मान्सूनाची सुरुवात झाली तरी महापालिका आपल्या कामांमध्ये अपुरी आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी आहे.कुठे नाले सफाई नाही तर कुठे महापालिकांचे अधिकारी कामांना दाद देत नाही.त्यामुळे आता तरी महापालिका आपल्या कामामध्ये सक्षम ठरेल का ?
महापालिका हे भ्रष्टाचाराचे आगार असल्याने मान्सूनपूर्व तयारी हा लोकप्रतिनिधी व नोकरशहांचे खिसे भरण्याचा धंदा बनला आहे. पाऊस सुरू होण्याची वेळ नक्की नसल्याने व प्रशासनातील गलथानपणामुळे योग्य वेळी पावसाची तयारी केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी पाऊस पडल्यावर शहरवासीयांना तोच त्रास भोगावा लागतो. हे टाळण्यासाठी प्रशासनावर दबाव आणून ठरावीक वेळेत पारदर्शक पद्धतीने मान्सूनपूर्व तयारी जनतेने करून घ्यावी. तिच्यावर माहितीच्या अधिकारामार्फत नियंत्रण ठेवून त्यात पैशांची अफरातफर झाल्यास किंवा अपु-या तयारीमुळे नागरिकांचे नुकसान झाल्यास ते संबंधितांच्या खिशातून वसूल करावे. पुढच्या वर्षापासून आपोआप मान्सूनपूर्व तयारी होईल.
– डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम
यंत्रणेवर प्रभावी नियंत्रण आवश्यक
नेमेचि येतो पावसाळा पण स्थिती येरे माझ्या मागल्या हे ठरलेलेच. नाले सफाई, रस्ते सफाई हा फार्स आहे. यामध्ये लाखो रुपयांची सफाई दिसते. पण नाले सफाई उशिरा सुरू होते, काढलेला कचरा, गाळ वेळेत उचलला जात नाही. कामचुकारपणामुळे या यंत्रणेचे तिनतेरा वाजले आहेत. मुंबईत २०० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी तुंबते व ६० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचतेच! पाणी साचण्याचे कारण म्हणजे मुंबईतील काही ठिकाणची उंची समुद्रसपाटीपासून कमी आहे. समुद्राच्या लाटा चार ते पाच मीटपर्यंत असतात. त्यामुळे मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी तुंबते! मिठी नदीचा गाळ काढण्याचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. गाळ काढल्यानंतर विल्हेवाट कशी लावावी हा प्रश्न अजून सुटलेला नाही. पावसाळ्यात जास्त करून साथीचे प्रमाण वाढते. त्यातून डासांची उत्पत्ती यामुळे मलेरिया, डेंग्यूचा प्रसार लवकर होतो. त्यावर आरोग्य यंत्रणा सज्ज पाहिजे. साचलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही तर रोग बळावतात. घाणीमुळे आरोग्याला धोका पोहोचतो. त्याकरिता त्वरित विल्हेवाट लागणे गरजेचे आहे. शासन, पालिका, सफाई व आरोग्यावर लाखो रुपयांचा निधी वापरते; परंतु सक्षम जबाबदारीने काम करणारी यंत्रणा नसल्याने हा प्रश्न बिकट होत आहे, परंतु ठेकेदाराचे खिसे मात्र भरत आहेत. हे टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवून कडक नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे.
– हरिभाऊ खैरनार, उल्हासनगर
हा तर मोठा विनोदच!
मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, राज्यसरकार, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ आणि लोहमार्ग यंत्रणांनी शहरांतील व उपनगरांतील नालेसफाई वगैरे पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे ही समाधानकारकपणे पार पडली असल्याचे भले कितीही दावे केले तरी आता अक्कल गहाण न टाकलेले कोणीही मुंबईकर नागरिक त्यावर सुतराम विश्वास ठेवणे शक्य नाही. कुठलीही जनहिताची सार्वजनिक कामे वेळेवर, दर्जेदार, संशयातीतपणे व नेटाने पार पाडली म्हणजेच समस्या वा प्रश्न ख-या अर्थाने सुटले तर आपल्या खाबुगिरीवर गंडांतर येणार हे कळण्याइतके संबंधित राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार निर्बुद्ध राहिलेले नाहीत. मुंबई व उपनगरांचे पावसाळ्यातील जीवनच पार उद्ध्वस्त करून टाकणा-या मिठी नदीचा गाळ कोणी उपसायचा व कोठे नेऊन टाकायचा यावरच महापालिका आणि अन्य संबंधित यंत्रणांमध्ये पाऊस दाराशी येऊन थडकला तरी आपापसांत लांछनास्पद असे
‘तू तू, मैं मैं अजूनही चालूच आहे.
