नायगावातील सर्वात जुन्या बैठय़ा चाळींपैकी एक म्हणजे राजारामवाडी चाळ. १९४२ च्याही आधीपासून ती उभी आहे. आठ बैठय़ा चाळींपासून बनलेली ही राजारामवाडी पूर्वीइतकीच आजही गजबजलेली आहे. भविष्यात विकासकांच्या घशात राजारामवाडी गेल्यावर चाळीतल्या एकीला तडा तर जणार नाही ना, अशी काळजी चाळीतल्या प्रत्येक रहिवाशाला लागून राहिलेली आहे.
आमचं सावंत कुटुंब १९८२ साली राजारामवाडीत राहायला आलं. तेव्हापासून आजपर्यंत चाळ अशीच गजबजलेली पाहतोय. चाळीत राहणाऱ्या दादा-ताईंची लग्नं झाली. याच चाळीत राहणा-या काका, मामा, मावशी, आत्यांना मुलं झाली.. चाळीने अनेक बदल अनुभवले असले तरी इथे राहणाऱ्या लोकांच्या स्वभावात थोडाही बदल झालेला नाही. त्यांच्यातील आपुलकी, एकी पूर्वीइतकीच आजही टिकून आहे.
सण, उत्सव, सोहळे गुण्यागोविंदाने साजरे करणं, हा तर आमच्या चाळीचा नियमच आहे. त्यामुळे कुठलाही सण असो वा कार्यक्रम, आम्ही सर्व एकजुटीने कामाला लागतो. परिणामी आजही वाडीत प्रत्येक सण दिमाखात साजरा केला जातो. गणपतीचे दिवस जवळ येत आहेत. सध्या वाडीत गणेशचतुर्थीची जोरदार तयारी सुरू आहे.
या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्ही मंडळाचे कार्यकर्ते रोज रात्री नाक्यावर जमतो. तेव्हाच वर्गणी, गणशोत्सवाचे जुने हिशोब, सांस्कृतिक कार्यक्रम, सजावट अशा विविध विषयांवर चर्चा होतात. चाळीतल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने आम्हा नव्या कार्यकर्त्यांच्या होणाऱ्या बैठका या जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांनी आखून दिलेल्या नियमांनुसार होतात. या उत्सवाच्या वेळी विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्या स्पर्धा भरवण्यात चाळीतील महिला कार्यकर्त्यांचा पुढाकार असतो. वाडीच्या गणेशोत्सवाविषयी लिहिताना एक जुनी आठवण आठवली. वाडीतील साऱ्याच बिऱ्हाडांना इथल्या गणेशोत्सवात सहभागी होता यायचं नाही. कारण काहींच्या गावी गणपती असायचे. त्यामुळे घरच्या गणपतीसाठी गावाला जावं लागे. या गावी जाणाऱ्या बिऱ्हाडांपैकी जी व्यक्ती आम्हाला सर्वात जास्त ओरडायची, त्यांच्या कोंबडय़ा पळवण्यासाठी ही नामी संधी असायची. उत्सव संपला की, दुस-या तिसऱ्या दिवशी चिकन-वडे-भाकरीचा बेत रंगायचा.
आजच्या घडीला आमची राजारामवाडी ज्या रस्त्याला लागून आहे, तिथे विकासकामांना ऊत आला आहे. पूर्वी इथे मोठीच्या मोठी मैदानं होती. या मैदानात नवरात्रीत लाउडस्पीकरच्या तालावर मुलं-मुली दांडिया खेळायची. दसऱ्याच्या दिवशी एकमेकांच्या घरी सोनं वाटण्यासाठी आम्हा मुला-मुलींची वरात निघायची. ती एखाद्या रेल्वेगाडीसारखीच दिसायची. दिवाळीला आमच्या वाडीत प्रत्येकाच्या दारात एकसारखे कंदील दिसायचे. आजही ती प्रथा कायम आहे. या कंदिलांची तयारी करण्यात आम्हा मुलांचा हिरिरीने सहभाग आजही असतो. सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे वाडीतील घरं ही बैठय़ा चाळीत असल्यामुळे प्रत्येक बिऱ्हाडांना अंगण आहे. हे अंगण दिवाळीच्या दिवसांत तसंच विविध सणसमारंभाप्रसंगी रांगोळय़ांनी सजवण्याची प्रथा आजही कायम आहे. दिवाळीत रांगोळय़ा काढण्याची चढाओढ पूर्वी तुलसी विवाहापर्यंत रंगायची. उत्तम रांगोळी काढणाऱ्यांचा बक्षिसाने सन्मान केला जायचा. दिवाळीच्या दिवसांत पूर्वी अंगण फक्त रांगोळय़ांनीच नाही तर दिव्यांच्या आराशीनेही सजून जायचं. त्यामुळे अंगणाच्या सौंदर्यात भर पडायची, ती निराळी! प्रत्येकाच्या घरी ठरवून फराळाला जाण्याची प्रथा मात्र आजही कायम आहे. ३१ डिसेंबरला चाळीत स्नेहभोजनाचा कार्यक्रम रंगायचा. पूर्वी या स्नेहभोजनाला वाडीतील प्रत्येक बिऱ्हाडाच्या नातेवाइकांचीही उपस्थिती असायची. त्यामुळे वाडीतील प्रत्येक कुटुंबाचा नातेवाईक एकमेकांच्या चांगल्याच परिचयाचा असे. आता स्नेहभोजनाचा घाट घातला जातो; पण त्याला फक्त वाडीतील बि-हाडांचीच उपस्थिती असते. कदाचित हा वाढत्या महागाईचा परिणाम असेल.
