मराठी रंगभूमीवर दरवर्षी पन्नासेक नाटकं सादर होतात. हा आकडा वरखाली होत असला तरी अलीकडच्या काही वर्षात आठवडय़ाला एक या गतीने मराठी नाटकं रंगभूमीवर येत आहेत. यंदा ही संख्या काहीशी जास्त आहे कारण केवळ डिसेंबर महिन्यातच पंधराहून अधिक नाटकं रंगभूमीवर आलीत. प्रश्न एवढाच आहे की, नाटकांची संख्या वाढली तरी त्याचा दर्जात्मक परिणाम मराठी रंगभूमीवर होणार आहे का?
मराठी नाटकांचा आजवरचा इतिहास पाहिला तर सर्वसाधारणपणे, एखादं नाटक दमदार चाललं की, त्याच प्रकारची नाटकं येत राहतात. हळूहळू त्याचा ट्रेंड तयार होतो. काही वर्षापूर्वी विनोदी नाटकांची चलती होती, तेव्हा विनोदी नाटकं भरपूर संख्येने येत होती. तीनेक वर्षापूर्वी सुनील बर्वेने ‘हर्बेरियम’ म्हणजे जुनी नाटकं नव्याने करण्याचा प्रयोग केला तेव्हा सगळ्यांनी जुनी नाटकं पुनरुज्जीवित करण्याचा सपाटा लावला. २०१२ मध्ये असा कुठलाही एक ट्रेंड रंगभूमीवर दिसून आला नाही. मात्र, जुन्या नाटकांची मोहिनी अजूनही कायम असल्याचं दिसून आलं. जयवंत दळवींचं ‘महासागर’, आचार्य अत्रे यांचं ‘लग्नाची बेडी’, पु. ल. देशपांडे यांचं ‘वाऱ्यावरची वरात’, वसंत कानेटकर यांचं ‘लेकुरे उदंड झाली’, राम गणेश गडकरी यांचं ‘एकच प्याला’, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं ‘संगीत सौभद्र’ यांसारखी अभिजात नाटकं २०१२मध्ये रंगभूमीवर आली. ‘व-हाड निघालंय लंडनला’, ‘वटवट सावित्री’, ‘बटाटय़ाची चाळ’, ‘घाशीराम कोतवाल’, ‘पांडगो इलो रे बा इलो’ ही या यादीतील आणखी काही नाटकं. ‘संगीत सौभद्र’ तर, मनोहर नरे यांची ‘ओम नाटय़गंधा’ आणि पुण्याची‘व्ही. आर. प्रॉडक्शन’ या दोन संस्थांनी रंगभूमीवर आणलं. बालगंधर्व यांच्या जयंतीचं १२५वं वर्ष आणि ‘गंधर्व नाटक मंडळी’च्या स्थापनेचं शताब्दी वर्ष असल्याने हे घडलं असावं. आपलंच ‘सौभद्र’ अधिक नेटकं आणि सुरीलं असल्याचा दावा दोन्ही संस्थांनी केला. प्रेक्षकांना मात्र ‘डबल बार’ अनुभवता आला. यंदाच्या वर्षी जी जुनी नाटकं रंगभूमीवर आली, त्यात सगळ्यांत जास्त यश मिळवलं ते ‘वा-यावरची वरात’ने. पन्नास वर्षापूर्वी पहिल्यांदा रंगभूमीवर आलेलं हे नाटक आजही प्रेक्षकांनी उचलून धरलं. ‘लेकुरे उदंड झाली’नेही प्रेक्षकांची पसंती मिळवली. एकूण ‘जुनं ते सोनं’ ही म्हण मराठी रंगभूमीसाठी तरी अजूनही चकाकते आहे, हेच यंदा दिसून आलं.
