मुंबई पोलिस दलातील वादग्रस्त अधिकारी वसंत ढोबळे यांची बदली करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी जोरदार टीका केली.
मुंबई- अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणा-या सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांची बदली केली जात असेल, तर कोणता पोलिस अधिकारी अनधिकृत कामांना आळा घालण्याची हिंमत दाखवणार? हा तर पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा उद्योग सुरू आहे, अशी टीका करत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी वसंत ढोबळे यांना पाठिंबा दिला आहे. परप्रांतीय फेरीवाल्यांना पाठीशी घालण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही ठाकरे यांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी तब्बल चार महिन्यांनंतर पत्रकार परिषद घेऊन मंगळवारी मौन सोडले. अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणा-या सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत ढोबळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. अनेक ठिकाणी मराठी फेरीवाल्यांना हटवले आहे. परंतु परप्रांतीय फेरीवाल्यांवर कारवाईची वेळ आल्यास पोलिस अधिका-यांचीच बदली केली जाते. जे अनधिकृत आहे ते हटवलेच पाहिजे. फेरीवाल्यांमुळे पदपथावर चालताही येत नाही. या फेरीवाल्यांमुळे शहराची वाट लागली असताना सरकार प्रशासकीय कामात ढवळाढवळ करत आहे. मग हे दुष्टचक्र तोडायचे कोणी, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला. शहरातील लोकसंख्येच्या दोन टक्के फेरीवाले ठेवण्यास मंजुरीचा प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे. मुंबईची लोकसंख्या एक कोटींहून अधिक आहे. मग दोन लाख फेरीवाल्यांना कुठे ठेवणार? ढोबळेंना आणा किंवा नका आणू पण पदपथावरून चालण्यास जागाही उरणार नाही, असे ठाकरे यांनी सांगितले.
तर मनसे रस्त्यावर उतरणार
फेरीवाल्यांनी आझाद मैदान येथे आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला आहे. त्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला तर मनसेला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
पोलिसांचे मानसिक खच्चीकरण करण्याचा उद्योग
अनिधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करणा-या पोलिस अधिका-यांची बदली होणार असेल तर, अशी कारवाई करण्यासाठी कुठला पोलिस अधिकारी समोर येईल असा सवाल राज यांनी उपस्थित केला. यावेळी राज यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही टीका केली. वसंत ढोबळे यांची बदली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय पटलेला नाही. पण तो मुख्यमंत्र्यांचाअधिकार असल्याने आम्हाला मान्य आहे असे अजित पवार सांगतात. मग मुख्यमंत्र्यांचा श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय त्यांना का नाही पटला ? स्वत:च्या सोयीच ते मान्य करायच आणि जे स्वत:च्या अडचणीच असेल त्याला विरोध करायचा या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीका केली.
दरम्यान, राज ठाकरे येत्या १० फेब्रुवारीपासून महाराष्ट्राच्या दौ-यावर निघणार आहेत. जवळपास महिनाभराहून अधिक काळ हा दौरा चालणार आहे.
मोर्चा काढला तर फेरीवाल्यांना मनसेची ताकत दाखवू असा सज्जड दम त्यांनी दिला… it is correct to say and it is our right.