मराठी चित्रपटसृष्टीत चाळिसेक वर्षापूर्वी रेखा आणि चित्रा या दोन अभिनेत्रींचा खूप बोलबाला होता. या दोन बहिणींमधल्या रेखा म्हणजे आधीच्या कुमुद सुखटणकर. सचिन शंकर यांच्या बॅलेमधून काम करता करता त्या अभिनय क्षेत्रात आल्या. ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटातून नायिका म्हणून त्यांनी रेखा या नावाने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. चित्रपटलेखक ग. रा. कामत यांच्याशी विवाह केल्यानंतर रेखा यांनी अनेक नाटकांतही भूमिका केल्या. अभिनेत्री म्हणून देखणा, घरंदाज, शालीन आणि प्रेमळ चेहरा लाभलेल्या रेखा आज काही मालिका आणि चित्रपटांतून प्रेमळ आजीच्या भूमिकांत दिसतात. जुन्या काळातील आपल्या आठवणींना त्यांनी या मुलाखतीत दिलेला हा उजाळा
राजाभाऊ परांजपे यांच्या ‘लाखाची गोष्ट’ या चित्रपटामुळे अभिनय श्रेत्राला ‘रेखा कामत’ नावाचा देखणा, घरंदाज, शालीन आणि प्रेमळ चेहरा अभिनेत्री म्हणून लाभला, पण तुम्हाला अभिनयाची गोडी लागली कशी?
>माझं बालपण गेलं कनिष्ठ मध्यमवर्गात. दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाशेजारच्या मिरांडा चाळीत. आमच्या चाळीत गणेशोत्सव जल्लोषात साजरा व्हायचा. त्यावेळी गणेशोत्सवात दहा-पंधरा दिवस चालणारे मेळे असायचे. त्या मेळयांमध्ये छोटया छोटया नाटिका व्हायच्या. त्या नाटिकांमधून कामं केली. हे मेळे बघायला दादर परिसरातील मान्यवर मंडळींची उपस्थिती असायची. त्यावेळी दादरमधल्या विविध संस्थांचे वार्षिक कार्यक्रम व्हायचे. मिरांडा चाळीतील गणेशोत्सवात होणा-या मेळयांतील कार्यक्रम पाहून आम्हाला त्या वार्षिक कार्यक्रमात होणा-या स्नेहसंमेलनात होणा-या सादरीकरणासाठी बोलावलं जायचं. त्यात काम करता करताच नाटकांतून कामं करण्याची आवड निर्माण झाली, तर दुसरीकडे नृत्य आणि गायनाचा सराव सुरू झाला. दादरमधील इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या मुलींच्या शाळेत शिकत असताना नृत्याचे आणि गायनाचे धडे गिरवायला सुरुवात केली. गाण्यासाठी भानुदास मानकामे, घोडकेगुरुजींची शिकवणी लावली. तर नृत्यासाठी गौरी शंकर (कथ्थक) आणि पार्वतीकुमार (भरतनाटयम्) अशा नामवंत गुरूंकडे शिकण्यास सुरुवात केली. नृत्य आणि गायनाची साधना सुरू असताना मेळयांमधून कामं करणं सोडलं नाही. एके दिवशी सचिन शंकर यांच्या ‘रामलीला’ या प्रसिद्ध बॅलेत ब्रेक मिळाला. माझं वय त्यावेळी असेल पंधरा-सोळा र्वष. सचिन शंकरच्या बॅलेत काम करण्याची संधी मिळणं, ही भाग्याची गोष्ट समजली जायची. त्यामुळे घरचे खासकरून आई तिथे पाठवायला तयार झाली. त्यावेळी सचिन शंकरच्या बॅलेत आमच्याबरोबर तेव्हा कुमुदिनी लेलेही होती. (नंतर ती कुमुदिनी शंकर झाली.) कुमुदिनी सोबत असल्यामुळे काम करण्यास हुरूप आला. त्या बॅलेत माझ्याकडे कुठलीच प्रमुख भूमिका नव्हती. पण वानर, राक्षस, सैनिक अशी कामं केली. या बॅलेचे ठिकठिकाणी प्रयोग व्हायचे. सचिन शंकर फक्त बॅलेच बसवायचे नाहीत, तर ‘बॉम्बे टॉकीज’, ‘फिल्मिस्तान’च्या चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन करायचे. त्यावेळी समूहनृत्यासाठी ते मला आवर्जून बोलवायचे. सचिन शंकरच्या बॅलेतून काम करण्याची संधी मिळाल्यामुळे लखनौपासून लाहौपर्यंतची भारतातील सगळी प्रमुख शहरं फुकटात बघून झाली. शिवाय माझी पहिलीवहिली मिळकतही सुरू झाली, याचाही आनंद होता. तसं बघायला गेलं तर नृत्य आणि गायन हे अभिनयाचं एक अंगच आहे. मला वाटतं, यातूनच माझ्यात अभिनयाची आवड निर्माण झाली.
