प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करणारा एक इंजिनीयरिंग डिप्लोमाधारक नोकरी सोडून सेंद्रिय शेतीकडे वळतो आणि त्यात अनेक प्रयोग करून उजाड माळरानावर हिरवंगार रान फुलवतो. राजेंद्र भट यांची ही ओळख. नुकताच त्यांना महाराष्ट्र शासनाचा कृषिभूषण पुरस्कार मिळाला आहे. सेंद्रिय शेतीत नवनवीन प्रयोग करत त्यांनी स्वविकसित, स्वावलंबी, आणि स्वयंपूर्ण शेतीचा उत्तम आदर्श शेतीजगतात निर्माण केला. बहुपीक पद्धतीचा पुरस्कार करत, निसर्गपूरक शेती पद्धतीत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांच्याशी केलेली ही बातचीत.
‘लार्सन अॅण्ड टुब्रो’मधली नोकरी सोडून तुम्हाला शेती करावीशी का वाटली?
हो. मी इन्स्ट्रमेंट मेकॅनिकल इंजिनीयरिंगचा डिप्लोमा होल्डर आहे. ‘लार्सन अॅण्ड टुब्रो’मध्ये मी इंजिनीयर म्हणून चांगल्या पगाराची नोकरीही करत होतो. नोकरी सांभाळत मी भारतभ्रमण करायचो, त्यामुळे हिमालय ते अगदी अंदमान अशी माझी भटकंती झाली. मला भटकंतीची पहिल्यापासून आवड. भटकंती करताना, निसर्ग बघता बघतानाच वाटायचं की, या निसर्गातला आपला सहभाग काय, हा विचार करत असतानाच माझ्याकडे ही संधी एक दिवस अकस्मात आली. झालं असं की, माझ्या आजोबांची पिढीजात जागा आणि माझ्या आईच्या नावावरही एक प्लॉट होता. या जमिनी काही कारणास्तव आम्हाला विकाव्या लागल्या. त्या विकून जे पैसे आले त्यातून असं ठरलं की, आपल्या कुटुंबाच्या मालकीची जमीन खरेदी करावी. मलाही निसर्गाच्या जवळ नेणारं काहीतरी काम करायचं होतं. त्यातूनच मग माझं असं ठरलं की, आपण शेती करावी. त्यासाठी मग मी सुरुवातीला नोकरी सांभाळत शेती करायचो. नंतर मात्र मी माझ्या नोकरीचा राजीनामा दिला आणि पूर्ण वेळ शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी मग जागा शोधायला सुरुवात केली, तेव्हा बदलापूरजवळची एक जमीन आम्हाला पसंत पडली आणि बदलापूरपासून ६ किलोमीटर अंतरावरच्या बेंडशीळ गावी एक एकरचं उजाड माळरान आम्ही विकत घेतलं.
आपण मूळ पुण्याचे, मग इथे बदलापूरला शेती करायचं कसं ठरलं?
हो. आमचं कुटुंब खरं तर मूळचं पुण्याचं. माझ्या वडिलांची फिरतीची नोकरी. मुंबईला त्यांची बदली झाल्यावर मग आम्ही डोंबिवलीला घर घेतलं. पुण्यात रस्ते विस्तारीकरणात आमचं घर जमीनदोस्त झालं, तेव्हा मग आमचं सगळंच कुटुंब डोंबिवलीला शिफ्ट झालं. डोंबिवलीजवळ एखादी जमीन घ्यावी, ती जागा शांत असावी म्हणून मग बदलापूरची जागा पसंत केली.
शेती करतानाही आपण ‘निसर्ग शेती’ करण्याचं ठरवलंत, त्यामागे काय कारण होतं?
हो, कारण मी तुम्हाला म्हटलं तसं मला निसर्गाच्या जवळ नेणारी शेती करायची होती. मी पर्यावरणतज्ज्ञ दिलीप कुलकर्णी यांचं ‘निसर्गायण’ हे पुस्तक वाचलं आणि मी झपाटून गेलो. त्यांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. तेव्हाच ठरवलं होतं की, शेती केली तर नैसर्गिक शेतीच करायची. पर्यावरणाचा समतोल राखणारी, रासायनिक खतं, बीजं, याशिवाय नैसर्गिक स्रेतांचा वापर करणारी शेती करायची.
