रायगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी दोन्ही पक्षातील नेतेमंडळींनी कंबर कसली आहे.
इंदापूर- रायगड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांना प्रचंड मताधिक्य मिळवून देण्यासाठी दोन्ही पक्षातील नेतेमंडळींनी कंबर कसली आहे. माणगावातील एका हॉटेलमध्ये होळीच्या दिवशी रायगड जिल्ह्यातील बडय़ा नेतेमंडळींचे मनोमिलन घडले असून, जिल्ह्यातील पक्ष कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे.
होळीच्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीतर्फे आयोजित बैठकीला सुनील तटकरे, आमदार अनिल तटकरे, माजी आमदार मुश्ताक अंतले, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, माजी खासदार रामशेठ ठाकूर, माजी मंत्री व पेणचे माजी आमदार रविशेठ पाटील, माजी आमदार शाम सावंत, महाडचे माजी आमदार माणिक जगताप, अलिबागचे माजी आमदार मधुकर ठाकूर, राष्ट्रवादीचे वसंतराव ओसवाल, जे. टी. पाटील आदी बडी नेतेमंडळी उपस्थित होती. यावेळी आपसांतील मतभेद विसरून दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी मनोमिलन झाल्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस माणिकराव जगताप यांनी जाहीर पत्रकार परिषदेत केली.
मागील अनेक वर्षापासून रायगडची जागा काँग्रेसच्या ताब्यात होती. मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन ही जागा लाकसेभेसाठी राष्ट्रवादी पक्षाला सोडण्यात आली आहे. जातीयवादी शक्तीला हद्दपार करण्यासाठी आघाडीतर्फे तटकरे यांना भरघोस मतांनी निवडून आणू व आमच्या दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये आता कोणतीही नाराजी नसल्याचे जगताप यांनी यावेळी स्पष्ट केले. आघाडीत बिघाडी आणण्याचे विरोधकांचे मनसुबे धुळीला मिळवू, असेही ते म्हणाले. यावेळी लोकसभेसाठी आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी सांगितले की, ‘आमच्यातील समज-गैरसमज दूर झाले असून आजच्या माणगावमधील बैठकीमुळे मी समाधानी आहे. यापुढील सर्व निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एकदिलाने काम करून आघाडीच्या उमेदवारांना निवडून आणतील.’
दोन्ही काँग्रेसमधील नेते व कार्यकर्ते एकत्र आल्याने माझी ताकद वाढल्याचेही त्यांनी सांगितले. दोन्ही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे मनोमिलन झाल्याची बातमी वा-यासारखी संपूर्ण रायगड जिल्ह्यात पसरल्याने दोन्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
tatkare bhratachari aahet.lokani vichar karun matdan karave