१९५०-६०च्या दशकातील आजच्या इतका पुढारलेपणा नव्हता. बॅलेतून, नाटकांतून कामं करणा-या सुशिक्षित घराण्यातील मुलींवर तेव्हा समाजातून, आप्तांकडून टीका व्हायची.
तुम्हालाही अशा टीकेला सामोरं जावं लागलं?
>हो तर, अशा प्रकारच्या टीकेला फक्त मलाच नाही, तर माझी पाठची बहीण कुसुमलाही सामोरं जावं लागलं. आज अभिनयक्षेत्राकडे करिअर म्हणून पाहिलं जातं. अभिनयाचं प्रशिक्षण देणा-या संस्थांचं सगळीकडे पीक आलंय. आमच्या वेळेला अशी परिस्थिती नव्हती. एखाद्याने अभिनय क्षेत्र स्वीकारणं म्हणजे त्या व्यक्तीचं भविष्य अंधारमय, अशीच बहुतेकांची भावना होती. त्यातही या क्षेत्रात काम करणा-या मुलींना-स्त्रियांना समाजात अजिबात प्रतिष्ठा नव्हती. ‘मुली वाया गेल्या’, ‘मुलींनी सिनेमातून कामं करणं आईवडिलांना कसं चालतं’ असे टोमणे लोक मारायचे. नातेवाईकसुद्धा आमच्याशी बोलायचे नाहीत. पण प्रगत विचारांची माझी आई आमच्या पाठी भक्कम उभी राहिल्यामुळे आम्हा बहिणींकडे वाकडया नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत झाली नाही. पुढे आमचं नाव झालं, तेव्हा शिव्यांची स्तुतिसमुनं झाली. नातेवाईक आवर्जून आमचं त्यांच्याशी असलेलं नातं सांगायचे.. ‘अरे या माझ्या चुलत बहिणी बरं का!’, ‘ही माझी भाची’, ‘ही माझ्या मोठया जावेची मुलगी’, ‘या दोघीही मुली आमच्या शेजारी राहतात’..अर्थात हे मतपरिवर्तन व्हायला बराच काळ जावा लागला.
चित्रपटसृष्टीत येणाऱ्यांची नावं बदलली जायची. तुमचंही असं बारसं झालं का?
>माझं माहेरचं नाव कुमुद सुखटणकर. सचिन-शंकर यांच्या बॅलेतून कामं करतानाही तेच नाव कायम होतं. मात्र राजाभाऊ परांजपेंचा ‘लाखाची गोष्ट’ हा चित्रपट मिळाला आणि माझं आणि कुसुमचं नाव ग. दि. माडगूळकरांनी बदललं. गदिमांनी माझं नाव ‘रेखा’ ठेवलं तर कुसुमचं नाव ‘चित्रा’. सगळ्या चित्रपटाच्या श्रेयनामावलीत तुम्हाला आजही आम्हा बहिणींची नावं रेखा आणि चित्रा अशीच सापडतील.
राजाभाऊंबरोबर काम करण्याची संधी कशी मिळाली?