शेतीचा सुरुवातीचा अनुभव कसा होता? खूप अडचणी आल्या असतील?
सुरुवात खूप खडतर होती, कारण मी जी जमीन घेतली होती तिथे पूर्ण माळरान होतं. इतकंच नाही तर स्टेशनपासून तिथे जायला रस्ता नव्हता. जमिनीलगत एक पाण्याचा ओढा होता. त्याला पूल नव्हता. पावसाळ्यात तर इतकी वाईट परिस्थिती असायची की, अक्षरश: पाण्यातून पोहत जावं लागायचं. राहायला घर नव्हतं. आमचं पुण्यातील पडलेल्या घराच्या सामानातूनच आताचं हे घर उभं केलं. १९०४ मधले पुण्याच्या घराचे पत्रे आजही आमच्या या शेतातल्या घराला वापरतो आहोत. गावात तेव्हा वीजही नव्हती. शेतात सगळीकडे तण वाढलेलं होतं. एकही झाड नव्हतं. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे, मला शेतीविषयीचं फारसं ज्ञान नव्हतं. जे काही येत होतं, ते कुठेतरी वाचलेलं होतं. मग मी सुरुवातीला ज्यांची शेती आहे, अशा ठिकाणी जाऊन त्यांच्या शेतीचा अभ्यास करायचो. मग लक्षात आलं, माळरानात शेती करायची तर त्याचाही एक पूर्वापार पॅटर्न ठरलेला असतो. आपली जागा, प्रकार, हवामान आणि गरजा या तिन्हींचा विचार करून घराला लागणा-या जास्तीत जास्त गोष्टी आपल्याला पिकवता येतील का? या दृष्टीने मग मी विचार करून कोणती पिकं घ्यायची हे ठरवलं. निकृष्ट जमीन सुपीक करण्यासाठी मग सेंद्रिय खत वापरावं म्हणून गावातून शेणखत विकत घ्यायचो. पण जागेच्या मानाने ते कमी वाटू लागलं. म्हणून मग दूध आणि शेणासाठी पाच म्हशी व दोन गाई विकत घेतल्या. जवळपास सात र्वष ट्रायल अॅण्डएरर अशा पद्धतीने कडधान्य, भात तसंच काही पालेभाज्यांचं उत्पादन मी घेतलं.
शेती करताना तुम्ही खूप वेगळे प्रयोग केले?
हो. कारण शेती करताना लक्षात आलं की, नुसतं शेणासारखं सेंद्रिय खत वापरून शेती करणं उपयोगाचं नाही, तर जोडीने पिकाचे अवशेष, त्यांचाही खत म्हणून विचार करायला हवा. झाडांचा पाला, पिकाचे अवशेष जागेवरच कुजवणं यातूनही खतनिर्मिती होऊ शकते. यासाठी मी शेतीत काही प्रयोग करून पाहिले. जमिनीवर पाला पडला की, आपोआप त्याचं आच्छादन होतं. सूर्यप्रकाश थेट जमिनीवर न पडल्याने ओलावा टिकून राहतो. त्यातून जमिनीतल्या सूक्ष्म जीवांची वाढ होते. त्यामुळे आपोआपच जमिनीची सुपीकता, उत्पादकता वाढते. सूक्ष्म जीव आणि गांडूळ, पिकांच्या अवशेषांचं विघटन करतात, त्यामुळे आपोआप चांगल्या प्रतीचं निसर्गनिर्मित खत मिळतं. दुसरा फायदा म्हणजे, गांडुळांची संख्या वाढल्यामुळे जमीन सच्छिद्र होते. त्यामुळे जमिनीच्या आतले मातीमधले अशुद्ध वायू बाहेर जायला जागा निर्माण होते. साहजिकच जमिनीत ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. जमीन सुपीक करणारे जीवाणू अशा प्रकारे मातीत निर्माण होत राहतात. यामुळे पडलेला पाऊस जमिनीत झिरपतो. यालाच आजच्या भाषेत रेन हार्वेस्टिंग असं म्हणतात. म्हणजे बघा, अशा पद्धतीने शेती केल्याने एकीकडे पाण्याची सोय झाली. जमीन सुपीक झाली. पाणी जमिनीत जिरलं. मातीचंही चांगल्या प्रकारे संवर्धन झालं.
