मोदी सरकारच्या मनात प्रत्येक विषयात काळेबेरे ठासून भरलेले आहे. मोदी सरकार जी जी गोष्ट करेल, ती ती सरळ असणार नाही. त्या प्रत्येक निर्णयात दाखवायची गोष्ट एक आणि त्यामागचा उद्देश दुसराच, हे आता पक्के समजून चालायला हवे. मोदींचा कोणताही निर्णय या देशातल्या गरीब माणसाच्या भल्यासाठी अजिबात घेतला जात नाही.
मोदींच्या एकूण राजकारणाचा पाया फसवणूक हा आहे. काळ्या पैशाच्या घोषणेमध्ये त्याचा प्रत्यय आला. निवडणुकीच्या वेळी हेच मोदी हातवारे करून जगाला सांगत होते की, करोडो रुपयांचा काळा पैसा परदेशात दडलेला आहे. आम्ही सत्तेवर आलो रे आलो की, हा पैसा भारतात आणू आणि देशातल्या प्रत्येक नागरिकाच्या खात्यात १५ लाख रुपये टाकता येतील, असे त्या पैशाचे वाटप करू. मोदींच्या या भाषणांना निवडणूक आयोगाने आक्षेप घेऊन त्यांची उमेदवारी रद्द करायला हवी होती. कारण ही अशी भाषणे म्हणजे चक्क प्रलोभने. या अशा घोषणांनी मोदींनी जनतेला उल्लू बनवले. जनताही फसली. मोदींच्या मागे गेली. मोदी सरकारात आले. आता म्हणतात, ‘काळा पैसा आणणे शक्य होणार नाही. कोणाचीही नावे सांगता येणार नाहीत.’ देशातल्या मतदारांची गेल्या ६० वर्षात अशी फसवणूक कधी कोणीच केली नसेल. मोदींनी ती केली; पण त्या बद्दल ना कोणी चॅनेलवाले बोलत. ना पेपरवाले लिहित. सगळे चॅनेलवाली मंडळी पद्धतशीरपणे मोदी नामाचा गजर करण्यात मग्न आहेत.
आता लोकसभेचे अधिवेशन सुरू आहे आणि मोदी मॉरिशसला निघून गेले. मोदींच्या सरकारने आणखी एक निर्णय लोकसभेत जाहीर केला तो म्हणजे देशातल्या ६५ कंपन्या बंद करण्याचा. त्यामध्ये ‘एअर इंडिया’ आहे. ‘एमटीएनएल’ आहे. ‘एचएमटी’ आहे. या बडय़ा बडय़ा चार-पाच कंपन्या सोडल्या तर बाकी कंपन्यांची नावे सांगायला मोदी तयार नाहीत. माहितीच्या अधिकाराखाली त्यांना ही नावे द्यावीच लागतील. किती दिवस लबाडी कराल आणि किती दिवस फसवाल? या कंपन्या बंद करण्याचे कारण काय? ते कारण आहे की, या कंपन्या तोटय़ात गेल्या. तोट्यात का गेल्या? एअर इंडिया कंपनीचे उदाहरण घेतले तर १९३२ सालापासून सुरू झालेली ही सेवा गेल्या काही वर्षात पद्धतशीरपणे तोटय़ात घालण्यात आलेली आहे. विजय मल्ल्या नावाच्या एका बदमाश माणसाच्या किंगफिशरला सगळ्या सवलती दिल्या गेल्या. त्यांनी सरकारी बँकांचे हजारो कोटी रुपये बुडवले. एअर इंडियाच्या सगळ्या सुविधा घेतल्या. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सगळ्या सवलती मिळवल्या. प्रत्येक कंपनीला विमान उतरवल्यावर आणि उड्डाण करताना नागरी हवाई खात्याकडे रक्कम भरावी लागते. मल्ल्या कोणाचा दोस्त होता, हे जगाला माहिती आहे. त्याने सरकारचे करोडो रुपये बुडवले. एअर इंडियाचे पद्धतशीरपणे खच्चीकरण केले. सरकारचे करोडो रुपये बुडवून किंगफिशर कंपनी बंद पडली; पण राजरोसपणे मल्ल्याचे मद्यपान सुरूच आहे. ‘आयपीएल’च्या सामन्यात मल्ल्याचा संघ उतरलेला असतोच. जिथे मल्ल्याच्या संघात काय काय असते, याचे जाहीर प्रदर्शन होते, त्या मल्ल्यामुळेच एअर इंडिया बुडाली. त्यांनी मुंबईचे ‘ए’ टर्मिनल राजरोसपणे वापरले, एरोब्रिज वापरले. एअर इंडियाच्या प्रवासी वाहतुकीच्या गाडय़ा वापरल्या. ही सवलत मल्ल्याला दिली कोणी? आणि त्यांनी कंपनी बुडवली आणि एअर इंडियाला डुबवले. एअर इंडियाची सेवा उत्तम असताना एअर इंडिया नुकसानीत आणि काल सुरू झालेली ‘गो’ कंपनी फायद्यात. नस्ली वाडिया यांची ती कंपनी. ‘स्पाय जेट’ करुणानिधीच्या मुलाची कंपनी. ‘इंडिगो’ अशीच कुणा भाटियाची कंपनी. या सगळ्या कंपन्या फायद्यात निघतात आणि एअर इंडियाच कशी तोटय़ात जाते आणि का तोटय़ात जाते? जर पूर्वी तोटय़ात