>चित्रपट दिग्दर्शक श्रीकांत सुतार आणि अभिनेत्री हंसाबाई वाडकरांमुळे राजाभाऊंबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सचिन शंकरच्या बॅलेतील आदर्श कलाकार ही आम्हा बहिणींची तेव्हा ओळख होती. त्यावेळी श्रीकांत सुतार कुणातरी मद्रासी निर्मात्याच्या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शन करत होता. त्या चित्रपटात हंसाबाई वाडकरांची प्रमुख भूमिका होती. हंसाबाईंच्या मैत्रिणींच्या भूमिकेसाठी श्रीकांतने मला आणि चित्राला बोलावलं. चित्रपटात गाणं, नृत्य आणि संवाद असलेल्या छोटया छोटया भूमिका होत्या. आम्ही दोघी बहिणी त्या मन लावून करत होतो. ते बहुतेक हंसाबाईंना आवडलं असावं. त्याच वेळेस काहीतरी कामानिमित्त हंसाबाई वाडकरांना राजाभाऊ परांजपे स्टुडिओत भेटायला आले होते. तिथे हंसाबाईंनी आमची ओळख राजाभाऊंशी करून दिली. ‘या दोन मराठी मुली आहेत. त्या नाचतातही सुरेख. शिवाय दोघींना अभिनयाची जाण आहे. पुढे यांना काही काम असेल तर द्या.’ हाच काय तो त्या भेटीतला संवाद. त्या प्रसंगाला बरेच महिने लोटले. राजाभाऊंसारखा श्रेष्ठ दिग्दर्शक आम्हाला कधी बोलावेल, असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं. एक दिवस अचानक पुण्याहून तार आली. ‘आम्ही चित्रपट करत आहोत. आम्हाला तातडीने येऊन भेटा.’ ती तार राजाभाऊंनी पाठवली होती. वडील आम्हा दोघी बहिणींना घेऊन पुण्याला राजाभाऊंच्या भेटीसाठी निघाले. त्यावेळी स्टुडिओत आमची स्वत: राजाभाऊ परांजपे, ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, बाळ बापट, राजा ठाकूर या मान्यवरांच्या समोर ऑडिशन झाली. आम्हाला संवाद म्हणायला लावले. नृत्य करायला लावलं. आम्ही दोघींनी गाणंही सादर केलं. पण आपल्याला चित्रपटात काम करायला मिळेल, असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. काही दिवसांनी ‘लाखाची गोष्ट’मध्ये तुम्हाला निवडलं गेलं असल्याची तार आली. ‘लाखाची गोष्ट’मुळे माझ्या अभिनयप्रवासाला आणि त्यानंतर लेखक ग. रा. कामतांसारख्या सिद्धहस्त लेखकाबरोबरच्या सहजीवनाला सुरुवात झाली.
या सगळया प्रवासात तुमचं शिक्षण सुटलं असेल?
>नाही, तसं काहीच घडलं नाही. कलाक्षेत्रात काम करत असलो तरी शिक्षण सोडायचं नाही, हा निश्चय आम्ही बहिणींनी आधीपासूनच केलेला होता. तसा आमच्या आईबाबांचा दंडकच होता. इयत्ता चौथीपर्यंत भवानी शंकर रोडवरील कुंभारवाडा परिसरातील शाळेत शिकले. पाचव्या इयत्तेनंतर इंडियन एज्युकेशन सोसायटीच्या छबिलदास शाळेतून मॅट्रिक केलं. पुढे एसएनडीटीमधून एफ. वाय. झाले. त्यादरम्यान ग. रा. कामतांशी लग्न ठरलं. परिणामी शिक्षण थांबवावं लागलं.
ग. रा. कामतांसारख्या प्रथितयश लेखकाच्या ‘लग्नाच्या बेडी’त अडकण्याचा योग कसा जुळून आला?
>का कुणास ठाऊक, पण माझा स्वभाव राजाभाऊंना भरपूर आवडायचा. माझ्यात असणा-या अभिनयाच्या गुणवत्तेला पुढे भविष्यातही प्रोत्साहन मिळावं, म्हणून राजाभाऊंनी ग. रा. कामतांसाठी मला मागणी घातली. तेही लग्नाच्या वयाचे होते. मुख्य म्हणजे आम्ही दोघं एका जातीचे होतो. १९५२ साली ‘लाखाची गोष्ट’ चित्रपट प्रदर्शित झाला. त्याच्या पुढल्या वर्षी म्हणजे १९५३ मध्ये आम्ही विवाहबंधनात अडकलो.