२०१२मध्ये उल्लेखनीय ठरलेल्या मोजक्या नाटकांची नावं घ्यायची तर ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’, ‘सत्यशोधक’, ‘टॉम अँड जेरी’, ‘वैशाली कॉटेज’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’, ‘केशवा माधवा’ यांची नावं घ्यावी लागतील. ‘सरगम’, ‘मायलेकी, ‘मी रेवती देशपांडे’, ‘एका क्षणात’, ‘प्रपोजल’, ‘बंदे मे था दम’, ‘गांधी आडवा येतो’, ‘सत्ताधीश’, ‘तक्षकयाग’, ‘सगळे उभे आहेत’, ‘तरुण आहे प्रीत अजुनी’, ‘येडुकेशन’ या नाटकातही वेगळे विषय हाताळण्यात आले. ‘संगीत कोणे एकेकाळी’ आणि ‘संगीत मृगरंजनी’ या नाटकांनी संगीत नाटकांची परंपरा जपली. २०१२ वर ज्या दिग्दर्शकांनी छाप पाडली त्यामध्ये कुमार सोहोनी, विजय केंकरे आणि राजेश देशपांडे यांची प्रामुख्याने नावं घ्यावी लागतील. त्यातही कुमार सोहोनी यांनी ‘मायलेकी’, ‘मी रेवती देशपांडे’, ‘तरुण आहे प्रीत अजूनी’, ‘किडनॅप’, ‘अहो जरा वेळ द्या’, ‘फक्त तुझी साथ’, ‘सुखाशी भांडतो आम्ही’ अशी तब्बल सात नाटकं दिली. तर विजय केंकरे यांनी ‘फॅमिली ड्रामा’, ‘दुर्गाबाई जरा जपून’, ‘लेकुरे उदंड झाली’ ही नाटकं दिली.
२०१२ मध्ये काही नाटकं वादातही सापडली. सगळ्यांत मोठा वाद निर्माण झाला तो अशोक पाटोळे यांनी लिहिलेल्या ‘एक चावट संध्याकाळ’मुळे. ‘केवळ प्रौढ पुरुषांसाठी’ अशी जाहिरात करणाऱ्या या नाटकाविरोधात गदारोळ झाल्याने अखेर महिलांनाही हे नाटक बघायची परवानगी देण्यात आली. पण मुळात गप्पांचं स्वरूप असलेल्या या प्रयोगाला नाटक म्हणायचं का, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाला नांदेड पालिसांना आक्षेप घेतला. तर ‘योनीच्या मनीच्या गुजगोष्टी’ या नाटकाला बोरिवलीच्या प्रबोधनकार नाटय़गृहात परवानगी नाकारण्यात आली. थोडक्यात, २०१२ या वर्षावर कुठल्याही एका ट्रेंडचा प्रभाव नव्हता. हे वर्ष व्यावसायिक रंगभूमीसाठी संमिश्र गेलं, परंतु अजून खूप मोठा पल्ला गाठायचंय, याची जाणीव ठेवूनच ते ठरलं.
ठळक घटना
** प्रशांत दामले यांनी १० हजार प्रयोगांचा टप्पा पार करून विश्वविक्रमी १०,७०० व्या प्रयोगाकडे वाटचाल केली.
** एका क्षणात (शरद पोंक्षे), तक्षकयाग (अविनाश नारकर), निखिल रत्नपारखी (टॉम अँड जेरी), संजय मोने (लग्नाची बेडी) या अभिनेत्यांनी दिग्दर्शनात उडी घेतली.
** १९८९ नंतर प्रथमच (नाटय़ संमेलनाच्या इतिहासात दुस-यांदा) एका वर्षी दोनदा नाटय़ संमेलन झालं.
** दिग्दर्शक वामन केंद्रे या संगीत नाटक अकादमीचा तर जयंत पवार यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
** ‘हर्बेरियम’ या सुनील बर्वेच्या संकल्पनेवर पुस्तक प्रकाशित झालं.
** ‘सत्यशोधक’ या नाटकात पुणे महापालिकेच्या सफाई कामगारांनी काम केलं तर ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकात ग्रामीण भागातील, शेतकरी कुटुंबांतील कलाकारांनी भूमिका केल्या.
** ‘प्रपोजल’ या नाटकात मराठीत पहिल्यांदाच लोकल रेल्वेच्या डब्याचं नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांनी साकारलं तर राजन भिसे यांनी ‘मायलेकी’ या नाटकात तुरुंगाचं नेपथ्य साकारलं.
