रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला असून, ही योजना रविवारपासून प्रत्यक्षात येणार आहे.
मुंबई- रेल्वे प्रशासनाने स्वयंचलित दरवाजा असलेली लोकल रेल्वे मार्गावर चालवण्याचा निर्णय घेतला असून, ही योजना रविवारपासून प्रत्यक्षात येणार आहे. शुक्रवारी पश्चिम रेल्वेच्या महालक्ष्मी-बोरिवली या स्थानकांदरम्यान स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल चालवण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली असून, महिलांच्या प्रथम दर्जाच्या डब्याला स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे प्रभारी महाव्यवस्थापक सुनील कुमार सूद यांनी दिली.
पश्चिम रेल्वेवरील एका लोकलचे दोनच दरवाजे सध्या स्वयंचलित प्रणालीने कार्यरत आहेत. पुढील पाच वर्षात मुंबईतील सर्व लोकलना अशा प्रकारचे स्वयंचलित दरवाजे लावण्यात येणार आहेत. भविष्यात नव्याने येणा-या बंबार्डियर लोकलचे दरवाजेही स्वयंचलित प्रणालीने कार्यरत असणार आहेत. एक दरवाजा बनवण्याकरता ६ लाख रुपये खर्च येतो. म्हणजेच १२ डब्यांच्या एका गाडीकरता साडेचार कोटी अशा १५०० कोटी रुपयांची गरज आहे. या संदर्भात रेल्वे बोर्डाकडे मागणी करण्यात आली असून, याकरता विशेष निधी दिला जाऊ शकतो, असा विश्वास सूद यांनी व्यक्त केला.
आगामी काळात मध्य आणि पश्चिम रेल्वेवर स्वयंचलित दरवाजे असलेल्या प्रत्येकी चार लोकल चालवण्यात येणार आहेत. फलाटावर गाडी थांबल्यानंतर दरवाजा उघडण्याकरता आणि बंद होण्याकरता अडीच सेकंदांचा अवधी लागणार आहे. अनावधानाने लोकलचा दरवाजा उघडा राहिल्यास गाडी सुरू होणार नाही. या स्वयंचलित दरवाजांवर गार्डचे नियंत्रण असणार आहे. स्थानकातील फलाटांची बाजू लक्षात घेऊन गार्डकडून दरवाजे उघडण्यात येणार आहेत. संकटसमयी बाहेर पडण्याकरता उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अपघातांचे प्रमाण पाहता स्वयंचलित दरवाजांमुळे ‘स्टंट’बाजीला आळा बसणार आहे.
रेल्वेने घेतलेला निर्णय चांगला आहे. रेल्वे अपघातांचे प्रमाण पाहता असा प्रयत्न गरजेचा होता. लवकरात लवकर मुंबईतील सर्व लोकल ट्रेनला अशा प्रकारचे स्वयंचलित दरवाजे लावायला हवेत. मात्र रेल्वेच्या या निर्णयामुळे आगामी काळात रेल्वे अपघातांचे प्रमाण घटेल. – सुभाष गुप्ता, अध्यक्ष, मुंबई यात्री संघ
लोकलमधील प्रवाशांची गर्दी पाहता, स्वयंचलित दरवाजे यशस्वी होतील की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी होईल, मात्र सरुवातीला वातानुकूलित लोकल चालवली असती तर योग्य झाले असते. – अशोक दातार, वाहतूक तज्ज्ञ
बन्द दरवाज्याचे गाडीतून प्रवास करा आणि घुसमटून मरा !! जय हो लोकल रेल्वे की,