कोकणच्या भूमीतील सिंधुदुर्ग जिल्ह्यात लोकप्रतिनिधी म्हणून काम करीत असताना मला २४ वर्षे पूर्ण झाली आहेत. या २४ वर्षात माझ्या जन्मभूमीचे म्हणजे कोकणाचे ऋण फेडण्याच्या दृष्टिकोनातून मिळालेली आमदारकी, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता आणि आता पुन्हा मंत्री या सर्व पदांचा मी उपयोग केला. सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की, मला मिळालेल्या या पदांचा कोकणाच्या मुख्यत: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकास प्रक्रियेसाठी पुरेपूर उपयोग मी करू शकलो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, शैक्षणिक स्थिती, औद्योगिक परिस्थिती, येथील जनतेचे दरडोई उत्पन्न वाढविण्याचे उपाय या सा-या बाबींचा अभ्यास करून जिल्ह्याचे परिवर्तन साध्य करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. मी असा दावा करीत नाही की, कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात शंभर टक्के परिवर्तन झाले. गेली अनेक वर्षे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रात विकासात्मक दृष्टिकोनातून मागे राहिलेल्या या जिल्ह्यात विकासाच्या प्रक्रियेला चालना दिल्यामुळे राज्यातील अन्य विकसित जिल्ह्यांसमवेत तो आता स्पर्धा करू लागला आहे हे कोणीही नाकारू शकत नाही. कोकणातील मुले आता दहावी व बारावीच्या गुणवत्ता यादीत अग्रेसर स्थान मिळवत आहेत. अनेक तरुण-तरुणी आयएएस आणि आयपीएससारख्या परीक्षांकरिता बसू लागली आहेत. तहसीलदार, उपजिल्हाधिकारी अशी पदेही ही तरुण मंडळी मिळवीत आहेत. एमबीएसारखे शिक्षण घेतले जात आहे. अनेक तरुण मोठया हुद्दयांवर जाऊन पोहोचल्याचे ऐकून मला नक्कीच आनंद होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा एकेकाळी मागासलेला जिल्हा म्हणून गणला जायचा. तो आज दरडोई उत्पन्नात पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यापेक्षा एक हजाराने पुढे आहे ही अभिमानाची बाब नाही का! या जिल्ह्याला आणि कोकणाला भविष्यकाळ उज्ज्वल आहे हे सांगावयास ज्योतिष्याची आवश्यकता नाही. आमचे अनेक तरुण-तरुणी नोकरी शोधण्यापेक्षा आता व्यवसायाकडे वळलेले दिसतात. जिल्ह्यात आता ही मंडळी खासगी आणि शासकीय क्षेत्रात छोटी-मोठी कंत्राटदारांची कामे करीत आहेत. आंबे, काजू, नारळ, सुपारी यांसारख्या उत्पादनांवर प्रक्रिया करून ते निर्यात करण्याचे छोटे-मोठे उद्योग उभारून स्वत:चे उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करून समाजातील अनेक लोकांना रोजगार देण्याचे काम हे स्थानिक भूमिपुत्र करीत असल्याचे पाहून समाधान वाटते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठी व इंग्रजी भाषेतून शिक्षण देणा-या संस्थांचे जाळे पसरलेले आहे. तालुक्याला आयटीआय, पॉलिटेक्निक, कणकवलीला इंजिनीअरिंग कॉलेज, कृषी कॉलेज, डेअरी कॉलेज, वेंगुल्र्याला हॉर्टिकल्चर कॉलेज सुरू झाले असून आता मेडिकल कॉलेजच्या इमारतीचे काम सुरू आहे. अशा प्रकारे शैक्षणिक क्षेत्रातील विविध उपक्रमांचे जाळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पसरलेले असल्यामुळे येथील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच सर्व प्रकारचे शिक्षण घेता येते. शिकलेल्या तरुण-तरुणींना येथेच रोजगार मिळावा, चांगल्या पगाराच्या नोक-या मिळाव्यात म्हणून कोकणात विशेषत: सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक उद्योग, व्यवसाय आणण्याचा मी प्रयत्न करीत आहे.
