उत्तर प्रदेशसारखे राज्य गमावणे मोदींना परवडणारे नाही. दिल्ली आणि बिहार राज्यात मोठा मार बसल्याने मोदींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. ‘मोदी हरू शकतात’ याचा अंदाज आल्याने मायावती त्यांच्या अंगावर तुटून पडल्या आहेत. पण कुठल्याही किमतीत उत्तर प्रदेश जिंकण्याची तयारी मोदींनी चालवली आहे.
पुढचे वर्ष निवडणुकांचे आहे. उत्तर प्रदेशसोबत पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या राज्यांत फेब्रुवारी-मार्चमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यानंतर गुजरातची निवडणूक आहे. या निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे २०१९चे भवितव्य ठरवतील. मोदींच्या निकालाला अजून अडीच वष्रे आहेत. पण आतापासून इशारे मिळणे सुरू झाले आहे.
मोदी आणखी एक निवडणूक भाजपाला जिंकवून देतील, असा दावा करणारे खूप राजकीय पंडित आहेत. पण मोदींनी पाच वर्षाची चालू टर्म पूर्ण केली तरी खूप झाले, असे म्हणावे, इतक्या वेगाने मोदींच्या हातून राजकारण निसटत चालले आहे. ‘गुजरात मॉडेल’ चालवून मोदींनी देशाची सत्ता मिळवली, ते गुजरातच मोदींच्या अंगावर उलटले आहे. उत्तर प्रदेशातही शाश्वती नाही. अश्वमेधाचा घोडा घेऊन निघालेले नरेंद्र मोदी, अमित शहा पदोपदी ठेचकळत आहेत. काय होणार या निवडणुकांमध्ये?
उत्तर प्रदेशमध्ये कुणाचे राज्य येणार हे आज कोणीही छाती ठोकून सांगू शकत नाही. तिथला मतदार कमालीचा लहरी आहे. एका निवडणुकीत मिळालेले यश या राज्यात दुस-या निवडणुकीत टिकत नाही. २४ तास जातीचे राजकारण करणा-या उत्तर प्रदेशात मुलायमसिंह समाजवादी पार्टी, मायावती यांची बसपा आणि भाजपा यांच्यात घनघोर संघर्ष होऊ घातला आहे. मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून ब्राह्मण शीला दीक्षित यांना पुढे करून काँग्रेसने या तिरंगी लढतीत उडी घेतली आहे.
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत ८० पैकी ७१ जागा जिंकून दिल्लीच्या तख्तावर पोहोचणा-या भाजपाला मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार अजून देता आला नाही. यावरून भाजपाची अडचण लक्षात येते. स्वबळावर सत्तेत यायला किमान २९ टक्केमते हवीत. एव्हढी गठ्ठा मते घेण्याच्या परिस्थितीत आज कुठलाही पक्ष नाही. चौरंगी लढती असल्याने मतांची कुतरओढ अटळ आहे. हिंदूंचा पक्ष म्हणून मिरवणा-या भाजपाचा दलित मतांवरही डोळा आहे. पण मायावती या दलित मतांवर हक्क सांगत आहेत, सपा म्हणजे मुलायमसिंह यादव यांचा मुस्लीम मतांवर भरवसा आहे.
२०१४च्या लाटेत भाजपाला ४२ टक्के मते मिळाली. दलितांनी मोठया प्रमाणावर भाजपाला मतदान केल्याने भाजपचा टक्का वाढला. २० टक्के मते घेऊनही बसपाला एकही जागा मिळाली नाही. उत्तर प्रदेशात २१ टक्केमतदार दलित आहे. ओबीसी ३० टक्के, ब्राह्मण १३ टक्के तर मुसलमान १८ टक्के आहे. दलित मतदार यंदा बिथरलेला असल्याने सा-यांची गणिते चुकू लागली आहेत. त्यामुळेच निवडणुकीला ६ महिने बाकी असताना, उत्तर प्रदेशात ‘खिचडी सरकार’ येईल, अशी भाकिते राजकीय पंडित सांगू लागले आहेत. पण राजकारणात काहीही होऊ शकते.
उत्तर प्रदेशसारखे राज्य गमावणे मोदींना परवडणारे नाही. दिल्ली आणि बिहार राज्यात मोठा मार बसल्याने मोदींच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. ‘मोदी हरू शकतात’ याचा अंदाज आल्याने मायावती त्यांच्या अंगावर तुटून पडल्या आहेत. पण कुठल्याही किमतीत उत्तर प्रदेश जिंकण्याची तयारी मोदींनी चालवली आहे. कुठलाही धोका ते पत्करू इच्छित नाहीत. अंतर्गत दगाबाजी होऊ नये म्हणून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करण्याचा मोह मोदींनी टाळला आहे.
दुर्दैवाने, सर्वमान्य असा नेताच त्यांच्याकडे नाही. राजनाथ सिंग, कलराज मिश्र, वरूण गांधी, योगी आदित्यनाथ, उमा भारती, कल्याण सिंग, प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य.. यापैकी कुणाकडेही निवडणूक जिंकवून देण्याची चकाकी नाही. खुद्द मोदी यांचा पूर्वीसारखा माहोल आता राहिलेला नाही. तरीही मोदी हत्यार टाकायला तयार नाहीत.