** मालतीबाई पेंढारकर, शशिकांत कारेकर, रघुनंदन फडके, संजय सुरकर, बाळ पळसुले यांचं निधन झालं.
कहीं खुशी कहीं गम!
चित्रपटसृष्टीसाठी दरवर्षीप्रमाणे हेही वर्ष ‘कहीं खुशी कहीं गम’चंच ठरलं. अनेक ज्येष्ठ आणि तितक्याच श्रेष्ठ कलावंतांनी या मायावी नगरीचाच नव्हे, तर जगाचाच निरोप घेतला. तर काही अभिनेते, अभिनेत्री चतुर्भुज झाले. काहींच्या घरी पाळणाही हलला. त्याचाच हा आढावा
पालकी में होके सवार..
रितेश देशमुख – जेनेलिया डिसूझा (३ फेब्रुवारी)
रितेश आणि जेनेलियाच्या प्रेमसंबंधांची चर्चा बरीच वर्ष सुरू होती. बॉलिवुडमधल्या अन्य प्रेमिकांप्रमाणे ते कधी एकत्र फिरताना दिसले नाहीत, पण यंदाच्या वर्षी ते लग्न करून मोकळे झाले.
इशा देओल – भरत तखतानी (२९ जून)
धर्मेद्र आणि हेमा मालिनीची ही मुलगी अभिनयाचे प्रयत्न करून करून थकली आणि संसाराला लागली. हेमा मालिनीने याच वर्षी आपल्या या कन्येचं करिअर रुळांवर आणण्यासाठी एका चित्रपटाची निर्मिती करून पाहिली. पण तरीही इशाचं काहीच न झाल्यामुळे अखेरीस तिनेही आपल्या या मुलीचे हात पिवळे करून टाकले.
सैफ अली खान – करिना कपूर (१६ ऑक्टोबर)
या वर्षातलं सर्वाधिक गाजलेलं लग्न. गेली दोन वर्ष होणार, होणार म्हणून गाजणारं सैफिनाचं लग्न अखेरीस यंदा पार पडलं. त्यातही बराच गोंधळ, बराच सस्पेन्स निर्माण करून हे लग्न पुरेपूर चर्चेत राहील, याची काळजी घेण्यात आली. आधी मार्चमध्ये होणारं लग्न ऑक्टोबरमध्ये ढकलण्यात आलं. नंतर करिना इतक्यात लग्न करण्यास उत्सुक नसल्याच्या बातम्याही पसरल्या. पण ठरल्याप्रमाणे ऑक्टोबरमध्ये करिना सैफशी विवाहबद्ध होऊन पतौडीच्या नवाबाची नवाबीण झाली.
विद्या बालन – सिद्धार्थ रॉय कपूर (१४ डिसेंबर)
या वर्षातलं आणखी एक लक्षवेधी तरीही सर्वात लो प्रोफाइल लग्न. करीअरच्या शिखरावर असलेली विद्या यूटीव्हीचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याशी विवाहबद्ध झाली, ती मीडियाच्या झगमगाटापासून दूर राहातच. अभिनयातलं वेगळेपण तिने खासगी आयुष्यातही जपलं.
आमुचा राम राम घ्यावा…
राज कँवर (१३ फेब्रुवारी)
हा दिग्दर्शक आजच्या पिढीच्या खिजगणतीत नव्हता, पण शाहरुख ‘बादशाह’ खानला पहिलं यश या माणसाने ‘दिवाना’मधून दाखवलं. त्यानंतरच शाहरुखची गाडी सुसाट सुटली. अनिल कपूरच्या कारकीर्दीचं गाडं रुळावरून घसरलेलं असताना राज कँवरनेच ‘जुदाई’मधून अनिलला अत्यंत गरजेचं यश मिळवून दिलं होतं. ‘लाडला’, ‘जीत’, ‘जान’, ‘बादल’ आदी चित्रपटांनी ९०चं दशक त्यांनी गाजवलं होतं.
जॉय मुखर्जी (९ मार्च)
दिग्गज निर्माते शशाधर मुखर्जी यांच्या हा मुलगा २९ चित्रपटांमध्ये नायक म्हणून वावरला, त्यापैकी १९ चित्रपट सुपरहिट होते. तरीही यशस्वी नायक म्हणून त्याचं नाव चटकन आठवत नाही.