– मधुकर ताटके, गोरेगाव
निसर्गाचा कोप होऊ नये
शहरी भागातील महापालिकांना आपल्या हद्दीत पाणी तुंबू नये म्हणून मोठय़ा नाल्यांची साफसफाईची कामे करावी लागतात. नाल्यातील दगड, माती, गाळ आणि घनपदार्थ बाहेर काढून नाले साफ केले जातात. पाण्याचा निचरा होण्याकरिता सखळ भागात पाणी तुंबण्याची शक्यता असते तेथे पाणी उपसण्याचे मोठे पंप बसवून पाणी पंपाद्वारे बाहेर फेकले जाते. ही कामे पावसाआधी एक महिना सुरू करण्यात येतात, पण नाल्यात साचलेला गाळ १२ महिन्यांचा असतो. तो एक महिन्यांत काढणे अशक्य वाटते. म्हणून ही व्यवस्था बारमाही असायला हवी. तेव्हाच कामाचा ताण कमी होईल. पंपही बसवावे लागणार नाहीत. लोकांमध्ये जागृतीची (माहिती) डंका पिटायला हवी. जेणेकरून नाल्यात, गटारांत, कोणी कचरा अथवा घनपदार्थ रस्त्यांवर टाकणार नाही. वेगवेगळ्या कामांसाठी रस्ते खोदावे लागतात. त्याचा परिणाम रस्त्यांवर खड्डे पडण्यात होतो. मोठे नाले, मध्यम नाले, पर्जन्य जलवाहिन्या याच्या साफसफाईचे काम दररोज व्हायला हवे. त्यामुळे पाणी तुंबण्याची समस्या कायमची बंद होईल.
– महादेव गोळवसकर, घाटकोपर
आपत्ती व्यवस्थापनासाठी पालिका तत्पर
साठलेल्या गाळामुळे मिठी नदी उथळ झाली होती. मिठी नदीची प्रथम साफसफाई करण्याची मोहीम राबविली जात आहे. मिठी नदीच्या प्रवाहाच्या आत साठलेला गाळ, नदीच्या पात्रात भर टाकून बांधलेल्या झोपडया आदी गोष्टी मिठी नदीचे पात्र रुंदवण्यात अडचणीच्या ठरूनसुद्धा मिठी नदीचा प्रवाह मोकळा करण्याचे काम अव्याहतपणे चालू आहे; परंतु असे असूनसुद्धा पावसाचे आगमन होताच पाणी साठते; परंतु महानगरपालिका तत्परतेने सखल भागात पाणी साठू नये म्हणून पंपाद्वारे पाण्याचा उपसा करते.
पाणी साठणार नाही असे कितीही दावे केले तरी हे दावे हवेत विरतात आणि पाणी साठते. कारण विकासकामांमुळे परिसराची उंची वाढते. ट्रॅक रस्ते सखळ भागात जातात. मिठी नदीचा प्रवाह पूर्वीसारखा करण्याचे काम अजून अपूर्ण आहे, त्यामुळे सखल भागात पाणी साठणार नाही, असे म्हणता येणार नाही. महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन नेहमीच नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी तत्पर असते. हवामानाचा अंदाज, भरती-ओहोटी, पावसाच्या जोरदार वृष्टीबाबत महापालिका आगाऊ सूचना देते. अग्निशमन दल, महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पोलिस दल यामध्ये समन्वय असतो. २००५ च्या जलप्रलयापासून महापालिकेने धडा घेऊन नागरिकांच्या सुरक्षेला महत्त्व देऊन उपाययोजना आखायच्या आहेत.