संपूर्ण जगाचे लक्ष आकर्षित करू शकेल, असे सी-वर्ल्ड मालवण येथे आकाराला येत आहे. आपल्या जिल्हयातील आणि राज्यातील विविध उत्पादने परदेशात पाठविता यावीत व परदेशातील माल आपल्या देशात आयात करता यावा यासाठी सुसज्ज अशा रेडी बंदराचे काम सुरू केले आहे. या जिल्हयातील शेतजमिनीला कोणत्याही प्रकारे धक्का न पोहोचवता पडीक आणि वरकस जमिनीवर उद्योग व्यवसाय आणावेत, जमिनीचा योग्य मोबदला दिला जावा, सिंधुदुर्ग जिल्हयात रोजगार निर्मिती करून बेकारी आणि गरिबी संपवावी, म्हणूनच जिल्हयातील कासार्डे (ता. कणकवली) येथे गारमेंट इंडस्ट्रीकरिता एमआयडीसी निर्माण केली जात असून त्याकरिता भूसंपादनाचे कामही सुरू झाले आहे.
गोवा, कर्नाटक आणि कोल्हापूरच्या जवळील दोडामार्ग या तालुक्यात सुमारे ७५० ते १००० एकर जमिनीवर एमआयडीसी घोषित झालेली असून त्यासंबंधीचे आदेश निघालेले आहेत. प्रदूषणविरहित मोठमोठे कारखाने येथे आणले जातील आणि उत्पादनांबरोबरच रोजगार निर्मितीदेखील केली जाईल. दोडामार्ग येथे एमआयडीसी निर्माण व्हावी ही स्थानिक शेतक-यांची मागणी आहे. कृषी, फलोत्पादन, उद्योग व पर्यटन या क्षेत्रांच्या माध्यमातून आपल्याला जिल्हयाचा विकास साध्य करावयाचा आहे. या चार प्रमुख विकासस्त्रोतांना चालना देण्यासाठी जिल्हयातील परुळे येथे विमानतळाचे काम सुरू झालेले आहे. कोकणातून जाणा-या राष्ट्रीय महामार्ग क्र. १७च्या चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली असून पनवेल ते पोलादपूर हा पहिला टप्पा मंजूर झालेला आहे. लवकरच पोलादपूर ते सावंतवाडी या दुस-या टप्प्याला मंजुरी मिळून तेही काम सुरू होईल. त्यामुळे कोकणातील वाहतूक व्यवस्था आदर्श करण्याचे काम जलदगतीने सुरू असताना या विभागाचे खासदार डॉ. निलेश राणे यांनी कोकण रेल्वेच्या सिंगल ट्रॅकचे डबल ट्रॅक व्हावे, ही मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. जपान सरकारच्या वतीने दिल्ली-मुंबई कॉरिडॉर ही योजना आखली जात असताना त्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयांचा समावेश केलेला आहे. त्यामुळे आता समुद्रमार्गे, हवाई मार्गे, रेल्वे मार्गे आणि हायवे या चारही प्रमुख मार्गाच्या माध्यमातून दळणवळण व्यवस्था आदर्श होईल आणि सिंधुदुर्गसह कोकणचा सर्वागीण विकास होईल. या सर्व विकासकामांमधून कोकणातील गरिबी संपून येथे समृद्धी व सुबत्ता नांदेल, असा मला विश्वास आहे.