कोणत्या पद्धतीने शेती करावी? कशी करावी याचा विचार कसा केलात?
शेती करताना ती बहुपीक, बहुस्तरीय अशा पद्धतीने करायचं ठरवलं. पीक पद्धतीत दीर्घायुषी (आंबा, नारळ), मध्यमआयुषी (सीताफळ, पपई, केळी), अल्पायुषी (वांगी, मिरची, भात) आणि अत्यल्पायुषी (पालेभाज्या, फूल) असे प्रकार असतात. मग मी त्यांचा अभ्यास करून, ३० दिवसांपासून ते ९० वर्षापर्यंत कशा पद्धतीने आपल्याला शेती करता येईल याचा विचार केला. त्यासाठी ३० दिवसांत उत्पन्न देणा-या पालेभाजीपासून ९० र्वष उत्पन्न देणा-या नारळापर्यंत कोणतं पीक घ्यायचं, याचं नियोजन केलं. अशा म्हणजे झुडपाच्या स्वरूपात अडुळसा, वेल स्वरूपात गुळवेल असा विचार केला. वनस्पतींचा तिसरा प्रकार म्हणजे घरबांधणीसाठी (साग, शिसं) लाकूड, तर खतासाठी वापरता येतील अशा वनस्पती (कुडी, हिरवळीची रोपं) हा चौथा प्रकार. वृक्ष लागवड करतानाही मी बराच विचार केला. म्हणजे मध्यम आकारातील वृक्ष (गिरीपुष्प), वातावरण सुगंधित करणारे वृक्ष म्हणजे सोनचाफा, सुरंगी, झुडपात अडुळसा, अनंत, कवठीचाफा, वेलांमध्ये जाईजुई आणि इंधनाचा विचार करून विलायती चिंच, आपटा अशा झाडांची लागवड केली.
अशा पद्धतीने झाडं लावण्याला बहुविविधता असं म्हणतात. शेताच्या पश्चिम आणि दक्षिणेला अशा प्रकारची वनस्पती एकत्र लावून त्यांची हिरवी भिंत मी कम्पाउंडसारखी शेताभोवती उभी केली. नियोजन करतानासुद्धा अशा पद्धतीने केलं की, पहिल्यांदा मोठा वृक्ष, त्याच्याखाली छोटा वृक्ष, त्याच्याखाली झुडपं आणि वृक्षांवरती वेली. म्हणजे एकाच वेळेस यातून माझी अन्न, जळण, खत यांची गरज पूर्ण झाली. वातावरण सुगंधित झालं. वन तयार झालं, त्यामुळे आपसूकच तिथे पक्षी आणि कीटक आले. एक नैसर्गिक चक्र पूर्ण झालं. या वृक्षांच्या श्वासोच्छ्वासामुळे शेताच्या आतलं तापमान बाहेरच्यापेक्षा पाच अंशांनी कमी राहण्यास मदत झाली. तसंच बाहेरच्यापेक्षा १० ते २० टक्के आर्द्रता अधिक राखली गेली. या सगळ्याचा झाडाच्या वाढीसाठी आणि परागीभवनासाठी चांगला फायदा झाला.
एकूण किती प्रकारच्या वनस्पती तुम्ही तुमच्या शेतात लावल्या आहेत?
