विलासराव देशमुख यांचा अकाली मृत्यू, अशोक चव्हाण यांचे आदर्श प्रकरण, दोन काँग्रेसमधल्या कुरघोडय़ा आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘निर्णय लकवा’..१५ वर्षे काँग्रेसमध्ये नुसता धुमाकूळ सुरू होता. कुणाचा पायपोस कुणात नव्हता.
विलासराव देशमुख यांचा अकाली मृत्यू, अशोक चव्हाण यांचे आदर्श प्रकरण, दोन काँग्रेसमधल्या कुरघोडय़ा आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा ‘निर्णय लकवा’..१५ वर्षे काँग्रेसमध्ये नुसता धुमाकूळ सुरू होता. कुणाचा पायपोस कुणात नव्हता. काँग्रेस नेतृत्वहीन झाली होती. कार्यकर्त्यांचे मोठय़ा प्रमाणावर खच्चीकरण झाले. माणिकराव ठाकरेंना कार्यकर्त्यांशी काही घेणे नव्हते.
कार्यकर्त्यांपुढे प्रश्न होता, कुणाचा झेंडा हाती घ्यायचा? याचा परिणाम व्हायचा तोच झाला. काँग्रेस घरी बसली, तरीही दिल्ली सुधारली नाही. लोकसभा निवडणुकीनंतर तब्बल १० महिन्यांनी आणि विधानसभा निवडणुकीनंतर चार महिन्यांनी हायकमांडने कृपा केली. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी ‘चिंतना’च्या सुट्टीवर असताना माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून जाहीर झाले. त्यांच्या आधी माणिकराव ठाकरे होते. तब्बल सात वष्रे त्यांना सुभेदारी मिळाली.
महाराष्ट्राचा विचार करायला हायकमांडला वेळ नव्हता. हेच ऑपरेशन एक वर्ष आधी केले असते तर वेगळी स्टोरी राहिली असती; पण काँग्रेसमध्ये निर्णय कसे होतात, हा ‘पीएचडी’चा विषय आहे. बाबासाहेब भोसले यांना इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रीपदी का बसवले, बाबासाहेबांनाही कळले नाही. तरीही त्यांनी एक वर्ष काढले. ते म्हणायचेही, ‘मला का बसवले आणि का उठवले, हे मलाही उमगले नाही.’ त्यामुळे आता अशोकरावांना आणले तर, यांनाच का आणले? जनार्दन चांदूरकर यांना मुंबई का दिली आणि आता का काढली, ही चर्चाच व्यर्थ आहे. काँग्रेसमध्ये गांधी घराणे हेच एक अंतिम सत्य आहे. हे सत्य ज्याला उमगले त्याला काँग्रेस संस्कृतीत वावरताना टेन्शन येत नाही.
गांधी आडनाव वजा केले तर आजच्या काँग्रेसमध्ये काहीही उरत नाही. नेते पायलीचे पन्नास होते. आता तेही फार उरले नाहीत. बारकाईने पाहा. गेली काही वर्षे राज्यात तेच तेच नेते फिरवून आणले जात आहेत. नमुना सांगतो. या लोकसभा निवडणुकीत अनेक जागी काँग्रेसकडे उमेदवार नव्हते. विदर्भात चंद्रपूर आणि यवतमाळचा उमेदवार अखेरच्या क्षणी त्यांची इच्छा नसताना देण्यात आला. दोघेही पडले.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यात अजिबात पटत नव्हते. या दोघांचे मनोमिलन घडवून आणण्याचा कुणी चुकूनही प्रयत्न केला नाही. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेल्या विदर्भात आज काँग्रेस औषधापुरती शिल्लक आहे. आता अशोक चव्हाण म्हणतात, काँग्रेसला गतवैभव आणून देऊ. कुणाच्या जोरावर आणणार? पुढा-यांनी विश्वासार्हता गमावली आहे. ती आधी सिद्ध करावी लागेल. सन्य कुठे आहे? अडचण आहे ती कार्यकर्त्यांची. आज ते दुर्मीळ झाले आहेत.
गेली १५ वर्षे दोन्ही काँग्रेस मिळून आघाडीची सत्ता आणि मुख्यमंत्रीपद काँग्रेसकडे होते. या काळात संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याने काँग्रेसचा जनाधार सुटत गेला. पुढा-यांच्या मस्तीने देशाची सत्ता गेली आणि महाराष्ट्रासारखे सोन्याचे राज्यही गेले. अशोक चव्हाणांनी चिलखत चढवले असले तरी काम सोपे नाही. माणिकराव ठाकरे यांनी खूप घाण करून ठेवली आहे.