लेखकाची बायको म्हणून सहजीवनात गमतीजमती नक्कीच अनुभवल्या असतील?
>हो, ते तर मंतरलेले दिवस होते. लग्नानंतरचं आमचं तेरा-चौदा वर्षाचं सहजीवन पुण्यात व्यतित झालं. नव्या पेठेतील आमच्या घरात श्री. पु. भागवत, पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, ग. दि. माडगूळकर, बा. सी. मर्ढेकर, बाळ कुरतडकर अशा थोर नामवंत साहित्यिकांचं घरी येणं-जाणं असायचं. पुण्यात येण्यापूर्वी कामतांनी रुईया महाविद्यालयातून मराठी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. केलं. न. र. फाटक आणि सदोपंत दांडेकर यांच्या तालमीत कामत तयार झाले होते. त्यामुळे त्यांच्यात अभ्यासू वृत्ती निर्माण झाली होती. काही वर्षातच ते रुईयात शिकवू लागले. तिथे त्यांची ओळख बाळ सामंत आणि श्री. पु. भागवतांशी झाली. पुढे कामत मौज-सत्यकथेचे सहसंपादक झाले. कामतांच्या अभ्यासू वृत्तीमुळे त्यांचं पु. ल. देशपांडे, पु. भा. भावे, गंगाधर गाडगीळ, व्यंकटेश माडगूळकर, ग. दि. माडगूळकर, बा. सी. मर्ढेकर या साहित्यिकांशी स्नेह जुळलं. पुढे आम्ही पुण्यात गेलो तरी ही मंडळी आमच्या त्या छोटयाशा घरात आवर्जून यायची. तेव्हा तर रात्री उशिरापर्यंत गप्पांच्या मैफली रंगत. ही मंडळी बोलायला लागली की, माझ्या जीवाचे कान होत. कामतांमुळे बालगंधर्वाना अगदी जवळून पाहण्याचा योग आला. त्यांचं सुमधूर गद्य बोलणं आजही माझ्या कानात गुंजतंय.
अभिनेत्री रेखा कामतांना सासरी जमवून घेताना काही त्रास झाला का?
>प्रत्येक नव्या नवरीला सासरी जुळवून घेताना थोडाफार त्रास होतोच. तसा मलाही झाला. चित्रपट-नाटकांमधून काम करणारी मुलगी कामतांचा संसार कसा सांभाळेल,हा सासरच्या मंडळींपुढे प्रश्नच होता. पण तो भ्रम काही दिवसांतच दूर झाला. काही दिवसांतच मी सासरच्या मंडळींची मनं जिंकली. नणंदा आणि दिरांचं अतिशय प्रेमाने केलं. अर्थातच त्या मंडळींनाही या सा-याची जाणीव आहे.
कुटुंब सांभाळून पुढे अभिनयाला वेळ कसा दिला?