मी जवळपास ८७ प्रकारच्या वनस्पतींची लागवड केली आहे. उदा. बांबू. यातला काटेबांबू प्रकार घेतला तर तो ४० ते ५० फूट वाढतो, ज्याचा उपयोग शिडी, झोपडी बांधणीसाठी होतो.) दुसरा प्रकार भरीव बांबू (मेस), जो लवचिक असतो. तिसरा प्रकार पोकळ बांबू, जो मंडप उभारणीसाठी व इतर कामांसाठी वापरला जातो. बांबू मातीची धूूप थांबवतात. त्यांच्या पानांमध्ये सिलिकॉन नावाचा घटक असतो, तो पिकांना कणखर करतो. अशा पद्धतीच्या वनस्पती लावल्या की, परत त्याचा घरबांधणी, खत, जल आणि मृदसंधारण यासाठी उपयोग होतो. प्रत्येक वनस्पतीची लागवड करताना, मी याच पद्धतीने विचार केला.
एकाच पिकाच्या वेगवेगळ्या जातींची लागवड करण्यामागे काय विचार होता?
एकाच पिकाच्या वेगवेगळ्या जाती लावण्यामागे अनेक उद्देश होते. उदा. आंबा. आंब्याचा वापर आपण लोणच्यासाठी, रसासाठी करतो, कापून खाण्यासाठीही तो आपण वापरतो. म्हणजे काय तर लोणच्यापासून ते खाण्यापर्यंतच्या गरजा त्यातून आपण पूर्ण केल्या. यातही आंब्याच्या विविध ५० जाती लावल्या. या जातींप्रमाणे त्यांच्या उत्पादनाचा कालावधी वाढला. उदा. हापूसचं पीक मेमध्ये घेतलं. चौसा प्रकारच्या आंब्यातून जुलै अखेरीपर्यंत उत्पन्न मिळालं. तीन महिने सातत्याने आंब्याच्याच वेगवेगळ्या जातींचं उत्पादन मिळालं. त्यामुळे काय घडलं की, वेगवेगळ्या कालावधीत फळ आल्यामुळे पीक विकायला अडचण येत नाही. त्याचा मोबदलाही चांगला मिळतो.
शेती करताना आपण बहुपीक पद्धती अवलंबली?
बहुपीक पद्धती म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पिकं हंगामानुसार शेतात लावणं. बहुपिकाच्या पुढचा प्रकार म्हणजे बहुस्तरीय बहुपिकं पद्धती. उदा. आंब्याचं झाड. त्याखाली हळदीचं पीक घेतलं. दुसरं नारळाचं पीक घेताना सोबत सुपारी, काळीमिरी घेतली. इथे नारळ उंच, त्याखाली सुपारी मध्यम उंचीवर आणि त्याच्या खोडावर काळी मिरी लावली, सुपारीच्या मधल्या जागेत केळी, त्याखाली कॉफी-कोको, त्याखाली हळद किंवा अननस आणि जमिनीवर लेंडीपिंपळी लावली. नुसतंच एक पीक घेण्याऐवजी त्याच हंगामात मिळू शकणारी अनेक पिकं एकत्र घेणं म्हणजेच बहुपीक पद्धती.
हंगामाचा विचार करताना इतर हंगामी पिकांची लागवड तुम्ही कशा पद्धतीने करता?
हंगामी पिकांमध्येसुद्धा बहुस्तरीय, बहुपीक पद्धतीचा अवलंब केला. मांडवावरती वाढणा-या वेलवर्गीय भाज्या उदा. दुधी भोपळा, कारली, तोंडलीचं उत्पन्न मिळण्यासाठी अडीच महिने लागतात. मांडवाखाली रिकाम्या जागेत पालेभाजी लावली, जी तीस दिवसांत मिळते. मूग किंवा चवळी सत्तर दिवसांत मिळते. म्हणजे इथे मी उपलब्ध जागेचा, पाण्याचा व मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर करत जागेचा वापर केला. एकाच वेळेस योग्य अंतरावर मी एकाच काळात अनेक पिकं घेऊ शकलो. चवळी आणि मुगाने जमिनीत नत्र स्थिर केलं. वर कडधान्य मिळालं. पिकांचे उरलेले अवशेष तिथेच कुजू दिले, त्यामुळे तिथल्या जमिनीची सुपीकता व उत्पादकता टिकून राहिली. आपोआप खताचा खर्च वाचला. पाण्याचं नियोजन झालं आणि आर्थिक फायदाही झाला. बरेचदा बहुतेक शेतकरी एकपीक पद्धती अवलंबत असल्यामुळे त्यांना पिकासाठी बरीच वाट पाहावी लागते. आपल्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्याची क्षमता या बहुपीक पद्धतीत आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही.
