मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे नजीकच्या काळात काँक्रिटीकरण करण्यात येणार असून लौकरच मुंबई ते गोवा दरम्यान बोट वाहतूकही सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय महामार्ग आणि जलपरिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले.
पणजी- मुंबई ते गोवा या राष्ट्रीय महामार्गाचे नजीकच्या काळात काँक्रिटीकरण करण्यात येणार असून लौकरच मुंबई ते गोवा दरम्यान बोट वाहतूकही सुरू करण्याचा विचार असल्याचे केंद्रीय महामार्ग आणि जलपरिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले. गोव्यात पणजी येथील कला अकादमीच्या मास्टर दीनानाथ रंगमंदिरात आयोजित कार्यक्रमात श्री. गडकरी बोलत होते. संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर, गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पास्रेकर हेही यावेळी उपस्थित होते.
पत्रादेवी ते वर्णा या दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाचा शुभारंभ मंत्री श्री. गडकरी यांच्या हस्ते ‘रिमोट’ प्रणालीने करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. सुमारे पाच हजार कोटी रुपये या कामासाठी खर्च होणार आहेत.
गोवा हे जगविख्यात पर्यटन स्थळ असल्यामुळे येथे वाहतुकीची सुलभता असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन श्री. गडकरी यांनी केले. मुंबई ते गोवा या विद्यमान महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू करण्यात आले असून या महामार्गाचे काँक्रिटीकरणही नजीकच्या काळात करण्यात येणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
जगभरात जलवाहतुकीवर भर देण्यात येत असल्याकडे लक्ष वेधून भारत सरकारही जलवाहतुकीवर यापुढे लक्ष केंद्रित करणार असल्याचे श्री. गडकरी म्हणाले. मुंबई ते गोवा या दरम्यान प्रवासी बोटसेवा सुरू करण्यालाही आपले मंत्रालय प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
रस्त्यावरील वाढते अपघात, इंधनाची होणारी नासाडी आणि प्रदूषणाला आळा घालणे यासारख्या गोष्टी जलवाहतुकीमुळे साध्य होणार असल्याचेही श्री. गडकरी यांनी निदर्शनास आणून दिले.
आधी वंदू वास्को डी गामा याला ! नंतर वंदू ” नितीन गडकरी ” याना ! धन्यवाद गडकरी साहेब ,आम्हा गोयेकरांकडे
लक्ष दिल्या बद्दल !