महाड दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचे मृतदेह सापडले असून शोधपथकाला वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष शुक्रवारी सापडले आहेत.
महाड- मुंबई-गोवामहामार्गावर सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत २२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तसेच वाहून गेलेल्या तवेरा कारचे अवशेष सापडले आहेत.
सावित्री नदीतील शोधमोहीमेच्या तिस-या दिवशी या भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे अडथळा निर्माण झाला. मात्र, तरीही एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानांनी शोधमोहिम सुरु ठेवली.
मुंबई-गोवामहामार्गावर महाडच्या सावित्री पूल दुर्घटनेत शुक्रवारी तिस-या दिवशी ८ मृतदेह सापडले असून आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण मृतांचा आकडा २२ वर गेला आहे. हे सर्व मृतदेह घटनास्थळापासून काही अंतरावर सापडले आहेत. शिवाय या दुर्घटनेत वाहून गेलेल्या टवेरा कारचेही काही अवशेष शोधपथकांना सापडले आहेत. त्यामुळे लवकरच वाहने सापडण्याची आशा निर्माण झाली आहे.
शुक्रवारी दासगाव ते महाड दरम्यान नदीत वाहत असलेले ८ मृतदेह स्थानिक ग्रामस्थांनी बाहेर काढले. या सर्व मृतदेहांची ओळख पटली असून ते महाडच्या ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तिथे शवविच्छेदन केल्यानंतर पोलीस, महाड ट्रॉमा केअर सेंटरचे डॉक्टर्स, कर्मचारी, स्वयंसेवक, महसुल कर्मचारी यांच्या माध्यमातून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्याचे काम सुरू आहे.
हे मृतदेह नेण्यासाठी रुग्णालयात ४६ रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत. यात १०८, नरेंद्र महाराज संस्थान आणि खाजगी रुग्णवाहिकांचाही समावेश आहे.
महाडमध्ये गुरुवारी पावसाने उसंत घेतली होती. मात्र शुक्रवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू असल्याने सावित्री नदीची पातळी पुन्हा वाढली. या भागात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे तिस-या दिवशी शोधकार्यात अडथळा निर्माण झाला. मात्र, तरीही एनडीआरएफ, नेव्ही आणि कोस्टगार्डच्या जवानांनी शोधमोहिम सुरु ठेवली.
यावेळी तब्बल ६३ तासांच्या शोधमोहिमेनंतर वाहून गेलेल्या तवेरा कारचे काही अवशेष सापडले. तवेरा गाडीच्या कॅरिअरचा भाग, चटई आणि काही सामान सापडले आहे. दुर्घटना घडली त्या ठिकाणापासून सुमारे अडीच किलोमीटर अंतरावर कारचे अवशेष सापडल्याचे शोधपथकाने म्हटले आहे. दुर्घटनेत बुडालेल्या दोन्ही एसटी बस व इतर वाहने याच भागात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आत्तापर्यंत सापडलेले मृतदेह
या दुर्घटनेनंतर शुक्रवारी सायंकाळपर्यंत बेपत्ता प्रवाशांपैकी २२ जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी श्रीकांत कांबळे, शेवंता मिरगल, रंजना वाजे, पांडुरंग घाग, आवेझ चौगुले, स्नेहल बैकर, प्रभाकर शिर्के, रमेश कदम, प्रशांत माने, अनिष बलेकर, बाळकृष्ण वरक, मंगेश काटकर, सुनील बैकर, आसिफ चौगुले, अजय गुरव, विजय पंडित, विजया विजय पंडित, संतोष गवताडे, भूमी भूषण पाटेकर आणि भिकाजी वाघदरे अशा २० जणांची ओळख पटली असून उर्वरित दोघांची अद्याप ओळख पटलेली नाही.
या पुढे सर्वांनी काळजी घेणे गरजेचे आहे दोष देणे यात वेळ घालवण्यापेक्षा मदत करा सावध रहा हि काळाची गरज आहे