>लग्नानंतर लगेचच चित्रपट-नाटकांतून कामं केली नाहीत. सुरुवात झाली पुणे आकाशवाणी केंद्रावर श्रुतिका सादर करण्यापासून. त्यावेळी पुणे आकाशवाणी केंद्रावर सीताकांत लाड आणि व्यंकटेश माडगूळकर छोटया छोटया श्रुतिकांचं सादरीकरण करायचे. त्यांनी मलाही त्यांच्या सादरीकरणात सहभागी होण्यास सांगितलं. मुली थोडया मोठया होईपर्यंत आकाशवाणी केंद्रांवर अधूनमधून सादरीकरण करायाल जायचे. त्यावेळी मी अभिनय अर्धवेळ केला, पण आईची भूमिका पूर्णवेळ निभावली. मुली थोडया मोठया झाल्यावर चित्रपट-नाटकांमधून कामं करू लागले. लग्नानंतरचा माझा पहिला चित्रपट होता ‘कुबेराचं धन’. या चित्रपटात माझी प्रमुख भूमिका होती. ती भरपूर गाजली. पाठोपाठ ‘गृहदेवता’ या राष्ट्रीय पारितोषिक विजेत्या चित्रपटातही मी दुहेरी भूमिका साकारली. पुण्यात असताना संगीत नाटकांमधूनही कामं केली. ‘पुण्यप्रभाव’मधली मी साकारलेली ‘किंकिणी’ विशेष गाजली. त्या नाटकात हिराबाई बडोदेकर, शांताबाई आपटे, नानासाहेब आपटे आणि ऑर्गनवादक गोविंदराव पटवर्धनांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मुंबईत राहायला आल्यावर निश्चिंत मनाने पुन्हा एकदा संगीत नाटकांद्वारे रंगभूमीवर पर्दापण केलं. ‘सौभद्र’, ‘एकच प्याला’, ‘भावबंधन’ यांच्यापाठोपाठ ‘तुझे आहे तुजपाशी’, ‘सुंदर मी होणार’, ‘लग्नाची बेडी’, ‘कल्पवृक्ष कन्येसाठी’, ‘दिल्या घरी तू सुखी राहा’, ‘दिवा जळू दे सारी रात’, ‘तुरुण तुर्क..’, ‘ऋणानुबंध’, ‘प्रेमाच्या गावा जावे’, ‘गोष्ट जन्मांतरीची’, ‘गंध निशिगंधाचा’ अशा सामाजिक तसंच व्यावसायिक नाटकांमधून कामं केली. कौटुंबिक नाटकांत जेवढया सहजतेने कामं केली तितक्याच उत्कटतेने प्रायोगिक नाटकांतीलही भूमिका रंगवल्या. ‘गंध निशिगंधाचा’ हे माझं शेवटचं नाटक. त्यानंतर नाटकांमधून कामं केली नाहीत.
‘काला पानी’, ‘बंबई का बाबू, ‘अनिता’, ‘कच्चे धागे’, ‘मैं तुलसी तेरे आंगन की’, ‘मेरा गाँव मेरा देश’, ‘बसेरा’सारख्या हिंदी चित्रपटांसाठी ग. रा. कामतांनी लेखन केलं आहे. तरीही तुम्ही हिंदी चित्रपटांपासून दूर राहिलात?
>लग्नानंतरचा माझा पहिला चित्रपट होता ‘कुबेराचं धन’. तो चित्रपट मिळाला तेव्हा कामतांनी स्पष्टच सांगितलं होतं की, ‘तू तुझ्या हिमतीवर कामं मिळवायची. मी लिहिलेल्या एकाही चित्रपटात तुला घेणार नाही. तशी तू मला सक्ती करायची नाहीस.’ मी ठीक आहे, म्हणाले. कामतांना दिलेला शब्द मी आजही पाळला आहे. कधीही कोणाकडे कामासाठी लाचारी केली नाही. जी कामं समोरून चालत आली ती केली.
या क्षेत्रात वावरताना काही कडू-गोड आठवणी, काही कसोटीचे प्रसंग आले असतीलच?