अचला सचदेव (३० एप्रिल)
अनेक चित्रपटांमधून प्रामुख्याने आईच्या भूमिकेत दिसलेल्या अचला सचदेव भारतीय चित्रपट इतिहासात अजरामर झाल्या ते ‘ओ मेरी जोहराजबी’ या गाण्यामुळे. अन्यथा निरुपा रॉयच्या आधी नायक किंवा नायिकेची हक्काची आई इतकीच त्यांची भूमिका असायची. ही भूमिका त्यांच्याशी इतकी निगडित झाली होती की, ‘कभी खुशी कभी गम’ या त्यांच्या अखेरच्या चित्रपटातही त्या अमिताभच्या आईच्या भूमिकेतच दिसल्या.
तरुणी सचदेवा (१४ मे)
‘रसना’च्या जाहिरातीतून प्रकाशझोतात आलेल्या या वंडरकिडचा नेपाळमध्ये झालेल्या विमान अपघातात करुण अंत झाला आणि अवघी चित्रपटसृष्टी हळहळली. अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘पा’मध्ये त्यांच्या वर्गातल्या मैत्रिणीची भूमिका तिने केल्यामुळे चित्रपटसृष्टीचं लक्ष तिच्याकडे वेधलं गेलं होतं.
दारासिंग (१२ जुलै)
हॉलिवुडसारखे सुपरहिरोवाले सिनेमे आपल्याकडे का होत नाहीत, हा प्रश्न पडणाऱ्यांनी दारासिंग नायक असलेले मारधाडपट बघावेत. इतका अस्सल, हाडामांसाचा सुपरहिरो असताना स्पेशल इफेक्ट्सवाल्या सुपरहिरोची गरज भासली असती तरच नवल होतं. एकीकडे मुमताजसारख्या मुसमुसलेल्या तरुणीशी प्रणयाराधन करत दुसरीकडे खलनायकाची कणिक तिंबून काढायची, हा खेळ दारासिंग यांनी वर्षानुर्वष केला. नव्या पिढीला मात्र ते माहीत झाले ते दूरदर्शनवरील ‘रामायण’ मालिकेतील हनुमानच्या व्यक्तिरेखेमुळे.
राजेश खन्ना (१८ जुलै)
भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला सुपरस्टार. खऱ्या अर्थाने फिनॉमिना. राजेश खन्नाइतकं झंझावाती यश त्यापूर्वी आणि त्यानंतरही कोणाला मिळालेलं नाही. खन्नानंतरचं दशक अमिताभने राज्य केलं. सध्या सलमान वादळी यश अनुभवतोय, पण राजेश खन्नाच्या त्या स्टारडमची तुलना कशाशीच होऊ शकत नाही. मुली त्याच्या पायात लोटांगण घालायच्या, त्याला रक्ताने पत्र लिहायच्या, या गोष्टी दोन पिढय़ांनंतर बहुधा दंतकथा वाटतील. पण त्या प्रत्यक्ष पाहिलेले लोक अजूनही आपल्यात आहेत. खन्नाचं यश जितकं आश्चर्यकारक होतं, तितकाच त्याच्या अध:पतनाचा वेग विस्मयचकित करणारा होता. त्याच्या यशाला जशी सीमा नव्हती, तशीच अपयशालाही. म्हणूनच आज त्याचा अखेरचा चित्रपट ‘रियासत’ डब्यात पडून आहे.
अशोक मेहता (१५ ऑगस्ट)
छायालेखक अशोक मेहतांच्या अद्वितीय कामगिरीचा पुरावा हवा असेल, तर गुलजारच्या ‘इजाजत’मधील गाणी बघावीत. मेहतांनी चित्रपट दिग्दर्शनाचाही प्रयत्न करून बघितला, पण छायालेखकाचा दिग्दर्शक होतो, तेव्हा जे होतं, तेच मेहतांच्या बाबतीतही झालं. त्यांच्यातला छायालेखक दिग्दर्शकापेक्षा प्रभावी ठरला. त्यामुळे ‘मोक्ष’ या एकमेव चित्रपटानंतर ते दिग्दर्शनाकडे वळले नाहीत. आपल्या अद्वितीय कामगिरीने ते दोन राष्ट्रीय पुरस्कारांवर नाव कोरून गेले.