एक अपवाद सोडला तर काँग्रेससोबत राहिलेल्या नागपुरात नितीन गडकरी निवडून येतात या वरून काय ते ओळखा. दोन वर्षानी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. आव्हाने मोठी आहेत. भाजपा हा आता भटजींचा पक्ष राहिलेला नाही. निम्मे मराठे आता तिकडे आहेत. आता केवळ युतीशी लढून युद्ध जिंकता येणार नाही. जनसामान्यांचे प्रश्न घेऊन लोकांमध्ये जावे लागेल. इथेच चव्हाण यांची कसोटी आहे. सामान्य जनतेशी नाळ तुटलेल्या काँग्रेसजनांना, खच्चीकरण झालेल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन किती आक्रमकपणे ते लोकांपुढे जातात, हे पाहायचे आहे.
विलासराव देशमुख यांच्या काळात काँग्रेसला जरा बरे दिवस होते. १९९९मध्ये शरद पवार यांनी काँग्रेस सोडली होती. आजच्यासारखीच तेव्हा नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. या पोकळीतून विलासरावांचे नेतृत्व पुढे आले. शरद पवार आणि हायकमांड या दोघांनाही सांभाळण्याची सर्कस त्यांनी तब्बल आठ वष्रे सांभाळली. कुणाचाही मोबाईल फोन येवो, विलासराव स्वत: घेत. आज साधा राज्यमंत्रीही मोबाईल उचलत नाही.
अनेक मंत्री आपला मोबाईल पीएकडे ठेवतात. पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्षापेक्षा स्वत:च्या चारित्र्याला जपले. पृथ्वीराजबाबा जिंकले; पण पक्ष पराभूत झाला. कसा वाढेल पक्ष? विलासरावानंतर २००८ अखेर अशोक चव्हाण यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आले. दोन वर्षे त्यांनी ते सांभाळले. या काळात साम, दाम अशी सारी आयुधे वापरून त्यांनी काँग्रेसला सा-या निवडणुका जिंकून दिल्या. मनसेला शिवसेनेच्या विरोधात सोयीस्कर वापरून घेतले. ‘लंबी रेस का घोडा’ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. चिल्लर मोहापायी ‘आदर्श घोटाळ्यात’ ते अडकले नसते तर आजची समीकरणे काही वेगळी असती.
या घोटाळ्यात मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर गेली साडेचार वष्रे ते अडगळीत गेल्यासारखे होते. त्यांच्यावर ‘आदर्श घोटाळय़ा’ची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे ते आता स्वत:ला वाचवणार की, काँग्रेसला वाचवणार, हाही प्रश्नच आहे. चव्हाणांना पुढे करून हायकमांडने जुगारच खेळला आहे. विरोधकांच्या हातात कोलीत दिले आहे.
पुढच्या निवडणुकीला बराच वेळ आहे. त्या आधी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची सेमीफायनल आहे. चव्हाण-संजय निरुपम जोडीला रागलोभ विसरून, सारे गटतट सोबत घेऊन कामाला सुरुवात करावी लागेल. हे काम सोपे नाही. नागपूर विधानसभेवर काँग्रेसने युती सरकारच्या विरोधात एका जंगी शेतकरी मोर्चाचे आयोजन केले होते. किती लोकांचा झाला असेल हा मोर्चा? १०० लोकही नव्हते. अमर काळे यांनी आपल्या मतदारसंघातून आणलेल्या मोर्चाने काँग्रेसची थोडी लाज राहिली; पण कुणाला त्याचे काही वाटले नाही.
१५ वर्षात काँग्रेसला आपल्या कार्यकर्त्यांना विविध मंडळे, समित्यांवर लावता आले असते. नेत्यांनी या जागा रिकाम्या ठेवणे पसंत केले. साधे विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांना नेमता आले नाहीत. आता तुम्ही बोलावले तर कार्यकत्रे येतील? काँग्रेसच्या मोर्चात का येत नाहीत शेतकरी? आजच्यासारखाच तेव्हाही शेतक-यांना मदतीचा विषय तापलेला होता. शेतकरी काँग्रेसपासून दूर गेलेत का? का येत नाहीत? आत्मचिंतन करावे लागेल.
