दिंडी सुरू होण्यापूर्वी मुंडे तेथे आले. तिथेच बसून गावातील लोकांशी संवाद साधला, त्यांची शेती, त्यात होणारी पिके, त्यांची मुलं-बाळं, संसार चालवताना त्यांची होणारी ओढाताण याची माहिती त्यांच्याकडून घेतली. ते इतक्या सहज लोकांत मिसळले होते की, तिथल्या लोकांनाही आपण लोकसभेतील विरोधी पक्षांच्या उपनेत्याशी बोलत आहोत, देशातील एका मोठया बहुजनाच्या नेत्याशी संवाद साधत आहोत असे दडपण कुठेही दिसत नव्हते.
पिंपळाच्या पाराची सकाळपासूनच साफसफाई सुरू होती. पाराच्या परिसरातल्या बैलगाडया हटवून परिसराचीही झाडलोट करून पाणी मारण्यात तरुण मंडळी गुंतली होती. तर आम्हा लहान मुलांना रंगीत कागदाच्या झिरमाळया कापून दो-याला चिटकवण्याच्या कामाला जुंपले होते. मारुतीच्या पारावरील खांबाला दोरे बांधून त्यांना झिरमाळया चिटकवण्यात आम्ही गुंतलो होतो. दिवस कसा सरला, कुणालाच कळले नाही. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत परिसर चकाचक झाला. पिंपर आणि पिंपळाच्या झाडाला झिरमाळया बांधण्यात आल्या. चौकात रांगोळया काढण्यात आल्या. पोलिस पाटील माणिकराव बोडके, सरपंच संतराम देवते कार्यकर्त्यांना घेऊन गावच्या वेशीत थांबले होते. लेझीम पथक सज्ज होऊन उभे होते. दगडू घुंबरेचे हात हलगीवर टिपरू तडतडवण्यासाठी सज्ज झाले होते. इतक्यात पांगरीच्या वाटेने तीन मोटारसायकली येताना दिसल्या आणि जमलेल्या कार्यकर्त्यांतून ‘गोपीनाथ मुंडे झिंदाबाद’ची घोषणा घुमली. हलगीचा कडकडाट झाला आणि लेझीमधारी तरुणांनी त्यावर ताल धरला. संतराम देवकते आणि माणिकराव बोडके यांनी पुढे होऊन आलेले पाहुणे गोपीनाथ मुंडे, टी. पी. मुंडे आणि माधव मुंडेंचे स्वागत केले.
रेणापूर मतदारसंघातून पहिल्यांदा १९८० निवडून आलेल्या गोपीनाथ मुंडे यांचा सत्कार आमच्या गावात आयोजित केलेला होता. मारुतीच्या मंदिरापासून गावच्या मुख्य चौकातील पिंपळाच्या पारापर्यंत नवनिर्वाचित आमदाराची लेझीमच्या तालावर मिरवणूक काढण्यात आली होती. पोलिस पाटलांच्या घरी आमदारांचे चहापान झाले. एव्हाना साडेसात वाजले होते आणि अंधार पडू लागला होता. गावात वीज आलेली नसल्याने दोन मशाली पेटवण्यात आल्या. पिंपळाच्या पानावर सतरंज्या अंथरून त्यावर पाहुणे आसनस्थ झाले. पारासमोरच्या मोकळया जागेवर गावातील लोक बसले होते. गावात भाषण करण्याची कुणालाही सवय नसल्यामुळे आमच्या शाळेचे गुरुजी किसनराव महामुनी यांनी आम्हा काही मुलांकडून भाषणे लिहून देऊन पाठ करून घेतली होती. मुलांनी भाषणे पाठ केली खरी, मात्र प्रत्यक्ष भाषणे करायला सुरुवात केल्यानंतर बरेच जण चार-दोन वाक्यांनंतर गडबडले. सरपंचांनी भाषणासाठी माझे नाव पुकारले. लहानपणापासून गावातील मारुतीच्या पारावर पोथी सांगण्याची सवय असल्याने जे पाठ केले होते ते दणक्यात बोलून दाखवले. माझे ते छोटेखानी भाषण ऐकूण आमदार मुंडे खूश झाले. मला जवळ बोलावून त्यांना घातलेला हार त्यांनी माझ्या गळयात घातला. त्यावेळी त्यांच्याशी जोडलेले नाते अखेपर्यंत कायम राहिले.
