‘होणार सून मी या घरची..’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला, नुसता घरातच नाही तर कित्येकांच्या मनात जागा मिळवणारा ‘श्री’ ऊर्फ शशांक केतकर हा केवळ कलाकारच नाही तर तो एक लेखक, कवी आणि राष्ट्रीय स्तरावरचा स्वीमरही आहे. इजिनीअर असलेल्या शशांकने ऑस्ट्रेलियात जाऊन एमईएम (मास्टर ऑफ इंजिनीअरिंग मॅनेजमेंट)देखील केलं आहे. अशा या चतुरस्र अभिनेत्याशी मारलेल्या गप्पा –शैक्षणिक बाजू भक्कम असताना अभिनयासारख्या अनिश्चित क्षेत्रात येण्याचं धाडस कसं केलंस?
>मला कलाक्षेत्राची लहानपणापासूनच पॅशन होती. लहानपणापासूनच कविता किंवा लिखाण करायचो, पण ते केवळ माझ्यापुरताच मर्यादित होतं. पण कलाक्षेत्रात काहीतरी वेगळं करायचं, असं मला नेहमीच वाटत होतं. ऑस्ट्रेलियात मास्टर्स करण्यासाठी गेलो असता तिथल्या मराठी मंडळाचा म्हणा किंवा तिथल्या रेडिओचा म्हणा माझ्या मनावर संस्कार झाला. मुळात परदेशात गेलो म्हणजे तिथेच राहायचं असं अजिबात ठरवलं नव्हतं. पहिल्यापासूनच भारतात यायचं, हे मनाशी पक्क ठरलं होतं. तिथे शिकत असताना आपण अभिनयाच्या क्षेत्रातच करिअर करायचं, हा विचार पक्का झाला. तसं परतल्यावर आई-वडिलांना सांगितलं. त्यांनी मला सहा महिन्यांचा वेळ दिला. आई-वडिलांची परवानगी मिळाल्यावर पुण्याच्या सुदर्शन रंगमंचावर जाऊन थडकलो. तिथे प्रमोद काळे सचिन कुंडलकर लिखित ‘पूर्णविराम’ हे नाटक मिळालं. तिथेच ख-या अर्थाने अभिनयाच्या करिअरला सुरुवात झाली. या नाटकाचे २५ प्रयोग केले. नंतर बालाजी टेलिफिल्म नवीन चेह-याच्या शोधात आहे. तिथे जाऊन ऑडिशन दिली. ती ऑडिशन टेप देवस्व प्रॉडक्शन हाउसपर्यंत पोहोचली आणि त्यांची ‘कालाय तस्मै नम:’ ही मालिका मिळाली. त्यात विक्रम गोखलेंचा नातू आणि मनोज कोल्हटकर (होणार.. मधील जान्हवीचे वडील) यांचा मुलगा अशी भूमिका मला मिळाली. या कलाकारांसोबत काम करताना कुठेही मनावर दडपण आलं नाही. प्रत्येक कलाकाराने प्रत्येक ठिकाणी सांभाळूनच घेतलं. अशा मोठमोठया कलाकारांसोबत काम करताना आत्मविश्वास दुणावला.
अभिनयाची आवड असताना अभिनयाचं तंत्रशुद्ध शिक्षण घ्यावंसं नाही का वाटलं?
> या क्षेत्रात आलो तेव्हा केवळ प्रोफेशन म्हणून हे क्षेत्रं निवडावं असं ठरवलं नव्हतं. केवळ आवड म्हणून या क्षेत्रात आलो. अभिनय शिकावा लागतो, असं मुळीच वाटत नाही. माझ्या मते, प्रत्यक्ष कामातून खूप गोष्टी शिकता येतात. चांगल्या माणसांसोबत काम करत गेलं की त्याचा नक्कीच फायदा होतो. त्यांच्याकडून, त्यांच्या अभिनयाचं निरीक्षण केलं की त्या निरीक्षणातून ब-याचशा गोष्टी शिकायला मिळतात. एनएसडीसारख्या संस्थेमध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक कामाचा खूप अनुभव मिळत असला तरीदेखील केवळ व्यावसायिक एके व्यावसायिकच स्तरावरच काम करावं लागतं. त्याचा एक प्रकारचा साचा तयार होतो. त्या साच्यात मला अडकायचं नव्हतं. मी स्वत:ला कलावंत समजतो, लोकांची करमणूक करणं एवढंच काम आहे, असं मी समजतो.
अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत ‘होणार सून मी.. ’ पुरस्कारांच्या स्पर्धेत उतरली. या स्पर्धेचं दडपण कधी मनावर आलं का?
> कधीच नाही. पुरस्कारांसाठी काम करावं असं कधीच वाटलं नाही. शरद पोंक्षे यांच्यासारखा कलाकार १९८३ ते २०१३ इतकी वर्ष या अभिनय क्षेत्रात आहे. त्यांनीदेखील कित्येक प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. तरीदेखील त्यांना आतापर्यंत केवळ एकच पुरस्कार मिळाला आहे. पण त्यांनीदेखील कधीच पुरस्काराचा विचार केला नाही. एवढय़ा मोठय़ा कलाकाराला एकच पुरस्कार मिळू शकतो, तर त्यांच्या तुलनेत आपण कुठेच नाही. असे आदर्श सदैव डोळ्यांसमोर होते. त्यामुळे केवळ पुरस्कारासाठी काम करावं, असं वाटलंच नाही. पुरस्कार मिळणं म्हणजे खरं तर एक प्रकारचा मान असतो, मानचिन्ह असतं. ही मानचिन्हं शोकेसमध्ये ठेवण्यासाठी नेहमीच चांगली वाटतात. पण माझ्या दृष्टीने प्रेक्षकांची पसंती महत्त्वाची असते. ती आपली ओळख असते. मग ती कुठलीही भूमिका असो. प्रेक्षकांची पसंती हीच आपल्या कामाची पावती असते. अशी पावती घ्यायला नेहमीच आवडेल.
तुझा श्री फारच सकारात्मक आहे. तू कधी नकारात्मक भूमिका केली आहेस का?
> ‘स्वप्नांच्या पलीकडले’ या मालिकेत अनिकेत गायधनी नावाच्या पात्राची भूमिका केली होती. ही भूमिका नकारात्मक असली तरी दिसायला चांगला गोंडस चेह-याचा हा अनिकेत वरकरणी अतिशय सभ्य आणि चांगल्या घरातला होता. मात्र त्या व्यक्तिरेखेला काळी किनार होती. तो वसुलीसाठी येतो. ही भूमिका करायलाही मजा आली. त्यामुळे सगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतील. काहीतरी वेगळं करण्याच्या नादात भलतंच काहीतरी करावं आणि प्रेक्षकांची नापसंती मिळवावी, सध्या चॉकलेट हिरो अशी इमेज तयार झाली ओहच. ही इमेज कायमस्वरूपी ठेवायला नक्कीच आवडेल.
तुझ्यासाठी ड्रीम रोल कुठला असेल?
> अमुक एखादा रोल करायला मिळायला हवा, असं कधीच वाटलं नाही किंवा ठरवलं नाही. अभिनयाच्या क्षेत्रात यायचं, हे मुळातच एक स्वप्न होतं. प्रेक्षकांच्या पसंतीस पडणं, चांगलं काम करणं आणि मुळातच स्वत:ला रुचेल अशी भूमिका करणं आवडेल. मग ती भूमिका कोणतीही असो. ती मनाला पटली, आवडली पाहिजे. त्यामुळे प्रत्येक रोल हा माझ्यासाठी ड्रीम रोलच असेल.
हिंदी मालिका किंवा चित्रपटाकडे वळण्याचा विचार आहे का?
> नक्कीच आहे. केवळ मराठीच नव्हे तर हिंदीतही मालिका किंवा चित्रपट असं सगळं काही करायचा विचार आहे. प्रत्येक ठिकाणी स्वत:ला आजमावून पाहायचं आहे. संधी मिळाली तर नक्कीच करेन.
भविष्यात जलतरणपटू, लेखक, कवी किंवा अभिनेता यापैकी कोणती ओळख व्हावी असं वाटतं?
> इंजिनीअरिंग करत असतानाच स्वीमिंग सोडलं. लहानपणापासूनच लिखाण करत असलो तरी भविष्यात लेखक म्हणून नावारूपाला येईल, असं अजिबात वाटत नाही. अभिनय करणं ही माझी आवड आहे, पॅशन आहे. त्यामुळे भविष्यातही एक चांगला अभिनेता म्हणून नावारूपाला येणं यालाच प्रथम प्राधान्य देईन.
Honar soon mi ya gharachi maliket sakarlela “Shree” apratim. Evadha positive,samanjas Mulaga,pati pratyakshat durmil aslyamule sarvanach havahavasa vatato. Preshkak Janvi pekashahi “Shree” chya premat padale aahet. Go ahed, wish you best of luck