जगी सर्व सुखी असा कोण आहे? अर्थात निर्लज्ज. ज्यांना कशाचीच शरम नाही अशी बेशरम मंडळी. आपल्या वर्तनाची, स्वीकारलेल्या जबाबदा-यांची, आपण कुणाचे काही देणे लागतो, आपल्याकडे लोकांनी काही एक विश्वासाने विशिष्ट जबाबदारी सोपवलेली आहे या कशाचीच चाड नसलेल्या महान मंडळींकडे पाहिले, त्यांच्या विचित्र वर्तनाचे अनुभव घेतले की आपल्याला आपोआप वरील प्रश्नाचे उत्तर मिळते.
जगी सर्व सुखी असा कोण आहे? अर्थात निर्लज्ज. ज्यांना कशाचीच शरम नाही अशी बेशरम मंडळी. आपल्या वर्तनाची, स्वीकारलेल्या जबाबदा-यांची, आपण कुणाचे काही देणे लागतो, आपल्याकडे लोकांनी काही एक विश्वासाने विशिष्ट जबाबदारी सोपवलेली आहे या कशाचीच चाड नसलेल्या महान मंडळींकडे पाहिले, त्यांच्या विचित्र वर्तनाचे अनुभव घेतले की आपल्याला आपोआप वरील प्रश्नाचे उत्तर मिळते. आणि तेच खरं आहे. हीच मंडळी जगात सर्वात सुखी आहेत. ज्यांना आपण बोलतोय एक आणि करतोय भलतेच याबद्दल काडीचीही खंत नाही, आपण करत असलेल्या दुर्वर्तनाबद्दल ज्यांचे मन त्यांना खात नाही, दिलेल्या शब्दापासून मागे फिरल्याने, वचन-आश्वासनपूर्ती न केल्याने, जबाबदारी टाळल्याने, करत असलेल्या भ्रष्टाचाराने ज्यांची झोप उडत नाही त्यांना निर्लज्ज, बेशरम म्हणणे जरा चुकीचेच आहे. क्षमस्व. त्यांना सुखी म्हणायचे नाही तर आणखी काय म्हणायचे?
अशी कर्तबगारी अंगी बाळगणारी निर्लज्ज, बेशरम मंडळी प्रत्येक क्षेत्रात आहेत. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण, तळकोकण, विदर्भ म्हणाल तिथे या मंडळींचे कळप आढळतात. झुंडशाही आणि कळपाने वावरण्यावर यांचा फार विश्वास असतो. ‘एक तीळ सात जणांनी वाटून खावा’ असे म्हटले जाते. ही मंडळी वेगळ्या अर्थाने तेच करतात. साखळी करायची आणि तीळ नाही तीळाचे कोठारच वाटून खायचे असा यांचा कार्यक्रम असतो. मुंबई महापालिका असो वा ठाणे महापालिका वा कल्याण-डोंबिवलीची महापालिका, कंत्राटदारांनी साखळी करायची, त्याला भ्रष्ट अधिका-यांची कडी जोडायची आणि वरपासून खालपर्यंत मलिदा वाटून-ओरपून खायचा असे यांचे खाणे आणि कळपाने वावरणे.
ब-याचदा असे होते की, असा काही विषय निघाला, भ्रष्टाचार, बेदरकारी, थापेबाजी, बेमुर्वतखोरी, अरेरावी, दंडेली असे शब्द उफाळून वर यायला लागले की आपोआप राजकारणी मंडळी, लोकप्रतिनिधी यांची आठवण आपसूक या शब्दांबरोबरच जोडूनच येते. हे समीकरण घट्ट राहावे, अबाधित राहावे, यात कुणी कुणी आपली जागा घेऊ नये यासाठी अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधींची स्पर्धाच जणू सुरू असते. अगदी ताजे उदाहरण ठाण्यातील. ठाणे महापालिकेच्या हद्दीत बेकायदा बांधकामांचे, अतिक्रमणांचे जंगल कैक वर्षे फोफावले आहे, वाढते आहे. मुंब्रा, कळवा, कौसा येथील इमारती लागोपाठ कोसळल्यानंतर विशेषत: शीळफाटा येथील इमारत दुर्घटनेत ७४ जणांचे बळी गेल्यावर, महापालिकेतील भ्रष्ट अधिकारी आणि स्थानिक नगरसेवक, राजकीय मंडळींच्या संरक्षणात ही अनधिकृत इमारत बिनदिक्कत उभी करणारा बिल्डर यांची साखळी उजेडात आली होती. ठाणे, कल्याण सगळीकडे हेच सुरू असते. ठाण्यात तर प्रत्येक अनधिकृत मजल्याला संरक्षण देण्याचा रेट ठरलेला असतो याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. शीळफाटा दुर्घटनेत फारच बोंबाबोंब झाल्यामुळे बिल्डर, पालिकेतील अधिकारी-कर्मचारी, राजकीय मंडळी काही काळ गजाआड झाली होती. वस्तुत: सरकारी कर्मचारी गजाआड झाल्यावर त्याचे निलंबन होत असते. येथे त्यांच्या संरक्षणकर्त्यांनी कमाल केली. तसा ठरावच महापालिकेच्या महासभेत आणला नाही. एरव्ही प्रशासनाच्या चुकीवर तुटून पडणा-या जागरूक नगरसेवकांनाही ते ‘लक्षात’ आले नाही. ठराव आणण्याची मुदत उलटून गेल्यावर त्यांच्या ‘अचानक’ ते लक्षात आले आणि ठराव नाही तर निलंबन रद्द, आता या भ्रष्ट कर्मचा-यांना कामावर घ्या, अशी एकमुखी मागणी महासभेत केली गेली आणि सर्वच नगरसेवकांनी या कर्मचा-यांना पुन्हा कामावर घेतलेही. सांगा, हे प्रतिनिधी नेमके कुणाचे? तुमचे-आमचे की भ्रष्ट अधिका-यांचे? गेल्या आठवडय़ातील ही घटना. त्याविषयी लिहिलेही होते. आता याबाबत यापैकी कुणीही निर्लज्ज एका शब्दानेही तोंड उघडायला तयार नाही. सगळेच या भ्रष्ट साखळीचे पाठीराखे आहेत असा अर्थ यातून कुणी काढला तर त्याचे काय चुकले? ठाण्यात अतिक्रमणे अजून सुरू आहेत, इमारतींची कामे सुरू आहेत या गोष्टी वेगळे काय सांगतात?