कोकणला नैसर्गिक सौंदर्य आहेच. पण त्याचबरोबर आर्थिक सुबत्ता आली तर ख-या अर्थाने कोकण समृद्ध होऊन देशाच्या नकाशावर आर्थिकदृष्टया सबळ आणि संपन्न भाग म्हणून नावलौकिक मिळवेल. आज आपल्याशी हितगुज करीत असताना गेल्या २४ वर्षात कोकणासाठी आणि सिंधुदुर्ग जिल्हय़ासाठी जे जे करता आले व यापुढे जे करता येईल त्याचे चित्र माझ्यासमोर आहे. कोकणी माणसाने मला जी विविध पदे दिली त्यांना न्याय देऊन त्या पदांच्या माध्यमातून कोकणी माणसाचा विकास साधण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कोकणचे नाव सर्वच क्षेत्रांत आघाडीवर आणण्याचे काम मी केले असून राजकारणातही मी कोकणी माणसाचा दबदबा निर्माण केलेला आहे. राजकारणात कोकणी माणसाची दखल न घेता कोणालाही पुढे जाता येणार नाही ही परिस्थिती तुम्हा सर्वाच्या आशीर्वादाने मी निर्माण करू शकलो आहे.
सन २०१४मध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे माझे विरोधक, विरोधी पक्षाचे आणि आपल्यातीलही काही जण विरोध करायला सक्रिय झालेले दिसत आहेत. कुठल्याही दिवशीचे कोकणातील वृत्तपत्र उघडून वाचल्यानंतर माझ्यावर टीका नाही, असा दिवस मला आठवत नाही. या लेखाच्या सुरुवातीलाच मी केलेली काही ठळक कामे नमूद केली आहेत. आता मला माझ्या विरोधकांना कोकणातील मुख्यत: सिंधुदुर्ग जिल्हयातील पत्रकारांना विचारायचे आहे की, पूर्वी जिल्हयाच्या विकासासाठी दर वर्षी जिल्हा नियोजनातर्फे ५-६ कोटी यायचे. आता ही रक्कम शंभर कोटींच्या घरात गेली आहे. याचे श्रेय मी घेत नाही. पण या जिल्हयात होत असलेला विकास आणि परिवर्तन, विविध क्षेत्रांतील प्रगती डोळयाने दिसत असताना टीका कशासाठी आणि कोणासाठी? सन १९९०पासूनच्या सगळयाच निवडणुकांमध्ये माझा विरोध, द्वेष, आकस आणि माझ्याविरुद्ध आग ओकण्याचं काम विविध माध्यमांतून झाले. यातून काय साध्य झाले? येथील जनता माझ्यावर प्रेम करते. माझ्यावर जनतेचा विश्वास आहे. त्यामुळे सातत्याने मला आणि माझ्या मुलाला मतदारराजाने विजयी केलेच ना! सर्व विरोधकांना मला सांगावेसे वाटते की, जिल्हयाचा विकास करण्याचा मी निवडलेला मार्ग आणि क्षेत्रे तुम्हाला आवडत नसतील तर कोणत्या क्षेत्रांतून या जिल्हयाचा विकास करता येईल आणि कोकणी माणूस कसा समृद्ध होईल ते तरी सांगा पाहू! माझी आपल्यासोबत बसून कधीही चर्चा करण्याची तयारी आहे. पण माझा द्वेष कशासाठी? तुम्हा कोणाचा मी अपमान केला? तुमच्याकडून मी काही उधार घेतले? मी कोणाच्या व्यवहारात, उठण्या-बसण्यात आहे ते सांगा? माझी कोणतीही चूक नसताना, कोणताही गुन्हा केला नसताना आपल्याला निवडणूक जिंकता येत नाही, पद मिळत नाही, जनता सातत्याने पराभव करते याचा राग माझ्यावर का काढता? जनता विश्वास ठेवेल असे वागायचा प्रयत्न करा ना! विरोधाला विरोध ही संकुचित वृत्ती, ही खेकडयाची प्रवृत्ती आणि तीही कोकणी माणसाच्या मुळावर! यातून काय साध्य होणार? गेल्या २४ वर्षात विरोध करून स्वत:चे वय वाढवून घेतलेत. कोणत्याही स्तरातील जनतेचे भले न करता टीकाच करीत राहिलात. यातही माणुसकीचा धर्म निभावू शकला नाहीत. कशाला विरोध