकेची। श्रवण करोनिया सांची।।
संतोषोनी मनाची। वर अमोलीक देत असे।।
जो न होय मिथ्या सहसा। म्हणूनी वाटे वर्णावासा।।
देऊनिया वरा ऐशा। गमन करी स्वस्थाना।।
त्या भूरिभद्रेचे मनोहर तीर।
येथे अक्कलकोट नाम नगर।।
अतिरमणीय आणि रुचिर। राज पालित वसतसे।।
त्रेता युगात एक ऋषीकन्या तिच्या कृत्यामुळे शापित झाली होती. अनेक वर्षे तपश्चर्या करूनही तिला शापातून मुक्ती नव्हती. अखेर तिने श्रीविष्णूंची म्हणजेच हरीची प्रार्थना केली. श्री विष्णू भगवान तिला प्रसन्न झाले आणि तिला त्यांनी वर दिला.
कलियुगामध्ये आम्ही दत्तात्रय अवतारात श्री स्वामी समर्थ या नावाने प्रगट होऊ त्यावेळी तुझा उद्धार करू. तोपर्यंत तुझ्या पवित्र जलाने सर्व जण प्राणी, पशू, पक्षी, मानव, देव सर्व जण तृप्त होतील. या सर्वाची आई होऊन राहशील. तुझ्या दर्शनाने, स्पर्शाने, प्राशनाने तीर्थरूपातून सगळे जीव मोक्षाला जातील. आम्ही कलियुगामध्ये तुझ्याच काठाला वस्तीला राहून जगाचा योगक्षेम चालवू असा वर तिला मिळाल्याचा उल्लेख पुराणातून आलेला आहे. त्या ऋषीकन्येचा नाव बद्रिका असे होते. अपभं्रषाने लोक भूरिभद्रा या नावाने ओळखू लागले.
तुळजाभवानी पुरणातही तिचा उल्लेख आलेला आहे. हीच भूरिभद्रा नदी अक्कलकोट नगराच्या पूर्व दिशेला तीन कि.मी. अंतरावरून दक्षिण वाहिनी म्हणून बोरी नदी या नावाने ओळखली जाते.
बद्रिकेची भूरिभद्रा झाली, कालांतराने तीच आज बोरी या नावाने वरदायिनी ठरलेली आहे. त्या बद्रिकेचा उद्धार करण्यासाठी महाराज संबंध भारतभ्रमण करून शेवटी अक्कलकोटला आले आणि अखंड वास्तव्यास थांबले.
त्या ऋषिकन्या भूरिभद्रेचे आपल्यावर किती उपकार आहेत? अखेर ब्रह्मांडाचा नायक जिच्या प्रार्थनेवर प्रसन्न होऊन आला आणि कायमचा थांबला. केवळ जगोद्धारासाठी. भूरिभद्रा ही महाराजांची चारही युगात वेगवगेळ्या रूपातून सेवा करीत आलेली आहे.
शिवाय अमृतदायिनी माता भूरिभद्रा म्हणजेच आजची बोरी ही तुम्हा-आम्हा सर्वाना मोक्ष देते. तृप्त करते, तहान भागवते, जगवते, रुजवते, वाढवते हे केवढे उपकार आहेत. तिने स्वत:करिता काहीही मागितले नाही. केवळ लोककल्याणासाठीच मागितले.
पिबान्ति नद्या: स्वयमेव नाम्भ:,
स्वयं न खांदति फलानि वृक्षा:।
धाराधरो वर्षति नात्महेतो,
परोपकाराय संतां विभूतया:।।
नद्या स्वत:चे पाणी स्वत: पीत नाहीत. झाडे आपली फळे स्वत: कधीही खात नाहीत. पाऊस स्वत:करिता कधीही पडत नाही. तसे संत हे केवळ आणि केवळ लोकांच्यासाठी, परोपकारासाठीच अवतीर्ण होतात. चौदा वर्षाच्या वनवासातून राम परत आले, त्यावेळी प्रथम त्यांनी कैकयीमातेचे दर्शन घेतले. लोक कैकयीला शिव्या देत होते. परंतु रामराय म्हणाले, आई तुझी आज्ञा किती फायदेशीर ठरली.
वडिलांचे माझ्यावरचे प्रेम दिसले, भरत महिमा वाढला,माझे बाहुबळ, सीतेचे प्रेम, हनुमंता पौरुषत्व, सुग्रीवाची मैत्री, रावणाचे वैरत्व कसे हे सगळे दिसले, पाहिले, जाणवले आई हे तुझे उपकार आहेत.
तसे भूरिभद्रेचे सकळ जीवावर प्रचंड उपकार आहेत. ते अगदी वर्णनातीत आहेत. या संतांचा हा गुण आपणही घ्यावा. परोपकाराचे बीज सर्वाच्या मनात रुजावे म्हणजे जीवन आनंदमय होईल.
चिंता, भय औषधालाही शिल्लक राहणार नाही. दुस-याला द्यायला शिकले ना, मग कोणत्याच गोष्टींच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावर राहात नाही. ‘‘सब स्वामी का’’ म्हटल्यावर आपण नामस्मरणात दंग राहून, मग काळजीचा प्रश्न नाही. हेच आम्हाला स्वामी समर्थाच्या चरित्रातून शिकण्यासारखे आहे.
।। श्री स्वामी समर्थ।।
लेख छान.
एक शंका – खांदति का खादन्ति ?