लडाखमधील चुमूर प्रदेशात चीनी सैन्याने घुसखोरी करुन, भारतीय टेहळणी चौक्या, बंकरची नासधूस केली आहे.
लेह- एकीकडे भारत-चीन यांच्यातील विविध क्षेत्रातील सहकार्य वाढवण्याचे दावे करताना, दुसरीकडे भारतीय भूभागात घुसखोरी करण्याचे चीनचे प्रकार अजूनही सुरू आहेत. तीन महिन्यांपूर्वी दौलत बेग ओल्डी भागात चीनकडून घुसखोरी झाली होतीच. आता पुन्हा एकदा चिनी ड्रॅगनने भारताची कुरापत काढली आहे. भारतीय हद्दीतील चुमार येथे १७ जूनपासून चीनकडून घुसखोरी सुरू असल्याचे दिसून आले आहे. भारतीय लष्कराच्या खंदकांची नासधूस करण्याबरोबरच सीमावर्ती चौक्यांवर लावलेल्या कॅमेरे चोरल्याचे प्रकारही चीनच्या सैन्याकडून झाले असल्याचे आढळले आहे. संरक्षणमंत्री ए. के. अॅँटनी चीनच्या दौ-यावर असताना हे प्रकार सुरू होते.
तीन महिन्यांपूर्वी घुसखोरी झाल्यानंतर दोन्ही देशातील संबंध तणावपूर्ण बनले होते. अखेर चीनचे पंतप्रधान ली केकियांग यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर चीनने काही अटींवर सैन्य मागे घेतले. याच दरम्यान भारत आणि चीन दरम्यान सीमा प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असतानाच चिनी सैन्याकडून घुसखोरीचा प्रकार उघड होता.
भारतीय सैन्याने चुमार येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चौकी उभारण्याचे ठरवल्यानंतर चीनने त्याला आक्षेप घेतला. त्यानंतर लष्कराने चौक्या व संरक्षण बंकर्स उभारणीचे काम बंद केले. मात्र चिनी सैन्याच्या हालचाली टिपण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कॅमेरे लावण्यात आले. चुमार हे गाव लडाख-हिमाचल प्रदेशच्या सीमेवर दुर्गम भागात वसले आहे. हा भाग आपला असल्याचा दावा चीनने केला आहे.
या भागात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने चीनने आपले सैनिक उतरवून भारतीय लष्कर व इंडो-तिबेट सीमा पोलिसांचे तंबू उद्ध्वस्त केले. या वर्षी एप्रिलमध्ये दौलत बेग ओल्डी भागात चिनी सैन्याने घुसखोरी करून या भागावर हक्क सांगितला होता.
घुसखोरी नाही, फक्त कॅमेरे चोरले
भारत-चीन सीमेवर भारताचे कॅमेरे चोरीला गेले, घुसखोरी झाली नाही, असा खुलासा सरकारी सूत्रांनी केला आहे. अॅँटनी चीनच्या दौ-यावर असताना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर उद्भवलेला किरकोळ वाद दोन्ही देशांनी मिटवला आहे. भारताचे कॅमेरा चोरीला गेल्याची तक्रार चीनकडे केली. त्यानंतर दोन दिवसांनी चीनने हे कॅमेरे परत दिले. अॅँटनी यांच्या चीन दौ-यात लष्करी सहकार्याबाबत संवाद वाढवण्यावर आणि सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करण्यावर भर देण्यात आला होता.
This is very shameful for Indians.