गावातील सर्वसामान्य माणसांशीही नाते जोडण्याची गोपीनाथ मुंडे यांची खास पद्धत होती. परळीत असो अगर मुंबईत, भेटले की गावातील लोकांची चौकशी करायचे. पुढे युतीचे सरकार आले आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री झाले. आपल्या गावाचा विकास व्हावा म्हणून त्यांनी पंचतारांकित एमआयडीसी आणण्याचे प्रस्तावित केले. नाथ्रा या त्यांच्या गावाला लागूनच आमच्या वडखेल गावचा शिवार आहे. एमआयडीसीसाठी ज्या विभागाची निवड केली होती त्यातील सर्वाधिक जमीन आमच्या गावची होती. ती एमआयडीसी झाली असती तर आमचे सर्व गाव विस्थापित होणार होते. त्यामुळेच गावातून मोठया प्रमाणात विरोध झाला. ज्यांच्यावर आमच्या गावांनी खूप प्रेम केले त्यांनीच एमएमडीसी आणल्यामुळे लोकांच्या मनात खूप कटुता निर्माण झाली. अखेर झालेल्या प्रखर विरोधामुळे ती एमआयडीसी होऊ शकली नाही. परंतु त्यामुळे गावाशी कटुता निर्माण झाल्यामुळे ते उपमुख्यमंत्री होते, तोपर्यंत कधीही त्यांना भेटायला गेलो नाही. पुढे २००४ साली आम्ही मुंबईत पांडुरंगाचा पालखी सोहळा सुरू केला. त्यासाठी भव्य रामकथा महोत्सव कॉटनग्रीन येथील राम मंदिराच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला होता. याच महोत्सवात वारकरी संप्रदायाची परंपरा, संतांची माहिती, पंढरीच्या वारीचा इतिहास, त्यातील प्रमुख विधी याची माहिती देणारे ‘पालखी’ हे पुस्तक प्रकाशित करण्यात येणार होते. त्याचे संपादन मी केले होते. या सोहळयाचे जे प्रमुख विश्वस्त होते, त्यात बाबासाहेब मिसाळ हे होते. त्यांचे गाव भगवानगडाच्या पायथ्याशी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचा खास संपर्क होता. म्हणून या महोत्सवाला मुंडे यांना बोलवावे आणि त्यांच्याच हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करावे, असे त्यांनी सुचवले. त्यावर मी म्हणालो, ‘आमच्या गावातील लोकांनी त्यांच्या प्रकल्पाला मोठया प्रमाणात विरोध केला होता. त्यामुळे ते माझ्या पुस्तकाच्या प्रकाशनाला येतील असे वाटत नाही. त्यामुळे मी काही त्यांना निमंत्रण द्यायला जाऊ शकणार नाही.’’ त्यावर मिसाळ म्हणाले, ‘‘तुम्ही नका जाऊ. आम्ही साहेबांना निमंत्रण देऊन येतो.’’ त्याप्रमाणे मिसाळ आणि इतर विश्वस्त त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेले. त्यांनी तात्काळ निमंत्रण स्वीकारले. त्या पुस्तक प्रकाशनच्या वेळी ते ज्या आपुलकीने बोलले, त्यावरून मुंडे का मोठे होते आणि त्यांच्यावर लोक इतके का प्रेम करीत होते, याची साक्ष पटली. ते म्हणाले की, ‘‘या पुस्तकाच्या लेखकाची गेल्या सात वर्षात भेट झाली नाही. मला वाटले कुठे गायब झाले. हे त्यांचे पुस्तक पाहिल्यानंतर पुन्हा खात्री पटली. परळीचे पाणी फुकट जाणार नाही.’’
केवळ माझ्याशीच नाही तर प्रत्येकाशी आपले नाते जपण्याचा त्यांचा हातखंडा होता. आपल्या नेतेपदाची कोणतीही झुल कायम अंगावर त्यांनी वागवली नाही. त्यांच्या निधनानंतर केशव उपाध्ये यांनी त्यांच्याबद्दल सांगितलेले वाक्य फार महत्त्वाचे होते. मुंडे माणसात रमाणारा नेता होते. एकटे असले की, ते अस्वस्थ होत असत. विशेषत: सर्वसामान्य तळागाळातील लोकांशी संवाद साधताना त्यांना मिळणारा आनंद काही औरच असायचा. किती मोठे व्यासपीठ आहे, किती लोकांची उपस्थिती आहे, याचा विचार न करता ते लोकांत मिसळायचे. लोकांत मिसळताना त्यांचे मोठेपण, प्रकृती याचा विचार ते करीत नसत. त्यांच्या साधेपणाचा अलीकडेच पाहिलेला किस्सा कधीही विसरता येण्यासारखा नाही.
शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी माजी आमदार पाशा पटेल यांनी लातूर ते औरंगाबाद अशी शेतकरी दिंडी काढली होती. या दिंडीत भाजपचा प्रत्येक नेता एक एक दिवस चालला होता. मुंडे यांच्या चालण्याच्या दिवशी आम्ही पत्रकार खास बीडला गेलो होतो. मुंडे यांचे नुकतेच डोळय़ांचे ऑपरेशन झालेले होते. डॉक्टरांनी त्यांना फार उन्हात आणि धुळीच्या ठिकाणी फिरू नका, डोक्यावर पाणी घेऊ नका अशा सूचना दिलेल्या होत्या. ज्या गावात त्या दिवशी दिंडीचा मुक्काम होता, ते अत्यंत छोटे डोंगराळ गाव होते. गावच्या चावडीसमोरच्या अत्यंत छोटया मैदानात तुकाराम महाराजांच्या शेतीविषयक अभंगाचे गायन सुरू होते. तिथेच दोन-चार खुर्च्या मांडलेल्या होत्या. इतर मंडळी दगडांवर बसलेली होती. दिंडी सुरू होण्यापूर्वी मुंडे तेथे आले. तिथेच बसून गावातील लोकांशी संवाद साधला, त्यांची शेती, त्यात होणारी पिके, त्यांची मुले-बाळे, संसार चालवताना त्यांची होणारी ओढाताण याची माहिती त्यांच्याकडून घेतली. ते इतक्या सहज लोकांत मिसळले होते की, तिथल्या लोकांनाही आपण लोकसभेतील विरोधी पक्षांच्या उपनेत्याशी बोलत आहोत, देशातील एका मोठया बहुजनाच्या नेत्याशी संवाद साधत आहोत असे दडपण कुठेही दिसत नव्हते. लोक किती सहज त्यांच्याशी बोलत होते, याचा छोटासा संवाद मुद्दाम इथे देण्याचा मोह होत आहे. बोलता-बोलता एक महिलेला त्यांनी विचारले, ‘‘बाई किती शेत आहे तुमचे?’’
