नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन २६ मे रोजी एक वर्ष झाले. एका वर्षात आपण काय तीर मारले ते मोदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत. मोदी सारे सांगतात.
नरेंद्र मोदी सरकारला सत्तेत येऊन २६ मे रोजी एक वर्ष झाले. एका वर्षात आपण काय तीर मारले ते मोदी बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत. मोदी सारे सांगतात. पण आपण लोकांना काय कबूल केले होते, त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत.
शेतक-यांना त्यांच्या मालाला चांगला भाव देण्याचे मोदींनी कबूल केले होते. तो विषय ते काढत नाहीत. ‘काँग्रेसने ६० वर्षात काही केले नाही. आज जे जे काही आहे ते काँग्रेसचे पाप आहे’ असे सांगून मोदी स्वत:ची सुटका करून घेऊ पाहत आहेत.
आपल्या सरकारवर वर्षभरात कुणी भ्रष्टाचाराचा आरोप करू शकले नाही, असे मोदी छाती ठोकून सांगतात; पण भ्रष्टाचाराचे ‘दर वाढले’ याबद्दल ते बोलत नाहीत. मोदींकडे जादूची कांडी नाही.
एका वर्षात ते हा १२५ कोटी लोकसंख्येचा देश सुधारू शकत नाहीत, हे जनतेलाही माहीत आहे. पण मग खोटी आश्वासने का दिली? मोदी म्हणतात, मी सत्तेत येण्याआधी लोकांना आपण भारतीय आहोत हे म्हणण्याची लाज वाटायची. असे आहे तर मग एक लाख भारतीयांनी या वर्षभरात दुबईचे नागरिकत्व का मागितले? देश लुटू पाहणा-यांना वाईट दिवस आले, असे मोदी म्हणतात म्हणजे सारा देश लुटारू आहे का? कारण मूठभर उद्योगपती सोडले तर सर्वाचेच वाईट दिवस सुरू आहेत. एक माणूस सुखी नाही. सरकार घोषणांचा नुसता पाऊस पडत आहे. कामाच्या नावाने बोंब.
‘टोल का खेल मैने शुरू किया, मैं ही उसे खतम करुंगा’ असे म्हणणारे नितीन गडकरी आता ‘रस्ते चांगले हवे असतील तर टोल द्यावाच लागेल’ असे म्हणत आहेत. फुकटात काहीही मिळणार नाही, असे सांगत फिरत आहेत. मोदी आल्यानंतर मार्केट उठेल, असे उद्योग क्षेत्राला वाटत होते. त्यांचीही निराशा झाली आहे. नवी गुंतवणूक नाही, म्हणून नव्या नोक-या नाहीत. मार्केट ठप्प आहे. कारण मालाला उठाव नाही. परवा ऐकले की, स्टील कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
विदर्भाची परिस्थिती सांगायची झाली तर भयंकर आहे. शेतकरी आत्महत्या, बालकांचे कुपोषण, नक्षलवाद आणि बेरोजगारी या समस्या मोदी येण्याआधी होत्या. आजही आहेत. उलट अधिक गंभीर झाल्या आहेत. खरे तर काँग्रेसने मोदींवर ४२०चा गुन्हा दाखल करायला पाहिजे. सारे पाप काँग्रेसवर ठोकून मोदी मोकळे होऊ पाहत आहेत. त्यांचे १०० गुन्हे माफ केले तरी एक गुन्हा माफ होऊ शकत नाही. त्यांनी या देशातील शेतक-यांचा विश्वासघात केला.
शेती आणि शेतीवरची वर्षभरातली संकटे त्यांनी ज्या पद्धतीने हाताळली त्यामुळे आधीच मरणासन्न असलेली ग्रामीण अर्थव्यवस्था आज मोडीत निघाली आहे. खेडय़ांमध्ये तुम्ही फिरून पाहा. शुकशुकाट आहे. स्मशानशांतता आहे. शेतीत पिकले नाही. दुसरा उद्योग नाही. त्यामुळे हाताला काम नाही. खिशात पैसे नाहीत. पुढच्या महिन्यात पेरणी सुरू होत आहे. जुने कर्ज असल्याने नवे कर्ज त्याला मिळू शकत नाही.
कशी कसायची त्याने शेती? मोदी गप्प आहेत. त्यांचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गप्प आहेत. आजही यवतमाळ जिल्ह्यात दिवसाला एक शेतकरी आत्महत्या करतो आहे. शेतक-यांचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे हे प्रमाण आणखी वाढण्याची भीती आहे.
