राज्य सरकारच्या वर्षभराच्या कारभाराचे दिशादर्शन म्हणून पाहिल्या जाणा-या राज्यपालांच्या अभिभाषणात या वर्षी काँग्रेसच्या राजवटीत सुरू केलेल्या योजनांना दिलेल्या भाजपा नेत्यांच्या नावाचाच पाऊस पडला
मुंबई – राज्य सरकारच्या वर्षभराच्या कारभाराचे दिशादर्शन म्हणून पाहिल्या जाणा-या राज्यपालांच्या अभिभाषणात या वर्षी काँग्रेसच्या राजवटीत सुरू केलेल्या योजनांना दिलेल्या भाजपा नेत्यांच्या नावाचाच पाऊस पडला. राज्यात वाढणा-या शेतक-यांच्या आत्महत्या, पाण्यासारख्या गंभीर प्रश्नावर फारच त्रोटक भाष्य करण्यात आले आहे. शेतक-यांच्या नावाने विविध घोषणा करण्यात आल्या असल्या तरी सध्या दुष्काळात होरपळणा-या शेतक-यांना तातडीचा आधार देण्यासाठी काय केले जात आहे, हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही.
विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात बुधवारी राज्यपालांच्या अभिभाषणाने झाली. या भाषणात काँग्रेस – राष्ट्रवादीच्या काळातच सुरू असणा-या योजनांची नावे बदलून त्याला भाजपाच्या नेत्यांची नावे देण्यात आली आहेत. शेतक-यांना सौर कृषी पंप देणा-या योजनेला ‘अटल सौर कृषी पंप योजना’ असे नाव देण्यात आले आहेत. तर शेतक-यांसाठी अपघात विमा योजनेला ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी कृषी स्मृद्धी योजना’ असे नाव देण्यात आले आहे.
मुंडे समर्थकांना आणखी खुश करण्यासाठी त्यांच्याच नावाने ‘लोकनेते गोपनाथ मुंडे ऊस तोड वाहतूक असंरक्षित श्रमजीवी कामगार महामंडळ’ स्थापन केल्याची माहिती देण्यात आली. शेतीसाठी यांत्रिकीकरणाच्या योजनेला ‘मोतीराम लहाने कृषी स्मृद्धी योजना’ असे नाव देण्यात आले असून आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवांना रिक्षाचे परवाने देण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे. तिला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना’ असे नाव देण्यात आले आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने दोन योजना सुरू करण्यार असल्याची घोषणा करण्यात आली.
तर कौशल्य विकासासाठी सुरू करण्यात येणा-या योजनेला ‘प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान’ असे नाव देण्यात आले आहे. काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लेक माझी लाडकी’ या योजनेचे नाव बदलून ‘माझी कन्या भाग्यश्री’ असे देण्यात आले आहे.
ज्यांना मराठी भाषा समजत नाही.अशांनाच राज्य पाल करण्यात येतो.म्हणून महाराष्ट्रात मराठी ऐवजी इंग्लिश भाषा मानाची आहे.