या पद्धतीचा फायदा काय?
१) उत्पादनाचं सातत्य २) पिकांचे वेगवेगळे प्रकार ३) उपलब्ध जागेचा, पाण्याचा आणि मनुष्यबळाचा सुयोग्य वापर ४) जमीन कायम मृत किंवा जिवंत पिकांच्या अवशेषांनी आच्छादित राहते ५) जमिनीच्या आतील वेगवेगळ्या खोलीवरती अन्नद्रव्यं वापरणं आणि पुनर्भरण होणं या क्रिया पूर्ण होतात, असे अनेक फायदे होऊ शकतात.
पिकांचं संरक्षण कशा पद्धतीने करता?
शेतातल्या बहुपीक पद्धतीमुळे जमिनीची सुपीकता वाढते. सशक्त जमिनीत वाढणा-या वनस्पतींना रोगाचा प्रादुर्भाव मुळात कमी होतो, शिवाय ज्या पद्धतीने शेती इथे केली जाते. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारचे कीटक शेतात येत असतात. या कीटकांपैकी ५ ते १० टक्के कीटक वनस्पतींना हानिकारक असतात. त्यांना आपण कीड म्हणतो. हे कीटक वनस्पतींच्या रसावर जगतात. उरलेले ९० टक्के कीटक हे मांसाहारी असतात. ते दुस-या कीटकांना खातात. म्हणजेच काय तर निसर्गाच्या अन्नसाखळीमध्ये कोणालाही एकाला कायम प्रभुत्व गाजवता येत नाही. कीटक एकमेकांना खाऊन जगतात. त्यामुळे पिकाचं विशेष नुकसान होत नाही. उलट मधमाशांसारख्या कीटकांचं संवर्धन होतं आणि तरीही कीड वाढलेली दिसली तर वनस्पतीनिर्मित कीटकविरोधक औषधं आपल्याला शेतातल्या सामग्रीतून तयार करता येतात. उदा. कडुलिंब आणि गुळवेल. त्यांच्यापासून तयार केलेला फवारा मारावा. एक गंमत माहिती आहे का? क नावाने सुरू होणा-या वनस्पती या बरेचदा कडू असतात. त्या वनस्पतींची ताजी पाने पाण्यात कुजवून त्या पाण्याची फवारणी पिकांवर केली तर त्या पिकांवर कीड खूपच कमी प्रमाणावर येते. जी येते ती पानं कडू असल्यामुळे हळूहळू मरते. आधुनिक विज्ञानाने जैविक कीडनाशकंसुद्धा तयार केली आहेत. ती वापरूनही आपण पिकांचं संरक्षण करू शकतो. सशक्त पिकासाठी आणखी एक पारंपरिक उपाय आपल्या पूर्वजांनी केला आहे. तो म्हणजे गणपतीच्या मूर्ती विसर्जनानंतर जी माती उरते ती, त्यात तूप, पाला, पाणी यांचं योग्य प्रमाण घेऊन जर झाडात, शेतात, पिकात टाकली असता त्यातून लक्षावधी उपयुक्त जीवाणू तयार होतात व वनस्पतीची अन्नाची गरज त्या माध्यमातून भागवली जाते.
तुम्ही शेतकरी आणि सर्वसामान्य यांच्यासाठीसुद्धा शेतीविषयक शिबिरं घेता, ती कशा प्रकारची असतात?
समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आम्ही अभ्यासवर्ग, पर्यावरण निरीक्षण वर्ग घेत असतो. वैयक्तिक पातळीवरही जर कोणाला शेतीविषयक सल्ला, माहिती हवी असेल तर ती आम्ही देतो. पर्यावरण जाणीव वृद्धिंगत करतानाच, आपण सारेच जे अन्न खातो, बरेचदा ते किती विषयुक्त असतं. तसंच त्यांचा वापर किती निसर्गविरोधी आहे याची जाणीव लोकांना आम्ही या शिबिरातून करून देत असतो. बरेचदा शहरी लोकांना भाजी कशी पिकते, याची माहिती नसते. उदा. नवलकोल कसा पिकतो? जमिनीवर की जमिनीखाली? या प्रकारची सगळी माहिती आम्ही शिबिरातून देतो. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे लोकांचा, शेतक-यांचा विश्वास वाढतो.