राजारामवाडीत प्रत्येक सणसमारंभ जसे गुण्यागोविंदाने साजरे केले जायचे, तसंच कबड्डी, कॅरम यांसारखे खेळही खेळले जायचे. वाडीचं ‘वंदे मातरम् क्रीडा मंडळ’ आजही सक्रिय आहे. साधारण १९४२ साली या क्रीडा मंडळाची स्थापना झाली. हा मुंबईतील सर्वात जुना आणि नावाजलेला संघ समजला जातो. अनेक राष्ट्रीय पातळीवरच्या खेळाडूंनी या संघातून मुंबई तसंच महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. आमचे दादा, काका जेव्हा या ‘वंदे मातरम् क्रीडा मंडळा’ मधून विविध कार्यक्रम करायचे, तेव्हा आम्ही आठ चाळीतील मुलं मिळून आटय़ापाटय़ा, लगोरी, चोर पोलीस यांसारखे खेळ खेळून परिसर दणाणून सोडायचो. उन्हाळी आणि दिवाळीच्या सुट्टय़ांमध्ये या खेळांना ऊत यायचा. अजूनही हे खेळ खेळले जातात. गोकुळाष्टमीच्या दिवशी चाळीतील मुलांमध्ये हंडी फोडण्यासाठी चढाओढ लागायची. आम्ही मुलं चाळीतील हंडी फोडल्यानंतर परिसरातील हंडय़ा बघण्यासाठी बाहेर निघायचो. दहीहंडीचा संपूर्ण दिवस हा हंडय़ा फोडण्यात जायचा. त्यानंतर श्रमपरिहारासाठी व्यायामशाळेत अल्पोपहार ठेवला जायचा.
पावसात फुटबॉल खेळण्याची मजा काही निराळीच. प्रत्येक वर्षी मुलं वर्गणी काढून एक नवीन फुटबॉल विकत घेतात. यंदाही घेतला आहे. हा फुटबॉल खेळण्याचा शुभारंभ लवकरच होईल. हल्ली पावसात भरपूर पाणी तुंबतं. आमच्या लहानपणीही तुंबायचं. मात्र ते पाणी पाहताना किंवा त्या पाण्यातून चालताना हल्ली जशी किळस वाटते, तशी तेव्हा कधीच वाटत नसे. उलट आम्ही साचलेलं पाणी पाहण्यासाठी चाळीतल्याच एखाद्या मोठय़ा मुलाबरोबर जायचो. त्या पाण्यात छोटय़ा छोटय़ा होडय़ा सोडून धम्माल करायचो.
१७८ खोल्या असलेली आमची चाळ आता विकासकांच्या नजरेत भरत आहे. तिचा विकास झाला तर कालांतराने चाळीतील जुने दिवस आठवावे लागणार आहेत. हा बदल केव्हापासून होईल, ते सांगता येत नाही. काही वर्षापूर्वी गिरण्या बंद पडल्यामुळे संपूर्ण चाळ हादरली होती. विकासकांच्या घशात चाळी जातील आणि आमच्या आनंदावर विरजण पडेल, ही भीती कुठेतरी मनात ठेवून प्रत्येक चाळीतील रहिवासी दिवस ढकलत आहोत. या जुन्या आठवणी पुन्हा आपल्या पदरात कधी पडणार ते माहीत नाही; पण काळाप्रमाणे जग बदलतं आणि आपल्यालाही बदलावं लागतं, हा निसर्गाचा नियम आहे. तो मोडून चालणार नाही.
Asich Maja Amhi Pan Kele He katha Vachun Mala Maze juhne Divas Athavale Aahet.
Aamhi pan asach chalit rahun zhalo aahe pan aatachya hya cosntruction mule amhala dusrikade java lagale aahe.
He katha Vachun Maze juhne Divasche, Juhnya Mitranche, Sanachi, Chalimadhil Maza He Sarva Aathavan Man Halke Zale.
Dinesh Dhanawade