– हरिष बडेकर
नालेसफाई म्हणजे धुळफेक
दरवर्षीप्रमाणे पालिका यावर्षीही पावसाळ्यासाठी सज्ज आहे. यावर्षी नागरिकांना कोणताच त्रास होणार नाही, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करू अशाप्रकारे पालिका बतावणी करते. मात्र त्यांचे हे दावे वेळोवेळी फोल ठरत असल्याचेच निदर्शनास येत आहे. पावसाळ्यात पाणी तुंबून जनतेचे हाल होणार नाहीत, त्याची काळजी घेण्यासाठी बृहन्मुंबई पालिकेने जास्तीत जास्त पैसे खर्च करावेत, जेणेकरून असे प्रश्न उद्भवणार नाहीत. तसेच आहेत त्या मशिनरींचा योग्य वापर व्हायला हवा. बरेचदा महागडी मशिनरी आणली जाते.
मात्र त्याचा वापर केला जात नाही. कित्येकदा ती तशीच पडून असल्याचेही आढळून आले आहे. पावसाळा जवळ आला की, मुंबईत महानगरपालिकेकडून नालेसफाई सुरू होते. खरेतर हे काम बारमाही होणे अपेक्षित आहे, कारण नाल्यांचा उपयोग बारमाही होत असतो, पण साफसफाईचे काम हे पावसाळ्यापूर्वीच हाती घेतले जाते. बऱ्याच ठिकाणी थातुरमातुर सफाई केली जाते. परिसर खोलगट आहे. तिकडे बांधकाम आहे. अशी अनेक कारणे देऊन पालिका आपल्या नाकर्तेपणावर पांघरूण घालते. परिणामी, नाल्यातील घाण तशीच राहते. त्यामुळे पावसाच्या तोंडावर केलेली नालेसफाई ही केवळ धुळफेक आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
– दादासाहेब येंधे, काळाचौकी
महापालिकेचा पाणउतारा
पावसाळा आला की संबंधित यंत्रणांना तमाम मुंबईकरांच्या सुरक्षेची काळजी वाटली तर त्यात नवल ते काय? परंतु मुंबईत आतापर्यंत मोठय़ा नाल्यांची ५५ ते ६० टक्केच सफाई झाली आहे. २६ जुलैच्या महाप्रलयाला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीतूनही आतापर्यंत ३० ते ३५ टक्केच गाळ काढला गेला आहे. तसेच विविध शासकीय आणि निमशासकीय प्राधिकरणांच्या हद्दीत नालेसफाईचे काम योग्यरीत्या झाले नसल्याने नाले तुंबण्याचा धोका निर्माण होण्याची चिन्हे आहेत. जी अवस्था नाल्यांची आहे तीच अवस्था रस्त्यांवरील खड्डयाची आहे. आधीच महापालिकेचा रस्त्यांवरील खड्डयामुळे पाणउतारा झाल्याने खड्डे बुजविण्याचे काम त्यांनी युद्धपातळीवर सुरू केले आहे. पावसाळा तोंडावर आलेला असताना पालिकेच्या या अपूर्ण कामांमुळे यंदाचा पावसाळा तरी मुंबईकरांसाठी सुखावह ठरतो का? हे पाहणे गरजेचे आहे.
– उदय वाघवणकर, जोगेश्वरी
प्रशासनाचे दावे : अळवावरचं पाणी
पावसाच्या स्वागतासाठी मुंबईसह ठाणे महापालिका आणि रेल्वे यंत्रणांनी नालेसफाईची केलेली कामे समाधानकारक केल्याचे दावे म्हणजे स्वत:च स्वत:ची पाठ थोपटण्याचा प्रकार स्पष्ट दिसतो. मुंबईतील रस्ते दुरुस्ती आणि नालेसफाईच्या नावाखाली करोडो रुपयांची कमाई पदरात पडली की लोकांना खड्डेविरहीत रस्ते, स्वच्छ नाले अशी सुखद स्वप्न दाखवली जातात. त्यावर लोकंही माना डोलावतात, मात्र मुंबईत पडणाऱ्या १०-१५ मिनिटांच्या संततधार पावसानेही सा-यांचा स्वप्नभंग ठरलेला असतो. ते वास्तव समोर येते तेव्हा पालिकेचे व कंत्राटदारांचे नालेसफाईचे दावे किती तकलादू आहेत, हे स्पष्ट होते असा आमचा अनुभव आहे.
