ही वेळ येईल असे कधी वाटलेच नव्हते. जणू सचिन तेंडुलकर अनादि अनंत काळ भारतासाठी खेळणार होता. २४ वर्षापूर्वी कराचीतील काळवंडलेल्या नोव्हेंबरच्या दुपारी ही वामनमूर्ती खेळायला उतरली. त्यानंतर…
मुंबई- ही वेळ येईल असे कधी वाटलेच नव्हते. जणू सचिन तेंडुलकर अनादि अनंत काळ भारतासाठी खेळणार होता. २४ वर्षापूर्वी कराचीतील काळवंडलेल्या नोव्हेंबरच्या दुपारी ही वामनमूर्ती खेळायला उतरली. त्यानंतर सुरू झालेला त्याचा प्रवास कधी थांबेल असे त्याच्या अनंतकोटी चाहत्यांना वाटलेच नव्हते. २४ वर्षे एखादे मशिनही बंद पडून मोडकळीत निघते. कम्प्युटर किंवा स्मार्टफोनच्या सहा पिढया जन्माला येऊन नामशेष होतात. सचिन इतकी वर्षे खेळत राहिला ते केवळ क्रिकेटवरील प्रेमापायी. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, चाहत्यांवरील प्रेमापोटी!
शरीराचा खेळाशी संबंधित जवळपास प्रत्येक अवयव खिळखिळा होऊनही, चाळीशी ओलांडूनही खेळणा-या सचिनची दोनच टॉनिक होती.. क्रिकेट आणि चाहते. पण एकीकडे तो त्याची दोनशेवी आणि शेवटची कसोटी खेळून क्रिकेटचा निरोप घेतोय म्हणून चाहते हळहळ व्यक्त करतायेत. त्याचवेळी या दोन परमप्रिय घटकांपासून अलविदा घेताना सचिनला किती वेदना होत असतील, याची कल्पनाही करवत नाही. मुंबईतील त्याच्या लाडक्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारपासून वेस्ट इंडिजविरुद्ध सचिनची बहुचर्चित (पण बहुप्रतीक्षित नक्कीच नाही!) शेवटची कसोटी सुरू होत आहे. कराचीतील त्या नोव्हेंबरच्या दिवसापेक्षा सध्या मुंबईत सूर्यप्रकाश भरपूर असला, तरी मनातील काळोख मात्र दूर करणे जड जातेय.
अर्थात सचिनच्या मनात यावेळी किंवा प्रत्यक्ष मैदानावर गेल्यानंतर या भावनांना थारा मिळणार नाही. त्याच्या गुणवत्तेमध्ये, निश्चयामध्ये, जिद्दीमध्ये कधीही भावनेने खोडा घातला नव्हता. दर वेळी ‘एकच सामना समोर आणिक पायतळी मैदान’ हेच त्याचे लक्ष्य राहिले. या निश्चयापुढे जशी कोटय़वधींच्या अक्षय अपेक्षांच्या दडपणाची मातब्बरी नव्हती, त्याचबरोबर भारतासारख्या देशात नित्यनेमाने होणा-या टीका-कुचाळक्यांचीही त्याने फिकीर केली नाही. त्यामुळे शतक लवकर पूर्ण होत नाही, शतकांचे शतक पूर्ण होत नाही, किती सामने अजून खेळणार, अजून किती खेळत राहणार वगैरे प्रश्नांची किंवा शंकांची उत्तरे देण्याच्या फंदात सचिन पडला नाही. याच अॅप्रोचमुळे कसोटी क्रिकेटमध्ये ५१ शतके, ६७ अर्धशतके, १५,८४७ धावा किंवा एकदिवसीय क्रिकेटमध्ये ४९ शतके, ९६ अर्धशतके आणि १८,४२६ धावा त्याला जमवता आल्या. त्याच्या बरोबरीने २०० आंतरराष्ट्रीय विकेट्स आणि २५५ झेलांचाही समावेश करता येऊ शकेल. त्यांच्या जोडीला असंख्य मॅन ऑफ दि मॅच पुरस्कार, असंख्य भागीदा-या.. त्याच्यावर किती शब्द लिहिले गेले याची तर गणतीच होऊ शकत नाही.
वानखेडे स्टेडियम सचिनसाठी स्पेशल आहे. याच मैदानावर दोन एप्रिल २०११ रोजी भारताने दुस-यांदा वर्ल्डकप जिंकला आणि सचिनसाठी तो कारकिर्दीतला परमोच्च क्षण ठरला. कारण त्याच्या झळाळत्या कारकिर्दीत तेवढी एकच ट्रॉफी मिळवायची बाकी राहिली होती. सामन्याच्या आदल्या दिवशी म्हणजे बुधवारी त्याने नेहमीप्रमाणे कसून सराव केला. ते केल्यानंतर मैदानाची काळजी घेणारे क्युरेटर आणि ग्राउंडस्टाफ, तसेच सचिनच्या या प्रवासात सतत त्याची साथ करणारे पत्रकार यांचे ऋण मान्य करण्यास तो विसरला नाही. सचिनने त्याच्या अखेरच्या कसोटीत एखादे शतक झळकवावे अशी काहींची अपेक्षा नक्कीच राहील. पण अशी अपेक्षा धरणे त्याच्यासाठी अन्यायकारक ठरेल. जणू सचिनने प्रत्येक वेळी खेळायचे म्हणजे शतक ठोकायचे! या कसोटीतला शेवटचा चेंडू टाकला गेल्यानंतर जी पोकळी
निर्माण होईल त्याबाबत आता विचार करण्याची हिंमत वा इच्छा होत नाही. तूर्तास सचिनच्या बरोबरीने ही कसोटी सेलिब्रेट करणे इतकेच आपल्या हाती आहे.
Sachin we miss u…