कोणताही कार्यक्रम सादर करताना मुख्यत्वे त्या कार्यक्रमाचे ‘बॅकस्टेज’ आणि ‘ऑनस्टेज’ असे दोन भाग पडतात. ऑनस्टेज कार्यक्रमाची सूत्रं हाती घेणारी आणि ती सूत्रं सांभाळणारी व्यक्ती म्हणजे कार्यक्रमाचा ‘सूत्रधार’. याच ‘बोलघेवडय़ा’ व्यक्तीला ‘निवेदक’ किंवा एखाद्या ‘इव्हेंट’चा ‘अँकर’ असंसुद्धा म्हणतात. कार्यक्रमाला, इव्हेंटला धरून ठेवणारा आणि त्या कार्यक्रमाला योग्य वेळी, योग्य वेगाने पुढे घेऊन जाणारा निवेदक असणं अत्यंत गरजेचं असतं. या क्षेत्रात करिअर करू पाहणा-यांसाठी हे मार्गदर्शन..
सामाजिक व राजकीय सभा, बक्षीस समारंभ, साहित्य-काव्य-नाटय़ संमेलनं, सांगीतिक कार्यक्रम, शासकीय समारंभ असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या आजूबाजूला होत असतात. या कार्यक्रमांच्या नांदीपासून भैरवीपर्यंत सगळे टप्पे व्यवस्थितपणे पार करत तो कार्यक्रम ‘सुफळ संपूर्ण’ करणं निवेदकाच्या हातात असतं. आयोजक, निर्माता, कलाकार आणि रसिक या सगळ्यांमधला दुवा निवेदकच असतो.
‘वेदनेशिवाय जे ऐकावेसे वाटते ते निवेदन’ अशी एका निवेदकाने गमतीने ‘निवेदन’ या कलेची व्याख्या केली होती. ‘निवेदन’ करणं ही एक कला आहे. ‘नुसतं बोलायला आवडतं’ म्हणून कोणी या क्षेत्रात करिअर करू शकत नाही. एक लोकप्रिय निवेदक होण्यासाठी ‘निवेदकाच्या’ भूमिकेला आवश्यक असणा-या काही गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. निवेदनाचं एक तंत्र आहे, त्याला अभ्यासाची जोड लागते. त्याशिवाय कार्यक्रमाच्या ठिकाणी एक निवेदक म्हणून पार पाडाव्या लागणा-या जबाबदा-या, सुरळीतपणे कार्यक्रम पुढे नेण्यासाठी आवश्यक असलेलं भान या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
एका कवितेत कविवर्य मंगेश पाडगावकरांनी म्हटलंय,
‘अखेर आमचं गलबत
तुमच्याच किना-याला लागतं,
तुमच्यासमोर उभं राहून
अखेर तुमचाच कौल मागतं.’
कोणत्याही कार्यक्रमात दोन घटक महत्त्वाचे असतात. सादरकर्ते कलाकार आणि प्रेक्षक. कलाकार हा प्रेक्षकांसाठी कार्यक्रम सादर करत असतो. त्यामुळे निवेदकाने आपल्या निवेदनाद्वारे प्रेक्षकांशी संवाद साधणं अतिशय गरजेचं असतं. एखाद्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रेक्षकांची अभिरूची ओळखून त्याप्रमाणे निवेदन केलं तर ते प्रेक्षकांना अधिक भावतं. निवेदन करत असताना काही प्रमुख गोष्टींचं कटाक्षाने भान राखलं पाहिजे.
विषय, स्थान : कोणत्याही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन किंवा निवेदन करताना तो कार्यक्रम कुठे आहे, कार्यक्रमाचं औचित्य काय आहे, हे लक्षात घ्यावं. कार्यक्रम ज्या शहरात, भागात आहे, तिथली काही वैशिष्टय़ आपल्या कार्यक्रमाच्या विषयाशी जुळणारी असतील तर त्यांचा जरूर उल्लेख करावा. कार्यक्रमाच्या संकल्पनेप्रमाणे आपल्या निवेदनाच्या शैलीत बदल करणं गरजेचं असतं. कॉपरेरेट कार्यक्रमांचं निवेदन करताना औपचारिकता असायला हवी तर घरगुती स्वरूप असणा-या कार्यक्रमांमध्ये घरातील माणसांचा निवेदनात उल्लेख केल्यास त्यांना कार्यक्रमात सामावून घेतल्याचा आनंद मिळतो. जुनी गाणी, कलाकार यांवर आधारित किंवा प्रासंगिक कार्यक्रम असतील तर त्या त्या वेळचे किस्से, रंजक माहिती यांची आपल्या निवेदनात अधून मधून पेरणी केल्यास ते निवेदन लोकांना खिळवून ठेवतं.
ज्ञान : निवेदकाला कार्यक्रमाच्या विषयाचं, त्यात सहभागी असणा-या व्यक्तींबाबत ज्ञान असावं. एखादी माहिती अपुरी असेल किंवा त्याबाबत आपण साशंक असू तर तो भाग निवेदनातून वगळून टाकावा. मंचावर घडणा-या गोष्टींचा क्रम, मान्यवरांची पूर्ण नावं, त्यांचे हुद्दे, परिचय याचा उल्लेख करताना सतर्क असणं फार महत्त्वाचं असतं. कारण नाव आणि व्यक्तीचा हुद्दा यातली छोटीशी चूकदेखील लोकांच्या पटकन लक्षात येऊ शकते. प्रत्येकाचा मान ठेवून बोलणं, उपस्थितांचा उल्लेख करताना त्यांच्या अधिकाराप्रमाणे क्रमाने उल्लेख करणं आवश्यक आहे. एखाद्या विषयाची नवी माहिती मिळवण्यासाठी निवेदकाने केलेला अभ्यास मात्र प्रेक्षकांवर छाप पाडतो.
