आपल्या देशात ‘चित्रपट’ हे माध्यम अतिशय प्रभावी तसेच सर्वार्थाने लोकप्रिय माध्यम आहे. चित्रपट यशाचे अंकगणित काहीसे अनाकलनीयच असते. तसे हिंदी रुपेरी पडद्यावर अनेक ‘सुपर डुपर हिट’ चित्रपट येऊन गेले.
आपल्या देशात ‘चित्रपट’ हे माध्यम अतिशय प्रभावी तसेच सर्वार्थाने लोकप्रिय माध्यम आहे. चित्रपट यशाचे अंकगणित काहीसे अनाकलनीयच असते. तसे हिंदी रुपेरी पडद्यावर अनेक ‘सुपर डुपर हिट’ चित्रपट येऊन गेले; मात्र या सर्वामध्ये ‘शोले’ चित्रपटाचे यश खरोखरच नेत्रदीपक, ऐतिहासिक व अभूतपूर्व असेच होते.
१५ ऑगस्ट १९७५ रोजी ‘शेाले’ हा मुंबईतील ‘मिनव्र्हा’ चित्रपटगृहात झळकला व पुढील ४/५ वर्षे तमाम चित्रपटसृष्टीला पार वेड लावून गेला. आज २०१५ मध्ये ‘शोले’ आपली ‘चाळिशी’ ओलांडत आहे. चाळिशीच्या शोलेबद्दल बोलताना जरा मागे वळून बघू या का?
तसा ‘शोले’ हा काही फार वेगळा आशयघन असणारा कलात्मक चित्रपट नव्हे. तो एक तद्दन फिल्मी व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून निर्माण केलेला दे दणादण बाजारू चित्रपट, डाकू, खून, बदला, सूड, मारामा-या, घोडसवारी पाठलाग, अगदी नेहमीच्या फिल्मी वळणाने जाणारा देमार चित्रपट. ‘मेरा गांव मेरा देश’ व ‘खोटे सिक्के’ या चित्रपटाची सरमिसळ आता कोणी म्हणेल शोले हा बिनबजेट होता म्हणून यशस्वी झाला.
त्याकाळात अनेक बिगबजेट, मल्टीस्टार चित्रपट आले, काही प्रमाणात यशस्वीही झाले; पण आज ४० वर्षानंतर फारसे स्मरणात नाहीत. पुन्हा पडद्यावर येण्याची शक्यता नाही. ‘शोले’ मात्र ४० वर्षानीही लक्षात आहे. पुन्हा लागला तर सिने रसिक तिकीट काढून पाहू शकतील. निर्माते जी. पी. सिप्पी व दिग्दर्शक रमेश सिप्पी यांच्या कल्पनेतून हा ‘शोले’ साकार झाला.
कथानक नावीन्यपूर्ण नसले तरी उत्कृष्ट पेपर वर्क, बंदिस्त पटकथा, कलाकार, तंत्रज्ञ यांची अचूक निवड हा शोलेचा प्लस पॉइंट. संजीव कुमार, धर्मेद्र, हेमामालिनी, अमिताभ बच्चन व जया भादुरी या पाच यशस्वी-हिट कलाकारांना एकत्र आणणे व त्यांचे इगो सांभाळत चित्रपट निर्माण करणे हेच मुळी धाडस होय. चित्रपटातील मुख्य खलनायक म्हणजे ‘गब्बर सिंग’साठी अमजद खानची निवड तर खरेच चमत्कार होता.
आधी ‘शत्रुघ्न सिन्हा’ ही भूमिका करणार होता; पण गणित जुळले नाही व नवाकोरा ‘अमजद’ आला, त्याने पाहिले आणि तमाम ररिकांना जिंकलेही. खरे तर याच ‘गब्बरसिंग’च्या अवतीभवती शोलेचे कथानक गुंफलेले आहे. संवाद-लेखक सलीम-जावेद यांनी हे पात्र उभे करताना खूपच मेहनत घेतली. चंबळ खो-यातील बोलीभाषेचा वापर करत ‘गब्बर’चे संवाद अधिक धारदार बनवले.
मुख्य म्हणजे अमजद खान हा ओल्या मातीसारखा ताजातवाना, मऊ असल्यामुळे त्याला योग्य तसे घडविणे, अनुरूप ढंगात सजविणे सहजशक्य झाले. अर्थात अमजद खानही मेहनती, अभ्यासू व चालाख बुद्धीचा ‘नट’ असल्यामुळे त्यानेही या संधीचे अक्षरश: सोने केले. एखाद्या पठडीतल्या कसलेल्या खलनायकाला या ‘गब्बरसिंग’चे इतके पैलू सहजपणे दाखविता आले असते का? अशी शंका घेण्याइतपत ‘अमजद’ने या गब्बरला न्याय दिला.
‘शोले’ चित्रपटाची तांत्रिक बाजूही भरभक्कम असावी याची काळजी सिप्पी पिता-पुत्रांनी प्रथमपासूनच बाळगली. आधीच्या दोन चित्रपटांचे म्हणजे ‘अंदाज’ व ‘सीता और गीता’चे छायाचित्रण के. वैकुंठ यांचे होते. तसे के. वैकुंठ हे एक निष्णात, दर्जेदार, दबदबा असणारे छायाचित्रकार, पण सिप्पींनी ‘शोले’चा आवाका लक्षात घेत ज्येष्ठ छायाचित्रकार द्वारका द्विवंचा यांना पाचारण केले.
