काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि अन्य काँग्रेस नेत्यांनी मनमोहन सिंग यांची भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठिशी उभा असल्याचा संदेश दिला.
नवी दिल्ली- कोळसा खाण वाटप घोटाळा प्रकरणात माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सीबीआयच्या विशेष न्यायालयाने आरोपी म्हणून समन्स बजावल्यानंतर त्यांच्या बचावासाठी संपूर्ण कॉँग्रेस पक्ष गुरुवारी रस्त्यावर उतरला. कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पदयात्रा करून डॉ. मनमोहन सिंग यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन पक्ष त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असल्याची ग्वाही दिली.
२००५मध्ये कोळसा खाण वाटप गरव्यवहारप्रकरणी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. परख यांना मंगळवारी आरोपी या नात्याने सीबीआयच्या विशेष न्यायालयाने समन्स बजावले. ‘तालबिरा-२’ या कोळसा खाण वाटपाप्रकरणी हे समन्स बजावले आहे.
कॉँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली कॉँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक गुरुवारी झाली. संपूर्ण पक्ष आपल्या पाठिशी आहे हा संदेश देण्यासाठी २४ अकबर रोडवरील काँग्रेस मुख्यालयापासून मोतीलाल नेहरू मार्गावरील मनमोहन सिंग यांच्या निवासस्थानापर्यंत काँग्रेस नेत्यांनी पदयात्रा काढली होती. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेत पी. चिदंबरम, कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते ए. के. अॅँटनी, अजय माकन, मल्लिकार्जुन खरगे, रेणुका चौधरी, मणिशंकर अय्यर, आनंद शर्मा, अंबिका सोनी, वीरप्पा मोईली, के. रेहमान खान हे वरिष्ठ नेते सहभागी झाले.
सरकार आणि भाजपा गप्प का?
हिंदाल्को कंपनीला तालबिरा कोळसा खाण वाटपात कोणतेही गैरकृत्य घडलेले नाही, असे सीबीआयने न्यायालयात स्पष्ट केले आहे. मात्र, तरीही मोदी सरकार याबाबत मौन बाळगून आहे, असा आरोप कॉँग्रेस नेत्यांनी केला. माजी पंतप्रधान सिंग हे देशातच नव्हे तर परदेशातही एकात्मता व प्रामाणिक गृहस्थ म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यामागे ठामपणे उभे असून सर्व कायदेशीर लढाई लढली जाईल. या प्रकरणातून ते निश्चितपणे निर्दोष सुटतील, असेही गांधी यांनी सांगितले.
कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा म्हणाले की, सिंग हे संशयाच्या धुक्यातून निश्चितपणे बाहेर पडतील. माजी पंतप्रधान हे पारदर्शक व प्रामाणिक गृहस्थ आहेत. त्यांना भारतात व परदेशातही मान आहे. त्यांच्यासमोर जे तथ्य मांडण्यात आले. त्यावर त्यांनी घेतलेले निर्णय हे पारदर्शक, योग्य होते.
कॉँग्रेसचे सर्व नेते, सर्व १०० खासदार व कॉँग्रेस वर्किंग कमिटीचे सर्व पदाधिकारी त्यांच्या मागे ठामपणे उभे आहेत. सार्वजनिक जीवनात प्रामाणिक व उच्च नैतिकतेचे दर्शन घडवणारे सिंग हे निश्चितपणे निर्दोषपणे सुटतील, असा विश्वास वीरप्पा मोईली यांनी व्यक्त केला.
वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले की, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली कॉँग्रेसच्या नेत्यांनी सिंग यांना पाठिंबा दिला आहे. संपूर्ण पक्ष तुमच्या मागे उभा आहे. आम्ही सर्व कायदेशीर लढाई लढू. आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला, माजी कोळसा सचिव पी. सी. परख यांना ८ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणी या तिघांसह हिंदाल्कोचे वरिष्ठ अधिकारी शुभेंदू अमिताभ आणि डी. भट्टाचार्य यांनाही आरोपी केले आहे.
दरम्यान, माजी पंतप्रधान सिंग हे या प्रकरणातून पूर्णपणे निर्दोष सुटतील, असे कॉँग्रेस नेते कमलनाथ यांनी सांगितले. आम्ही न्यायालयाबाहेर लढा देणार आहोत.
डॉ. सिंग यांनी मानले पक्षाचे आभार
कोळसा गैरव्यवहारप्रकरणी कॉँग्रेस पक्ष ठामपणे त्यांच्यामागे उभा राहिल्याने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी पक्षाचे आभार मानले. ते म्हणाले की, कॉँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी व कॉँग्रेस वर्किंग समितीचे सदस्य व वरिष्ठ नेते माझ्या निवासस्थानी आले होते. त्यांनी माझ्यासाठी एकजूट दाखवली ही बाब माझा आत्मविश्वास वाढवणारी आहे.
चिदंबरम यांनी उठवली झोड
माजी पंतप्रधानांना कोळसा घोटाळाप्रकरणी समन्स बजावल्याबद्दल मोदी सरकार आणि भाजपाने मौन बाळगल्याबद्दल माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीकेची झोड उठवली आहे.
सीबीआय ही सरकारची यंत्रणा आहे. या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कोणतीही संधी नसल्याचे सीबीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. आम्ही सीबीआयच्या अहवालावर ठाम आहोत. त्यामुळे या अहवालावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी. मात्र, या प्रकरणी सरकार कोणतीही भूमिका मांडायला तयार नाही, असे चिदंबरम यांनी स्पष्ट केले.
न्यायालयाच्या आदेशाने व्यथित
सीबीआय न्यायालयाने दिलेल्या आदेशाने आपण व्यथित झालो आहोत. मात्र, या खटल्यातून सत्य नक्कीच बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी दिली. या प्रकरणाची कायदेशीर छाननी व्हावी, अशी मागणी आपण कायम केलेली होती. या खटल्यामुळे माझी बाजू मांडायची संधी मला निश्चितपणे मिळेल. देशातील न्यायव्यवस्थेवर माझा विश्वास आहे. माझे निर्दोषत्व नक्कीच सिद्ध होईल, असेही सिंग म्हणाले.
काही वर्षा नंतर नरेंद्र मोदी असेच म्हणतील तेव्हा ऐर इंडिया विक्री घोटाळा झालेला असेल.जय श्री राम