रात्र वाढत चालली होती. स्कायवॉकवरची वर्दळही कमी व्हायला लागली होती. एका खांबाला टेकून किती तरी वेळ त्या तरुणाचे कुणाशी तरी मोबाइलवर संभाषण सुरू होते. खूप वेळ संभाषण संपत नव्हते. मध्येच त्याचे हातवारे सुरू होते. पलीकडच्या कुणाशी तरी बहुधा त्याचा वाद सुरू असावा. अचानक त्याने मोबाइल कट केला. संभाषण थांबवले. मोबाइल शर्टाच्या वरच्या खिशात ठेवला. स्कायवॉकवरून खाली पाहिले.
स्कायवॉकखालील रस्त्याच्या कडेला एखाद्या सोबत्यासारख्या पसरलेल्या तलावाचे पाणी अंधारात रस्त्यावरील दिव्यांची प्रकाशतिरीप घेऊन मधूनच चमकत होते. त्या पाण्याने बोलावल्यासारखं तरुणाने स्कायवॉकवरून स्वत:ला झोकून दिले. पाण्यात त्याचा देह शिरताना जोरदार आवाज झाला, चहूबाजूंनी पाणी उडाले. काही मिनिटांच्या खळबळाटानंतर पाणी शांत झाले. जणू काही झालेच नाही. तलावाने पोटात घेतलेल्या त्या तरुणाचा जीवही शांत झाला होता.
वाचकांना अस्वस्थ करणा-या एखाद्या कथेची ही सुरुवात नाही तर, प्रत्यक्ष घडलेली घटना आहे. वसई-विरार महापालिकेच्या पी. सी. सोळंखी तलावावरून हा स्कायवॉक जातो. रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मोहित विजय राऊत हा तीस वर्षाचा तरुण या स्कायवॉकवर मोबाइलवरून कुणाशी तरी बोलत होता. बोलता बोलता अचानक काय झालं कुणालाच कळलं नाही. त्याने फोन बंद केला आणि खिशात ठेवला. कुणाला काही कळण्याच्या आत त्याने या स्कायवॉकवरून स्वत:ला खाली तलावात भिरकावून दिलं. तलावाच्या काठाला काही युवक उभे होते. वरून कुणी तरी उडी घेतल्याचं लक्षात आल्यावर त्यांनी लगेचच तलावात उडया मारून मोहितला वाचवण्याचा प्रयत्न केला पण, तोपर्यंत तो बुडाला होता.
सोमवारी संध्याकाळी मोहितचा मृतदेह तरंगत वर आला. पण त्याने असे का केले यासह अनेक प्रश्नांची उत्तरं त्याच्याबरोबरच तळालाच गेली ती तिथेच राहिली आहेत. त्याच्या घरच्यांच्या सांगण्यानुसार, मोहित हुशार होता, जिद्दी होता, सकारात्मक दृष्टिकोनातून तो नेहमी आव्हानांना भिडायचा. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर गेल्याच महिन्यात त्याने यूपीएससीची प्राथमिक परीक्षाही पार केली होती. त्रासाला, जाचाला कंटाळून, अपयशाचा सामना करण्याची ताकद नसल्यामुळे अनेक जण आत्महत्येचा मार्ग पत्करतात. मोहितचं तसं नव्हतं. तरीही त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. त्याच्या बाबतीत असं काय घडलं होतं, घडत होतं की ज्याचं ओझं त्याला असह्य झालं होतं? आयुष्यही त्याला नकोसं झालं होतं? या कशाचीही उत्तरं त्याच्या कुटुंबीयांना आता कदाचित मिळणार नाहीत. घरून निघताना त्याने आई-वडिलांच्या पाया पडून निरोप घेतला होता. वडील त्याला बोललेही की पाया पडतोयस, काय युद्धावर चाललायस की काय? मोहितने उत्तर दिलं नव्हतं पण त्याच्या मनात त्या वेळी कुठलं तरी युद्ध नक्कीच सुरू असणार. जगाचा निरोप घेऊन त्याने हे युद्ध संपवलं.
