उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरुवारी मान्सूनपूर्व पावसाने दिलासा दिला. मात्र दोन तासांच्या पावसाने मुंबईतील वाहतूक सेवेचा खेळखंडोबा झाला. अनेक भागांत पाणी साचल्याने वाहतुकीतही बदल करावे लागले. बेस्टच्या वाहतुकीलाही त्याचा फटका बसल्याने मुंबईकरांचा प्रवास लांबला. मान्सूनपूर्व पावसातच मुंबई महापालिका आणि अन्य यंत्रणांची कसोटी लागल्याने प्रत्यक्ष मान्सूनचा पाऊस बरसेल, तेव्हा मुंबईची स्थिती काय असेल, याची झलक मुंबईकरांनी गुरुवारी अनुभवली.
या पहिल्याच पावसाने मान्सूनपूर्व तयारीची पोलखोल केल्याने मुंबई महापालिकेचा गैरकारभार चव्हाटय़ावर आला आहे. खरे तर मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची आहे याचा शिवसेना आणि त्यांच्या महापौरांना विसर पडलेला दिसतो. मुंबईत पाणी साचू शकेल अशी २०८ ठिकाणे पालिकेने निश्चित केली आहेत. यात दरवर्षीप्रमाणे हिंदमाता, भायखळा, दादर टीटी, माहीम, किंग्ज सर्कल, शीव, कुर्ला, अंधेरी, मालाड सबवे, घाटकोपर इत्यादी भागांचा समावेश आहे. मेट्रोचे काम सुरू असलेल्या १७ ठिकाणी तसेच पश्चिम व मध्य रेल्वेवरील ३७ ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता लक्षात घेऊन पाणी उपसण्याचे पंप तैनात ठेवण्यात आले आहेत. असे असतानाही मान्सूनपूर्व पावसानेच महापालिकेची ही तयारी किती तकलादू आहे, हे दिसून येते. यामुळे महापालिकेचा कारभार कसा सुरू आहे, याचा दाखला मुंबईकरांना पुन्हा पाहायला मिळाला. मुंबईचे कारभारी असतानाही पाणी तुंबण्याचे खापर मुख्यमंत्री आणि आयुक्तांवर फोडून शिवसेनेने पाऊस सुरू होण्यापूर्वीच आपल्या नाकर्तेपणाची कबुली दिली आहे. आता मुंबईतील खड्डय़ांचेही खापर महापौरांनी सरकारवर फोडून महापालिका आपली जबाबदारी झटकू पाहत आहे. दरवर्षी पावसाच्या तडाख्यात रस्त्यांवर खड्डे होतात. मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडले तर त्याची जबाबदारी राज्य सरकारवर राहील, असे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी स्पष्ट केल्यामुळे पावसाळ्यात रस्त्यांवर पडणा-या खड्डय़ांवरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाद रंगण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांवरून पालिकेतील पारदर्शकतेच्या पहारेक-यांनी शिवसेनेला लक्ष्य केले होते. त्यामुळे यंदा शिवसेनेने सावध पवित्रा घेतलेला दिसतो. आतापासूनच महापौरांनी खड्डय़ांवरून राज्य सरकारवर शरसंधान करण्यास सुरुवात केलेली दिसते. विकासाच्या नावाखाली मुंबईच्या रस्त्यांवर सरकारने अराजक निर्माण केल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. मेट्रोचे स्वप्न हे अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनप्रमाणेच फसवे आहे. गरज नसताना सुरू केलेले हे नसते उद्योग आहेत. पावसाळ्यात तुंबणा-या मुंबईची जबाबदारी सरकार, त्यांचे मेट्रो कॉर्पोरेशनची असल्याचे शिवसेनेने अलीकडेच जाहीर केले होते. मात्र त्यावेळी मुंबई महापालिकेवर सत्ता कोणाची आहे याचा विसर सेनेला पडलेला दिसतो. मेट्रो प्रकल्प काही आज आलेला नाही. गेली दहा-बारा वर्षे त्याची चर्चा आहे. कामही सुरू आहे. एक टप्पा सुरू होऊन पाच वर्षे उलटली. या बारा वर्षात सेनेला हे सुचले नाही आणि आताच हे रडगाणे का सुरू केले आहे? विकासकामांसाठी खोदकाम होणार हे शिवसेनेला माहिती नव्हते की मेट्रो ट्रेन डायरेक्ट इस्टंट फिटिंग होणार असे शिवसेनेला वाटत होते का? गेली तीन दशके मुंबई