कोणतीही भाडेवाढ न करता केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी अंतरिम अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला.
नवी दिल्ली- प्रवासी व मालवाहतुकीत कोणतीही भाडेवाढ न करता प्रवाशांच्या सोयीसाठी आलिशान गाड्या, नवे रेल्वेमार्ग अशा तरतुदी करण्याबरोबरच प्रवासाचा वेग वाढवण्याच्या दिशेने नवी पावले टाकणारा अंतरिम अर्थसंकल्प सादर करत रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी बुधवारी रेल्वे प्रवाशांना दिलासा दिला.
नव्या १७ प्रीमियम श्रेणीच्या जयहिंद एक्स्प्रेस, ३९ एक्स्प्रेस आणि १० पॅसेंजर, १६० ते २०० किलोमीटर वेगाने धावणा-या निम-अतिवेगवान एक्स्प्रेस गाड्या अशा विविध तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वेला अत्याधुनिक करण्यासाठी रेल्वेचे क्षेत्र खासगी आणि परकीय गुंतवणुकीला खुले करण्यात येणार असून स्वतंत्र रेल्वे भाडे प्राधिकरण, विमान तिकिटांच्या धर्तीवर रेल्वेत डायनामिक भाडे पद्धत आदी घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आल्या. महाराष्ट्राच्या वाटय़ाला २१ गाड्या आल्या असून मुंबईत जुलैपासून वातानुकूलित लोकल धावणार आहे.
रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्राचा विशेषत्वाने विचार
कोकणात धावणार डबल डेकर?
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी चार महिन्यांसाठी २०१४-१५चा अंतरिम रेल्वे अर्थसंकल्प लोकसभेत मांडला. १७ नवीन प्रीमियम जयहिंद एक्स्प्रेस, ३९ एक्स्प्रेस, १० पॅसेंजर गाड्या येत्या वर्षात सुरू करण्यात येतील. तासाला २०० किलोमीटर वेगाने धावणारी कमी तिकीट असलेली निम-अतिजलद गाड्यांची नवीन श्रेणी सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. दिल्ली-मुंबई विभागात वातानुकूलित विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. या गाडीच्या तिकिटाचे दर डायनामिक भाडे पद्धतीचा वापर करून ठरवले जाणार आहेत.
केंद्रीय रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी प्रवासी भाडेवाढ न करता सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांचा असून सुरक्षित प्रवासाची हमी देणारा आहे. या रेल्वे अर्थसंकल्पात कोकणासाठी निजामुद्दीन-मडगाव वातानुकूलित एक्स्प्रेस आणि मुंबई-करमाळी या गाड्यांची भेट देण्यात आली आहे. या गाड्यांचा फायदा कोकणवासीयांना निश्चितपणे होईल. – डॉ. निलेश राणे, खासदार
लोकांना खूश करण्यासाठी घोषणाबाजीवर भर न देता, वास्तवाचे भान ठेवून रेल्वेचा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. लोकप्रियता मिळवण्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याऐवजी रेल्वेचा ख-या अर्थाने विकास करण्यात मला रस आहे. प्रवाशांना विविध सुविधा देतानाच आणि देशातील जनतेसाठी ही सेवा सुरू राहायला हवी, अशी आमची भावना आहे. – मल्लिकार्जुन खरगे , रेल्वेमंत्री
रेल्वेत थेट परकीय गुंतवणूक
भारतात जागतिक दर्जाच्या रेल्वेच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा विचार रेल्वे करीत आहे. तसेच खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावरील प्रकल्पातून रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, लॉजिस्टिक पार्क्स, खासगी माल टर्मिनल, माल वाहतुकीसाठी विशेष गाड्या, रेल्वे वाघिणीसाठी गुंतवणूक, मालवाहतुकीसाठी विशेष मार्ग उभारण्यात येणार आहे.
रेल्वे जमीन विकास प्राधिकरणाची स्थापना
रेल्वे जमिनीचा विकास करून त्यातून हजार कोटी रुपये मिळवण्याचे लक्ष्य ठेवले होते. त्यापैकी ९३७ कोटी रुपये जमा झाले आहेत. कर्नाटक, झारखंड, आंध्र प्रदेश, हरियाणा सरकारने भागीदारी तत्त्वावर रेल्वे प्रकल्पात सहभागी होण्यास मंजुरी दिली आहे. अन्य राज्यांनाही यात सहभाग घेण्याचे आवाहन रेल्वेमंत्र्यांनी केले.
