१९८३ साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते. या न शिकलेल्या शहाण्या माणसाने एक मोलाचे वाक्य त्यावेळी उच्चारले होते, ‘मुंबई महाराष्ट्रात आहे; पण मुंबईत महाराष्ट्र नाही..’ दादांच्या या म्हणण्याचा नेमका अर्थ आता ३२ वर्षानी उलगडलेला आहे आणि तो अर्थ असा आहे की ‘या मुंबईतला मराठी माणूस कुठे आहे?’ महाराष्ट्र राज्य निर्माण झाल्यानंतर ५५ वर्षात मराठी माणूस किती उंच जागेवर पोहोचला आणि किती किती व्यवसायात, उद्योगात खाली खाली घसरला, या सगळ्यांचा जमा-खर्च तपासणे फार गरजेचे झालेले आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा ५५वा वाढदिवस साजरा झाला. सरकारमार्फत झेंडावंदन झाले. १५ ऑगस्ट, २६ जानेवारी या दोन दिवशी जसे झेंडावंदन होते, तसेच १ मेच्या महाराष्ट्र दिनाचे झेंडावंदन हा आता एक उपचाराचा भाग झाला आहे. महाराष्ट्र राज्य ज्या प्रचंड चळवळीतून आणि १०६ हुतात्म्यांच्या बलिदानातून निर्माण झाले आहे, ती चळवळ ख-या अर्थाने लोकचळवळ होती. पण गेल्या ५५ वर्षात महाराष्ट्राच्या वाढदिवसाचे स्वरूप ‘लोकोत्सवाचे’ न राहता ते ‘सरकारी उत्सवा’चे स्वरूप झालेले आहे.
जे सत्तेवर आहेत त्यांनी झेंडा फडकवायचा, जे सत्तेवर आहेत त्यांनीच हुतात्मा स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करायची. संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा सत्तेशी संबंध नव्हता. उलट सलग ५ र्वष झाली ही प्रचंड चळवळ सत्तेच्या विरोधात लढलेली होती. असे असताना हजारो मराठी माणसे हुतात्मा स्मारकासमोर महाराष्ट्रदिनी का जमली नाहीत? भल्याभल्यांना या चळवळीपुढे शरण यावे लागले होते. मोरारजींच्या बंदुकाही निकामी ठरल्या होत्या. या देशात ब्रिटिशांच्या विरुद्ध झालेली लढाई त्याला तोडच नव्हती.
काँग्रेसच्या चळवळीतूनच देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महात्मा गांधीजींच्या शांततामय मार्गाने तीन मोठय़ा लढाया झाल्या आहेत. त्यातली पहिली स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची लढाई वर्षातली मराठवाडा मुक्ती आंदोलनाची. १५ ऑगस्ट १९४७ला मराठवाडय़ात तिरंगा फडकला नव्हता, तिथे निजामाचे निशाण होते. स्वातंत्र्यानंतर निजामाच्या विरोधात झालेल्या लढाईतून १७ सप्टेंबर १९४८ म्हणजे, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तेरा महिन्यांनी मराठवाडा निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला आणि तिथे त्या दिवशी तिरंगा फडकला.
स्वातंत्र्यानंतरची परकीयांविरुद्धची ही पहिली लढाई. गोवा मुक्ती आंदोलन ही स्वातंत्र्यानंतरची परकीयांच्या विरुद्धची दुसरी लढाई. पण स्वकीय सरकारच्या विरोधात सलग पाच वर्षे चाललेली शांततामय मार्गाची, सगळ्यात मोठी लढाई संयुक्त महाराष्ट्राचीच लढाई आहे, असा इतिहासाला निर्वाळा द्यावा लागला आहे.
या लढाईत धर्मभेद, जातीभेद, पक्षभेद गळून पडले आणि ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’ या एकाच भावनेने पेटून उठलेल्या मराठी जनतेने ही लढाई जिंकली. संयुक्त महाराष्ट्र झाला. ज्या मुंबईच्या कामगारांचा या लढाईत सगळ्यात मोठा सहभाग होता त्याच कामगारदिनी (१ मे) महाराष्ट्र राज्याची निर्मिती साकार झाली. कारण या लढाईत कामगारच लढले होते आणि महाराष्ट्रातून शेतकरी लढले होते.
ज्या शेतक-यांनी या लढाईत प्रचंड मोठी ताकद उभी केली, त्या शेतक-यांचे आणि कामगारांचे मशाल हाती घेतलेले स्मारकही त्यामुळेच मुंबईत उभे राहिले. कारण या लढाईत शेतकरी आणि कामगार हेच महत्त्वाचे घटक होते.