ए. के. हंगल (२६ ऑगस्ट)
हंगल यांचा चित्रपटसृष्टीत प्रवेशच मुळी झाला तो चरित्र अभिनेता म्हणून. हृषिकेश मुखर्जी, बासू चतर्जी, बासू भट्टाचार्य, गुलजार यांसारख्या संवेदनशील दिग्दर्शकांच्या अर्थपूर्ण चित्रपटांमधून त्यांनी ७० आणि ८०च्या दशकांत सातत्याने चांगल्या भूमिका साकारल्या. मात्र, महाविक्रमी ‘शोले’तला ‘इतना सन्नाटा क्यूँ हैं भाई?’ हा त्यांचा एकच संवाद त्यांना अजरामर करून गेला. आयुष्याच्या अखेरीस मात्र या बुजुर्ग कलावंताला आर्थिक विवंचनांना सामोरं जावं लागलं.
यश चोप्रा (२१ ऑक्टोबर)
‘दाग’, ‘सिलसिला’, ‘कभी कभी’, ‘चांदनी’, ‘लम्हे’ यांसारख्या चित्रपटांनी यश चोप्रांना ‘रुपेरी पडद्यावरचा तरल कवी’ वगैरे पदवी बहाल केली असली तरी नाटय़ हे त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचं वैशिष्टय़ होतं. त्यांच्या तथाकथित रोमँटिक चित्रपटांमध्येही प्रखर नाटय़ होतं. त्यामुळेच हळूवार रोमान्स चित्रीत करणारे चोप्रा ‘दीवार’, ‘काला पत्थर’, ‘त्रिशूल’सारखे धारदार, संघर्षमय सिनेमेही तितक्याच सहजतेने केल. नव्या पिढीतले प्रेक्षक चोप्रांना या सिनेमाऐवजी ‘दिल तो पागल हैं’ आणि ‘जब तक हैं जान’सारख्या गुळगुळीत, निर्थक, कँडी फ्लॉस सिनेमांसाठी ओळखतो, यापेक्षा या श्रेष्ठ दिग्दर्शकाचं दुर्दैव काय असू शकेल?
जसपाल भट्टी (२५ ऑक्टोबर)
श्रेष्ठ व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी कुंचल्याच्या माध्यमातून जे काम वर्षानुर्वष केलं, तेच जसपाल भट्टींनी टेलिव्हिजनच्या छोटय़ा पडद्यावर केलं. त्यांचे ‘फ्लॉप शो’ आणि ‘उल्टा पुल्टा’ हे समाजाच्या व्यंगावर अचूक बोट ठेवणारे कार्यक्रम आपल्या पॉप कल्चरचा भाग झाले आहेत. राजकीय व्यंग आणि जसपाल भट्टी हे समीकरण इतकं घट्ट बनलं होतं की, सामान्य भारतीयांच्या भावनांना शब्द-चित्र रूप देणारे म्हणूनच भट्टी ओळखले जातील.
…आणि यांच्या घरी पाळणा हलला!
अमृता अरोरा
आयटम गर्ल मलायका अरोराची बहीण आणि करिना कपूरची मैत्रीण इतकीच ओळख असलेली अमृता अरोरा यावर्षी दुस-यांदा आई बनली. अभिनयात फार गती नाही, हे वेळीच लक्षात आल्याने लग्न करून ती संसाराला लागली होती.
सेलिना जेटली
अभिनेत्री म्हणून सेलिनाच्या कारकीर्दीत कधीच काहीच घडलं नाही. त्यामुळे तिने लग्न केलं तेव्हाही फार उलथापालथ झाली नाही आणि यंदाच्या वर्षात ती आई झाली तेव्हाही तिची दखल घेतली गेली नाही.
लारा दत्ता
कारकीर्दीने ब-यापैकी वेग पकडला असतानाच लारा दत्ता टेनिसपटू महेश भूपतीशी विवाहबद्ध झाली आणि वर्षाच्या आत भूपतींच्या घरी पाळणाही हलला. या वर्षाच्या सुरुवातीलाच, जानेवारीमध्ये लाराने एका गोड मुलीला जन्म दिला.