पाऊस उंबरठयावर येऊन ठेपला आहे तरी पूर्व उपनगरातील ११७ रस्त्यांची कामे रखडली आहेत. कंत्राटदार तसेच प्रशासनातील अधिका-यांच्या आडमुठया धोरणामुळे रहिवाशांना भर पावसाळ्यात खड्डयातून वाट काढणे म्हणजे तारेवरची कसरत ठरणार आहे. दरवर्षी कोटी रुपयाची बेफाम उड्डाणे घेताना कंत्राटदार, लोकप्रतिनिधी, नोकरशहा आणि सत्ताधारी पक्षप्रमुख यांच्या बेरजेची टक्केवारी नेहमीच पालिकेच्या मान्सूनपूर्व कामांना आडकाठी ठरल्याने गोत्यात टाकतात आणि एकमेकांचे रुसवेफुगवे दूर करण्यात वेळ वाया गेल्याने कामांना होणारा उशीर हा नेमेचि येतो मग.. या उक्तीला अनुसरून घडल्याने साफसफाईची फक्त नाटकं, देखावा केला जातो.
– दिलीप अक्षेकर, माहीम
मान्सूनसाठी महापालिका सज्ज?
तहान लागेल तेव्हा विहीर खणणा-या या महापालिका, रेल्वे व इतर यंत्रणा नेहमीच मान्सून दारावर पोहोचेपर्यंत आपली विविध कामे धिम्या गतीने सुरूच ठेवतात. व नेहमीप्रमाणे महापालिका पाणी तुंबणार नाही असे दावे करते, पण वरुणराजाने दिलेल्या पहिल्याच दणक्यात या यंत्रणाचे हे दावे फोल ठरतात. व त्याचा सर्वाधिक फटका बसतो तो सर्वसामान्यांना. कोटय़वधींचे उत्पन घेणारी ही महापालिका, रेल्वे यंत्रणा, आजही २००५ च्या प्रलयातून कोणताही धडा घेताना दिसत नाही. तसेच मिठी नदीच्या साफसफाईचा वाद त्यामुळे मिठी नदीची कामे मान्सून तोंडावर आला तरी योग्यरीत्या होताना दिसत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळणा-या या यंत्रणांनी पावसाळ्यात उद्भवणा-या परिस्थितीचा सामना करण्यासाठी आता सज्ज व्हावे. कामे समाधानकारक झाल्याची फक्त मुक्ताफळे उधळण्यात धन्यता मानू नये.
– चेतना झांजे, अंबरनाथ
दैनावस्था संपेना
परस्परांत समन्वय नसल्याने मुंबई-ठाणे, महापालिका, बेस्ट, एमटीएनएल, एमएमआरडीए यांची पाणी, मलनिस्सारण, वीज, एलपीजी, दूरसंचार यांची मान्सूनपूर्व रस्ते दुरुस्तीची कामे देखरेखीअभावी निकृष्ट, अनियमित आणि भ्रष्टाचारामुळे पुनश्च उद्भवणारी असतात. त्यामुळे नालेसफाई, रस्तेदुरुस्ती व खड्डे बुजवण्याचे कितीही दावे केले तरी पहिल्याच संततधार पावसात त्यांचे पितळ उघडे पडेल. कंत्राटदारांना मान्सूनपूर्व कामे देताना निविदा काढण्यापासूनच लोकप्रतिनिधी, स्थायी समिती सदस्य, मनपा व रेल्वे अधिकारी, राजकीय पक्ष इत्यादींचे ‘प्रीमियम’ सुरू होतात. तसेच विकासनिधीची अपुरी तरतूद, अनास्था या कारणांमुळे सदर कामांना उशीर होतो.
प्रशासकीय यंत्रणांना समाजाशी काहीही देणंघेणं नसल्यामुळे ती कायमच गाफील व उदासीन असते. मान्सूनची सुरुवात झाली तरी शासकीय-निमशासकीय आपत्कालीन कक्ष यंत्रणा कार्यक्षम व सक्षम असल्याचे दिसत नाही. विविध खात्यांतर्गत आपत्ती निवारणाकरिता लागणारी सर्व उपकरणे, औषधोपचार, दूरध्वनी संपर्क, अत्यावश्यक निधी, संक्रमण छावण्या, अन्नधान्याची पाकिटे, पूरनिवारण उपाययोजना कार्यान्वित आहेत का? या प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच दिसतात. वैज्ञानिक क्षेत्रात आम्ही नेत्रदीपक प्रगती केली. असली तरी मनुष्यनिर्मित भूतलावरील नालेसफाई, रस्तेदुरुस्ती, प्रदूषण, भूकंप-पूर निवारण या समस्या इच्छाशक्तीच्या अभावामुळे आम्हाला सोडविता येत नाहीत हा केवढा दैवदुर्विलास आहे. आपत्तींचा सामना करण्यास महाराष्ट्र असमर्थ असल्याचा ठपका कॅगनेही ठेवला आहे.