आज ५५ वर्षे झाल्यानंतर ज्या शेतक-यांनी आणि कामगारांनी सत्याग्रह करून, लाठय़ा खाऊन, रक्त सांडून १०६ जणांनी प्राणार्पण करून हे महाराष्ट्र राज्य मिळवून दिले तो शेतकरी आणि तो कामगार आणि त्याचवेळी या राज्यातला मराठी माणूस महाराष्ट्रात नेमका कुठे आहे? मुंबई महाराष्ट्रातल्या ज्या कामगारांनी ही लढाई लढवली तो कामगार गेल्या ५० वर्षात उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेला आहे.
ज्या गिरणगावच्या ताकदीवर ही लढाई लढली गेली तो गिरणगाव उद्ध्वस्त करून टाकण्यात आलेला आहे, गिरण्यांच्या जमिनी उद्ध्वस्त झालेल्या आहेत. तिथे मॉल आणि टॉवर उभे राहिले. त्याची मालकी कुणाकडे गेली? लढले कोण? हुतात्मा झाले कोण? आणि राज्य निर्माण झाल्यावर गब्बर झाले कोण? याचा हिशोब आता ५५ वर्षानी करण्याची वेळ नक्की आली आहे.
मुंबई, पुण्यात, ठाण्यात, नागपूर, सोलापूरमध्ये.. जिथे जिथे कामगार होता, तो कामगार उद्ध्वस्त झाला आहे. त्याचा रोजगार हिरावून घेण्यात आलेला आहे आणि दुसरीकडे चळवळीत लढलेला शेतकरीही उद्ध्वस्त झाला आहे. राज्य निर्माण करण्यासाठी जे लढले आणि ज्यांनी राज्य निर्माण केले त्यांना मातीत घातले गेले आणि ज्यांनी राज्य निर्माण करायला विरोध केला होता ते ५० वर्षात करोडो पटीने गब्बर झाले आहेत. शोलेमधल्या गब्बरचे बाप शोभतील एवढे गब्बर झालेले लोक मुंबई-महाराष्ट्रात वावरतायत आणि जे लढले ते कामगार आयुष्यातून उठले.
शेतकरी कर्जबाजारीपणामुळे मेले. ज्यांनी विरोध केला होता त्यांचे धंदे आता फायद्यात आहेत. त्यातून अमाप पैसा मिळवणारे श्रीमंत झाले आहेत. त्यांनी हजारो कोटी रुपये बुडवलेले आहेत. आणि कर्ज न फेडलेला शेतकरी गळफास लावून घेत आहे. ५५ वर्षातल्या महाराष्ट्राचे हे चित्र आहे.
संयुक्त महाराष्ट्राला विरोध करण्यात जे आघाडीवर होते त्यात एक मराठी नेताही होता, त्याचे नाव स. का. पाटील. हे मुंबई शहर ‘कॉस्मोपॉलिटीन’ आहे, असे ते ठामपणे सांगायचे. त्यावेळी आचार्य अत्रे यांनी स. का. पाटलांच्या उद्दाम विधानावर अतिशय तिखट अशी प्रतिक्रिया देताना, ‘तुझा बाप कॉस्मोपॉलिटीन’ अशी प्रतिक्रिया दिली होती. परंतु ५५ वर्षाच्या घटनेचा जमा-खर्च उलगडून पाहताना ज्या मराठी माणसांनी राज्य निर्माण केलेले आहे तो मराठी माणूस मुंबईत अल्पमतात चाललेला आहे आणि ही मुंबई खरोखर ‘कॉस्मोपॉलिटीन’ होत चालली आहे.
मराठी माणूस आपल्या हातात व्यापार-उदीम ठेवू शकलेला नाही. ज्यांनी मराठी माणसाचा कैवार घेऊन राजकारण केले, सत्ता मिळवली आणि आजही अफजल खानाच्या तंबूत शिरून सत्ता भोगत आहेत, त्यांनाही मराठी माणसाचे कल्याण करता आलेले नाही. त्यांच्या हातातील सत्तेच्या कृपेने (सरकार असो किंवा महापालिका) आणि मदतीने गब्बर झालेली माणसं दुसरीच आहेत. ५५ वर्षात मराठी हॉटेल्स बंद होत गेली आहेत.
विरकर बंद, तांबे बंद झाले आणि जे बंद झाले नाहीत त्यांना आपले व्यवसाय दुस-याला चालवायला द्यावे लागले आहेत. गरवारे, किलरेस्कर, चौगुले या नामवंत उद्योगपतींचा जलवा संपत आला आणि अंबानी, अदानी यांचे महत्त्व वाढले. मराठी उद्योजकाची प्रतिष्ठा कमी झाली.
वित्तीय आघाडीवर मराठी माणसाचे वर्चस्व संपले. कोटी कोटी रुपये घालून उद्योगधंदे सुरू करणारे कोण आहेत. त्यांची यादी पाहिली तर, त्यात मराठी माणसे दिसेनाशी झाली आहेत. ‘८० टक्के नोक-या मराठी माणसाला मिळाल्या पाहिजेत’ अशा घोषणा देणा-यांनी, ‘८० टक्के उद्योग मराठी माणसाच्या हातात राहिलाच पाहिजे’, अशी घोषणा कधीही दिली नाही.