शोलेचे बजेट होते दोन कोटी. त्याकाळी ही रक्कम देखील फार मोठी होती. मात्र, सिप्पीचे पेपरवर्क, सीन टू सीन शॉटची पूर्वतयारी व कॅमेरा प्लेसिंग व लोकेशन अतिशय अचूक व पक्के होते. तब्बल ८ महिने ही पूर्वतयारी झाल्यावर दि. ३ ऑक्टोबर १९७३ साली प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झाले. तब्बल ४०० दिवसांचे शेडय़ुल पूर्ण करत एप्रिल ७५मध्ये प्रमुख चित्रीकरण संपले. १५ ऑगस्टला चित्रपट प्रदर्शित करावयाचा होता.
मुळात चित्रपटाची लांबी खूप होती. संकलकांची खरी कसोटी होती; पण अतिशय चोखरित्या जुळवाजुळव करत चित्रपटाची ‘रशप्रिंट’ तयार झाली. चित्रपटाच्या क्लायमॅक्समध्ये संजीवकुमार म्हणजे ठाकूर आपल्या काटेरी बुटांनी अमजदला म्हणजेच गब्बरला तुडवून तुडवून मारून टाकतो असा प्रसंग चित्रित करण्यात आला होता; पण असे दृश्य दाखविणे सेन्सॉरला मान्य नव्हते. कारण त्यामुळे ‘कायदा हातात येऊ शकतो’ असा चुकीचा संदेश जाऊ शकतो व म्हणूनच डाकू गब्बरला पकडून पोलिसांच्या ताब्यात देतो असं दृश्यच संमत होऊ शकेल असे सेन्सॉरने स्पष्टपणे सांगितले. ऑगस्ट महिना जवळ येत होता व प्रदर्शनाची पूर्वतयारी सुरूही झाली होती, त्यामुळे सिप्पी पिता-पुत्रांनी धावपळ करत संजीव-अमजदला पुन्हा मूळ लोकेशनवर नेऊन शेवटचा क्लायमॅक्सचा अतिशय महत्त्वाचा प्रसंग पुन्हा ‘शूट’ केला व संकलकांनी अतिशय हुशारीने चित्रपटाची जोडणी केली.
सेन्सॉरला हवा तसा, पण प्रेक्षकांना रोमांचक वाटेल अशा तऱ्हेचा शोलेचा शेवट रंगविण्यात सर्व जणच अखेर यशस्वी झाले. बंगळूर शहरापासून ३५ मैलावर सिप्पींनी या शोलेसाठी एक गावच वसविले होते. कला-दिग्दर्शक राम मेडेकर यांनी कल्पक बुद्धीने तयार केलेल्या या रामगढची खुमारी काही औरच होती. सुमारे दीड वर्षे या गावात शोलेचे अख्खे युनिट तळ ठोकून होते.
मुंबईच्या स्टुडिओमध्येही थोडेफार शूटिंग झाले; पण बाह्यचित्रणावर अधिक भर दिल्याने हा शोले अधिक वास्तववादी व जवळचा झाला. धावत्या गाडीवर सनसनीखेज पाठलाग, मारामारी व अतिशय उत्कंठापूर्वक प्रसंग पनवेलजवळ चित्रित झाले. तांत्रिक बाबतीत अतिशय जागरुकता बाळगल्यामुळे पार्श्वसंगीत अधिक परिणामकारक झाले, तसं पाहिले तर अशा तऱ्हेच्या डाकूपटामध्ये संगीताला फारसा वाव असतोच असे नाही; पण सिप्पी पिता-पुत्रांनी राहुलदेव बर्मन यांच्यावर संगीताची जबाबदारी सोपवून, तसेच गीतलेखनासाठी आनंद बक्षी यांना घेऊन शोलेचे संगीत बहारदार आहे यांची खात्री करून घेतली होती. आर.डी. बर्मन यांनी स्वत: गायलेले व त्यावर नृतांगना हेलनची दिलखेचक अदाकारी ‘मेहबुबा-मेहबुबा’ अतिशय गाजले.
राहुलदेव बर्मन यांनी शोलेचे पार्श्वसंगीत तयार करतानाही विशेष मेहनत घेतली. तणाव निर्माण करणारे प्रसंग पार्श्वसंगीताच्या खुमारीने अधिकच रोमांचक झाले. झोपाळ्याचा आवाज तर शांत प्रेक्षागृहात अधिक धीरगंभीर व उत्कंठापूर्ण होत असे. ‘शोले’ची सर्वच गाणी कथेचा बाज सांभाळणारी लयबद्ध व सहज लक्षात राहतील, अशी चित्रपटाच्या गतीला पूरक ठरणारी होती. होळीचे नृत्य असो, धर्मेद्र-अभिताभचे दोस्ती गीत असो, वा हेमाचा काचेच्या तुकडय़ावरचा नाच असो शोलेची गाणी व संगीत लोकप्रिय ठरले.
सिप्पी पिता-पुत्रांचे एका बाबतीत राहून राहून आश्चर्य वाटते व कौतुकही करावयास हवे की, इतका महत्त्वाकांक्षी, बिगबजेट, मल्टीस्टार चित्रपट बनविताना त्यांनी कोठेही अश्लीलता, पांचट विनोद, अनावश्यक शरीर प्रदर्शन यांचा आधार घेतला नाही. उत्तान- भडक प्रसंग तर सोडाच, पण साधा कमरेखालचा विनोद घेण्याचेही त्यांनी कटाक्षाने टाळले. अर्थात, संवाद-लेखक सलीम जावेद यांचेही श्रेय आहेच. त्यांच्याच खुमासदार लेखणीमुळे एक खलनायक ‘गब्बरसिंग’ घरातील प्रत्येकाचा आवडता ठरला. खलनायकाच्या तोंडचे संवाद तोंडपाठ करणे व त्या संवादफेकीच्या प्रेमात अक्षरश: वेडे होणे हे शोलेचे अभूतपूर्व यश आहे.
जबरदस्त फिल्म ,!