पण नेमकं काय युद्ध होतं? त्याच्या मनात काय सुरू होतं? हे सारे प्रश्न मागे ठेवून तो गेलाय. हातातोंडाशी आलेला मुलगा अचानक निघून गेल्यामुळे त्याचे आई-वडील मोडून पडले आहेत. मोहितसारखे अनेक जण असेच टोकाचा निर्णय घेतात. मुंबईच्या सी-लिंकवरून देह झोकून देतात. त्यांची सुटका होते. पण मागे राहिलेले त्यांचे कुटुंबीय? आई-वडील, पत्नी, मुलं आणि कुणी त्यांचे काय? जवळच्या एखाद्याची आत्महत्या मागे राहणा-यांच्या आयुष्यावर चरचरीत ओरखडा उमटवून जाते. कायम भळभळत राहणारी जखम असते ती. अनेकदा आपण फक्त ज्याने जीवन संपवलं त्यांचाच विचार करतो. बिच्चारा. अशी काय वेळ आली असावी त्याच्यावर. असे म्हणत हळहळतो. जाणारा जातो पण त्याच्या पश्चात त्याच्या कुटुंबाचे, वृद्ध मातापित्यांचे, पत्नी-मुलांचे काय होते? याचा विचार व्हायची गरज आहे. जाणा-याने त्याच्यापुरती सुटका करून घेतलेली असते. खरे तर पलायन केलेले असते. त्याच्यावर अवलंबून असणा-यांना कायमचे दु:खी करून, समस्यांचे ओझे त्यांच्या खांद्यावर टाकून तो निघून जातो. गेलेल्या माणसाला वाईट म्हणायचं नाही अशी आपली शिकवण आहे. तरीही दुस-यांना संकटात सोडून आत्महत्येच्या मार्गाने पलायन करणा-यांना ‘स्वार्थी’च म्हणावेसे वाटते.
मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंक सेतू आत्महत्या करण्यासाठी सध्या जणू फेवरीट स्पॉट झाला आहे. या वर्षात आतापर्यंत आठ जणांनी या सेतूवरून आत्महत्या केली आहे. आत्महत्या करणे हा गुन्हा आहे. भारतीय दंडसंहितेच्या कलम ३०९ नुसार आत्महत्येच्या प्रयत्नासाठी एक वर्षाचा कारावास आणि दंड वा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तरीही या सगळ्या प्रकरणांमध्ये अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. अलीकडेच अंधेरीच्या एका उद्योजकाने ऑनलाइन व्यवहारांमध्ये झालेल्या नुकसानीमुळे याच सेतूवरून जीव देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर मात्र पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलणा-या व्यक्ती आधीच नैराश्याच्या खाईत असतात. त्यांना सहानुभूतीची गरज असते. अशा कारवाईमुळे या व्यक्ती आणखी दबावाखाली येतील. यामुळे आत्महत्या हा गुन्हा समजू नये याबाबत जगभर चर्चा सुरू असते. अशा प्रकरणांकडे सहानुभूतीने पाहून या व्यक्तींना आधार द्यायला हवा, नैराश्यातून बाहेर काढायला हवं, ही मानवी हक्क चळवळीतील कार्यकर्त्यांची भूमिका राहिली आहे. आत्महत्येचा मार्ग पत्करणा-यांबद्दल सहानुभूतीचा दृष्टिकोन जरूर बाळगायला हवा. त्यांना त्यांच्या नैराश्यातून बाहेर काढायला हवे, मानसिक आधार द्यायला हवा, हे योग्य असेल तर आत्महत्या केलेल्यांच्या कुटुंबीयांबद्दलही हीच सहानुभूती समाजाने दाखवायला हवी हेही तितकेच योग्य आहे.
वास्तवात वेगळेच घडते. आत्महत्या घडल्यावर मागे राहिलेले कुटुंब निराधार होते. त्यांच्या समस्या कैकपटीने वाढतात. त्यांना सावरायला आधाराचे, मदतीचे हात अभावानेच पुढे येतात. या समस्याग्रस्त कुटुंबाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनही बदलतो. अनेकदा तर अशी कुटुंबे रस्त्यावर येतात, त्यांचे शोषण होते. त्यांनाही सावरण्याची, उभं करण्याची, त्यांच्या मनावर उमटलेल्या ओरखडे भरून काढण्याची नितांत गरज आहे. या दिशेने मात्र पुरेसा विचार आज झालेला नाही.
आत्महत्या करणा-यांबद्दल हळहळ व्यक्त करताना त्याच्या कुटुंबाबद्दलही समाजमनात आत्मीयतेचा, अनुकंपेचा असा हुंकार उमटायला हवा. तरच मागे राहिलेल्यांचीही ख-या अर्थाने सुटका होईल.
ज्याला मित्र आहेत त्याच्या मनात आत्महत्येचा विचार कधीच येत नाही. कारण मित्र आपल्याला प्रत्येक प्रसंगात मदतीला उभे असतात. इतरांशी तुलना करू नका, मित्र जोडा हाच सुखी जीवनाचा पाया आहे.