पुढच्या किमान दोन वर्षाचे राजकारण शेतकरी आणि मुंबईच्या प्रश्नांभोवती फिरणार आहे. शेतक-यांच्या प्रश्नांवर आक्रमक राहण्याची घोषणा चव्हाणांनी केली आहे. चांगली गोष्ट आहे. पण आक्रमक होणार म्हणजे काय करणार? मारामा-या करणार? अलीकडे कुठलेही आंदोलन पैशाशिवाय फत्ते होत नाही. लोक आणायचे म्हणजे त्यांची सारी व्यवस्था करावी लागते. सत्ता असतानाही पैसे सुटत नव्हते. पुढा-यांना खिसा सल सोडण्याची सवय लावून घ्यावी लागेल.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात काँग्रेसमधले ‘चुंबकीय बल’ हरवले होते. विधानसभा निवडणुकांमध्ये अनेक जागी रसद पोहोचलीच नाही. चणेफुटाण्यावर दिवस काढावे लागले. काँग्रेसला या बाबतीत भाजपाच्या बरोबरीत यावे लागेल. त्यासाठी आíथक नियोजन करावे लागेल आणि एक सांगू का? एवढी पडझड होऊनही काँग्रेस राष्ट्रवादीच्या पुढेच आहे. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला २१.१ टक्के मते मिळाली तर राष्ट्रवादीला १७.३ टक्के मतदान झाले. भाजपाला २७.८ टक्के मते आहेत तर शिवसेनेला १९.४ टक्के. त्यामुळे काँग्रेसचा खरा शत्रू आता भाजपाच आहे. उगाच शरद पवारांशी पंगा घेऊन दिल्लीकडून पाठ थोपटून घेण्याचे दिवस संपले.
या लढाईत काँग्रेसला स्वबळावर लढावे लागेल. राष्ट्रवादीची मदत होण्याची शक्यता कमीच आहे. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार स्वत:च गोंधळले आहेत. राष्ट्रवादीला सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही. आता तर पूर्ण पाच वष्रे वाळवंट आणि उपासमार आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींशी लटकावे की, रस्त्यावर लढावे, अशी राष्ट्रवादीत घालमैल सुरू आहे. शिवसेनेने ‘लोकल’ सोडली तर पवार चढलेच समजा. बागायतदार, ऊसवाले हे राष्ट्रवादीचे हुकमी मतदार.
अवकाळी पावसाने, दुष्काळाने आज ते संकटात असताना पवारांची माणसे गप्प आहेत. उसाचे आंदोलन खासदार राजू शेट्टी यांनी पळवले. गळालेल्या द्राक्षबागांना कुणीही वाली नाही. शेतकरी एवढा अगतिक या आधी कधीही नव्हता. ५-२५ हजारांसाठी त्याला गयावया करावी लागत आहे. बनेल युती सरकार त्याला आज देतो, उद्या देतो असे म्हणत झुलवत आहे.
तसे पहिले तर भाजपाला ठोकून काढण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. शिवसेनेशीही त्यांचे फाटले आहे. उद्धव ठाकरे संतापले आहेत. काटय़ाने काटा निघतो आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी भाजपाला मते दिली ते लोक अपेक्षाभंगाच्या दु:खाने भडकले आहेत. काँग्रेसने या हवेचा फायदा घेतला पाहिजे. ८० वष्रे वयाचे अन्ना हजारे या वयात मोदींच्या विरोधात पदयात्रेची तयारी करीत आहेत. काँग्रेसवाल्यांना काय धाड भरली आहे?
लोकांमध्ये जा. शेतकरी संकटात आहे. शेतांमध्ये फिरा. यातून कार्यकर्त्यांची नवी टीम मिळू शकते. हे सर्व बोलायला ठीक आहे. पण फिरणार कोण, हा सवाल आहे. पूर्वी लाँग मार्च निघायचे, मृणालताई गोरे लाटणे घेऊन रस्त्यावर उतरायच्या. आता तशी आंदोलनेही होत नाहीत आणि तसे नेतेही राहिले नाहीत. आता आंदोलनाच्या नावाने दिसते ते मार्केटिंग.
अप्रतिम लेख आणि कॉंग्रेस ला वस्तुस्थिती दाखवून सणसणीत चपराक.