हिंदू मतांचे ध्रुवीकरण करून निवडणूक जिंकायची अशी मोदींची खेळी आहे. पण सध्या गुजरातमध्ये सुरू अंतर्गत राजकारण उखडून फेकताना मोदींची दमछाक सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ‘युवराज’ राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशात फिरायला सुरुवात केली आहे. ‘किसान यात्रे’च्या नावाने राहुल तब्बल अडीच हजार किलोमीटर फिरणार आहेत. गावागावात खाटा टाकून ते शेतक-यांशी संवाद साधत आहेत. पहिल्या सभेत काँग्रेसने १५०० खाटा टाकल्या होत्या. सभेनंतर लोकांनी त्या पळवल्या. त्याचीच खूप चर्चा झाली. टिंगलही उडवण्यात आली. पण आता खाटांचा हिशोब लागतो आहे. अयोध्येत जाऊन तिथल्या हनुमान गढीमध्ये दर्शन घेऊन राहुल गांधी यांनी ‘मास्टर कार्ड’ खेळले.
१९९२मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यानंतर काँग्रेसचा कुणी नेता अयोध्येकडे फिरकला नाही. त्यामुळे मुसलमानांचा अनुनय करणारा पक्ष अशी काँग्रेसची प्रतिमा तयार झाली आणि भाजपाने या गोष्टीचा फायदा उठवला आणि काँग्रेस पार धुतली गेली. देशाला ३-३ पंतप्रधान देणा-या उत्तर प्रदेशात गेली २७ वष्रे काँग्रेसची सत्ता नाही. यंदाही राजयोग नाही. काँग्रेसलाही ते छान ठाऊक आहे. त्यामुळे २०१९चे टाग्रेट फोकस करून काँग्रेसने रणनीती आखलेली दिसत आहे. शेतकरी आणि त्यांची कर्जमाफी हा मुद्दा राहुल प्रत्येक सभेत मांडत आहेत. पण २०१९मध्येही जोरदारपणे मैदानात यायचे असेल तर उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काँग्रेसला किमान १०० जागा जिंकाव्या लागतील. तरच बसपा किंवा सपासोबत आघाडी सरकार बनवण्याच्या स्पध्रेत काँग्रेस येऊ शकेल. तीन आकडयापर्यंत पोहोचायलाही काँग्रेसला जोर लावावा लागेल. २००९मध्ये काँग्रेसला फक्त २१ जागा मिळाल्या होत्या.
गेल्या २० वर्षातला हा सर्वात मोठा आकडा आहे. त्यामुळे लढाई सोपी नाही. यंदा आशा यासाठी आहे की, काँग्रेसने आपला ‘चेहरा’ बदलला आहे. मुसलमानांना अनुकूल पक्ष म्हणून आतापर्यंत काँग्रेस निवडणुका लढत आली. या प्रतिमेत यंदा थोडा बदल दिसतो आहे. राहुल गांधी मंदिरात जाऊ लागले आहेत. काशी विश्वनाथ, बद्रिनाथ-केदारनाथ आणि आता हनुमान गढीला ते जाऊन आले. हिंदू मतांसाठी काँग्रेस प्रथमच एवढी गंभीर दिसत आहे. दलितांसोबत हिंदूंनाही गोंजारण्याचा प्रयत्न काँग्रेसने चालवला आहे. हा मोठा बदल आहे.
निवडणुका उत्तर प्रदेशात असताना गुजरातचीच चर्चा अधिक आहे. मोदींना त्यांच्या गुजरातमधूनच फटाके सुरू आहेत. दलितांना मारहाणीच्या घटना उजेडात आल्यानंतर मोदींचे फासे उलटे पडू लागले आहेत. ‘दलितांना मारू नका. मला मारा’ असे त्यांना जाहीरपणे सांगावे लागले. यावरून मोदींची हतबलता लक्षात येते. गेल्या दशकात दलितविरोधी गुन्ह्यांचे प्रमाण प्रत्येक १० लाखांत ५० होते. गेल्या वर्षी ते २२३ गुन्ह्यांवर पोहोचले.
हैदराबादेत रोहित वेमुलाची आत्महत्या आणि गुजरातमध्ये गोरक्षकांकडून दलितांना मारहाणीचे प्रकार यामुळे दलित राजकारणाला उकळ्या फुटल्या आहेत. मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांचा राजीनामा घेऊनही दलित मतदार शांत झालेला दिसत नाही. प्रत्येक निवडणुकीत मोदींच्या पाठीशी राहिलेल्या पाटीदार समाजाने आरक्षण मागून मोदींची डोकेदुखी वाढवली आहे. पाटीदार समाजाचा तरुण नेता हार्दिक पटेल याला वर्षभर तुरुंगात डांबले, ही गोष्ट पाटीदार समाजाला झोंबली आहे.
भाजपाची प्रत्येक सभा तो उधळून लावतो आहे. गेल्या आठवडयात सुरतमध्ये झालेला अमित शहा यांचा मेळावा या समाजाने उधळून लावल्याने मोदींची झोप उडाली. दलित रस्त्यावर आहेत आणि पाटीदार म्हणजे पटेल समाजही रस्त्यावर आहे. लोकसभेच्या २६च्या २६ जागा भाजपाला देणा-या गुजरातमध्ये प्रथमच मोदींच्या विरोधात आवाज लागतो आहे. देशाचे राजकारण बदलवण्याची ताकद गुजरातने याआधी दाखवली आहे. जयप्रकाश नारायण यांच्या ‘नवनिर्माण आंदोलना’ने देशाचे राजकारण उलटवले. गुजरातचा ‘गुज्जूभाई’आज त्याच मूडमध्ये आहे.
उत्तर प्रदेशात कांग्रेस ला बहुमत हवे असेल तर राहूलजीने काही वर्षे सन्यास घ्यायला हवा.