मराठी संगीताचा सुवर्णकाळ ज्यांच्या संगीताने आणि गायनाने सजला, ज्यांनी गीतरामायण गायले व मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले, त्या बाबूजी अर्थात सुधीर फडके यांची आज ९६ वी जयंती. त्यानिमित्ताने त्यांच्या स्मृतींना दिलेला हा उजाळा..
सुमारे दीडशे वर्षापूर्वी बाबूजींचे आजोबा उद्योग व्यवसायानिमित्त देवगड तालुक्यातील वाडा-फणसे येथून कोल्हापूरला गेले. कालांतराने तेथेच रमल्याने गावाशी त्यांचा संपर्क कमी झाला. बाबूजींचे मूळ घर मात्र आजही पडक्या स्थितीत शाबूत आहे. बाबूजींचे वडील विनायक निष्णांत वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हटले जायचे. अशा प्रजावंत विनायक व सरस्वती दाम्पत्याच्या पोटी २५ जुलै १९१९ रोजी ‘रामचंद्र’ ऊर्फ बाबूजींचा जन्म झाला. पाच पुत्रांच्या माता सरस्वती यांच्या अकाली मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबांची पूर्ण वाताहात झाली. गिरगावच्या डॉ. भाजेकरांनी त्यांना मदतीचा हात देत छोटय़ा रामचंद्राला मुंबईत आणले. आर्यन हायस्कूलमध्ये दाखल झाल्यावर विनायकबुवा पाध्ये यांच्याकडे त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले; परंतु उदरनिर्वाहासाठी त्यांना पुन्हा कोल्हापूर गाठावे लागले. कालांतराने छोटे-छोटे गायनाचे कार्यक्रम करण्यासाठी त्यांना कोल्हापूर, मुंबई व नाशिकचे दौरे करावे लागले. अनेक हालअपेष्टा सहन करत त्यांनी परिस्थितीवर मात करून आपले कर्तृत्व सिद्ध केले. पुढे कवी न. ना. देशपांडे यांनी त्यांचे नाव बदलून ‘सुधीर’ असे नामकरण केले.
१९४१ मध्ये मात्र त्यांचे नशीब फळफळले व नोकरी करतानाच चित्रपटास संगीत देण्याचे भाग्य त्यांना लाभले. स्वत: गायक, गीतकार असल्याने प्रभातच्या माध्यमातून १९४६ मध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले. २९ मे १९४९ रोजी प्रसिद्ध पार्श्वगायिका आणि अभिनेत्री असलेल्या ललिता देऊलकर यांच्याशी पुण्यात त्यांचा विवाह झाला. याप्रसंगी गायक महंमद रफी यांनी हिंदीतून मंगलाष्टके म्हटल्याचे सर्वश्रुत आहे. बाबूजींचे चिरंजीव श्रीधर फडके हेदेखील नामवंत संगीतकार व गायक असून ते आपल्या पित्यांचा वारसा अत्यंत यशस्वीपणे चालवत आहेत.बाबूजी ही एक ईश्वरी देणगी असल्याने त्यांनी कधीच चुकीची गाणी बनवली नाहीत. बालगंधर्व व हिराबाई बडोदेकरांचे ते रसिक होते; कारण ते हॉटेलमध्ये गेल्यावर त्यांची गाणी लावायला सांगत व ऐकत. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटाने त्यांना प्रसिद्धी दिल्यावर ‘प्रपंच’, ‘आम्ही जातो आमुच्या गावा’, ‘पुढचं पाऊल’, ‘सुवासिनी’, ‘मुंबईचा जावई’, ‘शेवग्याच्या शेंगा’ अशा अनेक चित्रपटांना संगीत देण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले. तर संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणा-या गदिमांच्या ‘गीतरामायण’ने त्यांना ‘संगीत शिरोमणी’ म्हणून प्रसिद्धीच्या शिखरावर नेले. त्यांना लाभलेला तो प्रसाद परमेश्वरी होताच; परंतु त्या प्रसादामागे गदिमांच्या प्रतिमेचा वरदहस्त होता. १९५५-५६ साली मुंबईच्या आकाशवाणीसाठी त्यांनी त्यातील सर्व ५६ गीते स्वत: संगीत देऊन आणि गाऊन सादर केली. या कार्यक्रमात अन्य गीतांचा समावेश न करता सुमारे १८००च्या वर प्रयोग देश व विदेशात केले. बाबूजींचा सुरेल आवाज, स्पष्ट उच्चार व नेमके स्वराघात यामुळे ते संगीतातील बावनकशी सोन्याचे खणखणीत नाणेच होते.