महाराष्ट्राचे राजकारण एवढे अस्थिर कधीही नव्हते. कोण कुठे आहे, कुणासोबत आहे हेच कळत नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे तब्बल १५ र्वष सत्तेत होते. अंगमस्तीने दोघांना विरोधी बाकांवर बसवले. तिथेही कुरघोडय़ा सुरू आहेत. राष्ट्रवादीला तर भाजपासोबत सत्तेची स्वप्नं पडत आहेत. सशक्त विरोधी पक्ष नसल्याने भाजपाचे फावले आहे. त्यांना कुणी जाब विचारणारा नाही. मनमानी सुरू आहे.
नावाला युती सरकार आहे; पण भाजपा आणि शिवसेना यांच्यात समन्वय नाही. दोघेही एकदिलाने काम करताना दिसत नाहीत. शिवसेनेला तर या सरकारशी काही घेणे-देणे नाही. तशीच त्यांची वागणूक आहे. एकटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खिंड लढवताना दिसत आहेत. पण सरकार एकाच्या भरवशावर चालत नसते. टीमवर्क लागते. ते नसल्याने सरकारचा प्रभाव जाणवत नाही. ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमा जपण्याच्या धडपडीत फडणवीस यांचा ‘पृथ्वीराज चव्हाण’ झाला आहे.
‘फाईल सेन्सिटिव्ह’ झाले आहेत. ऊस, कापूस, दूध उत्पादकांचे प्रश्न अधिक गंभीर होत चालले आहेत. पण कुठेही आंदोलन नाही. आंदोलकच सत्तेत आल्याने आंदोलन करणार कोण? राजू शेट्टी सोडले तर कोठेही कुणी जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करताना दिसत नाही. अण्णा हजारे ‘सुट्टीवर’ असल्याने सरकारची चंगळ आहे.
जैतापूर प्रकल्पाचेच पाहा ना. या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे. पण सत्तेच्या खुर्चीला चिकटून राहायचे म्हणून ते भाजपाशी दोन हात करायला तयार नाहीत. विरोध चालू आणि सत्तेची मलाईही चालू असा नवा फंडा आला आहे. त्यामुळे शरद पवार यांचा मध्यावधी निवडणुकांचा अंदाज चुकणार असे दिसते. एकदा सत्तेची चटक लागली की, सोडता सोडवत नाही. उद्धव ठाकरे ताणून धरतील. पण तुटेल एवढे ताणणार नाहीत. आता तर सेनेच्या मंत्र्यांना लालदिव्याची सवय झाली आहे. त्यामुळे भाजपा आणि शिवसेना यांच्यात मतभेद वेळोवेळी प्रकट होत असले तरी सरकारला धोका नाही.
गडबड झाली तर हाताशी असो, या हिशोबाने मुख्यमंत्र्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांमागे एसीबीच्या चौकशा लावून दिल्या आहेत. त्यामुळे तुम्ही पाहा. अजितदादा पवार, छगन भुजबळ, सुनील तटकरे.. राष्ट्रवादीचे सारे नेते सुतासारखे सरळ आले आहेत. काँग्रेसचे हाल तर विचारू नका. महाराष्ट्राला नेतृत्वच राहिलेले नाही. देवेंद्र मुख्यमंत्री आहेत. पण महाराष्ट्राचे नेते त्यांना म्हणता येणार नाही. मोदींनी बोट दिले म्हणून ते सीएम झाले. बोट सुटले की सारेच सुटले. मंत्री झाला म्हणजे माणूस नेता होत नसतो. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे नेते होते. त्या दर्जाचे नेतृत्व आज राहिलेले नाही. मोदी हे नेते नाहीत. तो एक मार्केट ब्रँड आहे.
एकेकाळी देशाला नेते पोहोचवणा-या महाराष्ट्राची आज दयनीय अवस्था आहे. शरद पवार, सुशीलकुमार िशदे थकले. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आपसात लढत आहेत. अशोक चव्हाण, राधाकृष्ण विखे-पाटील, बाळासाहेब थोरात, हर्षवर्धन पाटील, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. केवळ ‘पुण्यतिथी’ साजरी करून मोदींचे काही वाकडे होणार नाही. ते पाच वर्षासाठी आले आहेत, त्यांच्याशी लढायचा दम कुणात आहे?
faarch surekh lekh .
लेख सुंदर आहे. शेवटची ओळ आवडली… “त्यांच्याशी लढायचा दम कुणात आहे?”
पण … गेल्या १५ वर्षात झालेली परिस्थिती बघता … मोदींकडून आशा आहे … considering the damage done so far… and changing economy and globalization.. a business man with dictatorial touch may run the country in better fashion.. otherwise ५ वर्ष युती टिकवण्यात व तडजोडीत जातात.. काही concrete बदल घडून येत नाहीत.