त्यामुळे ही दैनावस्था कधी संपणार हाच खरा प्रश्न आहे. आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यास पालिका प्रशासन सज्ज आहे किंवा नाही हे येणारा मान्सूनच ठरवेल. निव्वळ पत्रकार परिषदेत वल्गना करून किंवा पत्रके काढून काय उपयोग? त्यामुळे लाखो चाकरमान्यांचे पावसाळ्यातील भविष्य आणि भवितव्य दैवाच्याच हवाली आहे.
– कमलाकर गुर्जर, कळवा
‘असज्ज’ महापालिका
प्रशासनाने कितीही गाजावाजा केला तरीही मुंबईत दरवर्षी पाणी साचतेच. ऐन पावसाळा तोंडावर असताना पालिकेसह, रेल्वे प्रशासन झोपेतून खडबडून झागे झाल्यासारखे तयारीला लागते आणि जून महिन्याच्या सुरुवातीलाच यावर्षी कुठेही पाणी न साचण्याचे आश्वासन दिले जाते. रस्त्यांवरील पाण्याचा निचरा होण्यासाठी असणारी गटारे, उपनगरातील नाले, भल्या मोठय़ा पावसामध्ये तर अहोरात्र वाहताना दिसून येतात. त्यावरून पालिका प्रशासनाची कामे किती निष्फळ झाली हे समजते. खरे तर पावसाळ्यापूर्वी रस्त्यांवरील कचराकुंडया, नाल्यांमधील गाळ, ड्रेनेज-गटारे यामधील कचरा साठा मुंबईतील प्रत्येकी प्रभागांमध्ये आढळतो.
काही नागरिक वारंवार वॉर्ड-ऑफिसेस मध्ये तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासनाचे सफाई-कर्मचारी येत नाहीत व त्याचा भरूदड या नागरीकांनाच सोसावा लागतो ही तर नित्याचीच बाब आहे. दरवर्षीच्या या प्रकरणात आजवर अनेकांचा जीव गेला आहे. याला जबाबदार कोण? अशा या भेदक परिस्थितीवर प्रशासनाने कितीही आश्वासनांचे दावे केले असले, तरीही याही वर्षी पालिकेची असमाधानकारक स्थिती राहिल हे दिसून येते.
– ओमकार विलणकर, प्रभादेवी
अतिधोकादायक इमारतींनाही धोका!
हवामान खात्याने यंदा धुवांधार पावसाचे भाकित वर्तवून नऊ ते १३ जून या कालावधीत समुद्रीतटावर उंच लाटा उसळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. समुद्राला आलेल्या उधाणाचा परिणाम होऊन शहरातील नालेही तुंबण्याचा धोका संभवतो. त्यामुळे झोपडपट्टयामध्ये पाणी शिरण्याची भीती व्यक्त होत असतानाच पावसाच्या संतत धारेने पाणी तुंबल्यास धोकादायक व अतिधोकादायक इमारतीबाबत दुर्घटनेची समस्याही नाकारता येत नाही. त्याशिवाय महापालिका नालेसफाई, रस्तेदुरुस्ती आदी विविध कामे सुरूच आहेत किंवा यंदा पाणी तुंबणार नाही असे असे दावे करते. मग महापालिकेच्या हद्दीतील काही ठिकाणी नाले कसे तुंबतात?, रस्त्यावरील खड्डे व पावसाच्या पाण्याने भरतात कसे? आणि मीठीची कामे कोणाच्या खर्चाने करायचे तेही अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणा-या आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज आहे, असे म्हणता येणार नाही.