संगीत दिग्दर्शन, गायन, सामाजिक क्षेत्राविषयी आपुलकी, देशप्रेम व प्रामाणिकपणा यांचा स्रोत असलेले बाबूजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे भक्त होते. त्यांच्यावरील प्रेमापोटीच त्यांनी ‘वीर सावरकर’ या चित्रपटाची तन-मन-धन वेचून निर्मिती केली. संघात बँड कमांडर म्हणून कार्यरत असलेल्या बाबूजींनी गोवा मुक्ती संग्रामात भाग घेतला होता. मुक्तीवीर मोहन रानडे यांच्या सुटकेसाठीही व्यक्तिगत पातळीवर खूप प्रयत्न केले होते. त्यांचे गीत रामायणाचे गायन ऐकून द्वारकापीठाचे शंकराचार्य यांनी त्यांना ‘स्वरश्री’ या पदवीने सन्मानीत केले होते. आपल्या कल्पक बुद्धिमतेच्या जोरावर त्यांनी गाण्यांच्या चालींमध्ये वैविध्य राखण्याचे कठीण काम करतानाच अभंग, श्लोक, प्रेमगीते, लावणी, बालगीते असे अनेक गीतांचे प्रकार त्यांनी हाताळले. त्यातील गीतरामायण हा तर संपूर्ण शास्त्रीय गीतांचा प्रकार होता. म्हणूनच त्यांची सर्व गाणी कालातीत आहेत. सूर, लय, ताल, भाव व शब्दोच्चार हे सुगम संगीतातील पाच महत्त्वाचे घटक त्यांनी लोकांसमोर आपल्या गाण्यातून मांडले.
बाबूजींनी १११ सिनेमांना संगीत दिले असून त्यातील २१ हिंदी सिनेमा होते. शेकडो भावगीतांनाही त्यांनी संगीत दिले. सुमारे ५० वर्षे संगीतसृष्टी गाजवणारे बाबूजी माणूस म्हणून श्रेष्ठच होते ते त्यांच्या अभिजात संगीतप्रेमामुळेच! १९४६ मध्ये ‘गोकुळ’ या पहिल्या सिनेमास त्यांनी संगीत दिले, त्याच वेळी ‘रुक्मिणी स्वयंवर’ या मराठी सिनेमासही दिले. तर ‘वीर सावरकर’ हा २००१ मधील त्यांनी संगीत दिलेला अखेरचा चित्रपट ठरला. अमेरिकेतील ‘इंडिया हेरिटेज फाऊंडेशन’चे संस्थापक सदस्य असलेल्या बाबूजींना ‘हा माझा मार्ग एकला’ या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक पं. नेहरूंच्या उपस्थितीत डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते (१९६३), राष्ट्रपती टी. जी. वेंकटरमण यांच्या हस्ते ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९९१), ‘मा. दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ (२००१), ‘सहय़ाद्री स्वररत्न’ पुरस्कार (२००२) याशिवाय अनेक चित्रपटांतील संगीत व गायनाचे असंख्य पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्र व जीवनगौरवसारखे पुरस्कार लाभले, तरी शासनाच्या ‘पद्म’ पुरस्काराचा लाभ काही त्यांना मिळाला नाही, याची खंत वाटते.
अतोनात कष्ट, गरिबी, निराशा, अपमान यातून आलेली जिद्द, महत्त्वाकांक्षा यांचा साक्षात्कार नक्कीच आपण पाहू या विलक्षण आशावादावर त्यांनी आपले ध्येय गाठले. म्हणूनच त्यांनी गायलेली अनेक गाणी अजरामर झाली. संगीत हाच श्वास व ध्यास बाळगणारे, शब्दसुरांचे जादूगार असलेले स्वरतीर्थ, अखेर २९ जुलै २००२ मध्ये स्वर्गवासी झाले. तरीही एक संवेदशनशील व्यक्तिमत्त्व म्हणून ते चिरंतन आहेत, ते त्यांच्या एकापेक्षा एक अशा अजरामर गाण्यांतूनच.
लेख अतीशय छान वाटला.