जवळपास अडीच दशकापासून राज्यात अस्तित्वात असलेली शिवसेना आणि भाजपमधील युती आता फुटीच्या उंबरठय़ावर उभी आहे.
मुंबई – जवळपास अडीच दशकापासून राज्यात अस्तित्वात असलेली शिवसेना आणि भाजपमधील युती आता फुटीच्या उंबरठय़ावर उभी आहे. दोन्ही पक्षांमधील मतभेद आणि सत्ताकांक्षेची दरी आता रुंदावत चालली असून, शिवसेनेबरोबरची युती तोडून विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवून कार्यकर्त्यांना न्याय द्या, असा एल्गारच भाजपच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत गुरुवारी करण्यात आला.
प्रत्येक वेळी शिवसेनेबरोबर तडजोड करू नका अशी स्पष्ट भूमिकाच राज्यातील भाजप नेत्यांनी अंधेरीत झालेल्या या बैठकीत खुलेपणाने घेतली. त्या वेळी भाजप कार्यकर्त्यांनीही आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. स्वबळावर लढल्यास भाजपला १४५ जागाजिंकता येतील, असा विश्वासही काहींनी या बैठकीत व्यक्त करत ‘एकला चलो रे’चा जयघोष केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भाजपचे केंद्रीय नेते आणि मंत्री नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, राजीव प्रताप रुडींसह राज्यातले पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तेव्हा हा स्वतंत्र होण्याचा, निवडणूक एकटय़ाने लढवण्याचा सूर उमटला.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मोदी लाटेचा विधानसभेतही फायदा होईल, असा त्यांचा विश्वास आहे. याच विश्वासावर ज्येष्ठ नेते मधू चव्हाण यांनी थेट शिवसेनेलाच आव्हान दिले आहे. आतापर्यंत शिवसेनेमागे भाजपला फरफटत जावे लागत होते. ती परिस्थिती बदलली पाहिजे. ‘तीन पायांच्या शर्यती’चा आता कंटाळा आल्याचे सांगत त्यांनी थेट युती तोडण्याचीच मागणी केली आहे.
आतापर्यंत फक्त भाजपच तडजोड करत आला आहे. यापुढे असे होता कामा नये. राज्यात भाजपचे ‘बोन्साय’ करायचे आहे का, असा प्रश्नही त्यांनी थेट राष्ट्रीय नेत्यांना केला. त्यामुळेच प्रत्येक कार्यकर्त्यांला न्याय द्यायचा असेल तर आगामी विधानसभा स्वबळावर लढवली पाहिजे आणि तसे झाल्यास भाजपला १४५ पेक्षा जास्त जागा जिंकता येतील, असा विश्वास त्यांनी या बैठकीत व्यक्त केला.
त्यांनी केलेल्या मागणीला उपस्थित नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही जोरदार दाद देत युती तोडण्याची मागणी केली. चव्हाण यांच्या मागणीनंतर सुरजीत सिंग ठाकूर, संजय किणीकर, एकनाथ पवार आणि वर्षा भोसले या कार्यकर्त्यांनी व्यासपीठावरच युती तोडण्याची घोषणाबाजी केली. शिवसेनेसमोर आता लोटांगण नको असे ते आक्रमकपणे सांगत होते.
कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेत, त्यांच्या भावनांचा निश्चित आदर केला जाईल, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केल्यामुळे भाजप नेतृत्व या प्रकरणी गंभीर असल्याचे संकेत मिळाले आहेत. एरव्ही भाजपवर शिरजोरी करणा-या शिवसेनेची भाजपच्या या आक्रमक पवित्र्यामुळे आणखी कोंडी झाली आहे.
शिवसेनेची सारवासारव
सुरुवातीला जागा वाढवून देण्याची मागणी केल्यानंतर आता थेट युती तोडण्याची मागणी भाजपने केल्यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे. कोण काय बोलतो याकडे शिवसेना लक्ष देणार नाही तर दोन्ही पक्षांचे नेतृत्व काय ठरवते त्याला महत्त्व देणार, अशी सारवासारव शिवसेनेकडून करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या मागणीला महत्त्व देत नसल्याचा संदेश देण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न असला तरी भाजप बैठकीतील मतांमुळे शिवसेनेला चांगलाच धक्का बसला आहे.
अब तेरा क्या होगा ठाकूर ???