– प्रविण पाटील, भोईवाडा
येरे माझ्या मागल्या
दरवर्षी पाऊस तेवढाच पडतो. पण पाण्याचा योग्य निचरा होत नाही ही खरी समस्या आहे. या सगळ्याच्या मुळाशी जाऊन पालिका विचारत करीत नाही ही भयंकर डोकेदुखी आहे. एमएमआरडी नंतर पुराला जबाबदार आहे ते पालिका प्रशासन. पावसाच्या आधी मुंबईतील गटारांची शंभर टक्के सफाई करण्याचा दावा पालिकेकडून केला जातो. नालेसफाई आणि खड्डे बुजविण्यासाठी कोटयावधी रुपये खर्च होतात. त्याचे फलित काय, तर दरवर्षी मुंबई पाण्याखाली जायची काही चुकत नाही. नाल्यातून काढलेला गाळ काळजीपूर्वक उचलला गेला तर नाले सफाईची कामे शंभर टक्के पूर्ण होतात, पण तसं झालं तर नालेसफाईच्या नावाने चालणारी हातसफाई बंद पडेल, ही भीती आहेच. मिठी नदीतून गाळ काढणे आवश्यक असतांना केवळ वरवरचा कचरा काढला जात आहे. त्यामुळे मिठी गाळानेच भरलेली आहे. मिठीचे अरुंद पात्र रुंद करण्याची आवश्यकता आहे, पण त्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे पावसाचे पाणी तुंबले तर २६ जुलैची पुनरावृत्ती व्हायला वेळ लागणार नाही.
– राजा मयेकर, लोअर परळ
पर्यावरणाचा -हास झाला
मुंबई शहरातील नालेसफाई, रस्त्यावरील खड्डे भरणी, रेल्वेलाइन जवळील साचलेला कचरा, गाळ काढणे या प्राथमिक घटना, पावसाळा सुरू होण्यापूर्वी करणे हे महानगरपालिकेचे अत्यंत गरजेचे तसेच महत्त्वाचे काम आहे. शहरात पाणी तुंबू नये, आकांत घडू नये, रेल्वे ही जीवन वाहिनी सुरळीत चालावी ही जनतेची माफक इच्छा असते. सत्ताधा-याकडून आम्ही सर्व कामे पूर्ण केली अशी कितीही आश्वासने मिळाली तरी जोरदार पावसाच्या पहिल्याच तडाख्यात मुंबईतील उथळ भागात पाणी साचते रेल्वेही ठप्प होते. आणि सालाबादप्रमाणे आश्वासनाचे पितळ उघडे पडते.
याची कारणे बरीच आहेत; परंतु महत्त्वाची कारणे म्हणजे अनधिकृत बांधकामे, मुंबई शहरातून वाहणा-या छोटयामोठया नद्याची योग्य दखल न घेणे, मतासाठी जोगवा मागणारे (अनधिकृत बांधकामांना मतांसाठी प्रोत्साहन) राजकारणी आणि पर्यावरणाचा झालेला -हास. मुंबईतील नद्या कोठे उगम पावतात आणि कोठून वाहतात ते काठावर राहणा-याना काहीच खबर नसते. म्हणून त्यांचे गटार गंगेतच रूपांतर झाले आहे. नदीच्या पात्रातील तिवारांची लाखो झाडे तोडून त्यावर भर टाकून अनधिकृत झोपडपट्टया लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने उभ्या करून पर्यावरणाचा -हास केला गेला आहे. बांद्रा-माहीम खाडीच्या ठिकाणी तर चार प्रकारांच्या तिवरांची हजारो झाडांची कत्तल करून वारंवार भर
टाकून सांडपाण्याचा निचरा होणारा मार्गच अरुंद करत आहेत. त्यातच भरतीच्या वेळी पावसाचा जोर वाढला तर पाणी जाणार कुठे त्यामुळेच मुंबईभर पाणी भरते आणि हाहा:कार होतो.
– विजय पवार, बोरिवली
पालिकेची उपाययोजना अपुरी!
मुंबईतील नाल्यांची सफाई युद्ध पातळीवर सुरू असली तरी तासाला ५० मिलीलिटरहून अधिक पाणी वाहून नेऊ शकत नाही. त्यातच भरती असल्यास पावसाचे आणि समुद्राचे पाणी नाले तसेच गटारांत तुंबून धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी खबरदारीचा उपाय म्हणून वेधशाळेकडून जोरदार, अती जोरदार पावसाची शक्यता वर्तवल्यास नागरिकांना हायअर्लट जारी केला जाईल. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर मुंबईत नाले रुंदीकरणाचे काम मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यात आले.
