केजरीवाल आणि उद्धव ठाकरे हे विक्षिप्त आहेत, असा घणाघात उद्योगमंत्री आणि ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांनी केला.
मुंबई- ‘ज्यांना कोणत्याही समाजसेवेचा वारसा नाही अशी केजरीवालसारखी माणसे दिल्लीत गांधी कुटुंबीयांविरोधात बिनबुडाचे आरोप करत आहेत, तर सरकार कसे चालवावे याचा अनुभव नसणारे उद्धव ठाकरे राज्य सरकारवर आरोप करत आहेत. केजरीवाल आणि उद्धव ठाकरे ही दोन्ही माणसे विक्षिप्त आहेत, असा घणाघात राज्याचे उद्योगमंत्री आणि ‘प्रहार’चे संपादकीय सल्लागार नारायण राणे यांनी मंगळवारी येथे केला. उद्धव ठाकरे मंत्रालयात घुसू म्हणतात. मंत्रालयात घुसतील, पण त्यांना परत जाता येईल का, असा सवालही राणे यांनी केला.
‘प्रहार’च्या चौथ्या वर्धापनदिनानिमित्त आपली भूमिका स्पष्ट करताना, ‘प्रहार’ आम्ही धंदा म्हणून नव्हे तर धर्म म्हणून चालवितो, असेही राणे यांनी सांगितले. सरकारवर खोटेनाटे आरोप करणा-या केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ‘गेली दोन वर्षे मी जरा संयमाने राहण्याचे ठरवले होते. त्यामुळे काही लोकांची जीभ जरा जास्त चालू लागली आहे. त्यांचा समाचार घ्यावाच लागेल. उद्धव ठाकरे तर नेमके काय बोलतात याचे त्यांनाच भान नसते. आज एक बोलायचे आणि दुस-या दिवशी दुसरेच बोलायचे. गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली. म्हणाले, मुख्यमंत्री चांगले काम करीत आहेत. त्यांनाच ठेवा. आम्हालाही तेच वाटते. परंतु चोवीस तास उलटायच्या आत लगेच भूमिका बदलली. ज्या मुख्यमंत्र्यांची स्तुती केली त्यांच्याकडेच खाते असणा-या म्हाडावर मोर्चा काढला. म्हणे, आम्ही सरकार खाली खेचू. काल म्हणतो, मुख्यमंत्री हेच हवेत, दुस-या दिवशी म्हणतो, सरकार खाली खेचू. काय तापात बडबडतो की काय हा माणूस. म्हणे अकरा तारखेपर्यंत निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांच्या बंगल्यात घुसू, मंत्रालयात घुसू. वा रे वा, असे कसे घुसू? मातोश्रीच्या उंदराच्या बिळात राहणा-यांनी वाघाच्या गुहेत घुसायची भाषा करू नये. तुम्ही मंत्रालयात घुसाल तर आम्ही काय बघत बसू काय? मंत्रालयात घुसलात तर तो तुमच्यासाठी वन-वे ठरेल. परतीचा रस्ता सापडणार नाही,’ असा सज्जड इशाराही राणे यांनी दिला.
श्वेतपत्रिका म्हणजे आरोपपत्र नाही. जे सत्य आहे ते लोकांसमोर येण्यासाठी श्वेतपत्रिकेची घोषणा केली आहे. परंतु त्यावरूनही टीका होते. महापालिकेतील भ्रष्टाचारातून घर चालविणा-यांना राज्य सरकारवर टीका करण्याचा अधिकार आहे काय? श्वेतपत्रिकेचे राजकारण कराल तर महापालिकेचीही चौकशी करू, असा इशाराही त्यांनी दिला.
