पुरोगामी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधी विधेयकाचे प्रणेते, साधना साप्ताहिकाचे माजी संपादक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, एक विज्ञाननिष्ठ पुरोगामी आणि अनिष्ठ प्रथांचे जाहीर विरोधक म्हणजे नरेंद्र दाभोलकर.
नरेंद्र दाभोलकर हे त्यांच्या दहा भावंडांपैकी सर्वात थाकटे बंधू होते. समाजचिंतक कै.डॉ.देवदत्त दाभोलकर हे त्यांचे सगळ्यात ज्येष्ठ बंधू होते. नरेंद्र दाभोलकर यांचे माध्यमिक शिक्षण साता-यातील न्यू इंग्लिश स्कूल येथे झाले. त्यानंतर सांगलीतील विंलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान क्षेत्रातील पदवी संपादन केली.
पुरोगामी महाराष्ट्रातील अंधश्रद्धा, जादूटोणा विरोधी विधेयकाचे प्रणेते, साधना साप्ताहिकाचे माजी संपादक आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक, एक विज्ञाननिष्ठ पुरोगामी आणि अनिष्ठ प्रथांचे जाहीर विरोधक अशी त्यांची समस्त महाराष्ट्राला ओळख होती. बाबा आढाव यांच्या एक गाव-एक विहिर या सामाजिक उपक्रमात दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. दाभोलकरांनी १९८३ मध्ये श्याम मानव यांच्या सोबत ‘अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समिती’ची स्थापना केली. पुढे काही कारणांवरून १९८९ साली त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती (अंनिस) या स्वतंत्र संघटनेची स्थापना केली. डॉक्टरांनी वैयक्तिक आयुष्य आणि सामाजिक आयुष्य असे भेद पाळले नाहीत.
पूर्ण वेळ त्यांनी स्वत:ला सामाजिक कार्यात वाहून घेतले होते. दाभोलकर नेहमी धार्मिक आणि जातीय शोषणाविरोधात आवाज उठवीत. अंनिसच्या माध्यमातून राज्यातील अनेक बुवा, बाबा, माता आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणा-या पुंडांना त्यांनी खुले आव्हान दिले आणि वेळोवेळी त्यांचे खरे विद्रूप चेहरेही जनतेसमोर आणले. गेली अठरा वर्षे प्रलंबित असलेल्या अंधश्रद्धा विरोधी विधेयकाचे दाभोलकर सक्रिय समर्थक होते. त्यांच्या वैचारिक भूमिकेला वारकरी सेना, हिंदू जनजागरण समिती आणि इतर हिंदुत्ववादी संघटना विरोध करीत होत्या. सध्या ते जात पंचायतींच्या एकाधिकारशाही आणि शोषणा विरोधात ‘मुठ माती’ परिषदा घेत होते.
एके ठिकाणी दाभोलकरांनी म्हटले की, ”आधार घेण्याची वास्तवता आणि आहारी जाण्याची भयग्रस्तता याचा निरक्षीर विवेक व्यक्तीने सतत करावयास हवा. माणूस आधार घेता-घेता कधी आहारी जातो व मानसिक गुलामगिरी स्वीकारतो हे कळत नाही. म्हणूनच सजगता हवी, चुकीच्या संस्कारावर विचाराने मात करून त्याचे विवेकी आचारात रूपांतर करावयास लावणे हे खरे चळवळीचे काम असते. त्यासाठी लोकांवर संतापून भागणार नाही आणि ‘काय हा मूर्खपणा!’ म्हणून त्याची टिंगलटवाळी करून चालणार नाही. त्याच्याशी सतत व सहृदयतेने संवाद साधत राहावयास हवे. मार्ग खूप लांबचा आहे पण तोच इष्ट आहे. शेवटी लढा आहे माणूस बदलण्याचा आणि त्यासाठी क्रोधापेक्षा करुणेची व उपहासापेक्षा आपुलकीची खरी गरज आहे.” यावरून त्यांच्या वैचारिक भूमिकांची आणि विरोधाकांप्रती असलेल्या अहिंसक दृष्टीकोनाची ओळख पटते. संघर्ष बुवाबाजीशी, ऐसे कैसे झाले भोंदू, विवेकाची पताका घेवू खांद्यावरी आणि इतर पुस्तके त्यांनी लिहिली.
त्याशिवाय नरेंद्र दाभोलकर यांना कब्बडी या खेळावर विशेष प्रेम होते.ते स्वत: एक उत्तम कबड्डीपटू होते. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातर्फे खेळणारे चपळ खेळाडू म्हणून त्यांचा लौकिक होता. त्यांनी कबड्डीवर पुस्तकही लिहिले होते. दाभोलकरांच्या हत्येने पुरोगामी महाराष्ट्राच्या चेह-यावर न पुसला जाणारा ओरखडा उमटला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने पुरोगामी चळवळीची कधीही न भरून येणारी हानी झाली आहे आणि एक विवेकनिष्ठ, गांधीवादी आणि समाजहितासाठी वेळोवेळी झटणा-या महर्षींना महाराष्ट्र मुकला आहे.
चांगला लेख आहे पण दाभोळकर की दाभोलकर….