मात्र नाल्याचे रुंदीकरण पूर्ण क्षमतेने झालेले नसून समुद्राला भरती असताना पाणी बाहेर सोडणारे पंपिंग स्टेशनही रखडले आहे. तासाला ६० मीटरपेक्षा जास्त पाऊस आणि समुद्राला साडेचार मीटरपेक्षा जास्त उंचीची भरती असल्यास शहराला पुराचा धोका वाढतो. मिठी नदीवर काही अंतरावर दोन कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, तसेच हिंदमाता, मराठा मंदिर, दादर टी.टी, नाना चौक, शिवडी स्टेशन, शीव आगार या ठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. गिरगाव, दादर, जूहू, गोराई, वर्सोवा व आक्सा आदी चौपाटय़ांवर कॅमेरे बसविले जाणार आहेत, असे पालिका सूत्राने सांगितले आहे. पण एक गोष्ट सत्य आहे की जर निसर्गानेच कोप केला तर त्यासमोर कोणाचेही चालणार नाही.
– रामचंद्र मेस्त्री, चेंबूर
कामाचे नियोजन नाही
ज्याप्रमाणे शेतकरी शेतीच्या मशागतीची कामे पाऊस सुरू होण्यापूर्वीच उरकतो. त्याप्रमाणे पालिकांनीदेखील शहरातील पावसाळ्यापूर्वीची साफसफाई, जुन्या इमारतींच्या पाहणी अहवालानुसार योग्य तो निर्णय व पावसाळ्यात घ्यावयाची काळजी रहिवाशांना देणे योग्य आहे, कारण काही जुन्या इमारती व त्यांचे भाग पावसाळ्यात कोसळण्याचा धोका संभवतो. शिवाय रस्ते दुरुस्ती, सिमेंटीकरण व पुलांची कामे अर्धवट स्वरूपात राहिल्याने पावसाचे पाणी साचून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. विशेष म्हणजे कोणतेही काम पावसाळ्यानंतर लगेच सुरू होऊन पुढील पावसाळ्यापूर्वी पूर्णत्वास जाणे जरुरीचे आहे; परंतु आपल्याकडे कामाचे नियोजन व्यवस्थित होत नसल्याने दिरंगाई करून सगळ्याच कामाचा गोंधळ निर्माण करून भ्रष्टाचारास आमंत्रण दिले जाते.
– नरेश नाकती, बोरिवली
पहिल्याच पावसात बो-या वाजला
रोज मरे त्याला कोण रडे? दर पावसाळ्यात महापालिकेने, रेल्वेने नालेसफाई, रस्तेदुरुस्तीचे दावे करायचे आणि पहिल्याच पावसात त्याचा बो-या वाजायचा हे आता नित्यनियमाचेच झाले आहे. मध्य रेल्वे तर सात जूनच्या पावसात पूर्णपणे विस्कळित झाली. सिग्नल यंत्रणा बिघडल्याने एकामागोमाग एक १३ गाडया थांबल्या. ट्रॅकमध्ये पाणी तुंबले. लाखो प्रवाशांचे हाल झाले. तीच तीच नेहमीची पाणी तुंबण्याची ठिकाणे आणि त्याच त्याच घासून गुळगुळीत झालेल्या प्रतिक्रिया यांचा आता आम्हा मुंबईकरांना कंटाळा आला आहे. आम्ही चंद्रावर गेलो, पण जमिनीवरच्या समस्या आम्हाला सोडवता आल्या नाहीत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाल्याने प्रत्येक कामातून मला किती रक्कम मिळणार हेच संबंधित यंत्रणा आधी बघत असते त्यामुळेच पालिकेने कितीही दावे केले तरी ते नेहमीच फोल ठरतात हा इतिहास आहे.
– प्राची गुर्जर, कळवा
क्लासेसमुळे मुंबईचा आकडा घसरला का?
