निवळी-माळघाट मार्गासाठी उद्योगमंत्री राणे यांना निवेदन देण्यात आले.
देवरूख- संगमेश्वर तालुक्यातून थेट पाटणकडे जाण्यासाठी निवळी-माळघाट फोडण्याचे काम काही तांत्रिक बाबींमुळे थांबवण्यात आले आहे. त्यामध्ये उद्योगमंत्री नारायण राणे यांनी स्वत: लक्ष घालून निवळी-माळघाट प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी चिपळूण-संगमेश्वर युवा काँग्रेस विधानसभा क्षेत्र सरचिटणीस संतोष येडगे यांनी राणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवळी-माळघाटचे काम पूर्णत्वास गेल्यास संगमेश्वर तालुक्यातील जनतेला पश्चिम महाराष्ट्रातील पाटण साताऱ्याकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग उपलब्ध होणार आहे. निवळी माळघाट फोडण्याची संकल्पना राणे मुख्यमंत्री असताना मांडली होती. त्यांच्याच हस्ते निवळी नेदरवाडी येथे या मार्गाचे भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, त्यानंतर काही तांत्रिक कारणांमुळे हे काम थांबवण्यात आले आहे. या घाटाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे, अशी या भागातील लोकांची प्रलंबित मागणी आहे. जनतेच्या मागणीची दखल घेऊन येडगे यांनी पुढाकार घेतला आहे.
हे काम उद्योगमंत्री राणे यांच्या माध्यमातून पूर्ण होईल, असा विश्वास येथील जनता व कार्यकर्त्यांना असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. जनतेच्या आग्रहास्तव राणे यांनी लक्ष देऊन समस्या दूर करावी, अशी मागणी येडगे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. या मागणीची प्रत सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार डॉ. निलेश राणे यांनाही देण्यात आली आहे.
हा मार्ग झाला तर रत्नागिरी,जयगड व संगमेश्वर येथे राहणाऱ्या लोकांला सातारा,पाटण व पुण्याला जायला जवळचा मार्ग उपलब्ध होईल.
ह्या मार्गासाठी नारायण राणे यांनी पुढाकार घेतल्या बद्दल त्यांचे अभिनंदन.