बुलेट ट्रेनच्या व्यवहार्यतेचा अभ्यास
मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मार्गाच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी रेल्वे व जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीने काम सुरू केले आहे. येत्या दीड वर्षात हा अभ्यास पूर्ण होईल. याच मार्गावर फ्रेंच रेल्वेतर्फे व्यवसाय विकास अभ्यास करण्यात येत आहे.
वैष्णोदेवीला चला थेट रेल्वेने
जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी लवकरच रेल्वेमार्गाने देशाशी जोडले जाणार आहे. त्यामुळे कोटय़वधी भक्तांना आता थेट रेल्वेने कटरा येथे उतरून वैष्णोदेवीला जाता येईल. तसेच मेघालय, अरुणाचल प्रदेशला लवकरच रेल्वेने जाता येईल.
रेल्वे भाडे प्राधिकरण
रेल्वेचे प्रवासी आणि माल वाहतूक भाडे ठरवण्यासाठी नवीन ‘रेल्वे भाडे प्राधिकरण’ स्थापन करण्यात येणार आहे. रेल्वेच्या गरजेसोबत अन्य बाबींचा विचार केला जाणार आहे. ही प्रक्रिया राबवताना पूर्णपणे पारदर्शकता बाळगली जाणार आहे.
एसएमएस अॅलर्ट सेवा
प्रतीक्षा यादीवरील तिकीट ‘कन्फर्म’ झाल्यास प्रवाशांना एसएमएस पाठवला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा लाभ मिळणार आहे. तसेच गाड्यांमधील भोजनासाठी ऑनलाइन बुकिंग सेवा सुरू केली जाईल.
रेल्वेची आर्थिक कामगिरी
सहाव्या वेतन आयोगामुळे पडलेला एक लाख कोटी रुपयांचा भार रेल्वेने अंतर्गत स्रेतांतून भागवला आहे. यंदा माल वाहतुकीतून ९४००० कोटी रुपये तर प्रवासी भाड्यातून ३७,५०० कोटी रुपये मिळू शकतील. रेल्वे परिचालन प्रमाण ९०.८ टक्के राहील. गेल्या दोन वर्षात केलेल्या कामगिरीमुळे मार्चअखेर यंदा रेल्वेच्या गंगाजळीत २३९१ कोटी रुपयांनी वाढ होऊन ८०१८ कोटी रुपये शिल्लक राहतील, असे खरगे यांनी सांगितले.
आगविरोधी यंत्रणा, सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना
मानवरहित रेल्वे क्रॉसिंग हटवण्याबरोबरच रेल्वे गाड्यांमध्ये टक्करविरोधी यंत्रणा राबवणे, चालकाच्या दक्षतेची चाचणी घेणारी यंत्रणा आदी उपाययोजना प्रस्तावित आहेत. राजधानी एक्स्प्रेसमध्ये अग्नी व धूर प्रतिबंधक यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर बसवली आहे. ही सुविधा लवकरच अन्य महत्त्वाच्या प्रवासी गाड्यांमध्ये बसवण्यात येणार आहे. डब्यांच्या आत अग्निप्रतिबंधक सामग्री, डब्यात शॉर्टसर्किटपासून संरक्षण मिळण्यासाठी बहुस्तरीय यंत्रणा, वातानुकूलित डब्यांमध्ये पोर्टेबल अग्निशमन यंत्रणा, पॅँट्री कारमध्ये एलपीजी गॅसऐवजी विजेवर चालणा-या शेगड्या बसवण्यात येणार आहेत.
‘बायो-टॉयलेट’ची संख्या वाढवणार
पर्यावरणासाठी रेल्वेतर्फे विविध योजना हाती घेण्यात आल्या आहेत. रेल्वे ऊर्जा व्यवस्थापन कंपनीतर्फे २०० रेल्वे स्थानक, २६ इमारती आणि २ हजार रेल्वे क्रॉसिंगवर सौर व पवन ऊर्जा क्षेत्रातील प्रकल्प तयार करण्यात येणार आहेत. आग्रा व जयपूर रेल्वे स्थानकांवर ‘हरित पडदे’ तयार केले जाणार आहेत. कॉर्पोरेट क्षेत्राचे साहाय्य या प्रकल्पासाठी घेण्यात येणार आहे. २५०० डब्यांमध्ये ‘बायो-टॉयलेट’ बसवले असून अन्य गाड्यांमध्ये ते बसवण्यात येणार आहेत.
दूध वाहतुकीसाठी विशेष गाड्या
देशात दूध वाहतुकीचे वाढते मार्केट लक्षात घेऊन विशेष गाड्या सुरू करण्यात येणार आहेत.
