नाशिक – राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला शरमेने मान खाली घालायला लावणा-या घटना नाशिकमध्ये घडत आहेत. देशातील सर्वाधिक नवजात अर्भक मृत्यूचे प्रमाण असलेले रुग्णालय म्हणून नाशिक जिल्हा रुग्णालय बदनाम झाले आहे. गेल्या पाच महिन्यात तब्बल १८७ बालकांना प्राण गमवावे लागले आहेत.
देशात नवजात अर्भकांच्या मृत्यूचं प्रमाण दर हजारी ४० असताना नाशिक जिल्हा रुग्णालयात मात्र हे प्रमाण दीडशेवर गेलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे इथल्या अतिदक्षता विभागातील एका इनक्युबेटरमध्ये तीन ते चार बाळांना अक्षरश: दाटीवाटीनं कोंबून ठेवले जाते.
ज्या अतिदक्षता विभागाची क्षमता १८ बालके ठेवण्याची आहे, तिथे तब्बल ५२ बालकांवर उपचार सुरू आहेत. लाखो रुपये खर्च करुन खाजगी रुग्णालयात मुलांवर उपचार करणे शक्य होत नसल्यामुळे नाइलाजाने चिमुकल्यांना मरणाच्या दारात उभे करावे लागते.
नाशिक जिल्हा रुग्णालयात ५ महिन्यात १८७ बालकांचा मृत्यू झाला. एप्रिल महिन्यात ३२, मे महिन्यात ३९, जून महिन्यात २५, जुलै महिन्यात ३६ तर ऑगस्ट महिन्यात तब्बल ५५ बालकं दगावली. खरेतर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचा विस्तार करण्यासाठी २१ कोटींचा निधी वर्षभरापासून पडून आहे. मात्र झाडे तोडण्याची परवानगी नसल्याने काम रखडले आहे. उत्तर प्रदेशात वर्षात हजारभर मुलांचे मरण पाहिले.
फरुखाबादमध्येही कोवळ्या जीवांचा बळी गेला. मीडियाने दोन दिवस घसा ताणला, पण पुढे काहीच झाले नाही. इकडे फडणवीसांच्या राज्यातही ५ महिन्यात १८७ मुले दगावली. समृद्धी महामार्ग, स्मार्ट सिटी, मेट्रोच्या आणि महाराष्ट्राला नंबर वन बनवण्याच्या थापा मारणा-यांनी एकदा या १८७ चिमुकल्यांच्या आई-बाबांच्या डोळ्यात डोळे घालून विकासाची भाषा करून दाखवावी.
Chor lucche Lok ahet BJP madhye