मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी संयुक्त महाराष्ट्राचा एवढा प्रचंड लढा लढला गेला. मराठी भाषा मात्र आता अडचणीत येऊन पडली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळा बंद पडत चालल्या आहेत. प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार पाच वर्षात ४० हजार विद्यार्थी गळालेले आहेत. २०१०पासून ही गळती सुरू झाली आणि १८ हजारांहून आता ती ४० हजारांवर पोहोचली. अर्थात हे विद्यार्थी घरी बसले, असा त्याचा अर्थ नव्हे तर गळती झालेल्या विद्यार्थ्यांचे आकर्षण इंग्रजी माध्यमांच्या शाळा ठरलेले आहे. मराठी शाळांमधील ही गळती मराठी भाषेकरिता चिंतेची बाब मानली पाहिजे. मुंबई महानगरपालिका मराठी अस्मितेचा राजकीय घोष करणा-या पक्षाच्या हातात आहे. हा पक्ष मराठीच्या नावावर राजकारण करतो. ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशा घोषणा करतो. ‘जय महाराष्ट्र’ अशीही एक घोषणा आहेच. मुंबई महानगरपालिका मराठी शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्यांवर वर्षाला ५० हजार रुपये खर्च करते. म्हणजे महिन्याला सुमारे चार हजारांपेक्षा जास्त. इंग्रजी माध्यमांच्या शाळांवर महिन्याचा प्रत्येक विद्यार्थ्यांचा खर्च १० हजार रुपयांच्या आसपास आहे. बंद पडणा-या मराठी शाळा वाचवल्या पाहिजेत, याबद्दल काही दुमत नाही. मराठी भाषा वाचवली पाहिजे, याबद्दलही दुमत नाही. ज्ञानोबा, तुकोबाची मराठी आणि खुद्द ज्ञानोबा-तुकोबा मराठी अस्मितेची प्रतीके आहेत. तेव्हा मराठी भाषिकात आणि मराठी पालकांची ही जबाबदारीच आहे की, मराठी भाषा त्याच्या पाल्यांनी शिकलीच पाहिजे. मराठी बोली बोलली गेलीच पाहिजे. आज रस्त्यावर दोन मराठी माणसे भेटली तरी समोरचा माणूस मराठी आहे, हे समजेपर्यंत आणि समजल्यानंतरसुद्धा ही दोन्ही माणसे मुंबईत तरी हिंदीतच बोलतात. मराठी भाषेच्या अस्मितेसाठी संयुक्त महाराष्ट्राचा एवढा प्रचंड लढा लढला गेला. मराठी भाषा मात्र आता अडचणीत येऊन पडली आहे. मराठी शाळा मोडकळीला आलेल्या आहेत. मराठी चित्रपटगृहे मोडकळीला आलेली आहेत; पण सुर्दैवाने मराठी चित्रपट मात्र अमराठी चित्रपटगृहात अतिशय रुबाबात प्रदर्शित केले जात आहेत आणि मराठी चित्रपटसृष्टी तेजीत आहे, ही समाधानाची गोष्ट आहे. तरीसुद्धा मराठी शाळा बंद पडणे म्हणजे हळूहळू मराठी घरातले मराठी मुलांचे शिक्षण बंद पडल्यासारखे आहे. त्यामुळे मराठीचा कैवार घेणा-या प्रत्येकाला मराठी भाषा वाचवण्यासाठी प्रभावी उपाय योजावेच लागतील त्याचप्रमाणे आपल्या घरातील मुले मराठी शिकतील, याची काळजीही घ्यावी लागेल.
पण एक प्रश्न असा आहे की, मराठी शाळेतून मुलांची गळती होत असताना पालक आपल्या मुलाला इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे का वळवत आहेत?