जात नव्हती तर आता तोटय़ात का जाते? जी गोष्ट एअर इंडियाची तीच ‘एमटीएनएल’ची आणि तीच रडकथा ‘एचएमटी’ची म्हणजे हिंदुस्थान मशीन टुल्सची. या सगळ्या कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातल्या कंपन्या आहेत. रिचर्डसन क्रुडास आणि भेल (भारत हेवी इलेक्ट्रीकल) या सगळ्या कंपन्या भारत सरकारच्या अधिपत्याखालच्या कंपन्या आहेत आणि त्यांच्यासोबत ज्या ६० कंपन्यांची नावे सांगायला सरकार तयार नाही, ती नावे सरकारला आज ना उद्या सांगावीच लागतील. या सरकारच्या विरुद्ध ‘लोकसभा एकही दिवस चालू देणार नाही,’ एवढा रौद्रावतार विरोधी पक्षाने दाखवायला सुरुवात केली की, अवजड उद्योग राज्यमंत्री अनंत गीते यांच्या तोंडून गाणे गायला सुरुवात होईल. किती दिवस नावे दडवून ठेवणार आणि हे सगळे लाड कोणाकरिता चाललेले आहेत? सरकारी कंपन्या बंद करायच्या आणि त्या कंपन्या मूळ अॅसेटसह खाजगी उद्योगपतींच्या घशात घालायच्या आणि हा व्यवहार, कोणी कितीही ओरडून सांगितला तरी फार मोठा अर्थपूर्ण व्यवहार राहील, हे सगळी दुनिया जाणते. सरकारी कंपनी बंद करून ती जेव्हा खाजगी उद्योगपतीच्या घशात घातली जाते तेव्हा त्या उद्योगपतीकडून तेवढीच परतफेड होत असते. पण या ज्या ६५ कंपन्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, यात मोदी सरकारची नियत साफ नाही. एवढेच नव्हे तर यात दोनशे टक्के काळेबेरे आहे. एअर इंडिया बंद करणे म्हणजे खाजगी कंपन्यांना पूर्ण मुक्त रान देणे. आता नव्याने ‘विस्तारा’ विमान कंपनी सुरू झालेली आहे. मुंबईचा नवीन विमानतळ त्यांनी अडवलेला आहे. मुंबईचे ‘ए’ टर्मिनल मल्ल्याच्याच मालकीचे होते, अशा थाटात किंगफिशर कंपनी ते वापरत होती; पण मल्ल्याची कोणाशी पार्टनरशीप होती, हे सगळ्या जगाला माहिती आहे. आता या सगळ्या कंपन्या बंद करायला मोदी सरकार निघालेले आहे.
या कंपन्या बंद झाल्यानंतर हजारो कामगारांचा रोजगार बुडणार आहे. देशातल्या प्रत्येक मोठय़ा शहरात कामगाराला उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. या ६५ कंपन्या बंद झाल्यानंतर सरकार त्यांना कसलीही भरपाई न देता त्या कामगारांची कत्तल करून त्यांना देशोधडीला लावणार आहे. तिकडे भूमी अधिग्रहण मंजूर करून मोदी यांनी ते कोणत्या वर्गाचे प्रतिनिधीत्व करतात, हे दाखवून दिलेले आहे. आता ६५ कंपन्या बंद करून हे सरकार कामगार विरोधी आहे आणि खाजगी उद्योगपतींचे बटीक आहे, हेही जगासमोर आलेले आहे. शिशुपालाचे शंभर अपराध भरेपर्यंत अत्याचार सहन करण्यात आले. शंभर अपराध भरल्यानंतर शिशुपालाला कोणीही वाचवू शकले नाही. मोदी आणि त्यांच्या सरकारचे दहा महिन्यांतच शंभर अपराध पूर्ण व्हायची वेळ आलेली आहे आणि मग जेव्हा केव्हा लोकांच्या हातात मोदींचा हिशोब चुकता करण्याचा क्षण येईल त्यावेळेला परमेश्वरही मोदींना वाचवू शकणार नाही.
[EPSB]
लबाडांचे सरकार!
देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र मंत्रिमंडळातले चार प्रमुख मंत्री आहेत. बाकी जेवढे आहेत ते सगळे दुय्यम, तिय्यम आहेत. या चौघांनी आपापल्या आरशात आपापला चेहरा पाहावा. त्यानंतर त्यांनी आठवण करावी ती त्यांच्या सरकारात सत्ताधारी बाकावर बसलेल्या माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची आणि आमदार गुलाबराव पाटील यांची.
[/EPSB]
इअर इंडिया, महानगर टेलिफोन , एच एम या कंपन्या बंद करतात हे ऐकून नवल वाटले .प्रत्येकाचे चंगले व वाईट
गुण असतातच मग शिशुपाल असो व कंसमामा यांच्यापेक्षा राजकारणी फारच वेगळे ओतू जाणारी पापे परदेशातल्या
हंडीत भरली जातात हासुद्धा कलियुगातला चमत्कारच म्हणावा लागेल