एक लाख सहा हजार कोटी रुपये महसुलाचे लक्ष्य
येत्या आर्थिक वर्षात एक लाख सहा हजार कोटी रुपये महसुलाचे लक्ष्य रेल्वेने ठेवले आहे. माल वाहतुकीतून १,०५, ७७० कोटी, प्रवासी वाहतुकीतून ४५,२५५ कोटी, कोचिंग ४२०० कोटी आणि संड्रीतून ५५०० कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. २०१४-१५ या वर्षासाठी ६४,३०५ कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातून ३०,२२३ कोटी रुपये अपेक्षित आहेत. देशातील अर्थव्यवस्थेची परिस्थिती लक्षात घेऊन येत्या वर्षात ११०१ दशलक्ष टन माल वाहतुकीचे लक्ष्य प्रस्तावित आहे. यंदा १०५२ दशलक्ष टन माल वाहतुकीचे लक्ष्य ठेवले आहे. यंदा १,४४,१९९ कोटी रुपये खर्च प्रस्तावित आहे. तसेच नवीन नोकरभरती, वाढीव महागाई भत्ता, वाढते इंधन बिल, आयआरएफसीच्या भाड्याचे वाढीव पैसे, वाढती महागाई आदी बाबी लक्षात घेण्यात आल्या आहेत. निवृत्ती वेतनासाठी २७ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
>बांद्रा-लखनऊ एक्सप्रेस >गोरखपूर-पुणे एक्सप्रेस >कानपूर-बांद्रा एक्सप्रेस >मुंबूई-चेन्नई एक्सप्रेस >मुंबई-गोरखपूर एक्सप्रेस >मुंबई-कर्माली एक्सप्रेस >नांदेड-औरंगाबाद एक्सप्रेस >नागपूर-रिवा एक्सप्रेस >पुणे-लखनऊ एक्सप्रेस
तर राज्यात पाच नव्या पॅसेंजर गाड्या सुरु करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
>निमच-हिंगोली, >कराड-पंढरपूर, >पुणे-मोरगाव, >पुणे-अहमदनगर, >पुणे-कोल्हापूर
खरगे यांनी मुंबईतून अन्य राज्यातील शहरांमध्ये जाणा-या सात नव्या प्रिमियम गाड्यांची घोषणा केली आहे.
> हावडा-पुणे एक्सप्रेस >नागपूर-मालवा एक्सप्रेस >मुंबई-हावडा एक्सप्रेस >मुंबई-पटणा एक्सप्रेस >बांद्रा-अमरुतसर एक्सप्रेस > बांद्रा-कटरा एक्सप्रेस >मुंबई-गोरखपूर एक्सप्रेस
रेल्वे अर्थसंकल्पातील ठळक घडामोडी…
» रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे २०१४-१५चा अंतरिम रेल्वे अर्थसंकल्प सादर केला
» केवळ चार महिन्यांसाठीचा रेल्वे अर्थसंकल्प
» लोकसभेत रेल्वे अर्थसंकल्प सादर करताना सभागृहात गदारोळ आणि घोषणाबाजी
» रेल्वे अर्थसंकल्पात ३८ नव्या एक्स्प्रेस गाड्या
» दहा नव्या पॅसेंजर, तर १७ नव्या प्रीमियर गाड्यांची घोषणा
» प्रवासी भाड्यात कोणतेही बदल नाहीत
» ईशान्य भारतात रेल्वेचे जाळे वाढवणार
» मेघालय राज्यात नवे रेल्वे मार्ग
» जम्मू काश्मीरमधील कटरापर्यंत पॅसेंजर रेल्वे सुरु करणार
» स्वच्छतेच्या दृष्टीने बायो टॉयलेट असलेल्या रेल्वे गाड्यांची संख्या वाढवणार
» दोन राजधानी एक्स्प्रेस गाड्यांमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा तयार करणार
» रायबरेली आणि छप्रा येथील रेल्वे कारखान्याच्या कामास सुरुवात
» इटानगर रेल्वेशी जोडणार
» गेल्या वर्षभरात दोन हजार २०७ किलो मीटरचे नवे रेल्वे मार्ग तयार करण्यात आले
» वैष्णदेवीला जाण्यासाठी लवकरच रेल्वे सुरु करणार
» नव्या १९ रेल्वे मार्गांचा प्रस्ताव
कोकणरेल्वेची पश्चिम महाराष्ट्रात घोडदौड हे यावेळीही स्वप्नच राहिले…