याची कारणे काय आहेत? त्या कारणांच्या खोलात गेल्याशिवाय या प्रश्नाचे उत्तर सापडणार नाही. आज परिस्थिती अशी आहे की, स्पर्धेच्या या युगात केवळ मराठी माध्यमांच्या शाळांमधून पदवी शिक्षण घेतलेल्यांना फारसा वाव मिळत नाही. मराठी टिकली पाहिजे, हा आग्रह धरत असतानाच जगाच्या स्पर्धेची भाषा बहुसंख्य देशात इंग्रजी आहे, हे सत्य नाकारता येत नाही. गेल्या २५ वर्षात देशाच्या बदललेल्या जीवनशैलीची सगळी सूत्रे प्रामुख्याने कॉर्पोरेट जगाच्या हातात गेलेली आहेत. कॉर्पोरेट जग हे जसे स्पर्धेचे जग आहे तसेच ते गुणवत्तेचे जगही आहे आणि या गुणवत्तेच्या जगात मराठी भाषा स्पर्धेत कमी पडते आहे, विज्ञानात कमी पडते आहे, तंत्रज्ञानात कमी पडते आहे, संगणकीय क्रांतीत तर जी जवळपाससुद्धा पोहोचलेली नाही. या स्थितीमध्ये उद्याच्या स्पर्धेच्या जगात मराठी तरुण टिकायचा असेल तर त्याला ज्ञान विज्ञानाची मान्य झालेली इंग्रजी भाषा नुसतीच शिकावी लागेल असे नव्हे तर पचवावी लागेल आणि त्या भाषेत पारंगतताही मिळवावी लागेल. एक गोष्ट नक्की आहे की, आता येथून पुढे गुणवत्ता हाच निकष प्रभावी निकष ठरणार आहे. शिफारसपत्राच्या आधारावर नोक-या मिळण्याचे दिवस जसे संपलेले आहेत, त्याचप्रमाणे व्यवसायामध्येही ‘वशिला’ हा शब्द आता बाद होत चालला आहे. जिथे गुणवत्ता आहे, तीच स्पर्धेत टिकून राहील आणि गुणवत्तेला जागतिक भाषेची फार मोठी गरज आहे. कोणत्याही उत्पादकाला केवळ मराठी भाषेतच त्याची जाहिरात किंवा त्याची टिपण्णी ही अपुरी पडणारी आहे. आजच्या जाहिरातीच्या जगातही टिकायचे असेल तर जागतिक स्पर्धेत मराठी इतकीच अस्खलितपणे इंग्रजी भाषाही आत्मसात केल्याशिवाय आमचा मराठी विद्यार्थी जगाच्या स्पर्धेत टिकू शकेल, अशी शक्यता कमी आहे. माधव ज्युलियन यांनी ६० वर्षापूर्वीच सांगून ठेवले आहे की,
वाघिणीचे दूध प्याला
वाघ बच्चे फाकडे..
इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध म्हणून संबोधले गेले आहे. मराठी टिकवण्याची जबाबदारी मराठी पालकांवर असतानाच आपले पाल्य जागतिक स्पर्धेत कुठेही कमी पडू नये, याकरिताही इंग्रजीची तितकीच मदत अत्यावश्यक आहे, हे नजरेआड करून चालणार नाही.
मग यावर तोडगा काय काढायचा? मराठी टिकली पाहिजे, हे म्हणत असताना केवळ सभा-संमेलनातून, साहित्य संमेलनातून किंवा कवी संमेलनातून मराठीचा वापर हा मराठीच्या उद्धाराकरिता अपुरा आहे. मराठी अडचणीत आली, या भावनेचा अर्थ मराठी भाषा संपेल, असा अजिबात घेता कामा नये.
ज्ञानोबा-तुकोबाची मराठी संपणार नाही; पण मराठी माणसाला प्रतिष्ठित करण्याकरिता, सन्मानित करण्याकरिता आणि आर्थिकदृष्टय़ा संपन्न करण्याकरिता मराठीच्या मदतीला इंग्रजीसुद्धा आवश्यक ठरलेली आहे. याची दखल आपण घेतली नाही तर प्रवाहाच्या विरुद्ध फार दिवस पोहता येणार नाही. दमछाक होईल, हेही समजून घेतले पाहिजे.
१२५ कोटी लोकसंख्या असलेल्या भारताची राज्य भाषा कोणती.कोणताही मोबाईल घ्या त्यातील भाषा बघा. ५० लाख लोकसंख्या असलेल्या देशाची राज्य भाषा त्यात मिळेल. आमचे नेते शिवाजी आणि आंबेडकर यांच्या काळ खंडातून बाहेर पडत नाहीत. जनता नेत्यांचे अनुकरण करणार.