शिल्पा शेट्टी
अभिनेत्री म्हणून कारकीर्द संपुष्टात येत असतानाच राज कुंद्रा या उद्योजकाशी लग्न लावून नंतर राजस्थान रॉयल्सची मालकीण झालेल्या शिल्पाने सरत्या वर्षात मुलाला जन्म दिला.
साहित्य- संस्कृती
निखळलेले तारे
कवी ग्रेस, गीतकार वंदना विटणकर, क्रांती बांदेकर, दत्ता हलसगीकर, भा. द. खेर, सुहासिनी हिर्लेकर, शंकर सखाराम, फिरोज रानडे आदी साहित्यिक. प्रकाशक कांताशेठ नेरुरकर.
आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे, दिग्दर्शक संजय सूरकर.
संगीतकार अनील मोहिले, रवी, पं. यशवंतबुवा जोशी, भारतरत्न रविशंकर. नाटककार संजय बेलोसे,
गायक मेहदी हसन, नृत्यगुरू पार्वतीकुमार.
पुरस्कार
साहित्य अकादमीचा मराठीतील पुरस्कार जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या लघुकथा संग्रहाला जाहीर, धर्मकीर्ती सुमंत, शारदा साठे (अनुवाद) यांचाही गौरव
डॉ. जयंत नारळीकर यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा साहित्याबद्दलचा तर ठाकूरदास बंग यांना सामाजिक कार्याबद्दलचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर
ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता यांच्या ‘झिम्मा’ या आत्मचरित्रास यंदाचा भैरूरतन दमाणी पुरस्कार. तसेच त्यांची चतुरंगच्या जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.
संमेलने
**जागतिक मराठी अकादमीचे ९वे संमेलन विरार येथे अरुण फिरोदिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
**सहावे अखिल भारतीय मराठी गझल संमेलन पणजी येथे घनश्याम धेंडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
**दुसरे राज्यव्यापी शिक्षक साहित्य संमेलन मुंबईत प्रा. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
**वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली चंद्रपूर येथे ८५वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
**चिपळूण येथे जानेवारी, २०१३मध्ये होणा-या ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. नागनाथ कोत्तापल्ले यांची निवड
**कवी अशोक नायगावकर यांच्या अध्यक्षतेखाली १४वे कोकण मराठी साहित्य संमेलन दापोलीत
**सांगली येथे ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांच्या अध्यक्षतेखाली ९२वे अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलन
**बारामती येथे डॉ. मोहन आगाशे यांच्या अध्यक्षतेखाली ९३वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
**२४वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन ओणी (राजापूर) येथे मदन हजेरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
**तिसरे सम्यक साहित्य संमेलन पुणे येथे पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न
मानाचे पान!
पुरस्कार
ब्रिटिश लेखिका हिलरी मँटेल यांच्या ‘ब्रिंग ऑफ द बॉडीज’ या कांदबरीला यावर्षीचा बुकर पुरस्कार जाहीर. त्यांच्या ‘वुल्फ हॉल’ या कांदबरीला याआधीही ‘बुकर’ने गौरवण्यात आले आहे. दोनदा बुकर पुरस्कार पटकावणा-या त्या एकमेव लेखिका. (ऑगस्ट)
बाबा भांड यांना साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार जाहीर (सप्टेंबर)
ज्येष्ठ रंगकर्मी वामन केंद्रे, पं. अजय पोहनकर व अरुण काकडे यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार जाहीर (डिसेंबर)
यादे…
ज्येष्ठ बंगाली साहित्यिक कवी सुनील गंगोपाध्याय, परिवर्तनवादी चळवळींचे अध्वर्यू तसेच पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. राम बापट, दलित चळवळीतील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां व साहित्यिका बेबीताई कांबळे यांचे यावर्षी निधन झाले.
विशेष घटना
मराठी विश्वकोशाच्या सातव्या आवृत्तीचे इंटरनेटवर प्रकाशन आणि लोकार्पण.
Your answer was just what I neddee. It’s made my day!