>पुष्कळच आले. ज्या रात्री माझ्या वडिलांना देवाज्ञा झाली, त्याच्या दुस-या दिवशी सकाळी दहा वाजता रवींद्र नाटय मंदिरमध्ये ‘प्रेमाच्या गावा जावे’चा प्रयोग होता. ही बातमी आमच्या युनिटमध्ये कुणालाच ठाऊक नव्हती. रात्रभरचं जागरण, मनावरचा ताण घेऊन प्रयोगासाठी रंगभूमीवर एंट्री घेतली. पहिला अंक संपता संपता मी संवाद विसरून गेले. काही सुचेनासं झालं. त्यावेळी माझे सहकलाकार अरविंद देशपांडेंनी मला सावरून घेतलं. विंगेत आले. हमसून हमसून रडले. डोळे पुसले, पुन्हा प्रयोगाला उभे राहिले. पुढचं नाटक व्यवस्थित पार पडलं. प्रेक्षकांना काहीच समजलं नाही. कडू आठवणींविषयी सांगायचं तर त्यावेळी प्रभाकर पणशीकर ‘मला काही सांगायचं आहे’ हे नाटक करत होते. त्या नाटकात सुधा कमरकरची प्रमुख भूमिका होती. या नाटकाचे प्रयोग चालू असताना सुधा अचानक बाथरूममध्ये पाय घसरून पडली. दुस-या दिवशी ‘मला काही..’चा प्रयोग होता. सुधाऐवजी कुणाला घ्यायचं, या विचारात पणशीकर असताना कुणीतरी त्यांना माझं नाव सुचवलं. मीही तयार झाले. त्या प्रयोगाची तिकीटविक्री झाली होती. आयत्या वेळेस मी ते नाटक केलं. प्रेक्षकांना आवडलं. पणशीकरही खूश होते. या नाटकाचे तेवीस प्रयोग मी केले असतील. चोविसाव्या प्रयोगाच्या वेळी नाटयगृहात पोहोचले. दारावरचा नाटकाचा फलक पाहिला. त्या फलकावर माझ्याऐवजी सुधाचं नाव होतं. मला वाईट वाटलं. सुधाने नाटकात काम करण्याला माझा आक्षेप नव्हता. आपल्या कामाची गरज संपल्यावर पणशीकरांनी झालेले बदल कळवण्याचं सौजन्यही दाखवलं नाही, याचं दु:ख झालं. त्यानंतर ठरवलं की, पणशीकरांच्या कुठल्याच प्रोजेक्टमध्ये काम करायचं नाही. कालांतराने पणशीकर एक ऐतिहासिक नाटक करत होते. त्यात त्यांनी मला भूमिका देऊ केली, पण ती मी नाकारली. मोहन वाघांमुळे ‘गंध निशिगंधाचा’मध्ये पणशीकरांबरोबर काम केलं. अर्थातच ते माझं शेवटचं नाटक होतं.
पण चांगले अनुभवही आले असतील ना?
>चांगले अनुभव पुष्कळ आहेत. इथे मी हिराबाई बडोदेकरांची आठवण सांगते. त्यावेळेस ‘पुण्यप्रभाव’ या संगीत नाटकात ‘किंकिणी’ नावाची भूमिका साकारत होते. किंकिणी कालिंदीची दासी असते. नाटकात ‘कालिंदी’च्या भूमिकेत होत्या हिराबाई बडोदोकर. वसुंधराच्या भूमिकेत होत्या शांताबाई आपटे आणि वृंदावन वठवत होते नानासाहेब आपटे. या संगीत नाटकात चार गाणी होती. निर्मात्यांचं असं म्हणणं होतं की, ती गाणी मीच गायला हवीत. गंधर्व संगीत महाविद्यालयात चार र्वष पेटीवर गाणं शिकले असले तरी व्यासपीठावर गाणं म्हणण्याचा अनुभव नव्हता. माझी अडचण निर्मात्यांना सांगितली. त्यांनी ऑर्गनवादक गोविंदराव पटवर्धनांना माझ्या मदतीला पाठवलं. गोविंदरावांनी सलग पंधरा दिवस तालमी घेतल्या. त्यांनी माझ्या गळयाला साजेशा सुरात गाणी बसवली. ‘पुण्यप्रभाव’चा पहिला प्रयोग झाल्यावर हिराबाई बडोदेकर माझ्याजवळ आल्या आणि म्हणाल्या, ‘रेखाताई तुमचा आवाज चांगला आहे. तुम्हाला गाणं आणि तालाची चांगली समज आहे. तुम्ही अतिशय चारही गाणी सुरेख गायलीत. मला आवडली. तुम्ही गाणं का वाढवत नाही? मी शिकवेन तुम्हाला.’ हिराबाईंच्या कौतुकाने मी सुखावले. तत्काळ गाणं शिकण्याचा होकार दिला. पण नंतर मला काही गाणं वाढवता आलं नाही, ही खंत आजही
मनात कायम आहे. राग ओळखता येतात. सूर समजतो. पण त्याचा उपयोग काय? संसार सांभाळून एवढी सारी व्यवधानं सांभाळणं कठीणच असतं.
