मुंबईतील प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करताना मराठी सुगम संगीत आणि भक्तिगीतेच लावावीत, असे आवाहन ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती’ने केले आहे.
मुंबई- मुंबईतील प्रत्येक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करताना मराठी सुगम संगीत आणि भक्तिगीतेच लावावीत, असे आवाहन ‘बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समिती’ने केले आहे. हे आवाहन करताना समन्वय समितीने उत्सवात महिलांची छेडछाड किंवा त्यांना त्रास झाल्याची तक्रार येता कामा नये, असा दमही मंडळांना भरला आहे.
बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधित्व करणारी मध्यवर्ती संघटना बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सोमवारी महापालिका पत्रकार संघात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी गणेशोत्सव निर्विघ्न पार पडावा, यासाठी विविध संस्था, विभागांशी चर्चा सुरू असल्याचे समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी सांगितले.
[poll id=”1140″]
यावेळी प्रमुख कार्यवाह गिरीश वालावलकर, कार्याध्यक्ष कुंदन आगासकर, उपाध्यक्ष हेमचंद्र पाटील, सहकार्यवाह अॅड. एस. एस. पवार, सहकार्यवाह शिरीषभाई मोदी, खजिनदार तुकाराम राऊत, लक्ष्मण फणसगावकर, आनंद बेडेकर, सतीश नायक, अरुणा हळदणकर, इंदुमती मांजरेकर, सुषमा बेर्डे, राजेश राणे आदी उपस्थित होते.
उत्सवाच्या अकरा दिवसांत मुंबईतील वातावरण भक्तिमय कसे राहील, यावर प्रत्येक मंडळाने भर द्यायला हवा. यासाठी प्रत्येक मंडळांनी सकाळपासून रात्रीपर्यंत अधिकाअधिक मराठीतील सुगमसंगीत व भक्तिगीते वाजवावीत.
जेणेकरून अशा गीतांमुळे उत्सवाचे वातावरण निर्माण होईल, असे दहिबावकर यांनी स्पष्ट केले. मुंबईतील २०२६ गणेशोत्सव मंडळांनी परवानगीसाठी पालिका व वाहतूक पोलिसांकडे अर्ज केला. आतापर्यंत ६२७ मंडळांना परवानगी देण्यात आली आहे तर ४१३ मंडळांना परवानगी नाकारली आहे. शिवाय ९५७ मंडळं परवानगीच्या प्रतीक्षेत आहेत.
यावर बोलताना ज्या मंडळांना परवानगी मिळाली नाही. त्यांनी घाबरून न जाता परवानगी मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना उत्सवही साजरा करावा. त्यांनी परवानगी मिळणार नाही म्हणून घाबरून जाऊ नये. समन्वय समिती या मंडळांच्या पाठीशी राहील, असे दहिबावकर यांनी स्पष्ट केले.
महापालिका, विसर्जन स्थळे, कृत्रिम विसर्जन स्थळे, नियंत्रण कक्ष, जीवरक्षक, मोटारबोट, प्रथमोपचार, रुग्णवाहिका, निर्माल्य कलश, विद्युत व्यवस्था, पोलीस विभाग, गणसेवक, प्रदूषण, पर्यावरण आणि आरोग्य विभागातील सुविधांत वाढ करण्यात यावी, अशा सूचना विविध विभागांशी बैठका घेऊन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
उत्सवासाठी रात्री १२ वाजेपर्यंत परवानगी द्या!
गणेशोत्सवात १८, २१, २६ व २७ या चार दिवसांत रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरसह वाद्य वाजवण्यास परवानगी देण्यात आली आहे. ही सवलत उत्सवाच्या सर्वच दिवसांत देण्यात यावी. गणेशोत्सवांमधील लोककलांमधून अनेक कलाकार घडले आहेत. त्यामुळे १२ वाजेपर्यंत वाद्य वाजवण्यास परवानगी दिल्यास अनेक कार्यक्रम केले जातील व विभागांतील मुलांना आपले कलागुण दाखवण्याची संधी उपलब्ध होईल, असा विश्वास दहिबावकर यांनी व्यक्त केला.
‘अंधेरीचा राजा’ ड्रेस कोडबाबत चर्चा करणार
‘अंधेरीचा राजा’ मंडळाने महिलांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. भारतीय पेहरावात आलेल्यांना गणेश दर्शन दिले जाणार आहे. यासाठी समन्वय समितीने या मंडळाने कशाच्या आधारे हा ड्रेस कोड लागू केला, याची माहिती घेतली जाईल व यात गैर आढल्यास त्यांना समज दिली जाईल, असे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील दृष्काळग्रस्तांसाठी १ कोटींचे टार्गेट
समन्वय समितीच्या माध्यमातून सर्व गणेशोत्सव मंडळांकडून दुष्काळग्रस्तांसाठी मदत निधी जमा करण्यात येणार आहे. या मोहिमेतून किमान १ कोटी रुपयांचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. हा सर्व निधी मुख्यमंत्र्यांकडे सोपवला जाईल, अशीही माहिती दहिबावकर यांनी दिली.
छान कल्पना… सर्व वातावरण आणि परिसर भक्तीमय होईल…