कल्याण-डोंबिवली महापालिकेतही काही वेगळे घडत नाही. तिथल्या भ्रष्ट अधिका-यांची तर मोठी यादी आहे. अनेक बडे मासे त्यात आहेत. त्यातल्या काही अधिका-यांना पुन्हा कामावर घ्यावे यासाठी वेळोवेळी मोर्चेबांधणी सुरू असते. तिथले काही नगरसेवक यासाठी फिल्डींग लावण्यात आघाडीवर असतात. यात सगळ्यांचीच युती असते. अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारा एक अधिकारी काही महिने निलंबन होऊन बाहेर होता. त्याला याच युतीने पुन्हा सेवेत घेतले आहे. आणि याच अधिका-याने परवा म्हणे मोठय़ा बंदोबस्तात अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली. आता बोला! मुंबई महापालिकेत तर अधिकृत लुटमार सुरू आहे. प्रत्येक कंत्राटात, प्रत्येक कामात ‘वाटे’ पाडले जातात आणि ब्लॅकलिस्टमधील कंत्राटदारांनाही पायघडय़ा अंथरल्या जातात याच्या बातम्या ‘प्रहार’नेही वारंवार दिल्या आहेत. एका दिवसात काही तासांच्या अवधीत कोटय़वधीची कंत्राटे मंजूर केली जातात. पण महापालिकेतील निर्लज्ज साखळी त्याबद्दल चकार शब्दानेही खुलासा करत नाही. तिथली नेतेमंडळी मुंबईभर बॅनरबाजीचे शेवाळे पसरवण्यात धन्यता मानतात.
फक्त लोकप्रतिनिधींनाच दूषणे कशासाठी देता आम्हीही आहोत की, असे म्हणत सर्वसामान्यांना ऐन गर्दीच्या वेळी वेठीस धरणारे मोटरमन, परीक्षांच्या वेळी विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणारे दुर्जन शिक्षक, अरेरावी दाखवत संपावर जाणारे पालिका कर्मचारी, रिक्षा-टॅक्सीचालक सगळेच वेळ पाहून सर्वसामान्यांना वेठीस धरत असतात. यापैकी कुणालाच त्याबद्दल गैर वाटत नाही. दहावी-बारावीच्या परीक्षांना बसणा-या विद्यार्थ्यांचे पेपर आम्ही तपासणार नाही, परत पाठवून देऊ असे ब्लॅकमेलिंग करणारे गुरुजन नव्हे दुर्जन आम्हाला लाभले आहेत. प्रवाशांना गिऱ्हाईक बनवून सर्रास लुटमार करणारे रिक्षा-टॅक्सी चालक येथेच आहेत. रेल्वे आरक्षण खिडकीवर दादागिरी करणा-या दलालांना साथ देणारे रेल्वे अधिकारी आणि या दलालांना विरोध करणा-या ‘आप’च्या कार्यकर्त्यांना मारहाण करून अटक करणारे ठाणे पोलिसही याच निर्लज्जांच्या साखळीत आहेत. अपघातातील जखमींना वेळेवर औषधोपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करायचे सोडून पोलिसी खाक्यानुसार चौकशीचे सोपस्कार आरामात उरकण्यात वेळ घालवून जखमीचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे प्राण कंठाशी आणणारे पोलिस आणि कर्मचारीही यांच्यातलेच. ‘कुणी निंदा अथवा वंदा आम्हाला लाज नाही’ ही वृत्ती या सगळ्यांनी अंगी बाणवून घेतली आहे. त्यांच्यासमोर गांधीगिरी करा वा त्यांना गुलाब द्या, त्यांना काहीच फरक पडणार नाही. कारण यांच्यापैकी कुणालाच लाज नाही!
Khup chan …post