‘‘दीड एकर’’ बाईचे उत्तर.
‘‘काय पेरलंय शेतात?’’ मुंडेंचा प्रश्न.
‘‘एक्या एकरात कापूस हाय आन अध्र्या एकरात सोयाबीन हाय.’’ बाईचे उत्तर.
‘‘एवढय़ाशा शेतावर भागतंय का? जेवढी मेहनत करता तेवढा कापसाला आणि सोयाबीनला भाव मिळतो का?’’ मुंडेंचा प्रश्न.
‘‘कशाचं भागतंय. शेतात घातलेल्या खाताचं आणि ब्याचं (बियाणाचे) पैसंही मिळताना मुस्किल. पर भराव लागतीय काळय़ामाईची वटी.’’ त्या भाबडय़ा बाईचं उत्तर.
‘‘संसाराचा खर्च मग कसा भागवीता?’’ मुंडेंचा प्रश्न.
‘‘ जातावं ऊस तोडाय कारखान्याला. लेकरं घरी ठेवून.’’ बाईचं उत्तर.
‘‘किती लेकरं आहेत?’’ मुंडे
‘‘पाच पोरीच हाईत. आजून पोरगं नाही झालं.’’ ती बाई.
‘‘ पाच पोरी? नवरा कुठाय तुझा?’’ असा प्रश्न विचारताच देहाचे मुटकुळे करून समोर बसलेला, हाडाची काडं असलेला तिचा नवरा उभा राहिला. पुन्हा प्रश्न, ‘‘का रे पाच मुली?’’
‘‘काय करावं सायेब. पोरगं झालं नाही ना आजून.’’ त्याचं भाबडं उत्तर.
‘‘कशाला पाहिजे पोरगं? आता पोरं संभाळतील याचा काही भरवसा नाही. उलट पोरी बापाची जास्त काळजी घेतात.’’ मुंडेंचा समजूत काढण्याचा प्रयत्न.
‘‘सायेब नका का सांभाळी ना पोरगं, पर मेल्यावर लागतंय ना, पुढं गाडगं धराया.’’ त्याचं तितकं सरळ उत्तर.
‘‘आता मला पोरगं नाही. माझं गाडगं कोण धरणार?’’ मुंडेंचा मिश्कील प्रश्न. त्यावर आपण देशाच्या मोठया नेत्यांशी बोलत आहोत, याचं कोणतंही दडपण नसणारा तो भाबडा माणूस म्हणला, ‘‘ते तुमचं तुम्ही बघा सायेब.’’
इतकं सहज माणसात मिसळण्याच्या स्वाभावामुळेच असामान्य असणारे मुंडे सामान्य माणसांना आपले वाटत होते. दिंडी तिथून निघाली तेव्हा गळयात टाळ अडकून मुंडे चालायला लागले. डोळयाचं ऑपरेशन केलेलं होते. तरीही बीड-मांजरसुंबा रस्त्यांवरील वाहनामुळे उडणा-या धुळीची फिकीर न करता ते चालत राहिले. काही वेळातच पावसाचे थेंब पडू लागले. कुणी तरी त्यांच्या डोक्यावर छत्री धरली तेव्हा त्यांनी ती झटक्यात बाजूला सारली. ‘‘हे सर्व वारकरी पावसात भिजत असताना मी छत्री घेऊकाय.’’ असा प्रश्न त्यांनी केला. पुढे दुपारच्या विसाव्याला एका आमराईत दिंडी जेवणासाठी थांबवली तेव्हा एका सामान्य ढाब्यावर आपला मोठेपणा विसरून त्यांनी कार्यकर्त्यांसोबत कांदा-भाकरी खाल्ली.
आपले आभाळाएवढे मोठे विसरून जमिनीशी असणारे नाते कायम ठेवणारा, असामान्य कर्तृत्व विसरून सर्वसामान्यांत मिसळणारा नेता म्हणून गोपीनाथ मुंडे अनेक वर्षे लोकांच्या स्मरणात राहतील.
खरच ! डोळ्यांतून आसवे ओघळ लीत ,!!! कै,मुंडेसाहेब यांस भावपूर्ण श्रद्धांजली , धनंजय हळर्णकर,मुंबई,/ दोहा/ कतार.