दहावी-बारावीसाठी मोठ-मोठ्या क्लासेसचे प्रस्थ असलेल्या मुंबईत दहावीचा आणि बारावीचा निकाल यंदा गेल्या वर्षीपेक्षा थोडा कमीच लागला. वास्तविक पाहता ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ आणि शाळेकडून दिले जाणारे वाढीव गुण यामुळे विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण वाढेल, अशी अपेक्षा होती. त्याप्रमाणे इतर विभागांमध्ये हे प्रमाण वाढलेही, पण मुंबईत मात्र विरुद्ध चित्र दिसून आले. सुट्टयामध्ये सहा-सात तास शिकवणी, वर्षभर चालणाऱ्या टेस्ट सिरिज, शिकवण्यांच्या शुल्कांचा मोठा आकडा या नंतरही जर विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण घटणार असेल, तर याचा उपयोग काय? शिकवण्या आणि तासन्तास अभ्यासामुळे मुलांवरील दडपण वाढत आहे का? त्यातच शिकवण्यांकडे विद्यार्थांचा वाढता कल आणि शिकवण्यांमध्ये वाढणारी पटसंख्या यामुळे शिकवण्यांचे रुपांतर शाळेत होत आहे का? त्यामुळे शिकवण्यांचा मूळ उद्देश मागे पडून त्यांचा दर्जा घसरत चालला आहे का? सर्वस्वी शिकवण्यांवर अवलंबून राहिल्याने विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा आकडा घसरला आहे का? याबाबत वाचकांनी आपली मते सुवाच्य अक्षरात शुक्रवापर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत. शब्दमर्यादा : शंभर शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.
आपली मते तुम्ही yasapith@gmail.com या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता. तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही नोंदवू शकता.
महापालिका हे भ्रष्टाचाराचे आगार असल्याने मान्सूनपूर्व तयारी हा लोकप्रतिनिधी व नोकरशहांचे खिसे भरण्याचा धंदा बनला आहे.- डॉ. कृष्णकांत नाबर, माहिम
मुंबई महापालिका पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे ही समाधानकारकपणे पार पडली असल्याचे भले कितीही दावे केले तरी आता अक्कल गहाण न टाकलेले कोणीही मुंबईकर नागरिक सुतराम विश्वास ठेवणे शक्य नाही. मिठी नदीचा गाळ कोणी उपसायचा व कोठे नेऊन टाकायचा यावरच वाद सुरू आहेत. – मधुकर ताटके, गोरेगाव
नेमेची येतो पावसाळा पण स्थिती येरे माझ्या मागल्या हे ठरलेलेच. मुंबईत २०० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी तुंबते व ६० पेक्षा जास्त ठिकाणी पाणी साचतेच! मुंबईतील काही ठिकाणची उंची समुद्रसपाटीपासून कमी आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी तुंबते. त्यात मिठी नदीचा गाळ काढण्याचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे. त्यामुळे प्रभावी यंत्रणा राबवून कडक नियंत्रण ठेवणे जरुरीचे आहे.- हरिभाऊ खैरनार, उल्हासनगर
रोज मरे त्याला कोण रडे ? दर पावसाळ्यात महापालिकेने, रेल्वेने नालेसफाई, रस्तेदुरूस्तीचे दावे करायचे आणि पहिल्याच पावसात त्याचा बो-या वाजायचा हे आता नित्यनियमाचेच झाले आहे. मध्य रेल्वे तर कालच्या ७ जूनच्या पावसात पूर्णपणे विस्कळित झाली. सिग्नल यंत्रणा बिघडल्याने एकामागोमाग एक १३ गाड्या थांबल्या.ट्रॅकमध्ये पाणी तुंबले. लाखो प्रवाशांचे हाल झाले. तीच तीच नेहमीची पाणी तुंबण्याची ठिकाणे आणि त्याच त्याच घासून गुळगुळीत झालेल्या प्रतिक्रिया यांचा आता आम्हा मुंबईकरांना कंटाळा आला आहे. आम्ही चंद्रावर गेलो पण जमिनीवरच्या समस्या आम्हाला सोडवता आल्या नाहीत. भ्रष्टाचार हाच शिष्टाचार झाल्याने प्रत्येक कामातून मला किती रक्कम मिळणार हेच संबंधित यंत्रणा आधी बघत असते त्यामुळेच पालिकेने कितीही दावे केले तरी ते नेहमीच फोल ठरतात हा इतिहास आहे.