रॉबर्ट वद्रा यांच्याविरोधात बेछूट आरोप करणा-या अरविंद केजरीवालबद्दल ते म्हणाले, ‘दिल्लीत अरविंद केजरीवाल गांधी कुटुंबीयांवर बेछूट आरोप करीत आहे. काय या केजरीवालची समाजसेवा. एकदा विजेच्या खांबावर चढला. बस्स. गांधी घराण्याच्या त्यागाची त्यांना सर येणार आहे का? एकट्या गांधी घराण्यातील दोन पंतप्रधानांनी देशासाठी बलिदान दिले. देशासाठी त्याग केला. केजरीवालकडे असे काही आहे का? उठसूट फक्त आरोप करायचे. त्याला चॅनेलवाले आणि वृत्तपत्रे प्रसिद्धी देत आहेत. केला आरोप द्या छापून. असली पत्रकारिता ‘प्रहार’ला मान्य नाही. जे सत्य आहे, तेच लोकांसमोर मांडण्यासाठी ‘प्रहार’ची निर्मिती केलेली आहे. सल्लागार म्हणून मी तशा सूचना दिलेल्या आहेत. कुणाच्याही विरोधात एकतर्फी बातमी येणार नाही याची काळजी घेतली जात आहे,’ असेही राणे यांनी अधोरेखित केले.
‘प्रहार’ टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप
सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याची जी अपेक्षा जयंत पाटील आणि शिवाजीराव मोघे यांनी व्यक्त केली आहे, ती पूर्ण केली जाईल, असे सांगून राणे यांनी ‘प्रहार’ टीमच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. महाराष्ट्रात वृत्तपत्राच्या माध्यमातून तर जगात वेबसाइटच्या माध्यमातून ‘प्रहार’ समाजप्रबोधनाचे काम करीत आहे. त्यासाठी संपादक महेश म्हात्रे, महाव्यवस्थापक राघवेंद्र शेठ, वितरक बाळासाहेब दांगट, लेखक, जाहिरातदार यांचेही मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे राणे यांनी सांगितले.
गांधी घराण्यावरील टीका निंदनीय
सध्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वद्रा यांच्यासंदर्भात सुरू असलेल्या आरोपांबाबत, प्रसारमाध्यमांनी घेतलेल्या एकांगी भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून नारायण राणे यांनी अरविंद केजरीवाल आणि उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ज्या गांधी घराण्याने देशासाठी रक्त सांडले, त्यांच्यावर टीका करण्याची या मंडळींची पात्रता आहे का, असा सवाल करून राणे म्हणाले, ‘या गांधी घराण्यातील माननीय इंदिराजी आणि राजीवजी यांनी देशासाठी बलिदान दिले. या घराण्याचे देशरक्षणातील आणि देशसेवेतील योगदान ज्यांना कळत नाही, तेच असे वागू-बोलू शकतात.’ त्याचबरोबर, ज्यांची घरे राजकारणावर चालतात, अशा मंडळींनी तरी गांधी घराण्याविरोधात बोलू नये, असा टोलाही राणे यांनी लगावला.
हशा आणि टाळ्या
गेली दोन वर्षे मी शांत आहे. ब-याच विषयांवर बोलावेसे वाटत होते, तरीही मी बोललो नाही. परंतु या दोन वर्षाच्या काळात कोणीही काहीही बोलायला लागलेत. अगदी आजारी माणूस तापात बरळतो तसे (हशा). हो ना, त्यांना वाटते आपण जे काही बोलतो ते जोरदार (हशा). अहो, पण तसं बोलण्यासाठी अंगात जोश असावा लागतो (हशा आणि टाळ्या). बरं, हे जे काही बोलतात त्यात काही अर्थ असतो का हो? परवा उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हेच मुख्यमंत्री कायम राहिले पाहिजेत.’ आम्ही म्हणालो, व्वा! हे छानच आहे. अगदी दुस-याच दिवशी उद्धवनी मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील ‘म्हाडा’वर मोर्चा काढला. तिथे हे काय म्हणतात? ‘आम्ही हे सरकार खाली खेचू.’ पुढे तर कहर, कारण ते म्हणतात, ‘आम्ही मंत्रालयात घुसू.’ आता हे काय बोलणे झाले? तुम्ही मंत्रालयात घुसलात तर काय आम्ही गप्प बसू (प्रचंड टाळ्या)? आलात तर तिकडे वन-वे असेल, तुम्ही परत जाल काय?
प्रहार वर्धापनदिन सोहळा (फोटो फिचर)
[EPSB]
कसा वाटला तुम्हाला बदल…
प्रहार ऑनलाइन नव्या रुपात… तुमच्या सूचनांचे स्वागत…
[/EPSB]
khupach chan aahe…..grt…badal nehamich chan aasato….