आम्हाला शिक्षणाचे धडे देणा-यांनी त्यांचे साक्षरतेचे प्रमाण किमान महाराष्ट्राच्या बरोबरीत तरी आणावे, असा पलटवार काँग्रेसने केला आहे.
मुंबई- बाहेरच्या लोकांनी महाराष्ट्रात आणि तेही राज्याची शैक्षणिक व सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यात येऊन आम्हाला शिक्षणाबाबतचे धडे देण्याची अजिबात गरज नाही. महाराष्ट्राचा शैक्षणिक इतिहास आणि वर्तमान संपूर्ण भारताला ज्ञात आहे. संपूर्ण देशाला इंजिनिअर्स आणि डॉक्टर्स देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रालाच दूषणे देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या राज्यातील साक्षरतेचे प्रमाण किमान महाराष्ट्राच्या बरोबरीत कसे आणता येईल, याचा विचार करावा, असा सणसणीत पलटवार काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर केला आहे.
काँग्रेसला कधीही कोणत्याही परिस्थितीत धर्मनिरपेक्षतेचा मुखवटा किंवा बुरखा घालावा लागलेला नाही. कारण काँग्रेसचा मूळ चेहराच धर्मनिरपेक्षतेचा आहे. बुरखे-मुखवटे तर त्यांना वापरावे लागतात, ज्यांना खरा चेहरा लपवायचा असतो. धर्मांधतेच्या ख-या चेह-यावर विकासाचा मुखवटा कोण घालतो, दंगलखोर चेहरा लपविण्यासाठी राष्ट्रवादाचा बुरखा कोण पांघरतो, ते या देशाला चांगलेच ठाऊक आहे, असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
असाच राष्ट्रवादाचा बुरखा नथुराम गोडसेने घातला होता आणि त्यानेच राष्ट्रवादाचे सर्वात मोठे प्रतिक असलेल्या राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या केली होती, ही वस्तुस्थिती देश अजून विसरलेला नाही.विरोधी पक्षांनी त्यांच्या सरकारांची तुलना काँग्रेसच्या नेतृत्त्वाखालील सरकारांशी अजिबात करू नये. तशी तुलना करण्याऐवजी केंद्रातील त्यांचे सरकार सहा वर्षांत आणि महाराष्ट्रातील सरकार अवघ्या साडेचार वर्षांत जनतेने हद्दपार का केले, याचे आत्मचिंतन केले तर अधिक बरे होईल, असे खडे बोलही ठाकरे यांनी सुनावले आहेत.
अन्न सुरक्षेचा अध्यादेश म्हणजे केवळ कागदाचा एक तुकडा नव्हे, हे विरोधकांनी लक्षात घेतले पाहिजे. माहितीचा अधिकार कायदा केवळ कायद्याचा एक कागद राहिलेला नाही, मनरेगा देखील केवळ कायद्याचा कागद राहिलेला नाही. काँग्रेसच्या पुढाकाराने झालेल्या या दोन्ही कायद्यांचे फायदे सर्वांसमोर आहेत. तसेच अन्न सुरक्षा अध्यादेशाचे फायदेही या देशाला मिळतील. ज्यांना सामान्य जनतेचे भले बघायचेच नाही, त्यांना हे कायदे म्हणजे केवळ कागदच भासणार, यात नवल ते काय, अशी टिका करत भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांची स्वार्थी भूमिका असल्याचे ठाकरे यांनी निदर्शनास आणले आहे.
मित्रपक्षांशी कसे वागावे, ते विरोधकांनी काँग्रेसला शिकवण्याची गरज नाही. ज्यांच्या नुसत्या येण्याने मित्रपक्ष पळून जातात, त्यांनी इतरांना आघाडीचा धर्म सांगावा, हाच मुळात एक मोठा विनोद असल्याचे सांगून माणिकरावांनी मोदींची खिल्ली उडवली.
Konihi Maharashtratalya Jantela shikau Naye. Sagalyana rajkaran kalate. Vat lagaliy gavachya lokanchi hya bekar rajkarnyamule. Kam kahi karat nahit TV var roj.