महापालिकेवर शिवसेनेची सत्ता असताना मुंबापुरीची अशी वाताहत का झाली, याचा विचार शिवसेनेने करायला हवा. संपूर्ण देशात नागरीकरण वाढले आहे, लोकसंख्या वाढली आहे, असे असताना मुंबईला आलेले बकाल स्वरूप बदलण्यास शिवसेनेला सपशेल अपयश आले आहे. मान्सूनपूर्व पावसानेच ठिकठिकाणी पाणी तुंबल्याने शिवसेना मुंबईचा कारभार सांभाळण्यास असमर्थ आहे असेच दिसते. मेट्रो, मोनो आणि बरेच प्रकल्प सध्या मुंबईत सुरू आहेत. हे किमान चार-पाच वर्षापासून सुरू आहेत. प्रकल्पाला आधी मंजुरी द्यायची आणि नंतर लोकांना त्रास व्हायला लागल्यावर बोंबलायचे ही शिवसेनेची नेहमीचीच दुटप्पी भूमिका आहे. शिवसेनेला मुंबईकरांची बिलकूल काळजी नाही. महापालिका चालवण्यास शिवसेना असमर्थ असल्यामुळे आपल्या अपयशाचे खापर आता सरकारवर फोडण्याचा अधमपणा शिवसेना करते आहे. पण मुंबईकर आता सेनेच्या या नौटंकीला फसणार नाहीत. शिवसेना म्हणते आहे, एमएमआरडीए नावाची बाजारबसवी मुंबई महानगरपालिकेच्या छाताडावर आणून बसवल्यापासून मुंबईचे हाल हे आत्महत्याग्रस्त शेतक-यांप्रमाणे झाले. म्हणजे मुंबईकरांना जगणे कठीण झाले आहे. एमएमआरडीए काही आज निर्माण झालेली नाही. मुंबई विकासासाठी एमएमआरडीएची गरज नाही, असे त्याचवेळी ठणकावून सांगायला शिवसेनेला कोणी विरोध केला होता? तेव्हा शिवसेना मूग गिळून गप्प का बसली? त्यावेळी एमएमआरडीए म्हणजे आपल्याला सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे, असा समज सेनेने करून घेतला. मुंबईचा विकास या प्राधिकरणातून होईल अन् त्याचा फायदा आपल्याला होईल हे शिवसेनेचे तेव्हा स्वप्न होते. त्यामुळे आपल्या निष्क्रियतेचे खापर सरकारवर फोडण्यात काहीही अर्थ नाही हे सेनेने लक्षात घ्यावे. मेट्रोमुळे या पावसाळ्यात साधारण २०८ ठिकाणी मुंबईत पाणी तुंबण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. पहिल्याच पावसात त्याची प्रचितीही आली. राज्य सरकारच्या एमएमआरडीए या बाजारबसवीमुळे मुंबईत पाणी तुंबणार असल्याचा शिवसेनेचा आरोप आहे. पण ही बाजारबसवी आपल्या घरात शिवसेनेने आणलीच कशी हा प्रश्न मुंबईकरांना आहे. बाजारबसवी घरात येत नाही तर ती आणली जाते. त्यामुळे तिला विरोध न करणारेच दोषी असतात हे लक्षात घेतले पाहिजे. शहरातील खड्डे, पाणी तुंबण्याची जबाबदारी सरकारला घ्यावी लागेल, असे शिवसेनेचे म्हणणे असेल, तर महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेची काहीच जबाबदारी नाही का? मुंबईत, राज्यात, केंद्रात सगळीकडे सत्तेत तुमचा वाटा असताना जबाबदारी झटकून टाकण्याचे पाप शिवसेना करते आहे. आपल्या चुकांचे आणि चुकीच्या कामाचे खापर शिवसेनेने दुस-यांच्या माथी फोडणे बंद केले पाहिजे. मुंबईचा खोटा पुळका आणण्याची आता गरज नाही. मुंबईतून मराठी माणूस अस्तंगत होत असताना बघ्याची भूमिका घेणा-या आणि परप्रांतीय आणि बिल्डरलॉबीला लाल कारपेट घालणा-या शिवसेनेच्या दुटप्पीपणावर कोण विश्वास ठेवणार? मुंबईतील प्रत्येक गोष्टीसाठी सरकारला जबाबदार धरण्यापेक्षा महापालिकेची सत्ता सांभाळता येत नाही, असे सांगून सत्तेतून पायउतार होणे केव्हाही चांगलेच!
शिवसेनेचा बाण सध्या त्यांना पेलवेना झालाय। धड सोडता येत नाही की धड ताणता येत नाही। बोलणे सोपे करणे अवघड, चोराच्या उलट्या बोंबा, अशी आपली आजची शिवसेना झाली आहे। राजकारण आणि सत्तेचा उपभोग एवढेच दिवेस्वप्न शिवसेनेचे आहे। मराठी माणूस आणि मुंबापुरीच त्यांना काही ठेवलेलं नाही। त्यांना डोहाळे आहेत ते फक्त सत्तेचे।