शालेय मुलांकरिताही शेतीविषयक शिबिरं घेता?
हो. लहान मुलांकरिता आम्ही आमच्या शेतात खास शिबिरं घेतो. याचा उद्देश पुस्तकातला निसर्ग प्रत्यक्ष कसा आहे, हे मुलांना कळावं हा असतो. त्यात निसर्ग वाचन, निसर्ग निरीक्षण, पर्यावरण जाणीव आणि अभ्यास याबद्दलची माहिती आम्ही देतो. आपल्या पर्यावरणाची काळजी आपण कशी घ्यावी, हेही मुलांना शिकवतो.
सध्याच्या शेतीपद्धतीविषयी काय सांगाल?
आताच्या प्रचलित शेतीपद्धतीत जास्तीत जास्त गोष्टी बाहेरून विकत आणून शेती करण्यावर भर आहे. उदा. खत, बियाणं, कीटकनाशकं. या सा-यासाठी व्यवस्थेवर अवलंबून राहिलं जातं, त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि विक्रीतून मिळणा-या पैशांचा ताळमेळ खर्चाशी न लागल्यामुळे आज अनेक शेतकरी आत्महत्या करतात. मात्र सेंद्रिय शेतीपद्धतीत उत्पादन खर्च अतिशय नगण्य असतो. ख-या अर्थाने ही शेती फायद्याची ठरते. म्हणूनच सेंद्रिय शेती कशी करावी, याचे अभ्यासवर्ग आम्ही शेतावर घेतो. शेती व्यवसायाला जोड म्हणून इथे पर्यटनाचा पर्यायही देतो आहे. या प्रकारे शेतकरी चांगलं उत्पादन मिळवू शकतात.
या कामात आपल्या कुटुंबाचा सहभाग किती असतो?
त्यांचा सहभाग आहे, म्हणूनच मी हे काम करू शकलो. आमचं एकत्र कुटुंब आहे. माझी पत्नी संगीता ही पर्यटन आणि शेती व्यवस्थापनामध्ये मला मदत करते. माझा भाऊ व त्याची पत्नी हे गरज पडल्यास आर्थिक मदत करतात. माझा मुलगा अॅग्रिकल्चरचा पदवीधर आहे. त्यानंतर त्याने अॅग्रिबिझनेसही केलं आहे. त्यामुळे शेतीत नवीन प्रयोग करताना त्याचीही मदत होते. तुम्हाला गंमत सांगतो, त्याने जेव्हा अॅग्रीच्या पदवीसाठी अर्ज केला, तेव्हा त्याच्यासोबत मीही अर्ज केला व रितसर सहा वर्ष शेतीचं शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलं. माझे आई-बाबा यांचही नेहमीच मार्गदर्शन मला मिळालं. या सा-यांच्या सहभागातून, प्रोत्साहनातून मी शेतीत हे परिवर्तन करू शकलो.
इतर कोणते उपक्रम राबवता?
ताणविरहित जीवन जगण्याचं प्रशिक्षणही देतो. याव्यतिरिक्त गेली आठ र्वष रायगड जिल्ह्यातल्या ‘शेअर’ व ठाणे जिल्ह्यातलं ‘कर्म’ या अशासकीय संस्थांमधून शेतीआधारित ग्रामीण विकास कार्यक्रमासाठी मी सल्लागार म्हणून काम केलं आहे, करत आहे.
शेतीव्यतिरिक्त दुसरे कुठले छंद?
चित्र काढणं, फोटोग्राफी, गिर्यारोहण असे सारे निसर्गाशी निगडित छंद. फोटोग्राफी आणि गिर्यारोहणाचे तर मी रीतसर कोर्सही केले आहेत. त्याशिवाय मला खूप वाचायला आवडतं. आताही कृषिविषयक पुस्तकं वाचून मी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो.