कारपेंटरीचा किंवा ऑटोमोबाईलचा धंदा करणारा आमचा शीख बांधव, हॉटेल व्यवसाय करणारा आमचा उडिपी बांधव या समाजांनी हे व्यवसाय आमच्या हातात राहिले पाहिजेत यासाठी कधी मोर्चा काढला नाही. व्यवसाय बरोबर आपल्या हातात ठेवले, मोठे केले आणि त्यात फायदे मिळवून ते गब्बर झाले. मराठी माणूस नोकरीसाठी धडपडत राहिला. उद्योग हातात घेण्यासाठी त्यांनी पावले टाकली नाहीत.
राज्याला ५५ वर्ष झाल्यानंतरही महाराष्ट्र गीत गाताना ‘दारिद्रय़ाच्या उन्हानं झिजला, निधळाच्या घामाने भिजला’ हे गीत गाण्यात आम्हाला फार मोठी फुशारकी वाटत आहे. ५५ वर्षे आम्ही दारिद्रय़ाचीच सोबत केली आणि हे गीत गाणारे दरिद्रीच राहिले आणि गीत ऐकणारे गब्बर झाले.
मुंबईचे करोडो रुपयांचे मॉल कुणाचे आहेत? त्यात एक तरी मराठी माणूस आणि उद्योगपती आहेत का? त्यांना लागणा-या जमिनी मंजूर करून घेणारे कोण आहेत? ही साखळी कुठपर्यंत पोहोचलेली आहे हे सगळे महाराष्ट्राला कळले पाहिजे. महाराष्ट्र राज्याचे वय वाढत चालले आणि त्या प्रत्येक वर्षाबरोबर मराठी माणसांचे आर्थिक खुजेपणही वाढत चालले आहे.
मराठी माणूस उद्योगात का प्रभावी होत नाही, याची चर्चा आम्ही कधीच केली नाही, आमचा जास्तीत जास्त मोठा उद्योग म्हणजे शिववडा-पाव. याच्यापुढे आमची मजल गेली नाही. नफा कमवण्यात मराठी माणूस पाप मानतो आणि बिगर मराठी माणसे नफा कमविण्यात धंद्याचे कौशल्य समजतात.
‘नफेखोर’ हा शब्द मराठी माणसानेच तयार केला आणि तो शिवीसारखा वापरला. मराठी समाज सोडला तर बाकीच्या समाजाच्या सभा, संमेलनं होताहेत, असं दिसत नाही. ते समाज आपला हिसाबकिताब लिहीत असतात. नफा-नुकसान तोलत असतात. तेव्हा आमचा मराठी माणूस व्याख्यानाला गर्दी करत असतो.
गेल्या ५५ वर्षात मराठी माणूस कुठे चुकत आहे, याची चर्चा नाही कोणी केली, नाही कुणाला करावीशी वाटली. ‘जय महाराष्ट्र’ म्हणताना अभिमान वाटतोच; पण महाराष्ट्राचा जयजयकार करताना मराठी माणसाचा जयजयकार होत आहे का? याचा विचार मराठीचा कैवार घेणा-यांनीही केलेला नाही.
या राज्याच्या निर्मितीसाठी लढलेला कामगार आणि शेतकरी यांची ५० वर्षात दैना का झाली? कुणी केली, कशी केली या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची गरज कुणालाही वाटत नाही.
ज्यांनी राज्य निर्माण केले त्यांनाच गाडले गेले आणि ज्यांनी राज्याला विरोध केला होता ते आता टॉवरमध्ये सर्वोच्चपदी आहेत, मॉलमध्ये सर्वोच्चपदी आहेत आणि हवेल्यांमध्येही सर्वोच्चपदी आहेत. गाडला गेला कामगार आणि गाडला गेला शेतकरी. ५५ वर्षानंतर महाराष्ट्राचा जयजयकार करताना ‘दारिद्रय़ाच्या उन्हात भिजला’ या उन्हातून महाराष्ट्र आर्थिक समृद्धीच्या सावलीत येणार आहे की नाही?
जे इतिहास वाचतात ते इतिहास घडवत नाहीत.जे इतिहास वाचत नाहीत तेच इतिहास घडवतात.ज्या दिवशी बाबा साहेब आंबेड करांनी मनु स्मृती जाळली त्याच दिवशी मराठी माणूस संपला.माणसाच्या शरीरातून आत्मा निघून गेला कि राहतो निर्जीव शरीर.महाराष्ट्रात मराठी माणसांचे निर्जीव शरीर आहे.त्यात आत्मा नाही.कारण मराठी माणूस इतिहास वाचायला शिकला आहे.इतिहास घडवायला शिकला नाही.धनाची निर्मिती श्रमातून होते श्रम शेतात करायचे असतात.शाळेत जाऊन पुस्तक वाचून धनाची निर्मिती होत नाही.हेच आम्हाला कोणी शिकवले नाही.