अवधान : फक्त साठवलेलं ज्ञान आधारभूत होत नाही तर कार्यक्रमाच्या ठिकाणी सातत्याने घडणा-या गोष्टींचं अवधान ठेवायला हवं. ऐनवेळी कार्यक्रमाच्या सूचीमध्ये करावे लागलेले बदल आपल्या निवेदनाद्वारे सहजपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं आवश्यक असतं. बोलताना आपल्याकडून कधीतरी चूक होऊ शकते. त्यावरही वाक्चातुर्याने मात करता यायला हवी. पण त्याचवेळी हेही लक्षात ठेवलं पाहिजे की निवेदक हा ‘सर्वज्ञानी’ नसतो. त्यामुळे बोलताना खूप मोठी चूक झाली असेल तर सारवासारव करण्याऐवजी ‘माफ करा’ किंवा ‘क्षमस्व’ म्हणत आपली चूक मान्य करून पुढे जाणं श्रेयस्कर. बोलताना वाणीत मार्दव असायला हवं. योग्य त्या वेळी जिभेची तलवार चालवावी पण या क्षेत्रात ब-याचदा ती म्यान करून ठेवलेलीच बरी.
बलस्थानं : ‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण निवेदकाच्या बाबतीत तंतोतंत लागू होते. कारण निवेदन करत असताना बरेचदा आयत्या वेळी आपण ठरवलेल्या मुद्दय़ांपेक्षा इतर अनेक मुद्दय़ांवर बोलावं लागतं. अशा वेळी दांडगं वाचन असेल तर निवेदक कोणत्याही विषयावर लीलया बोलू शकतो.
निवेदकाकडे ‘विपुल शब्दसंपदा’ असणंही महत्त्वाचं आहे. निवेदनात तोच-तोचपणा आल्यास ते कंटाळवाणं होऊ शकतं. हे टाळण्यासाठी वाक्प्रचार, म्हणी, सुविचार, शब्दखेळ करत आपलं बोलणं नटवलं पाहिजे.
‘हजरजबाबीपणा’ने निवेदक रसिकांना जिंकून घेतो. कार्यक्रमाच्या ठिकाणी घडलेल्या चांगल्या गोष्टींचा आपल्या निवेदनात अंतर्भाव करण्यासाठी किंवा काही प्रेक्षकांनी कार्यक्रमाचा रसभंग करण्याच्या दृष्टीने केलेल्या अगोचरपणाचा गोड शब्दांत समाचार घेण्यासाठी निवेदकाकडे हजरजबाबीपणा असणं आवश्यक आहे.
‘निवेदन कसं करावं’ याविषयी अनेक पुस्तकांमधून लेख वाचायला मिळतात. अनेकदा याविषयी मार्गदर्शनपर शिबिरं अयोजित केली जातात. शिकाऊ निवेदकांनी या सगळ्यांचा अनुभव घ्यावा. परंतु निवेदन ही ‘कला’ असल्यामुळे या कलेत यशस्वी होण्यासाठी ‘२ + २ = ४’ याप्रकारचं कोणतंही सूत्र नाही. वाचनातलं सातत्य, सादरीकरण करताना हजरजबाबीपणा, प्रेक्षकांची अचूक नाळ ओळखणं, यांसारख्या काही बाबी सरावाने आत्मसात करत निवेदनाच्या या ‘अनुभवाधिष्ठित’ क्षेत्रात प्रावीण्य मिळवता येऊ शकतं.
पैसा आणि प्रसिद्धीही
चांगलं बोलणा-यांसाठी हे क्षेत्र निश्चितच आकर्षक आणि खुणावणारं आहे. शिवाय पैसा व प्रसिद्धी मिळवून देणारं आहे. अनेकांना या क्षेत्रात येण्याची, निवेदक होण्याची दांडगी हौस असते; पण कसं यायचं हे कळत नाही. त्यासाठी सोसायटी, घरगुती कार्यक्रम, मंडळं, भिशी ग्रुप, वाचन कट्टा अशा छोटेखानी कार्यक्रमांचं सूत्रसंचालन स्वत:हून मागून घ्यावं आणि तिथून सुरुवात करावी. यामुळे कोणत्याही कलेत आवश्यक असणारा प्रत्यक्ष अनुभव मिळतो आणि माईक हातात धरून बोलणं हे वाटतं तितकं सोपं नाही आणि कठीणही नाही हे लक्षात येतं. स्वतंत्रपणे निवेदक म्हणून काम करण्याबरोबरच या क्षेत्रात काम करण्यासाठी इतरही काही मार्ग आहेत. इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, आकाशवाणी, दूरदर्शन, एफ. एम चॅनल्स इतकंच नव्हे तर विविध क्रीडा वाहिन्या, मनोरंजन वाहिन्या या ठिकाणीही तुम्ही निवेदक म्हणून काम करू शकता.
खूप सुंदर व उपयुक्त आणि अगदी खरी माहिती दिली आहे.
हा उपक्रम पण छान आहे.