महाराष्ट्र सरकारचा ‘कृषिभूषण पुरस्कार’ नुकताच आपल्याला मिळाला आहे. त्याबद्दल काय वाटतं?
खूप आनंद झालाय. सेंद्रिय शेतीसाठी शासन तीन वर्षापासून विभागवार कृषिभूषण पुरस्कार देतं. शेतक-याला शाबासकी देण्यासोबत, राज्य दुस-या हरित क्रांतीच्या माध्यमातून शाश्वत विकास करण्याचं प्रशंसनीय धोरण राबवणं हा त्यामागचा हेतू आहे. दरवर्षी दहा टक्के जमीन सेंद्रिय शेतीखाली वाढवत जाण्याचं उद्दिष्ट सरकारने डोळ्यांसमोर ठेवलं आहे. मला कोकण विभागासाठी २०१२चा कृषिभूषण पुरस्कार या वर्षी देण्यात आला. मला वाटतं, हा पुरस्कार माझा नसून मी केलेल्या शेतीपद्धतीचा आहे आणि ही शेतीपद्धती प्रत्यक्ष कृतीत उतरण्यासाठी ज्या ज्या गुरूजनांनी, मार्गदर्शकांनी मदत केली त्यांचा हा सत्कार आहे.
अलीकडे ग्लोबल वॉर्मिगची खूप चर्चा होतेय. अशा पद्धतीने केलेला निसर्गशेतीचा प्रयोग त्यासाठी किती लाभदायक आहे, असं तुम्हाला वाटतं?
मला वाटतं निसर्गशेतीमुळे ८० ते ९० टक्के इतक्या प्रमाणात ग्लोबल वॉर्मिग रोखता येऊ शकते. त्याचबरोबर त्याचे दुष्परिणाम रोखण्यासही मदत होते. उदा. मुसळधार पाऊस पडला की, जमिनीची धूप होते, ती या शेतीमुळे टाळली जाते. आपोआप पाण्याचं जलसंधारण होऊन पाण्याची भूगर्भपातळी वाढते. विषयुक्त अन्न न मिळून आरोग्याची समस्या सोडवली जाते. पिकांचे जे अवशेष व तण आहेत, ते जागेवरच कुजण्यामुळे तयार होणारा कार्बन डायऑक्साइड शोषून घेण्यासाठी तिथे वनस्पती असतेच, त्यामुळे कार्बन डायऑक्साइड वातावरणात जात नाही. साहजिकच ऑक्सिजनचं प्रमाण आपोआप वाढतं. किमान तेवढय़ा जागेपुरतं तपमान नियंत्रित राहतं. याचबरोबर कीटक आणि पक्षी यांना पोषक वातावरण मिळून त्यांचंही संरक्षण आणि संवर्धन होण्यास मदत होते. तसंच उपलब्ध जागा अधिकाधिक वृक्षाच्छादित झाल्यामुळे पर्यावरणीय समतोल राखला जातो. या सगळ्या पद्धतीला जागतिक पातळीवर व विद्यापीठ स्तरावर एकात्मिक शेतीपद्धती किंवा शाश्वत शेतीपद्धती म्हणतात. यंदाच्या वर्षासाठी युनोचं घोषवाक्य ‘कुटुंबासाठी शेती’ असंच आहे. ही शेतीपद्धती पूर्णपणे कौटुंबिक गरजा भागवणारी आहे, त्यासोबतच जल व वायुप्रदूषण टाळणारी आहे. म्हणूनच मला असं वाटतं, ज्यांच्याकडे लहान-मोठी जागा आहे त्यांनी त्या जागेत अशा पद्धतीने शेती केल्यास कौटुंबिक, सामाजिक गरजा भागवता येतीलच, पण समाजहितही साधलं जाईल.
i am eager to see agriculture farming kindly give e mail and mobile of mr rajendra bhatt by which appoinment would be taken prior to visit ,thanks and awaiting for reply
congratulation , very good information , pl give address details with mobile no and e mail id etc
Very good information