करता? सी-वर्ल्ड प्रकल्पामध्ये एकही घर जात नाही. एकही गोठा जात नाही. एकाचीही बागायती जमीन जात नाही. वरकस जमिनीवर जागतिक कीर्तीचे सी-वर्ल्ड होत असताना आणि वरकस जमिनीचा योग्य मोबदला मिळत असतानासुद्धा विरोधकांचा विरोध! काही विरोधक आम्हाला वृत्तपत्रांतून विचारतात एवढी जमीन कशाला? हा प्रकल्प किती मोठा असेल? त्यासाठी किती जमीन लागेल? या प्रकल्पातून किती लोकांना रोजगार मिळेल? नोक-या लागतील? स्थानिकांना किती फायदा होणार? याचा काहीही अभ्यास नसताना फक्त विरोध! सी-वर्ल्डसाठी जाणा-या जागेपैकी ६० टक्के जागा अगोदरच विकून झालेली आहे. ज्यांची जमीन जात नाही, ज्यांनी विकलेली आहे तेच विरोध करतात. हे राजकारण काहींनी आता चांगल्या रीतीने ओळखले आहे. रेडी बंदराला विरोध, कासार्डे एमआयडीसीला विरोध, विमानतळाला विरोध, दोडामार्गच्या एमआयडीसीला विरोध. मग हे प्रकल्प आणायचे नाहीत तर कोणते आणायचे? आपल्या मुला-मुलींना नोक-या कशा द्यायच्या याचे उत्तर माझे विरोधक देऊ शकतील काय? स्वत:ला काही करता येत नाही. विकासात्मक दृष्टी नाही. अशा स्थितीत कोकण आणि सिंधुदुर्गचा विकास कसा साध्य करणार? मला जरूर विरोध करा. जे काय करायचे ते माझे करा. पण माझ्या कोकणवासीयांची प्रगती खुंटविण्याचे पाप करू नका. तुम्हाला राजकीय पदे मिळणार नाहीत म्हणून जिल्हयातील लोकांच्या विकासाच्या मुळावर येऊ नका. भावी पिढी तुम्हाला कधीही माफ करणार नाही. जिल्हयातील विरोधकांना कोणत्याही प्रकल्पाची माहिती हवी असल्यास ती त्वरित देण्यासाठी संबंधित विभागाला द्यायला सांगेन. या शासकीय प्रकल्पाची माहिती तुम्ही माहितीच्या अधिकारात केव्हाही मिळवू शकता. यात लपवालपवी काही नाही. मात्र, राजकीय हेतूने माझ्यावरील द्वेषापोटी आणि आकसातून स्थानिक जनतेची दिशाभूल करू नये.
शिवसेनेचा जन्म मराठी जनतेच्या रक्षणासाठी झाला. सिंधुदुर्ग जिल्हयात राहणा-या शंभर टक्के मराठी लोकांचा विकास करीत असताना सगळया प्रकल्पांना होणारा विरोध हा मराठी माणसांच्या मुळावर येणारा विरोध नाही का? हा पक्ष मूळ उद्दिष्टांपासून दूर गेला म्हणूनच मराठी माणसाने आपल्या मनातून या पक्षाला दूर लोटले आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. काँग्रेसचा एक मंत्री चांगले काम करीत असेल तर चांगल्याला चांगले म्हणणे हा माणुसकीचा धर्म या पक्षाच्या पुढा-यांनी अवलंबिला तर ४-२ मते कदाचित मिळू शकतील. जनतेची दिशाभूल करून नाही! निवडणुका येतात आणि जातात. निवडणुकांचा काळ संपला तरी माझ्या विरोधात टीका! माझ्या सिंधुदुर्गवासीय जनतेला मी सांगेन की, नागरिकांच्या विकासाच्या बाबतीत, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्याच्या बाबतीत कधीच संबंध नसलेल्या या पुढा-यांच्या दिशाभूल करणा-या टीकेला माझ्या वतीने नागरिक म्हणून तुम्हीच उत्तर द्यावे, असे मला वाटत असल्याने आज ‘प्रहार’च्या माध्यमातून बोललो. उद्याही बोलेन.
Artical kharach sunder ahet magche kokan ani atache kokan yat khup sudharna zali ahe. he sarv Rane shaebha mulech zale he me manapsun namud karoto