‘गंध निशिगंधाचा’नंतर चार ते पाच वर्षानी तुम्ही प्रतिमा कुलकर्णीच्या ‘प्रपंच’ या मालिकेत दिसलात. त्या दरम्यान तुम्ही कुठल्याही नाटक किंवा चित्रपटातून दिसला नाहीत..
>मी आणि कामत आपापल्या क्षेत्रात इतके व्यग्र असायचो की, एकमेकांना वेळ देता आला नाही. त्या चार वर्षाच्या काळात एकमेकांना पुष्कळ वेळ दिला. विश्रांती घेतली. त्या दरम्यान प्रतिमा कुलकर्णीनी ‘प्रपंच’साठी विचारणा केली. तीही मालिका प्रेक्षकांना पुष्कळ आवडली. इतकी ५२ भागांची मालिका पुढे ७८ भागांपर्यंत वाढवली. ‘प्रपंच’नंतर मला जेवढया मालिका-चित्रपट मिळाले त्यात माझ्यासाठी ‘आजी’ची भूमिका खास निर्माण करण्यात आली. याचा प्रत्यय ‘माणूस’, ‘याला जीवन ऐसे नाव’, ‘सांजसावल्या’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ या मालिका तसंच ‘अगं बाई अरेच्चा!’ सारखे चित्रपट, विविध जाहिरातींमधून आलाच असेल.
आवडते दिग्दर्शक कोणते?
>नाटय दिग्दर्शक म्हणाल तर बाळ सुखटणकर, अरविंद देशपांडे, आत्माराम भेंडे हे माझे आवडते नाटय दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली महिनाभर तालमी करायचो. त्यांच्या कामाची पद्धत खूपच चांगली होती. चित्रपट दिग्दर्शक म्हणून आजही आदर्श वाटतात, राजाभाऊ परांजपे. नैसर्गिक अभिनय कसा असला पाहिजे, कसा केला पाहिजे, भूमिकेचा अभ्यास कसा केला पाहिजे याचे राजाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली गिरवलेले धडे आजही उपयोगी पडतात.
डॉ. काशिनाथ घाणेकर ते आजच्या नव्या पिढीतील सुनील बर्वे, भरत जाधव, संजय नार्वेकर, स्वप्नील जोशी यांच्याबरोबर काम केलंत. या नव्या पिढीतील कलाकारांविषयी काय सांगाल?
>जुन्या पिढीतील कलाकारांविषयी प्रश्नच नव्हता. त्यांचा भूमिकेचा अभ्यास दांडगा होता. त्या तुलनेत नव्या पिढीतील कलाकारांविषयी सांगायचं झाल्यास ते आपल्या भूमिकेशी प्रामाणिक राहून सादरीकरण करतात. भरत, संजयचं विनोदाचं टायमिंग अचूक आहे. स्वप्नील, सुनीलच्या अभिनयातील सहजता भावते.
काही करायचं राहून गेलंय का?
>गाणं वाढवायचं राहून गेल्याव्यतिरिक्त कुठलीच खंत मनात नाही. कामतांचंही आत्ता वय झालंय. ९० वर्षाच्या कामतांना सांभाळणं, वाचन आणि घरकाम यात जास्तीत जास्त वेळ जातो. त्यामुळे कुठल्या नवीन कलाकृतीत काम करणं सध्या तरी शक्य नाही.
magil veli rajesh shirbhateni manmurad anand dil ani sandhyati aaj tumhi.. kharch tumche aahar kase manu hech kalt nahi eka anandachya ani madhur ahtvnichya duniyet ghrbslya phirvun anlet abhinandan ani shubhecha kiti chan lok ahet aplya marthit great man abhimanane bharun yete, punha ekda dhnyvad.
prahhar sampadkiy chamuche abhar.
atul kamalakar tandalikar
खूपच छान ! मुद्देसूद आणी माहीतीपूर्ण ! कामत कुटुंबियांशी संपर्क करायचा आहे ! फोन नंबर किंवा पत्ता मिळाल्यास फार आभारी होईन !